बागलाण तालुक्यात मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला असून, तालुक्यात ठिकठिकाणी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील १७१ गावांपैकी २८ गावे व ४ वाड्यांना सुमारे २५ टँकर सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात १५ टँकर्स वाढण्याची शक्यता आहे.
बागलाण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह नामपूर, काटवन परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात २५ टँकर सुरू असून, पैकी ५ शासकीय तर १९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठ ठिकाणच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन टँकर भरण्यासाठी व पाच गावांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील सारदे, तरसाळी, सुराणे, रामतीर, बिजोरसे, इजमाणे, रातीर, नवेगांव, पिंपळकोठे, अजमीर सौंदाणे, कऱ्हे, वरचे टेंभे, चौगाव, पिंपळदर, चिराई, राहुड, जुनीशेमळी, नामपूर, कातरवेल, बहिराणे, मळगाव भामेर, भाक्षी, देवळाणे, आखतवाडे, श्रीपूरवडे, वडेखुर्द, टिंगरी, खमताणे या गावांसह लोणारवाडी, वघाणे पाडा, किरायतवाडी, जामनवाडी या चार वाड्यांचा समावेश आहे. आराई, बिजोटे, ठेंगोडा, चौंधाणे, नवी शेमळी, इंदिरानगर, निताणे, या आठ ठिकाणी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. सटाणा शहरात देखील सद्यस्थितीत आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट