म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गोदावरीसह उपनद्यांची स्वच्छता करून त्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून विकत घेतलेले रोबोटिक मशिन फोल ठरल्याची कबुली आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीच दिली आहे. त्यामुळे नदीतील पाणवेली काढण्यासाठी आता मनुष्यबळाचा वापर केला जाणार असून, त्यासाठी छोटे-छोटे ठेके दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाणवेलीच्या एकाही ठेक्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या रोबोटिक मशिनच्या देखभाल व दुरुस्तीसाठी नुकताच मंजूर केलेला अडीच कोटींचा प्रस्तावही वादात सापडला आहे.
गोदावरीची स्वच्छता करण्यासाठी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्या काळात पाच कोटी रुपये खर्चून परदेशातून रोबोटिक मशिन खरेदी करण्यात आले होते. ही मशिन खरेदी चांगलीच वादग्रस्त ठरली होती. परंतु, तरीही ती खरेदी करण्यात आली होती. आता या मशिनद्वारे पाणवेली काढणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. या मशिनकडून केवळ नदीतील गाळच काढला जात आहे. नदीची स्वच्छता करता येत नाही. नुकतेच मशिनची देखभाल व दुरूस्तीसाठी अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. परंतु आयुक्तांनीच रोबोटिक मशिनद्वारे स्वच्छता होत नसल्याची कबुली आता दिली आहे. पाणवेली काढण्यासाठी स्वतंत्र टेंडर काढण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या पाणी संथ असल्याने पाणवेलींसाठी हा पोषक काळ आहे. त्यामुळे वेली काढण्यासाठी आता वेगवेगळी कामे दिली जाणार आहेत. सध्याच्या १९ किलोमीटर अंतरावरील टेंडरचे तीन ते चार तुकडे केले जाणार असून, मनुष्यबळातर्फे हे काम केले जाणार आहे. शक्य झाल्यास पूर्वीप्रमाणेच मजूर संस्थांना हे काम दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकताच मंजूर केलेला देखभाल व दुरूस्तीचा प्रस्तावही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
वायू प्रदूषणाप्रमाणेच गोदावरी नदीचे प्रदूषण दररोज कळावे यासाठी गोदावरीत आनंदवल्ली, रामकुंड व दसकपंचक या ठिकाणी हे प्रदूषण मापक यंत्र बसविले जाणार आहेत. अशा प्रकारच्या यंत्राचा शोध घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दररोज नदीतील पाण्याचे प्रदूषण किती, याची अपडेट माहिती पालिकेसह नागरिकांना व्हावी यासाठी हे यंत्र बसविले जाणार आहे. गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात दररोज आरोप प्रत्यारोप केले जातात. परंतु, हे यंत्र बसवल्यानंतर रोजची स्थिती समजणार आहे.
नंदिनी, वाघाडीसाठी यंत्राचा वापर
महापालिकेने पाच कोटी रुपये देवून खरेदी केलेले रोबोटिक मशिनच्या मदतीने गोदावरीप्रमाणेच नंदिनी व वाघाडीचा गाळ काढला जाणार आहे. या दोन उपनद्यांमध्येही गाळ साचला आहे. हा गाळ या रोबोटिक मशिनच्या मदतीने काढला जाणार आहे. मशिनद्वारे स्वच्छता करता येत नसली तरी ते गाळ काढण्यासाठी उपयुक्त असून, त्याचा योग्य वापर केला जाणार असल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट