वाहतूक पोलिसांनी गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दंड नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबरअखेर वसूल केला आहे. पोलिसांनी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रुपयांचा दंड बजावून घेतला आहे.
वाहनांच्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, वाहनचालकांची मानसिकता तसेच वाहनांची वाढती संख्या यामुळे मागील सात वर्षातील दंड वसुलीतील सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्याची कामगिरी वाहतूक पोलिसांनी बजावली आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत एक लाख ७९ हजार ८८९ वाहनचालकांवर कारवाई झाली असून, यापोटी एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त बेशिस्त वाहनचालकांना कोर्टाने तब्बल १२ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.
शहरातील औद्योगिक व आधुनिक शेतीप्रधान संस्कृतीमुळे प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. याबरोबर पर्यटन क्षेत्र देखील बहरत आहे. सर्वांचा आर्थिक स्थर उंचावत असल्याने शहरातील वाहनांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. नाशिक शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांतील लाखो वाहने दररोज रस्त्यावर धावतात. याशिवाय, राष्ट्रीय व राज्य महामार्गांचा वापर करीत मोठ्या प्रमाणावर वाहने शहरातून मार्ग काढत पुढे जातात. या सर्वांचा ताण शेवटी रस्त्यांवर पडतो. त्यातच मुख्य शहरातील स्थापत्य रचना वाहनांच्या जास्त संख्येसाठी तयार झालेली नाही. या सर्वांचा परिणाम वाहतूक कोंडी, अपघात, रॅश ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांची पायमल्ली यांसारख्या घटकांमधून प्रतिबिंबित होतात. त्यातच गेल्या काही वर्षांत वाहतूक नियमांची पायमल्ली करणे हा वाहनचालकांचा हक्क झाल्यासारखे चित्र निर्माण झाले. झेब्रा, सायलन्स झोन, लेन कटिंग यांसारखे नियम तर वाहनचालकांना माहित असतात का, असा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर २०१२पासून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई वाढवण्यावर भर दिला आहे.
दंडाच्या रकमेतदेखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. २०११मध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांत वाहतूक विभागाने प्रथमच एक लाख १० हजार ८४ वाहनांवर कारवाई करीत एक कोटी २२ लाख चार हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला होता. शहर वाहतूक विभागाची स्थापना झाल्यापासून प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरुपाची कारवाई झाली होती. त्यानंतर २०१२मध्येदेखील बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येवर परिणाम झाला नाही. उलट या वर्षात शहर पोलिसांनी एक लाख ५२ हजार ३१२ वाहनचालकांवर कारवाई करीत एक कोटी ८३ लाख ४३ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला. २०१६मध्ये वाहतूक विभाग बेशिस्त वाहनचालकांविरोधात सुरुवातीपासून आक्रमक राहिला. आर्थिक झळ बसली तर वाहनचालक नियम पाळतील, अशी पोलिसांची अपेक्षा होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पोलिसांनी एक लाख ७९ हजार ८८९ वाहनचालकांवर कारवाई करीत विक्रमी एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. याच वर्षात कोर्टात पाठवण्यात आलेल्या ६८२ पैकी ५६६ वाहनचालकांना कोर्टाने १२ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड सुनावला आहे.
वाहनांची वाढती संख्या आणि त्यात बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण यामुळे दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढले आहे. आता तर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठी रक्कम दंड स्वरुपात आकारली जाणार आहे. वाहनचालकांनी नियमांचे कसोशिने पालन करणे, हेच उत्तम आहे. पोलिस टार्गेटनुसार नाही, तर वाहनचालकांच्या बेशिस्तीनुसार कारवाई करतात.
-जयंत बजबळे,
सहायक पोलिस आयुक्त
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट