आतिथ्य क्षेत्रात जगभरात कृषी पर्यटन किंवा ग्राम पर्यटन याचा अत्यंत महत्त्वाचा असा वाटा आहे.नाशिकला असलेल्या आल्हाददायक वातावरणामुळे विविध प्रकारच्या पिकांची तसेच फळबागांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. द्राक्ष शेती, डाळिंबाची शेती तसेच विविध प्रकारची फळे, भाजीपाला व फुलांची अत्यंत समृद्ध शेती या भागात केली जाते. शेती व्यावसायात मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. नवी पिढी शेती व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघते. यामुळे या क्षेत्रात मोठी क्रांतिकारी बदल घडून आले. जैव तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम पिके घेऊ लागले आहेत. अशा प्रकारे उत्पादकता वाढीत नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यावरण अनुकूल अशा मापदंडांचा वापर केला जातो. या सगळ्यात आपली शेती खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली आहे. या सगळ्यात कृषी पर्यटन तसेच त्यावर आधारित आतिथ्य व्यवसायाकडे तितक्या गंभीरतेने पहिले गेले नाही. युरोपात कृषी अथवा ग्राम पर्यटन यांकडे अत्यंत व्यावसायिकतेने बघितले जाते. यामुळे तेथील शेतकऱ्यांना अथवा गावकऱ्यांना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण झालेला दिसतो.
स्थानिक हस्तकला व्यवसाय तसेच कारागिरांना देखील यामूळे चांगले दिवस आले आहे. आपल्या जिल्ह्यात देखील कृषी अथवा ग्राम पर्यटनास मोठाच वाव आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन होते. पर्यटकांना द्राक्षाच्या हंगामात जर द्राक्ष खुडणीपासून ते पॅकिंगपर्यंत होणाऱ्या प्रक्रियेत सामील केले व तेथेच त्यांच्या निवासाची व जेवणाची सोय केली तर निश्चितच मोठ्या प्रमाणात पर्यटक याचा आनंद घेतील. सोबतच ग्रामीण जीवनाची ओळख होईल तसेच तेथील स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद देखील घेता येईल. यामुळे ग्रामीण भागात उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत निर्माण होईल. त्यासोबतच द्राक्षाची विक्री थेट ग्राहकास होईल. यामुळे शेतकरी आणि पर्यटक दोघांनाही याचा लाभ होईल.
येणाऱ्या पर्यटकांना शेतावरच शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरातच जर चांगल्या निवासाची सोय करून दिली तर निश्चितच पर्यटक आनंदाने या गोष्टीचा स्वतःहून प्रसार करतील कालांतराने अशा प्रकारचे पर्यटन निश्चितच लोकप्रिय होईल. शेतकरी व शहरी भागातील लोकांमध्ये दृढ असे नाते निर्माण होईल. एखादा पर्यटक जेव्हा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या घरी राहतो तेव्हा त्याला शेती सोबतच ग्रामीण भागातील जीवनमान, रूढी परंपरा या जवळून अनुभवता येतात.
नव्या पिढीला शेती व्यवसायाची ओळख होते. त्यात येणाऱ्या अडीअडचणी व त्याचबरोबर शेती पिकविण्यासाठी लागणाऱ्या कष्टांची देखील जाणीव होते. बहुतेक द्राक्ष उत्पादक शेतकरी हे शेतावरच राहतात व आर्थिक सुबत्तेमुळे बहुतेकांनी सर्व सोयींनी युक्त असे बंगले शेतावरच बांधलेले दिसतात. या राहत्या घरांमधीलच एखादी खोली जर पर्यटकांसाठी राखून ठेवली तर पर्यटक आनंदाने तेथे राहतील. द्राक्षासारखेच जिल्ह्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. डाळिंबाच्या शेतीतून देखील ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता वाढलेली पाहायला मिळते. तिथे सुद्धा कृषी पर्यटनास मोठा वाव आहे. यातूनच ग्रामीण भागात तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांना (लोणचे, पापड इ.) देखील चांगली मागणी वाढू शकते.
जिल्ह्याचा आदिवासी भागात तर पर्यटकांना प्रचंड वाव आहे. आदिवासी किंवा डोंगराळ भागात पावसाळ्यात निसर्ग अगदी हिरवाईने नटलेला असतो. या काळात बरेच लोक या परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरतात. त्यांना जर निवास व भोजनाची व्यवस्था त्या परिसरात करून दिली तर ते आनंदाने तेथे राहणे पसंत करतील. त्यामुळे तेथे राहणाऱ्या आदिवासींना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण होईल. सोबतच शहरी लोकांनादेखील आदिवासी लोकांच्या जीवनमान जवळून अनुभवता येईल. या आदिवासी भागात अनेक लोककला तसेच नृत्य प्रकार आजही जतन केलेले दिसतात. या दुर्मिळ कलांचा पर्यटकांना देखील निश्चितच आस्वाद घेता येईल. डोंगराळ भागात पिकणाऱ्या स्थानिक वाणांचे भात, नाचणी, वरई आदींना देखील शहरी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे शहरी भागातील लोकांना याचा निश्चितच आस्वाद घेता येईल.
डोंगराळ भागात अनेक दुर्मिळ अशा वनौषधी तसेच पावसाळी भाज्यांची उपलब्धता असते. या गोष्टी जर आपण पर्यटकांपर्यंत पोहोचवू शकलो तर तेथील आदिवासींना निश्चितच चागले उत्पन्न मिळू शकते. आपल्याकडे विविध प्रकारच्या फुलांचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पण आपण कधीही पर्यटकांनी ही फुले शेतावर येऊन पहावी असा कधीही प्रयत्न करत नाही. किंबहुना आपल्या देशातील लोक वेगवेगळ्या फुलांचा बहर अनुभवण्यासाठी देश विदेशात प्रवास करतात. या प्रकारच्या पर्यटकांना आपण जर इथल्या फुलांचा बहर अनुभवण्यास बोलावले तर आतिथ्याचे नवीन दालनच आपल्या समोर खुले होईल.
शेतावरची बैलगाडी, मोटेने पाणी ओढणारे बैल, चुलीवर भाकरी करणाऱ्या बायका, चौरंग पाटावर केलेले जेवण म्हणजे कृषी पर्यटन या जुनाट संकल्पनेवर आपण अडकलेले आहोत. गरज आहे ती इथे येणाऱ्या पर्यटकांना शेतीच्या नवीन पद्धती त्यावर आधारित उद्योग प्रक्रिया व सोबतच त्यांच्या आरामदायी निवासाची व्यवस्था या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याची. यातूनच निश्चितपणे कृषी पर्यटन व ग्राम पर्यटन या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो.
(लेखक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट