हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय होवून आठवडा उलटला तरीदेखील येथील बाजार समितीचे व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. बाजार समितीत गेल्याच आठवड्यात चलन तुटवडा झाल्याने लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली होती. बुधवारपासून अन्नधान्य, कडधान्य आदी शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट देणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांनी चेकने पेमेंट देण्याचा पर्याय स्वीकारला आहे. मुंगसे व झोडगे येथील कांदा खरेदी विक्री केंद्र बंद झाल्याने कांदा उत्पादकांदची मात्र कोंडी झाली आहे.
नोटा बंदीच्या निर्णयाचा तत्काळ परिणाम झाल्याने बुधवारपर्यंत व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी व्यवहार सुरू झाल्याने गेल्या दोन दिवसात बाजार समिती आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका विक्रीसाठी आणल्याने आवक वाढली आहे. गुरुवारी (दि १७) मक्याला सरासरी हजार ते बाराशे रुपये इतका भाव मिळाला. मात्र व्यापऱ्यांकडून एरवी रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अन्य आर्थिक व्यवहार सुरळीत होत होते. मात्र व्यापऱ्यांनादेखील चलन तुटवडा जाणवू लागला असून, त्यांनी अखेर चेकद्वारे पेमेंट करण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीने शहरातील बँकांना चेकबुक देण्याची विनंतीपत्र पाठवले होते. बहुतांशी बँकांनी चेकबुक दिल्याने व्यवहार सुरू झाले आहेत. शेतकरी मात्र रोख रक्कम मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. बँकेत चेक जमा करण्यासाठी मोठी गर्दी आहे. त्यात रक्कम काढण्यास देखील चार हजाराची मर्यादा आहे. त्यामुळे शेतमाल विक्री करून देखील हातात पैसे येत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. आधीच गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. त्यात आता चलनच हाती मिळत नसल्यामुळे रोजचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा असा पेच पडला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट