पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्यामुळे जिल्ह्यात एसटी महामंडळ तोट्यात तर रेल्वेची मालवाहतूक निम्म्याने घटली आहे. नोटा बदलण्यापासून तर पैसै काढणे आणि पैसा खात्यात भरण्याची आर्थिक उलाढालही गेल्या १० ते १२ दिवसात कोट्यवधींमध्ये गेली आहे. या साऱ्या स्थितीचा आढावा राज्याचे मुख्य सचिव स्वधीन क्षत्रीय यांनी घेतला आहे. चलनात सुटै पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)द्वारे राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी नोटाबंदीच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. गेल्या दहा दिवसानंतर राज्यात नोटा रद्द झाल्यामुळे काय परिणाम झाला याचा आढावा आता राज्य सरकारने घेण्यास सुरुवात केली असून, त्यात कशी सुधारणा करण्यात येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे याबाबत त्यांनी माहिती घेतली.
बसला फटका
नोटा रद्द झाल्यामुळे मनमाड, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, येवला, लासलगाव या बसस्थानकावर १२ ते १६ टक्के वाहतुकीत घट झाली आहे. त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे उर्वरित बसस्थानकावर ५ ते ८ टक्के घट झाली आहे.
रेल्वेची वाहतूक निम्मी
नाशिक जिल्ह्यातून मनमाड, येवला, लासलगाव, खेरवाडी, नांदगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची वाहतूक रेल्वेच्या रॅकने केली जाते. त्यामुळे या दहा दिवसात त्यात मोठी घट झाल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. एका रॅकसाठी रेल्वे १८ लाख ते २० लाखापर्यंत भाडे आकारते. पण कांद्याचे लिलाव बंद पडल्यामुळे त्याचा परिणाम झाला असल्याचे बोलले जाते.
भाजीपाल्यालाही फटका
नाशिक हे देशाचे किचन म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील भाजीपाला मुंबईसह देशातील अन्य राज्य आणि शहरांमध्ये पुरवली जातो. कांद्याबरोबरच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले असून, ११ ते १४ नोव्हेंबर या काळात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. गेल्या १-२ दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्वपदावर आले आहेत.
माहिती गोळा?
नोटा रद्द झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालायतून नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रमुख व्यापाऱ्यांना रोज फोन करुन व्यापारावर काय परिणाम झाला याची माहिती गोळा केली जात होती. याबाबत अनेक व्यापाऱ्यांना प्रश्न पडला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट