Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिककर पुन्हा ऑनलाइन

$
0
0

मोबाइल इंटरनेट सुरू; सोशल मीडियाचा जपून करा वापर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाच दिवसांनंतर शनिवारी शहरासह जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या सात ते आठ जणांविरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, सोशल मीडियावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी सामाजिक मर्यादांचे भान ठेवावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आंदोलनाला हिंसक रूप मिळाल्याने दोन समाजात तेढ निर्माण झाला. हा गोंधळ वाढविण्यास सोशल मीडियाने हातभार लावला. पोलिसांनी अशा संशयित आरोपींची शोधमोहीम राबवली. तसेच तपासाअंती भडक पोस्ट करणाऱ्या सात ते आठ संशयितांविरोधात अंबड, सातपूर, गंगापूर पोलिस स्टेशन, ग्रामीण पोलिस हद्दीतील त्र्यंबकेश्वर, वाडीवऱ्हे आदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. नऊ ऑक्टोबर रोजी हिंसक आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे गृह विभागाने नाशिक शहरासह ग्रामीण भागातील मोबाइल इंटरनेट सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांसाठी घेतलेल्या निर्णयात परिस्थितीनुसार वाढ करण्यात आली. शुक्रवारी शहर पूर्वपदावर आले. ग्रामीण भागातील त्या गावांमधील संचारबंदी मागे घेण्याचा निर्णय झाला. तसेच ग्रामीण भागात दैनंदिन कामकाज सुरू झाले. या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय झाला. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोबाइलच्या मेसेज टोन पुन्हा खणखणू लागले. जवळपास सहा दिवस इंटरनेट सेवा बंद असल्याने या दरम्यान सोशल मीडियावर पाठविण्यात आलेले मॅसेज डिलेव्हर होण्यास सुरू झाली. यात अगदी रविवारपासूनच्या संदेशाचा समावेश होता. पैकी काही संदेश जर आक्षेपार्ह असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. यामुळे मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. पोलिसांनी याबाबत सक्त भूमिका घेतली असून, जुने वादग्रस्त मेसेज फॉरवर्ड करण्याचे टाळावे. तसे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

- रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजूनही सात गावांत संचारबंदी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विल्होळी पाठोपाठ शनिवारी इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथील संचारबंदी मागे घेण्यात आली. मात्र तणावपूर्ण परिस्थितीमुळे अन्य सात गावांमध्ये रविवारी सकाळपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

तळेगाव अंजनेरी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर इगतपुरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यातील नऊ गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. सुरुवातीला ४८ तासांसाठी म्हणजेच शुक्रवारी दुपारपर्यंत संचारबंदी लागू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र संवेदनशील गावांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असल्याने ग्रामीण पोलिसांच्या विनंतीनुसार संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आला. शुक्रवारी दुपारनंतर विल्होळी येथील तणाव निवळला. त्यामुळे तेथील संचारबंदी मागे घेण्यात आली. मात्र उर्वरित आठ गावांमध्ये ती कायम ठेवण्यात आली. शनिवारी दुपारी एकनंतर या गावांमधील संचारबंदी मागे घेतली जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती.

मात्र शनिवारी केवळ शेवगेडांग येथील संचारबंदी मागे घेण्यात आली असून, उर्वरित गावांमध्ये ती काहीशी शिथिल करण्यात आली होती. परंतु, सायंकाळी सहापासून पुन्हा १२ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी सहापर्यंत वाडीवऱ्हे, तळेगाव, तळवाडे, महिरावणी, सांझेगाव, गोंदे आणि अंजनेरी येथे संचारबंदी कायम राहणार आहे. त्यानंतर परिस्थितीनुरूप संचारबंदी सुरू ठेवावी, की मागे घ्यावी याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरच अॅट्रॉसिटीत दुरुस्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अॅट्रॉसिटी कायदा हा कुणावर अन्याय करण्यासाठी नसून, दलितांना न्याय देण्यासाठी आहे. दलितांवर अत्याचार झालाच नाही, तर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची वेळच येणार नाही. या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल सुचवले तर निर्णय घेतला जाईल असे सांगत दुरुस्तीबाबत सकारात्मक असल्याची तयारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दर्शवली आहे. या कायद्यातील दुरुस्तीबाबत सूचनांचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तळेगाव येथील घटनेनंतर उद्‍भवलेल्या स्थितीसंदर्भात आठवले यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करणार नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या आठवलेंनी यू टर्न घेत कायद्याच्या गैरवापराबाबत दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली. अॅट्रॉसिटी कायद्याचा चुकीचा वापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कोपर्डीच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चातून अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी झाली आहे. कोपर्डी तसेच नाशिकमधील नराधम आरोपींची जात पुढे आणली जात आहे. मात्र अशा नराधमांना जात नसते, असे सांगून तळेगावच्या घटनेबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या घटनांमधून मराठा आणि दलितांमध्ये दरी वाढविण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते रोखले पाहिजे. कायद्याचा गैरवापर होऊ नये या मताशी मी सहमत आहे. मात्र ज्यांना वाटते की या कायद्याचा गैरवापर होत आहे, त्यांनी दलितांवर अन्यायच करू नये, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

शांतता राखा

तळेगाव येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणात आरोपी दलित समाजाचा असला तरी आरोपीला जात नसते, असे सांगत समाजाचा किंवा आरपीआयचा त्याला पाठिंबा नाही. दलित आणि मराठा समाजाने सलोख्याचे संबंध कायम राहण्यासाठी शांतता पाळण्याचे आवाहन आठवले यांनी केले. मराठा आणि दलित समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. या दोन समाजात संघर्ष पेटला, तर राज्याला विकासाला खीळ बसेल. कोपर्डी घटनेनंतर अशा प्रकारचे दंगे राज्यात कोठेही झाले नाही. परंतु, नाशिकमध्ये दोन समाजात अशा प्रकारे तेढ निर्माण होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले. आठवले यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच दंगलीतील जखमींचीही भेट घेऊन विचारपूस केली.

क्रांती नव्हे, शांती मोर्चा

रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगून राज्यभर निघत असलेल्या मोर्चांचे कौतुक केले. मराठा समाजाचे मोर्चे हे क्रांती मोर्चा असले तरी त्यांना मराठा शांती मोर्चा असे म्हणायला हवे. मराठा मोर्चांना आमचा विरोध नसून, या मोर्चांविरोधात प्रतिमोर्चे आम्ही काढलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. घटनेत ७५ टक्के आरक्षणाची दुरुस्ती करून मराठा समाजाला त्यात १६ टक्के आरक्षण मिळायला हवे असे सांगत, आरक्षणातून मराठा-दलित वाद कमी होईल, असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात आनंदाची लयलूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरात दुधास वाढलेल्या मागणीच्या परिणामी या दिवशी विक्रेत्यांनी रोजच्या तुलनेत सुमारे तीनपटींनी अधिक दूध विकले. या दिवशी वाढत्या मागणीमुळे रोजच्या तुलनेत दरामध्ये सुमारे २० टक्के इतकी तात्पुरती वाढ करण्यात आली. शनिवारी रात्री कोजागिरीच्या चंद्र प्रकाशात नाशिककरांनी आप्तेष्टांसोबत दुग्धपान करीत आनंदाची लयलूट केली.

दसरा संपल्यानंतर नागरिकांना वेध लागले होते ते कोजागिरी पौर्णिमेच्या सेलिब्रेशनचे. यातच यंदा कोजागिरीस शनिवार आल्याने अनेकांनी जागरणाचे नियोजन केले. यानुसार शहरातील अनेक मित्रमंडळे, विविध कार्यालयांमधील सहकारी, कॉलेजियन्स, महिलांचे ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप आणि विविध निवासी सोसायट्यांमध्ये जागरण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शुक्रवारपासूनच दूधबाजारासह शहरातील डेअरी चालकांकडे दुधाची मागणी वाढली होती. बाजारपेठेच्या अपेक्षित मागणीचा अंदाज असल्याने अनेक दूधविक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुधाचा साठाही वाढविला होता. यानुसार नेहमी शहरात सुमारे ४५ ते ५५ रुपये लिटर या भावाने विकले जाणारे म्हशीचे दूध शनिवारी ८० रुपये लिटरने विकले गेले. गायीच्या दुधासही सुमारे ५५ ते ६० रुपये प्रति लिटर असा भाव मिळाला. रोजच्या विक्रीपेक्षा सुमारे तीनपट अधिक प्रमाणात दूध विकले गेल्याची माहिती दूधविक्रेत्यांनी दिली.

दुधाच्या उत्पादनात यंदा वाढ

गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेत दुधाची उपलब्धता मुबलक प्रमाणात होती. गेल्या वर्षी जिल्ह्यानेही दुष्काळाचा सामना केला होता. हजारो रुपये खर्चूनही चाऱ्याची उपलब्धता नव्हती. याचा परिणाम दुग्ध उत्पादनावरही झाला होता. यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र हिरवळ आहे. जनावरांना चाराही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी जिल्हाभरातूनही कोजागिरीच्या निमित्ताने शहरात दुधाची आवक वाढली होती. दूध विक्रेत्यांनीही प्रासंगिक मागणीमुळे अगोदपासूनच साठ्यात वाढ केल्याने ग्राहकांची निराशा टळली.

कोजागिरीच्या निमित्ताने दोन दिवसांपासून दुधाच्या मागणीत विशेष वाढ झाली. रोज सुमारे ७०० लिटर दूध विकले जाते, तेथे १२०० लिटर दुधाचा पुरवठा करावा लागला. वाढत्या मागणीच्या परिणामी रोजपेक्षा अधिक चांगला भाव दुधाला मिळाला.

- महेश कल्याणकर, दूध विक्रेते, दूधबाजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचा सर्व्हे जोरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी निमा या औद्योगिक संघटनेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ऑनलाइन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत हजारो जणांनी यात सहभाग घेतला आहे.

नाशिकच्या विमानसेवेला घरघर लागली आहे. अनेकदा प्रयत्न करूनही त्यास यश मिळालेले नाही. विविध प्रकारच्या अडथळ्यांची मालिका अद्यापही सुरूच आहे. आता निमा या संघटनेने विमानसेवेचे सर्व्हेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन हे सर्व्हेक्षण केले जात आहे. नाशिकमधून किती प्रवासी विमानाने प्रवास करतात, कुठे जातात, परतीचा प्रवासही करतात की केवळ एकाच बाजूने विमानाने जातात, वर्षभरातून किती वेळा विमान प्रवास केला जातो, अशा विविध प्रकारच्या प्रश्नांवर आधारित हे सर्व्हेक्षण आहे. आतापर्यंत हजारो जणांनी या सर्व्हेक्षणात सहभाग घेतल्याची माहिती निमाचे मनिष रावल यांनी दिली. वर्षाकाठी किती जण परतीच्या प्रवासाची तिकिटे बुक करतात, हे सुद्धा सर्व्हेक्षणातून निदर्शनास येत आहे. ओझरहून सेवा सुरू झाल्यास त्याचा नक्की फायदा होईल, असा विश्वास या सर्व्हेक्षणाद्वारे व्यक्त केला जात आहे. सर्व्हेक्षणाचे विमानसेवा सुरू करणाऱ्या कंपनीबरोबर निष्ठा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याद्वारे विमानाची तिकिटे खरेदी करणे, आवश्यक तो प्रतिसाद देणे याचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबडला मिळावा कायमस्वरूपी तलाठी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड गावात असलेल्या तलाठी कार्यालयात नेहमीच तलाठी उपलब्ध राहत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु नेमणूक करण्यात आलेले तलाठी गुंढे यांना तीन ठिकाणांचे अतिरिक्त भार सांभाळत काम करावे लागत आहे. यासाठी महसूल विभागाने अंबड गावाला कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिक शहराचा विकास गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाला आहे. यामुळे शहराला लागून असलेल्या २२ खेड्यांच्या भागातही नागरी वस्ती झपाट्याने वाढली आहे. परंतु यात अनेक गावांमध्ये सातबारा घेण्यासाठी नागरिक गेल्यानंतर तलाठीच उपस्थित राहत नसल्याचे समोर आले आहे. अंबड गावातही नेमणूक करण्यात आलेले तलाठी गुंडे यांच्या प्रभारी तलाठी म्हणून अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

त्यातच सरकारच्या निवडणुकीचे कामकाजदेखील त्यांनाच पहावे लागत असल्याने पूर्णवेळ तलाठी कार्यालयात त्यांना देणे शक्य होत नाही. यामुळे अनेकदा कामांसाठी येत असलेल्या नागरिकांना खाली हात परतण्याची वेळ येते. अंबड गावात वाढलेली लोकवस्ती पहाता सातबारा उतार घेण्यासाठी नेहमीच तलाठी कार्यालयात गर्दी होत असते. मात्र तलाठी उपस्थित होत नसल्याने त्यांना ताटकळत उभे राहण्याची वेळ येते. यासाठी महसूल विभागाने तत्काळ कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अंबड गावालगत नवीन घरे घेणाऱ्या नागरिकांना लोन घेण्यासाठी नव्याने सातबारा लागत असतो. तो घेण्यासाठी अंबड गावातील तलाठी कार्यालयात अनेकदा चकरा मारल्यानंतर सातबारा मिळतो. यासाठी कायमस्वरूपी तलाठी द्यावा.

साहेबराव दातीर, ग्रामस्थ अंबडगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववसाहतींना मूलभूत समस्यांचे ग्रहण

$
0
0

कपालेश्वर नगर, कृषी कॉलेजजवळील परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

परिसरातील कपालेश्वर नगर, के. के. वाघ कृषी कॉलेजसमोरील कॉलनी या नववसाहती मध्ये रस्ते, वीज, पाणी या मूलभूत समस्यांचे ग्रहण लागले आहे. या मूलभूत या समस्यांसह नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

या वसाहतींमध्ये अद्यापही कच्चे रस्ते असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. शिवाय परिसरातील पथदीपदेखील अनेक दिवसांपासून बंदच आहेत. त्याची दुरुस्तीही मनपा प्रशासनाकडून केली जात नाही. त्यासोबतच या परिसरात घंटागाडीचीही दैना आहे. याबाबत वेळोवेळी सांगूनही ती वेळेवर येत नाही. त्यामुळे नागरिक कचऱ्याची विल्हेवाट आजूबाजूच्या परिसरात करतात परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या साचलेल्या कचऱ्याने परिसरात डासांचे प्रमाणदेखील वाढत आहे.

परिसरात कॉलेजांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थी या परिसरात राहतात. पण मुलांना खेळण्यासाठी उद्यान, क्रीडांगण नाही. त्यांच्यासाठी परिसरात अभ्यासिका, वाचनालय अपेक्षित आहे. पण प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. या नवीन वसाहतींना अजून नगरसेवकांचे दर्शनच दुर्लभ आहे, त्यामुळे त्वरित या सर्व समस्यांची दखल घेऊन उपाययोजना करण्यात यावी.

रस्त्यावरील मुरूम वाहून गेल्याने खड्डे पडले आहेत. शिवाय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय, क्रीडांगण, उद्यान कधी होणार. मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही.

-सचिन खैरे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा काळात रोडरोमिओंचा त्रास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडला ऐन परीक्षांच्या काळात रोडरोमिओंनी शाळेच्या मुलींना टारगेट करून त्यांची छेडछाड सुरू केली आहे. त्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली असून रोड रोमिओंवर कारवाईची मागणी केली आहे. परिसरात र. ज. बिटको, कोठारी कन्या, के. एन. केला, के. जे. मेहता, होली फ्लावर आदी मोठ्या शाळा आहेत. सध्या परीक्षांचे दिवस सुरू असल्याने मुली परीक्षेला जाताना रोडरोमिओ गल्लीतील कॉर्नरला, शाळेजवळ किंवा निर्जन रस्त्यावर बसून त्यांची छेड काढतात. बेस्ट ऑफ लक देण्याच्या नावाखाली मुलींना त्रास देतात.


इमोशनल ब्लॅकमेलिंग

यामध्ये मुलांनी दबाव टाकून इमोशनल ब्लॅकमेल केले असल्याने मुली घरीही लवकर घडलेला प्रकार सांगत नाहीत. नंतर मुले छळ करू लागल्यावर आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर जाहीर वाच्यता होते. तेव्हा पालकांना खरी गोष्ट माहिती पडते. पोलिसांची कटकट नको म्हणून तडजोड करण्याची पालकांची मनोवृत्ती असल्याने रोडरोमिओंचे फावते.

तीन महिन्यांपूर्वी जेलरोडच्या आरंभ शाळेसमोर शालेय मुलांचे गॅंगवार झाले होते. मुलगा-मुलगी रस्त्यावर बोलत बसलेले असताना नागरिकांनी हटकल्यावर त्यांना घरात घुसून दमदाटी करण्यासही रोडरोमिओ मागे-पुढे पहात नाहीत. चार महिन्यांपूर्वीही करन्सी प्रेसच्या शेजारी उभ्या युवा जोडप्याला हटकल्यानंतर युवकाने रात्री टोळके आणून मारहाण केली होती. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रकारांनंतर पोलिसांनी यावर वचक निर्माण करत यांना आळा घालणे आता आवश्यक झाले आहे. नाशिकरोड आणि उपनगरच्या पोलिसांनी शाळा परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर गस्त घालावी, अशी मागणीही पालक व शाळांनी केली आहे.

नाशिकरोड, जेलरोडच्या शाळा परिसरांमध्ये रोडरोमिओंचा जाच शाळा सुरू झाल्यावर होतो. त्यांच्या जाचाला कायमचा आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. पालकांनीही न घाबरता पोलिसांना साथ दिल्यास निर्भय वातावरण होईल.

शाम गोहाड, मनविसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदुर्डीत बिबट्याने केली शेळी फस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील नांदुर्डी रोडवरील वस्तीतील एक शेळी बिबट्याने शनिवारी पहाटे फस्त केली. सुरेश जाधव हे नांदुर्डी रोडवर असलेल्या रेल्वे गेटजवळील त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराजवळ बांधलेल्या गोठ्यात दोन गायी, दोन वासरे, एक शेळी बांधलेली होती. शुक्रवारी रात्री ११ ते १२ च्या सुमारास बिबट्याने या गोठ्याच्या भिंतीवरून उडी शेळीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. शनिवारी सकाळी जाधव यांना बिबट्याने शेळीला ठार केल्याचे लक्षात आले. त्यांनी ही घटना येवला वनविभागाला कळवली. वनरक्षक विजय टेकणर, वन सेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे, भय्या शेख हे तातडीने घटनास्थळी गेले व पंचनामा केला.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तसेच वांरवार हानी पोहोचविणाऱ्या या वन्य हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

निफाड तालुक्यात कोळवाडी रोड, नांदुर्डी रोड, सोनेवाडी रोड परिसरातील शेती क्षेत्राच्या भागात काही महिन्यांपासून बिबट्यांनी थैमान घातला आहे. अधूनमधून ह बिबटे शेतकऱ्यांना दर्शन देत असल्याने या भागातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने जास्तीचे पिंजरे लावावेत, अशी मागणी निफाडचे नगरसेवक मुकुंद होळकर यांनी केली आहे. गेल्या काह ‌महिन्यांमध्ये बिबट्याने अनेकदा थैमान घातले असून वस्तीवर राहणाऱ्यांमध्ये भीती पसरविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजकारण नको, समाजकारण करा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तळेगाव प्रकरणी केलेले वक्तव्य चुकीचे असून, असे वक्तव्य त्यांनी करायला नको होते. बलात्काराचा प्रयत्न करणे आणि बलात्कार हा एकच प्रकार आहे. त्यामुळे त्याला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. तळेगावच्या प्रकरणावरून शिवसेना व भाजपात राजकारण सुरू झाले आहे. युतीच्या नेत्यांनी या प्रकरणात राजकारण न करता समाजकारण करावे असा टोला आठवले नाशिक दौ-यावेळी लगावला.

...तर भाजपसोबतच युती

आगामी दहा महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांनी एकत्र येणे गरजेचे आहेे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. लवकरच शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचीही भेट आपण घेणार आहोत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होऊ द्यायचा नसेल, तर महायुती होणे गरजेचे आहे. मात्र काही कारणास्तव युती तुटलीच, तर भाजपसोबत आमची युती कायम राहील, असे स्पष्टीकरणही आठवले यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर संचारबंदी मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात निर्माण झालेली दंगलसदृश परिस्थिती निवळल्याने संवेदनशील सात गावांमधील संचारबंदी रविवारी सकाळी मागे घेण्यात आली. गेले पाच दिवस बंदीस्त जीवन जगणाऱ्या गावकऱ्यांनी रविवारी मोकळा श्वास घेतला. गावांमधील जनजीवन पूर्वपदावर आले असून, परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी म्हणून संवेदनशील गावांमध्ये पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

तळेगाव अंजनेरी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर इगतपुरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी दगडफेक, तसेच वाहन जाळपोळीचे प्रकारही घडले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यातील नऊ संवेदनशील गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी घेतला होता. बारा ऑक्टोबरपासून ही संचारबंदी लागू करण्यात आली होती. सुरुवातीला ४८ तासांसाठी म्हणजेच शुक्रवारी दुपारी बारापर्यंत संचारबंदी लागू राहणार होती. विल्होळी येथील तणाव निवळल्याने शुक्रवारी दुपारनंतर तेथील संचारबंदी मागे घेण्यात आली. मात्र, उर्वरीत आठ गावांमध्ये ती कायम ठेवण्यात आली. संवेदनशील गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने ग्रामीण पोलिसांच्या विनंतीनुसार जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी वाढविला. शनिवारी शेवगेडांग येथील संचारबंदी मागे घेण्यात आली. उर्वरित गावांमध्ये ती दिवसभर काहीशी शिथिल करण्यात आली. मात्र, सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा अशा १२ तासांसाठी वाडिवऱ्हे, तळेगाव, तळवाडे, महिरावणी, सांझेगाव, गोंदे आणि अंजनेरी या गावांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली होती. रविवारी सकाळी सहानंतर संचारबंदी शिथिल करण्यात आली. दुपारनंतर ती पूर्णत: मागे घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या संवेदनशील गावांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तेथे पोलिस बंदोबस्त राहणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. वाहतूकही सुरळीत सुरू आहे. संवेदनशील सर्व गावांमधील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या गावांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.

- अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक

विल्होळी, शेवगेडांग ही गावे वगळता अन्य सात संवेदनशील गावांमध्ये रविवारी सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू होती. संचारबंदीचा कालावधी वाढविण्याबाबत पोलिसांकडून विनंती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रविवारी सकाळपासून गावांमध्ये संचारबंदी शिथिल झाली आहे.

- राहुल पाटील, प्रांताधिकारी इगतपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौमित्र, गुरू ठाकूरच्या शब्दांची रसिक मनावर मोहिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कोजागिरीच्या तेजोमयी चंद्रास साक्षी ठेवून एकाच व्यासपीठावर दोन दिग्गज कवींचा संवाद बहरत गेला अन् ‘शब्दांच्या पलिकडले’ या कार्यक्रमास नवा अर्थ आला.
असेच काहीसे चित्र होते ते गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानात आयोजित ‘शब्दांच्या पलिकडले’ या शब्दमयी कार्यक्रमाचे. दिशा फाऊंडेशन आणि भाजपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दोन दिग्गज कवी सौमित्र आणि गुरूदेव ठाकूर यांच्या शब्दांची जुगलबंदी श्रोत्यांना ऐकावयास मिळाली.
प्रतिभासंपन्न माणसांच्या अभिव्यक्तीमागील प्रेरणा कोणती असावी, अशा काहीशा अनोख्या संकल्पनेची निवड कवी सौमित्र आणि कवी गुरू ठाकूर यांनी करत हा कार्यक्रम नाशिककरांसाठी नाशिकमध्ये पहिल्यांदाच सादर केला. ‘रसिक हो रंग चढू दे ...’ ही नटरंग चित्रपटातील नांदी दमदारपणे सादर करत या कार्यक्रमास सुरूवात झाली. तोच कवी सौमित्र तथा किशोर कदम यांना त्यांच्या शब्द सुचण्याविषयीचा एक प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले ,
‘पहाटेस तांबडे फुटावे, तसे कुणाला शब्द सुचावे,
कधी शुभ्र आभाळ बोलते, कधी मनाशी तेच दाटते ,
कधी मृगाचे जलद भरावे, तसे कुणाला शब्द सुचावे’
स्फूर्तीमागची प्रेरणा त्यांनी कवीतेतच मांडून चेंडू गुरू ठाकूरांच्या कोर्टात टोलावला. त्यावर गुरू ठाकूर उत्तरले,
‘तुझा स्पर्श झाला असा जीवनाला,
जणू लाभले पंख वेड्या मनाला,
रित्या ओंजळीला दिले तूच तारे,
मलाही न कळले कसे गीत झाले !’
अशा दोन दिग्गजांमध्ये रंगलेल्या शब्द जुगलबंदीने कार्यक्रम बहरत गेला. सुरूवातीस दिशा फाऊंडेशनच्या वतीने स्वाती भामरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आमदार देवयानी फरांदे, सीमा पवार, विद्युल्लता गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कलावंतांच्या वतीने नाटककार दत्ता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर कवी गुरू ठाकूर आणि कवी सौमित्र यांच्या जुगलबंदीस निवेदन व गायनातून योगिता चितळे, की-बोर्डवर प्रशांत महाले, गायक म्हणून नचिकेत देसाई, तबल्यावर गौरव तांबे, ऑक्टोपॅडवर उमेश खैरनार यांनी साथ दिली. ध्वनीव्यवस्था पराग जोशी यांनी पाहिली. रसिकांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसाकासाठी कर्जहमी मागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
निफाड साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्जाची हमी घेऊन कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मागणी करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ विधीज्ञ व निफाड कारखान्याचे सभासद अॅड. दौलतराव घुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वाताहतीस जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असून, निफाड पोलिस स्टेशनमध्ये लेखा परीक्षकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविला होता. तथाप‌ि या ३१ आरोपींमध्ये जिल्हा बॅँकेचे संचालक आमदार असल्याने त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे या गैरव्यवहाराची माहिती येत्या १८ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सादर केली जाणार असल्याचेही घुमरे म्हणाले.
या गुन्ह्याबाबत तपशील देताना ते म्हणाले की, ५ जुलै २००७ रोजी गुन्हा रजि नं ७६-२००७ याअन्वये विशेष लेखा परीक्षक रवींद्र वाघ यांनी फिर्याद दिली आहे. भादंव‌ि ४२०, ४०८, ४०९, ४६५, १२० ब अन्वये गुन्हा दाखल होता. परंतु कुठलाही तपास झाला नाही. जिल्हा बँकेने व्यापाऱ्यांकडून १२८ चेक घेतले ते चेक निफाड कारखान्याच्या खात्यावर वटविण्यात आले नाही. ते चेक ७-८ महिने बँकेत पडून होते. त्यामुळे साखर विक्रीचे पैसे जिल्हा बॅँकेला न दिल्याने निफाड कारखान्याचे कर्ज व त्यावरील व्याज वाढतच राह‌िले, असेही घुमरे यांनी सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅनो’ संशोधनात भारत पहिल्या दहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘विज्ञानातील संशोधनावर जगातील प्रगत देश विशेष तरतूद करताना दिसत आहेत. या तुलनेत भारताची या विषयावरील तरतूद ही अत्यल्प आहे. ही खंतावणारी बाब असली तरीही नॅनो मटेरिअलसारख्या जगाच्या मुख्य प्रवाहातील विषयात भारत जगातील पहिल्या दहा प्रगत देशांच्या स्पर्धेत आहे ’ , या मुद्द्याकडे कोरिया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. डी. पी. अंमळनेरकर यांनी लक्ष वेधले.
चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या कर्मवीर आबड, लोढा व जैन आर्ट , कॉमर्स व सायन्स कॉलेजात ‘नॅनो मटेरिअल इम्पॅरिट‌िव्ह अॅण्ड न्यू मिलेनियम’या भौतिकशास्त्र विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी डॉ.अंमळनेरकर यांनी बीजभाषण करताना भूमिका मांडली.
ते म्हणाले, कोरियाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ४.५ टक्के रक्कम केवळ संशोधनावर खर्च केली जाते. तर भारतात हेच प्रमाण अवघे ०.८२ टक्के आहे. परिणामी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ६६ व्या क्रमांकावर येतो. तर कोरियाचा या यादीत अकरावा क्रमांक लागतो.
या परिषदेच्या अध्यक्षपदी संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा उपस्थित होते. डॉ. जी. एच. जैन यांनी प्रास्ताविक केले.
भारताच्या संरक्षण व संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. मुनीरत्नम यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ तंत्रज्ञानाची सांगड जीवनाशी घातली पाहिजे. सद्यस्थितीत स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होऊन त्यांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढीला लागला आहे. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे. यासारख्या आव्हानावर प्रभावी उपचार पध्दती शोधण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा काय उपयोग होऊ शकतो , यासारख्या दृष्टीने केलेले संशोधन मानवजातीस उपकारक ठरेल.
यावेळी डॉ. गणेश पाटील यांनी संपादीत केलेल्या ‘नॅनो मटेरिअल’ या विषयावरील ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचा दर्जा उंचावणार

$
0
0

कुरुडगाव शाळेच्या भेटीत शिक्षण सचिवांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सरकार चालवत असलेल्या सर्व शाळांना येत्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जा देणार असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्यातील २८६ शिक्षकांनी स्वखर्चाने सिंगापूर येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली. ते कुरुडगाव (ता. निफाड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यालयातील ज्ञानरचनावाद आणि शिक्षण पद्धत जाणून घेतली.

शिक्षण विभागाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्यासाठीची कारवाई सुरू झाली असून त्यासाठी राज्यातील शंभर शाळांची निवड करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात या शंभर शाळांना हा दर्जा प्राप्त करून दिल्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित सर्व शाळाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली.

राज्यातील सरकारी शाळांची शैक्षणिक प्रगती मागील वर्षाच्या तुलनेत सुधारत असून पुढील दोन वर्षांत ही प्रगती शंभर टक्के होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्ञानरचना वाद शिक्षण पद्धतीत सुधारणा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत मुलांना फळ्यावर लिहिलेल्या शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष जीवनात लागणारे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शिक्षण अधिकारी आहीरे, पंचायत समिती सभापती सुभाष कराड, पंढरीनाथ थोरे, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, स्नेहा शिरोरे आदींसह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जातीव्यवस्था समाजातील कीड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जातीव्यवस्था ही समाजव्यवस्थेला लागलेली कीड असून, ती जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत जात निर्मूलन होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांनी केले. बौध्द साहित्य प्रसार केंद्राच्या वतीने आयोजित धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.
कालिदास कलामंदिरात ‘जातीचे निर्मूलन काळाची गरज’या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भीम स्मृतीगीताने झाली. यावेळी बौध्द साहित्य प्रसार केंद्राचे अध्यक्ष अतुल भोसेकर, शामराव विठ्ठल बॅँकेचे संचालक रवी पगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नरके पुढे म्हणाले की, शाहू-फुले-आंबेडकरांची साहित्य संपदा प्रत्येकाच्या घरात आहे. मात्र, ती शोकेसमध्ये आहे. त‌िचे जोपर्यंत वाचन होऊन आचरण होणार नाही, तोपर्यंत समाज परिवर्तन होणार नाही. शाहू-फुले-आंबेडकरांनी जातीव्यवस्था नष्ट व्हावी म्हणून सवार्थाने प्रयत्न केले. बाबासाहेबांच्या प्रत्येक ग्रंथात समाज व्यवस्थेचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी भेदभावाच्या चार जागा समाजाला दाखवून दिल्या. या चार जागा नष्ट झाल्याशिवाय समाजातील भेदभाव नष्ट होणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. जोपर्यंत स्त्री-पुरुष हा लिंगभेद नष्ट होत नाही, तोपर्यंत जातीनिर्मूलन होणार नाही. भारतात ४ हजार ६३५ जाती आहेत. त्यातील प्रत्येक जातीला साडेबारा पोटजाती आहेत. ही जात शिडीसारखी आहे. प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यामुळे भारतात ४ हजार राष्ट्र आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचप्रमाणे गरीब आणि श्रीमंत असे वर्ग आहेत, ते नष्ट झाले पाहिजे. धर्म ही संकल्पनादेखील नष्ट होणे गरजेचे आहे. हा धर्म शोषणाला मान्यता देत असतो. जगातील २२० देशांमध्ये स्त्र‌ियांना समान संधी देण्यात भारत १०५व्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्था नष्ट करायची असेल, तर शिक्षणाला महत्व देणे गरजेचे आहे. संपत्तीची निर्मिती ही कौशल्यावर आधारित असली पाहिजे. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह झाले तर जातीय व्यवस्था नष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रास्ताविक अतुल भोसकर यांनी केले. दोन दिवसीय विचारमनंथनाचा समारोप प्रयोगशील विद्यार्थी निर्मित ‘जातीचे निर्मूलन’ या नाट्यअभिवाचनाने झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाग भांडवल वाढविण्याचा ठराव

$
0
0

जिल्हा सहकारी संघाच्या विशेष सभेत एकमताने मंजुरी

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे भाग भांडवल वाढविण्याबाबतचा ठराव मालेगाव येथे झालेल्या जिल्हा संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव संर्वसंमतीने करण्यात आल्याने जिल्ह्यातील संस्था, विविध कार्यकारी सोसायटी व इतरही संस्थांना जिल्हा संघाचे सभासद होण्याची संधी मिळणार आहे. यासाबरोबरच जिल्हा संघाच्या भाग भांडवलात मोठी वाढ होऊन व्यवहाराची व्याप्तीही यामुळे वाढणार आहे.

नाशिक जिल्हा कृषी औद्यागिक संघाचे जाळे जिल्हाभर पसरवण्याच्या हेतूने व संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेतोपयोगी वस्तू मिळवून देण्यासाठी चेअरमन अद्वय हिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. येथील सयाजीराव गायकवाड कॉलेजच्या सभागृहात ही सभा झाली. या वेळी व्हाइस चेअरमन संदीप गुळवे, संचालक बापूसाहेब कवडे, राजेंद्र डोखळे, शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

यावेळी अद्वय हिरे यांनी, जिल्हा संघाची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगत, सध्याला संघाला वार्षिक एक कोटी नफा मिळत असल्याची माहिती दिली. संघाच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे या हेतूने संघाची भाग भांडवल मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला असून सभासदांच्या पाठबळामुळे याला मंजुरी देण्यात आली, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या निर्णयानंतर जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी संघाची शाखा स्थापन करून शेतकऱ्यांसाठी अल्पदरात खत, बियाणे, पत्रे, पाइप व उपयोगी वस्तू दिल्या जाणार आहे, असे अद्वय हिरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी मालेगाव शाखेच्या गोदामाचे उद््घाटनही करण्यात आले. सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन दिलीप गाडेकर यांनी केले. तर आभार प्रमोद गडाख यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपावली खरेदीचा महिलांनी घेतला आनंद

$
0
0

आनंदी संखी मंचच्यावतीने प्रदर्शन

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूररोड भागातील पाइपलाइन रोडला असलेल्या नक्षत्र लॉन्स येथे आनंदी सखी मंचच्यावतीने दीपावली पदार्थांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आमदार सीमा हिरे, नगरसेवक विक्रांत मते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रदर्शनात विविध ठेवण्यात आलेल्या पदार्थ खरेदीचा आनंद महिलांनी लुटला.

आनंदी सखी मंचच्या सदस्यांनी दिवाळी सणाच्या पदार्थांच्या विक्रीसाठी खास व्यवस्था महिलांना उपलब्ध करून दिली असल्याचे आमदार सीमा हिरे यावेळी म्हणाल्या. तर नगरसेवक मते यांनी महिलांनी दिवाळीच्या सणासाठी तयार केलेल्या वस्तूंना त्यात फराळ व घरसजावटीच्या वस्तूंना योग्य

व्यासपीठ उपलब्ध झाल्याने नक्कीच त्याचा फायदा महिलांना होणार असल्याचे सांगितले. दरवर्षी दिवाळी सणाच्या अगोदर महिलांनी तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी आनंदी सखी मंच पुढाकार घेत असल्याचे अध्यक्षा साधना गिलालकर यांनी सांगितले. याप्रसंगी फ्रवशीच्या व्हाईस चेअरपर्सन शर्वरी लथ, माजी नगरसेवक अरूण काळे, मंचच्या सदस्या सीमा पछाडे, आदिती अग्रवाल, प्रभा तालीकोट यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

यात दीपावली सणाच्या अगोदर महिलांनी सणासाठी तयार केलेले विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. पाइपलाइन रोड येथील नक्षत्र लॉन्स येथे नुकतेच महिलांना दिवाळी सणात तयार करण्यात आलेल्या पदार्थांना बाजार पेठ उपलब्ध व्हावी, हा हेतू प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयाविना कोट्यवधींची जागा पडून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीच्या अगदी मधोमध महापालिकेने रुग्णालयासाठी जागा आरक्षित केली आहे. परंतु कोट्यवधी रुपयांचे बाजारमूल्य असलेली जागा रुग्णालयाअभावी पडून आहे. याबाबत प्रभागाचे नगरसेवकांनी या जागेवर कामगार, कष्टकरी वर्गासाठी रुग्णालय उभारावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. अनेक वर्षांपासून आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्यास यास जबाबदार कोण असा सवालही नगरसेवक सचिन भोर यांनी उपस्थित केला आहे.


महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहर विकासाच्या दृष्टीकोनातून सहाही विभागात भूसंपादन केल्यानंतर आरक्षणे टाकण्यात आली होती. परंतु वीस वर्षांहून अधिक काळापासून आरक्षित असलेली करोडोंची आरक्षित जागा रुग्णालयाअभावी पडून आहे. दरम्यान प्रभाग ५० चे नगरसेवक भोर यांनी आरक्षित असलेल्या रुग्णालयाच्या जागेवर महापालिकेने अद्ययावत रुग्णालय उभारावे अशी मागणी महापालिकेकडे केली होती.


रुग्णालयासाठी आरक्षित जागेची पाहणी महापालिकेचे माजी आयुक्त संजय खंदारे यांनी केली होती. यानंतर माजी आयुक्त खंदारे यांनी प्रस्तावदेखील सादर करण्याचे सुचवले होते. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करूनही रुग्णालयाची जागा पडून आहे.

सचिन भोर, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् कागदाची झाली फुले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विविध प्रकारच्या रंगीत कागदांची विशिष्ट आकारात केलेली कटिंग, त्यांना आकार देत त्यांची केलेली जोडणी, त्यातून आकार घेत असलेली विविध फुले स्वतःच्या हाताने तयार करण्याचा होणारा आनंद मटा क्लचरल सभासदांच्या महिला आणि युवतींनी घेतला. विविध प्रकारची आर्टिफिशिअल फुले तयार करण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वतःच्या हाताने आकर्षक फुले बनविण्याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या दुर्गा मंगल कार्यालय यासाठी व्हेन्यू पार्टनर होते. या कार्यशाळेत पुणे येथील उमा सरपोद्दार यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने कागदांपासून फुले कशी बनवायचे याची माहिती दिली. त्यासाठी ड्युप्लेक्स, क्रेप, टिशू पेपर यांचा वापर करून जर्बेरा, क्रिस्टल, कार्नेशियन, गुलाब ही फुले बनविण्यात आले.

यावेळी फुले तयार करण्यासाठी कोणत्या पेपरचा वापर करायचा. कैचीच्या सहाय्याने कशा प्रकारे काप घ्यायचे, ते कसे चिटकवायचे, फुलाची दांडी तारेच्या सहाय्याने कशी बनवायची. साध्या वस्तूंचा सहजतेने वापर करण्याचे कौशल्य सहभागींनी आत्मसात केले. फुलांचा आकार साकारत असताना ते बनविणाऱ्यांची आनंद ओसंडून वाहत होता. बनविलेल्या फुले कशी झाली हे एकमेकांना दाखवित प्रशंसा मिळवित होते.

दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या या फुले बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गातून आपणही आपल्या कल्पनेतील फुले बनवू शकतो. असा आत्मविश्वास सहभागी झालेल्या महिला आणि युवतींना मिळाला. यंदा दिवाळीत सजावट करण्यासाठी स्वतः बनविलेल्या फुलांचा उपयोग करण्याचा संकल्पही त्यांनी महिलांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>