म. टा. प्रतिनिधी, नाशिक
तळेगाव (अंजनेरी) येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे पडसाद रविवारी दिवसभर दिसून आले. विशेषतः मुंबई-आग्रा हायवेवरील परिस्थिती आटोक्यात आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलिस पाहत होते आणि आंदोलकर्ते बस, कार तसेच दुचाकी पेटवत राहिले. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. संध्याकाळी उशिरा लोकप्रतिनिधींना सोबत घेत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना विनवणी केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे पाच वर्षांच्या मुलीवर १५ वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना रात्री नऊ वाजेनंतर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली. यात अतिशयोक्ती वर्णन करण्यात आले. यानंतर मात्र मराठा समाजाच्या तरुणांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. रात्री १२ वाजेपासूनच इगतपुरी टोलनाका, वाडीवऱ्हे, गोंदे चौफुली तसेच विल्होळी येथे आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. विल्होळी येथे आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना मारहाण करीत त्याची पेट्रोलिंग व्हॅन पेटवून दिली. यानंतर, दिवसभरात विल्होळी येथेच पाच बसेस, दोन कार तसेच एक दुचाकी आंदोलकांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पाडल्या. कंटेनर, कार तसेच इतर वाहनांच्या काचाही मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आल्या. पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत पोलिस येथे फिरकलेच नाही. तसेच आलेल्या पोलिसांनी हतबलतेने पाहण्यापलिकडे काही केले नाही. पोलिस असताना येथे एक बस पेटवून दिली, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासमोरच एक दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आली.
मीडियाच्या नावाने डांगोरा
आंदोलनकर्ते आक्रमक होते कारण तेथे पोलिसच नव्हते. पोलिसांना या आंदोलनाची तीव्रता समजेपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन चिघळण्यासाठी मीडियाला दोषी ठरवले. विल्होळी येथे काही पत्रकार वार्तांकनाचे काम करीत असताना ग्रामीण पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने त्यास हरकत घेतली. आंदोलनकर्ते समोर असताना त्यांना पकडण्याचे सोडून तिवारी व त्यांचे सहकारी पत्रकारांना दमबाजी करण्यात मश्गुल होते. तुम्ही मीडियावाले असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले, तर ते तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशा वेळी आम्ही काहीही करू शकणार नाही, असे विचार तिवारी यांनी मांडले. वास्तविक, पोलिसांनी काहीच केले नाही. जळते ते जळू द्या, आपोआप शांत होईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.
चुंभळे येताच आंदोलक थंड
पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळेच आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या उपस्थितीत वाहनांची जाळपोळ केली गेली. संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना सोबत घेऊन विल्होळी येथे आले. चुंभळे येताच अवघ्या पाच मिनिटांत आंदोलन मागे घेण्यात आले.
दलितांमध्ये भीती
विल्होळी, वाडीवऱ्हे तसेच या परिसरात राहणाऱ्या दलितांमध्ये आजच्या प्रकरणामुळे भीतीची भावना निर्माण झाली आहे. विल्होळीसह वाडीवऱ्हे भागात दलित वस्त्यांवर हल्ला करण्याची तयारी केली जात होती. मात्र, आंदोलनकर्त्यांमधील काहींनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून पुढील अनर्थ ठळला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट