म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिध्दी पावलेले नाशिक सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहे. थंडीच्या दिवसांचा चांगलाच फायदा नाशिकला होत असून, येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक नाशिकच्या दिशेने येत आहे. येथूनच काही अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर, वणी-सापुतारा तसेच शिर्डी या पर्यटन व धार्मिक स्थळांच्या ओढीमुळे पर्यटक नाशिकला वळत आहेत.
रेंगाळलेल्या थंडीमुळे थोडा उशिरा सुरू झालेला पर्यटकांना आवडणारा थंडीचा मोसम आता चांगलाच बहरला आहे. नाशिक परिसरातील मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी फुल्ल गर्दी केली असल्यामुळे पर्यटकांनी शहर बहरले आहे; मात्र पार्किंग व रस्ते यांची योग्य सोय नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सध्या डोके वर काढत आहे. प्रत्येक ठिकाणी अर्धा ते एक तास रांगेत उभे रहावे लागत असल्यामुळे पर्यटकांची नाराजीही पसरली आहे. शहरातील पांडवलेणी, चामरलेणी, रामसेज, अंजनेरी, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर परिसर, दिंडोरी, चांदवड परिसरातील ऐतिहसिक किल्ले पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत अाहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी फिरण्यासाठीही पर्यटक राजीखुशीने तयार होत असून, नांदूरमध्यमेश्वरला भेट देण्यासाठी पसंती देत आहेत. निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या व विविध वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वास्तव्य असलेले नांदूरमध्यमेश्वर नेहमीच पर्यटक, वनस्पतिशास्त्रज्ञ व गिरिभ्रमंतीकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.
द्राक्षबागांनी बहरलेल्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर म्हणजे हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे हक्काचे ठिकाण. वन विभागाच्या माहितीनुसार १५० जातींचे परदेशी व स्थानिक पक्षी येथे पाहायला मिळतात. फ्लेमिंगो, स्पुनबिन, ग्रे व परपल हेरॉन, पेंटेड स्कॉर्क, आयबीस, टिल्ट यांचा प्रामुख्याने त्यात समावेश आहे. पक्षीनिरीक्षणासाठी वन विभागाने येथे निरीक्षण मनोरे उभारले आहेत.
विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यापेक्षा या निसर्गरम्य ठिकाणांकडे पर्यटक अधिकांश वळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरी पर्यटकांची संख्याही वाढली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्याबरोबर परराज्यातील पर्यटकांनी हजेरी लावून येथील निर्सगाच्या अनोख्या आविष्काराचा आस्वाद घ्यायला सुरूवात केली आहे.
जिल्हा परिसरातही होते भ्रमंती
निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विपश्यना केंद्र, जवळच असणारे भंडारदरा धरण, धुक्यांच्या दुलईत हरवणारा कसारा घाट, कावनई व टाकेद यासारखी ऐतिहासिक धार्मिक स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील 'चेरापुंजी' म्हणून इगतपुरी तालुक्याची खरी ओळख असली तरी अवघा नाशिक जिल्हा गड-किल्ल्यांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. रतनगड, साल्हेर-मुल्हेर, ओंधा-पट्टा, धोडप, कौळाणे, मार्कंडेय, रामशेज व अनकाई असे सह्याद्रीच्या रांगेतील अनेक गड-किल्ले पर्यटकांना खुणावत आहेत.
धार्मिक पर्यटनालाही प्रचंड वाव
नाशिक हे नैसर्गिक पर्यटनापेक्षाही धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला येण्याची आज गरज आहे. त्र्यंबकेश्वर तसेच रामकुंड या दोन ठिकाणी पर्यटनाला वाव असला तरीही आणखी अनेक धार्मिक ठिकाणे नाशकात आहेत; मात्र त्याकडे कुणाचे अधिक लक्ष जात नसून त्याची जाहीरात करण्याची गरज आहे. हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनेरी, समर्थ रामदासांनी वास्तव्य केलेले आगर टाकळी, इच्छामणी गणपती (उपनगर ), एकमुखी दत्तमंदिर, कालिका मंदिर, देवळाली कँपजवळ असलेले खंडोबाची टेकडी, चामर लेणी, नवश्या गणपती, भक्तिधाम (पेठ नाका), मुक्तिधाम (नाशिक रोड) या देखील धार्मिक पर्यटनस्थळांमध्ये मोडणाऱ्या ठिकाणांची माहिती पर्यटकांना मिळाल्यास येथेही भेटी देण्यास ते उत्सुक असतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट