Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘सीबीआयने विश्वासात घेतले नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली सरकारच्या विरोधातील सीबीआयची कारवाई ही सूडबुध्दीने असल्याचा आरोप दिल्लीतील आमदार व आपचे माजी मंत्री गिरीश सोनी यांनी केला. ही कारवाई करताना सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने विश्वासात घ्यायला हवे होते, असा दावाही सोनी यांनी पत्रकार परिषदेत केला.

उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी या भूमिकेतून ते गुरूवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केजरीवाल सरकारला बदनाम करण्यासाठी मोदी सरकारच्या षडयंत्राचा भाग म्हणजे सीबीआयचे छापे आहेत. या सरकारमधील ज्या व्यक्तींना या छाप्यात लक्ष केले गेले ती त्यांची जुनी प्रकरणे नेमकी आताच उकरून काढली जात आहेत. मोदी सरकार सातत्याने केजरीवाल सरकारला लक्ष करते आहे. काँग्रेस आणि भाजपासह विरोधकांकडून आम्ही लक्ष्य ठरत असून, देखील चांगल्या कामांचा पाठपुरावा सोडलेला नाही असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीमधील सुरक्षेवर ते म्हणाले, तेथील पोलिस यंत्रणा बहुतांशी केंद्राच्या अख्यत्यारीतील आहे. येथे पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. सार्वजनिक ठिकाणी नाग‌रिकांना सुरक्षेप्रती आश्वस्त करताना ते म्हणाले, दिल्ली सरकार लवकरच पाच हजार मार्शलची भरती करून त्यांना सार्वजनिक ठिकाणी सेवा देणार आहेत. त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेवर भर देण्यात येईल.

महाराष्ट्रात आप पक्ष प्रभाव वाढवू शकला नसल्याची वस्तुस्थितीही त्यांनी मान्य केली. महाराष्ट्रात नव्याने समित्यांची रचना करण्यात येईल, असेही ते म्हणाले. दिल्लीमध्ये शिक्षण आणि आरोग्य या विषयावरील तरतूदीमध्ये दीड ते दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीतील सरकारी शाळांचा दर्जा अवघ्या तीन वर्षात खाजगी शाळांच्याही वर जाईल, असा दावाही त्यांनी केला.

तर श‌ीला दीक्षितांच्या कार्यकाळात फ्लाय ओव्हरसारख्या बड्या ‍प्रकल्पांना जितका पैसा लागायचा त्या तुलनेत केजरीवाल सरकारने किमान शंभर कोटी रूपयांनी या प्रकल्पांच्या किमती खाली आणून भ्रष्टाचाराच्या फुगवट्याला टाचणी लावल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव महासभेतही गाजला पाणीप्रश्न

$
0
0

मालेगाव : मालेगाव मनपात बहुतांशी वेळा गोंधळ आणि वादग्रस्त मुद्द्यांमुळे तहकूब होणारी महासभा आज शांततेत पार पडली. नगरसेवक सखाराम घोडके यांनी महासभेपुढे ठेवलेले पाणीपुरवठा व घरकुल योजना दिरंगाई प्रकरण यांसह जनता दलाच्या मनमानी गैरकारभाराचे मुद्दे महासभेत प्रमुख राहिले. विषयपत्रिकेवरील एकूण आठ विषयांपैकी सहा विषयांना महासभेने मंजुरी दिली, तर एक विषय रद्द करून एकाला स्थगिती देण्यात आली. मात्र, या आधी झालेल्या प्रत्येक महासभेत दिसणारा अभूतपूर्व गोधळ न झाल्याने गोंधळी नगरसेवकांच्या शिस्तप्रिय वर्तणुकीबद्दल मनपा वर्तुळात चर्चा रंगली होती.

सभेच्या प्रारंभी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी तसेच लेखक मुरलीधर खैरनार यांच्यासह शहरातील दिवंगतांनाबद्दल शोकप्रस्ताव सादर करण्यात येवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मात्र या नंतर लगेचच जनता दलाचे नगरसेवक बुलंद इक्बाल व अन्य जद च्या नगरसेवकांनी महापौरांच्या पुढील जागेत येवून मनपाच्या प्रवेशद्व्रावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाचा मुद्दा उपस्थित करीत आक्रमक पवित्र घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील शरीफ गफूर पारकर (८१) या आरोपीचा आज, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान, सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. २०१३ पासून पारकर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता.

मुंबई हादरावून सोडणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात पारकरला टाडा कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. प्रारंभी हा कैदी मुंबईच्या आर्थररोड कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. २०१३ साली त्याला नाशिकरोड कारागृहात हलविण्यात आले. वयोमानामुळे त्याची प्रकृती खालावलेली होती. त्याला पक्षाघात आणि न्यूराजेटिक हा आजार जडला होता. तीन आठवड्यांपूर्वी या कैद्याला प्रशासनाने आपल्या वाहनाने मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलविले होते. तेथून दोन दिवसांपूर्वी त्याला नाशिकरोड कारागृहात हलविण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृती खालावतच गेली. आज, गुरूवारी कारागृहाच्या डॉक्टरांनी तपासून त्याला सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये हालवण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याला हॉस्पिटलमधील कैदी वार्डात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत सरकारवाडा तसेच नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

दुकानात चोरी; एकाला अटक

नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी एकाला दुकान फोडल्याप्रकरणी अटक केली आहे. भगवान उर्फ मन्या गाडवे (३०, चेहेडी, नाशिकरोड) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून दोन लाख ३० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकांत धीवरे यांनी दिली.

नाशिकरोड येथील साई काॅम्पलेक्समधील दृष्टी सिरॅमिकचे दुकान रात्री फोडून गाडवे याने चोरी केली होती. २४ तासात त्याला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक खैरनार, उपनिरीक्षक गायकवाड, हवालदार पाटील, भालेराव, लोंढे, कोटमे यांनी ही कामगिरी केली.

रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पाथर्डी फाटा येथील विक्रीकर भवन रस्त्यावर पायी फिरायला निघालेल्या व्यक्तीला रिक्षाने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शांताराम रामभाऊ चुंबळे (४५) असे त्यांचे नाव असून, ते महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांचे पुतणे होते.

मुळचे गौळाणे येथील असलेले शांताराम चुंबळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर विक्रीकर भवनच्या रस्त्यावर फिरण्यासाठी निघाले होते. त्यांना भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने (एम. एच. १५ झेड - ००८८) जोरदार धडक दिली. शांताराम चुंबळे यांना हॉस्पिटलमध्ये तत्काळ नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी रिक्षासह चालक संजय काशिनाथ पवार (रा. पाथर्डी फाटा) यास अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ गटाला धक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाग प्रक्रिया गटाच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत पवार-दराडे गटाचे उमेदवार प्रमोद मुरलीधर पाटील यांनी प्रतिस्पर्धी सुभाष विठ्ठलराव निकम यांचा सहा मतांनी पराभव करीत बाजी मारली. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांना हा मतदारांनी दिलेला धक्का समजला जात आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ प्रणित पॅनलने बहुमत प्राप्त केल्यानंतर बाजार समितीच्या प्रक्रिया गटातील संचालक पदाच्या एका जागेसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. अवघे २४ मतदार असलेल्या या गटातील निवडणुकीसाठी आमदार छगन भुजबळ यांनी बाजार समितीचे माजी संचालक सुभाष निकम यांना रिंगणात उतरविले होते. तर, येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांच्या गटाने निकम यांच्या विरोधात तालुक्यातील नगरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमोद पाटील यांना उमेदवारी बहाल केली होती.

शुक्रवारी सकाळी ९ ते १२ यावेळेत बाजार समितीच्या कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली. या गटातील सर्वच्या सर्व २४ मतदारांनी मतदान केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत मतमोजणी होऊन अवघ्या दहा मिनिटात निकाल जाहीर झाला. प्रमोद पाटील यांना १५ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुभाष निकम यांना ९ मते मिळाली. सहकार अधिकारी राजेंद्र लोंढे यांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पहिले. त्यांना संदीप नेरे, बाजार समिती सचिव डी. सी. खैरनार यांनी सहकार्य केले.

या निवडणुकीत प्रमोद पाटील यांनी बाजी मारताच पवार-दराडे गटाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पदाधिकारी अन् शिवसैनिकांनी येवला शहरातील विंचूर चौफुलीवर फटाके फोडत जल्लोष केला. यावेळी जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, पं. स. माजी सभापती संभाजी पवार, विठ्ठलराव शेलार, शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, जिल्हा दूध संघाचे चेअरमन शरद लहरे, बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे, डॉ. सुधीर जाधव, रतन काळे, बाजार समिती संचालक भास्कर कोंढरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, रिपाइंचे संजय पगारे आदी उपस्थित होते.

या निवडणुकीत भुजबळ गटाकडे मतदार अधिक असल्याची चर्चा झडत होती. भुजबळ समर्थकांकडून तसा खासगीत दावाही केला जात होता. मात्र, निवडणुकीत पाटील यांना मिळालेली मते लक्षात घेता दराडे-पवार गटाने प्रतिस्पर्धी गटातील मते आपल्याकडे वळविल्याचे निवडणूक निकालानंतर चर्चा रंगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्तावित शिंदे टोलनाका नकोच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील प्रस्तावित टोल नाका रद्द करावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत शून्य प्रहारात केली आहे. टोल नाका पुण्याजवळील चालकवाडी येथे प्रस्तावित केल्यास कोल्हापूर टोल नाक्यासारखा प्रश्न निर्माण होणार नाही, असे खासदार गोडसे यांनी म्हटले आहे.

शिंदेगाव नाशिकपासून सुमारे २० किलोमीटरवर आहे. महापालिका व सिन्नर नगरपरिषदेपासून ते सुमारे सात किलोमीटर आहे. प्रस्तावित टोलनाका शहर व तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी येतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० गेल्या पाच वर्षांपासून विकसित होत आहे. सिन्नर हे औद्योगिक शहर या मार्गावर आहे. सिन्नरचे शेतकरी नाशिक येथील बाजारपेठेत फळे-भाजापाल्याची विक्री करतात. असंख्य कामगार, नागरिक नाशिक-सिन्नर दरम्यान दररोज प्रवास करतात. हा मार्ग व्यापारी कामासाठी वापरला जात नाही. टोल नाका झाल्यास अव्यावसायिक वाहन धारकांना २१५ रुपयांचा मासिक पास काढावा लागेल. व्यावसायिक वाहन धारकांना या रकमेपेक्षा पन्नास टक्के जादा टोल भरावा लागेल. शेतकरी, भाजीपाल, धान्यवाहक, खासगी वाहनचालकांना याचा फटका बसेल. टोलचा भार हा पुढील १८ वर्षे वसूल केला जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ३१२ कोटी ९६ लाख असून शासकीय निधी १२ कोटी ५१ लाख आहे. उरलेली १९२ कोटी ४५ लाखाची रक्कम ग्रामीण भागाकडून ये-जा करणाऱ्यांकडून १८ वर्षे वसूल केली जाणार आहे, त्यामुळे टोल नाका रद्द करावा अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणमध्ये चक्काजाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

राज्य परिवहन महामंडळाच्या इंटक संघटनेच्या चालक व वाहकांनी चक्का जाम आंदोलनात शुक्रवारी सकाळी सहभाग घेतल्याने कळवण आगाराची सेवा पूर्णपणे कोलमडली. इतर संघटनांनीही त्यास पाठिंबा दिल्याने आंदोलनाचा मोठा परिणाम दिसून आला. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. दरम्यान, या संपामुळे खासगी वाहतूक तेजीत असल्याचे दिसून आले.

पंचवीस टक्के पगारवाढ व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) ने बेमुदत संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या बेमुदत संपात कळवण आगाराच्या जवळपास सर्वच संघटना सहभागी झाल्याचे दिसून आले. सकाळी लवकर चक्का जाम आंदोलनास सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातून कळवण येथे शिक्षणास येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. आंदोलनास इतर संघटनांनी पाठिंबा दिल्याने बससेवा पूर्णपणे बंद झाली. सकाळी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यानंतर बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला.

खासगी वाहतूकदारांची चांदी

प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. खासगी वाहतूकदारांनी प्रवासभाडे वाढविल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसल्याचे दिसून आले. कळवण आगारात सर्वच्या सर्व बसेस जमा करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या आगाराच्या बसेस ये-जा करीत असल्याने काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळत होता. अनेकांनी खासगी वाहतुकीला पसंती दिली.

बस रिकाम्याच धावल्या

सिन्नर : एस टी महामंडळाच्या चालक वाहक संघटनांनी विविध मागण्यासाठी पुकारलेल्या संपात दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बंद सुरूच ठेवल्याने प्रवाशांसह विद्यार्थी, नोकरदारांचे हाल झाले. दुपारी संप मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतर बसेच पूर्ववत सुरू करण्यात आल्या. मात्र, प्रवाशी नसल्याने या बसेस रिकाम्याच धावत होत्या. गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासून बंदला प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी सकाळी बसेस सुरू होतील या आशेवर नागरिक बसस्थानकावर आले होते. मात्र, बंद सुरूच असल्याने विद्यार्थ्यांसह, नोकरदार यांचे कामाचे गणित बिघडले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास संप मागे घेत असल्याचे संघटनांनी जाहीर केले. मात्र बसेस सोडण्याचे गणित बिघडल्याने व प्रवाशी नसल्याने अनेक बसेस रिकाम्याच सोडाव्या लागल्या. यामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेची आता आर्थिक कोंडी!

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : जायकवाडीचे पाणी आंदोलन व स्मार्ट सिटी प्रकरणात भाजपला कोंडीत पकडणाऱ्या मनसेला भाजप सरकारने आर्थिक कोंडीत पकडले आहे. सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात पालिकेचा आर्थिक भार उचलणारे शासन आता उर्वरित २०२ कोटींचा शिल्लक निधी देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. कुंभमेळ्याच्या शाही पर्वण्या संपून तीन महिने झाले तरी शासनाने हा निधी पालिकेला दिलेला नाही. त्यामुळे महापालिका आर्थिक कोंडीत सापडली आहे. पालिकेने या निधीसाठी पत्रव्यवहाराचा सपाटा लावला असला तरी नगरविकास विभाग या पत्रांना केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे लेखा विभागाची अस्वस्थता वाढली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेला आराखडा ११२९ कोटींपर्यंत पोचला. त्यात भूसंपादनाचे २०० कोटींचे प्रस्ताव होते. त्यामुळे उर्वरित ९१४ कोटी २९ लाखांचा आर्थिक बोजा महापालिकेला असह्य होता. पालिकेने राज्य सरकारला विनंती केल्यानंतर सरकारने ७५ टक्के तर महापालिकेने २५ टक्के भार उचलण्याचा सयुंक्त निर्णय नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाला होता. त्यामुळे राज्य सरकारवर ६८९ कोटी आणि महापालिकेवर २३० कोटींचा भार आला. त्यामुळे पालिकेने आराखड्यानुसार कामांचा धडाका लावला. तर उर्वरित निधीसाठी ३०० कोटींचे कर्जही घेतले.

राज्य सरकारने काही अंशी दिलेला शब्द पाळत सिंहस्थ काळापर्यंत महापालिकेला ४८७ कोटी रुपये अदा केले आहेत. पंरतु, उर्वरित २०२ कोटी दिलेले नाहीत. या निधीसाठी लेखा विभागाकडून नगरविकास, अर्थ व नियोजन विभागाला वारंवार पत्रव्यवहार केला जात आहे. परंतु,त्याला अद्यापही प्रतिसाद दिला जात नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल कांदादरात घसरण सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या काही दिवसांपासून लाल कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरूच असून, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी पूर्वीच्या तुलनेत कांदा बाजारभाव जवळपास १०० रुपयांनी गडगडले. दुष्काळी परिस्थितीने अगोदरच मेटाकुटीस आलेला कांदा उत्पादक शेतकरी ढासळणाऱ्या बाजारभावामुळे हवालदिल झाला आहे.

येवला बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात शुक्रवारी साडेसातशे ट्रॅक्टरमधून जवळपास १५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. लाल कांद्याला किमान ७०० ते कमाल १२५० तर सरासरी एक हजार रुपये असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शुक्रवारी जवळपास पाच हजार क्विंटल इतकी कांदा आवक होताना बाजारभाव किमान ७०० ते कमाल १२०० तर सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटल होता. गुरुवारी येवला बाजार समितीत याच लाल कांद्याला कमाल १३५० असा बाजारभाव मिळाला होता.

आवक वाढल्याचा परिणाम कांदा बाजारभावावर दिसत आहे. सध्या देशांतर्गत असलेल्या मागणीपेक्षा घाऊक बाजारात पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने लाल कांदा बाजारभाव काहीसे खाली आलेले आहेत.

- डी. सी. खैरनार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट कॅन्टोन्मेंट निर्मितीचा मानस

$
0
0

रक्षा संपदा दिनानिमित्त नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात कर्नल एस. एम. दीक्षित, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विलास पवार, उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, भगवान कटारिया, कावेरी कासार, आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे आदी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष ठाकरे म्हणाले की सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी बोर्डात लोकप्रतिनिधींना विशेष अधिकार देण्यात यावे. कार्यक्रमास बोर्डाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सायमन भंडारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

शाळांतर्फे विविध स्पर्धा कॅन्टोन्मेंट बोर्ड शालेच्या वतीने रक्षा संपदा दिनानिमित्त खंडेराव टेकडीच्या पायथ्याशी शेकडो विद्यार्थ्यांची गटात विभागणी करत विविध विषयांवर चित्र काढले. तसेच शाळेमध्ये निबंध, रांगोळी स्पर्धा झाल्या. चित्रकला स्पर्धांसाठी शाळेचे मुख्याध्यापक के. टी. पाटोळे यांसह कलाशिक्षक प्रयत्नशील होते. कॅन्टोन्मेंट रुग्णालयात ४७ जणांचे हिमोग्लोबिन, १८ जणांची शुगर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र गायकवाड यांनी ३० जणांची तर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनीष बोथरा यांनी १५ जणांची तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरे प्रकल्पासाठी नागपूरला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

एकलहरे येथे ६६० मेगावॅटचा प्रस्तावित वीजप्रकल्प लवकर व्हावा, या मागणीसाठी सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिक, कंत्राटी कामगार व संघर्ष समितीतर्फे नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाचे नेतृत्व प्रा. जोगेंद्र कवाडे, गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे यांनी केले. संजय जाधव, प्रदीप वीर, प्रवीण पगारे आदींसह नागरिक सहभागी झाले. प्रा. कवाडे म्हणाले, की एकलहरे येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारला जाणार आहे. मात्र, विविध परवानग्या मिळण्यासाठी सहा वर्षांपासून प्रकल्प रखडला आहे. जुने संच केव्हाही बंद केले जाऊ शकतात. तेथील कंत्राटी कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

देशातील आघाडीच वीज संच उत्तम कामगिरी करत असताना ते बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वे, वीज, पाणी, जागा आदी सर्व सुविधा असताना सरकारी एवजी खासगी प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे. प्रकल्प त्वरित सुरु व्हावा यासाठी शासनाने लवकरात लवकर हालचाल करावी, अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कंपनीचा ग्राहकांना ‘शॉक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वीज महावितरण कंपनीने कालिका परिसरातील ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. अनेक सोसायट्यांचे वीज बिल भरलेले असताना कनेक्शन तोडण्यात आले आहे. घडल्या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून, या कारवाईविरोधात लढा छेडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

कालिका परिसरात श्रृंगेरी अपार्टमेंट ही गृहनिर्माण संस्था असून, या सोसायटीत मध्यमवर्गीय नागरिक राहतात. या सोसायटीला गेल्या अनेक महिन्यांपासून स्टेअरकेस आणि थ्रीफेज ही दोन बिले येत नसल्याने त्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी सोसायटीने अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. या परिसरातील निवासी वापराची बिलेही रस्त्यात टाकून दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा कुणाला ही बिले सापडतात, तेव्हा ती रहिवाशांना मिळतात. अन्यथा रहिवाशांना मनस्तापालाच सामोरे जावे लागते.

बिलांचे वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सोसायटीच्या सभासदांनी तक्रार नोंदवली. मात्र त्यानेही दुर्लक्ष्य केले. तरीही वेळोवेळी नेटवरून बिले काढून बिले भरल्याचे सोसायटीच्या सभासदांचे म्हणणे आहे. मात्र, मार्च २०१५ पासून या सोसायटीला बिलच मिळाले नाही. मध्ये अचानक नेटवर १६ हजार ५२० रुपयांचे बिल दाखवण्यात आले. ते ५ नोव्हेंबर रोजी सोसायटीच्या सभासदांनी भरले. त्यानंतर अचानक कुणालाही न सांगता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोसायटीचे कनेक्शन तोडले. सकाळी पाण्यासाठी मोटार सुरू करतांना ही बाब लक्षात आली. यासंदर्भात चौकशी केली असता, तुमचे बिल थकले आहे, बिल भरा असे सांगण्यात आले. १० डिसेंबर २०१५ रोजी महावितरणने वीज बिल दिले. त्याची भरणा करण्याची मुदत २६ डिसेंबर असताना त्यापूर्वी १७ डिसेंबर रोजी पुन्हा वीज कनेक्शन कापण्यात आले. या परिसरात असे वारंवार घडत असून, कोणत्याही ग्राहकाला नियमित बिलांचे वाटप करण्यात येत नाही. याबाबत भद्रकाली येथील कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली असता, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नाही. महावितरणच्या मनमानी कारभाराला आम्ही कंटाळलो असून, परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन थेट ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रसंगी आंदोलनाचाही इशारा रहिवाशांनी दिला आहे. वीज कंपनी ग्राहकांंना सतावण्याचे काम करीत आहे, असा आरोपही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत आज ग्रामीण साहित्य संमेलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक यांच्या वतीने आज (१९ डिसेंबर) इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे चौथे नवोदितांचे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन तथा ५ पाचवा भव्य गुणवंत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध सिने गीतकार तथा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे हे राहणार आहेत.

या संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून खासदार हेंमत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, निर्मला गावित, हेंमत टकले, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, जयंत जाधव, डॉ. अपुर्व हिरे हे सर्व आमदार, माजी मंत्री विनायकदादा पाटील, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार माणिकराव कोकाटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ९ वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन, दीपप्रज्वलन, पुस्तक प्रकाशन, दिनदर्शिका प्रकाशन व गुणवंत सन्मान सोहळा होणार आहे. साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर स्वागत तर विजयकुमार कर्डक हे प्रास्ताविक करणार आहेत. रामदास वारुंगसे सूत्रसंचालन तर सुनील गोवर्धने आभार व्यक्त करतील.

दुपारी १२ वाता सुप्रसिद्ध साहित्यिक तुकाराम धांडे यांचे साहित्यिक प्रवासाचा वेध घेणारी प्रकट मुलाखत पत्रकार भास्कर सोनवणे हे घेतील. दुपारच्या सत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचन, लेखन संस्कृतीवर झालेले नेमके परिणाम या विषयावर परिसंवाद होणार आहे. कथा कथनात जेष्ठ लेखक डॉ. भास्कर म्हरसाळे, अलका कोठावदे व नवनाथ गायकर हे सहभागी होणार आहेत. बालकांना मनोरंजन विश्वातील सैर घडवणारे जादूचे प्रयोग ही यावेळी रुपचंद डगळे व राजू आतकरी हे सादर करणार आहेत. स्वर साज शाहिरीचा या कार्यक्रमातून शाहीर बाळासाहेब भगत, उत्तम गायकर व शिवाजी शिंदे हे लोककला सादर करणार आहेत. यावेळी आयोजित निबंध स्पर्धा, सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, रांगोळी स्पर्धांसह साहित्य परिषद सर्वोत्कृष्ट लेखन पारितोषिकाचे ही मान्यवरांचे हस्ते वितरण होईल. समारोप राजयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष साहेबराव उत्तेकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैगंबर जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन

$
0
0

पैगंबर यांची जयंती येत्या गुरुवारी (दि. २४) साजरी केली जाणार आहे. या दिवशी शहरातून निघणाऱ्या जुलूसमध्ये स्पिकर व डीजे असलेली वाहने आणू नये. ध्वनी प्रदूषण वाढून अनेकांना त्रास होईल असे कृत्य कुणीही करू नये, असे आवाहन धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त वडाळारोड येथे दररोज रात्री साडे आठ ते दहा वाजेपर्यंत धार्मिक प्रवचन होत आहे. अल्लामा मौलाना अनिस आलम सिवानी यांचे धार्मिक प्रवचन सुरू आहे. तसेच ठिकठिकाणी महिलांकडून सामूहिकरित्या मजलिस वाचन केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावाने फाडली ‘दिलवाले’ची पोस्टर्स!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बॉलिवुड सुपरस्टार शाहरूख खान याच्या `दिलवाले` चित्रपटाला विरोध करीत त्याचे खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न छावा संघटनेने शुक्रवारी केला. अखिल भारतीय छावा संघटनेने त्रिमूर्ती चौकातील दिव्या अॅडलॅब मल्टीप्लेक्सजवळ शाहरूखच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पोस्टर्सवर शाई फेकून ते फाडण्यात आले. या प्रकारामुळे प्रेक्षकवर्ग काही काळ धास्तावला होता. अंबड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

शहरातील चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारी 'दिलवाले' आणि 'बाजीराव मस्तानी' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या दोन्ही चित्रपटांना विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. देशवासीयांऐवजी पाकिस्तानला मदत करणारा तसेच वादग्रस्त वक्तव्ये करून देशाची एकात्मता धोक्यात आणणाऱ्या शाहरूख खान याला विरोध दर्शविण्यात आला होता. तर बाजीराव मस्तानी चित्रपटातही इतिहास चुकीच्या पध्दतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्याने या चित्रपटालाही अनेक संघटनांनी विरोध दर्शविला होता. हे चित्रपट प्रदर्षित होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला होता.

त्रिमूर्ती चौक येथील दिव्या अडलॅबमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले. शाहरूख खान याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चित्रपटाचे पोस्टर्स फाडून त्यावर शाई फेकण्यात आली. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शाहरूखने त्यांना कधीच मदत करण्याचे औदार्य दाखविले नाही. मात्र त्याचवेळी पाकिस्ताननमध्ये तो भरघोस आर्थिक मदत करतो. अशा अभिनेत्याचे चित्रपट आपण का पहायचे, असा सवाल आंदोलकांनी केला. नागरिकांही हा चित्रपट पाहू नये असे आवाहनही करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात अक्षय पवार, नितीन अमृतकर, अजिंक्य शिर्के, शरद शिंदे, अर्जुन शिरसाठ, दशरथ माने, सागर जाधव, अजय कडभाने आदिंसह ७० ते ८० आंदोलक सहभागी झाले. अंबड पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. समज देऊन त्यांना सोडण्यात आले. दरम्यान, या चित्रपटाचे खेळ बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी अंबड पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आमदार सीमा हिरे यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले असून, त्यांनी राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

`बाजीराव-मस्तानी`चे खेळ मात्र सुरळीत

बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखविला असा आक्षेप घेत काही संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शविला होता. मात्र नाशिक शहरात कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय या चित्रपटाचे खेळ झाले. सिटी सेंटर मॉल, आयनॉक्स, दिव्या अडलॅब येथे या चित्रपटाचे खेळ सुरूळीत सुरू होते. विशेष म्हणजे शनिवारचीही बहुतांश तिकीटे बुक झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी होणारा विरोध प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र मावळल्याचे पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांदूळ, गव्हाचा ट्रक ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

रात्रीच्या गस्तवेळी येवला तालुक्यातील मातूलठाण रेल्वे गेटजवळ रेशनिंगचा गहू व तांदूळ असलेला संशयास्पदरित्या आढळून आलेला मालट्रक येवला शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेल्या या मालट्रक व त्यातील माल याची एकूण किमत सुमारे ५ लाख ९० हजार रुपये असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलिसांनी मालट्रक चालकास देखील ताब्यात घेतले आहे.

येवला शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपककुमार वाघमारे हे गुरुवारी रात्री गस्त घालीत असताना त्यांना येवला-नगरसूल रोडवर मातूलठाण रेल्वे गेट समोर ट्रक (एम.एच.१५, ए.जी. ७१७०) दिसून आला. हा मालट्रक थांबवत पोलिसांनी चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना यात काही वेगळाच प्रकार असावा असा संशय आला. हा ट्रक रस्त्याचे कडेला उभा करून पोलिसांनी ट्रकवरील ताडपत्री खोलून खात्री केली असता या ट्रकध्ये गहू व तांदळाने भरलेली पोती आढळून आली. गहू व तांदूळ याबाबत ट्रकचालक आयूब गुलाब इनामदार (वय ६३) रा. संजयनगर, कोपरगाव याला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने काहीही सांगण्यास नकार दिल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

सदरचा गहू व तांदूळ वैभव उर्फ भैय्या भाऊसाहेब नेरकर (रा. कोकमठाण, ता. कोपरगाव) याने मयूर राठोड (वालठाण, ता. चाळीसगाव) यांच्याकडून घेऊन कोपरगाव येथे पोहोच करण्यास सांगितले होते. रेशनिंगचा हा गहू व तांदूळ वालठाण येथून गाडीत भरताना तो कोपरगाव येथे पोहोच करण्यात येणार होता असे यावेळी चालकाने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या गहू व तांदूळ धान्याची येवला तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे यांना पाचारण केले जाताना पोलिसांनी तपासणी केली. हे धान्य संशयास्पद आढळून येत असून धान्य मालाबाबत चालकाकडे कोणत्याही पावत्या नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. वाहनचालक आयूब गुलाब इनामदार ( रा. कोपरगाव), वैभव उर्फ भैय्या भाऊसाहेब नेरकर (कोकमठाण, ता. कोपरगाव) व मयूर राठोड (वालठाण, ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये रेशनिंगचा माल काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी नेणे याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थॅलेसिमियाग्रस्तांना ‘अर्पण’चा दिलासा

$
0
0

ashwini.kawale

@timesgroup.com

नाशिक : खेळण्या-बागडण्याच्या वयात काही मुलांना थॅलेसिमियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. रक्त ट्रान्सफर करणे, वजन न वाढणे, आजारी पडणे यामुळे थॅलेसिमियाग्रस्तांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांसमोरही या आजाराचे मोठे आव्हान उभे राहते. त्यांचे हे आव्हान सोपे करण्यासाठी 'अर्पण ब्लड बँके'नी पुढाकार घेतला असून, १८१ थॅलेसिमियाग्रस्तांचे पालकत्त्व स्वीकारले आहे.

कुटुंबात एक जरी थॅलेसिमियाग्रस्त पेशंट असेल तर त्याच्याबरोबरच घरातील प्रत्येक व्यक्तीलाही या आजाराचा कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने सामना करावा लागतो. अर्पणच्या या उपक्रमामुळे नियमित रक्त बदलाचा त्रास सहन करणाऱ्या थॅलेसिमियाग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा मिळाला आहे. अर्पण ब्लड बँकेने २०१२ सालापासून पालकत्त्व स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. आज नाशिकबरोबरच हैदराबाद, मध्य प्रदेश येथील पेशंट्सही या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये १ ते २२ वर्षांमधील मुलांचा समावेश आहे. दर महिन्याला साधारण तीनशे रक्तपिशव्या या पेशंट्सला पुरविल्या जात आहेत.

रक्ताच्या गरजेबरोबरच इतर शारीरिक समस्यांनाही या पेशंट्सला सामोरे जावे लागत असल्याने ह्रदयाशी संबंधित चाचण्या, एक्सरे, सोनोग्राफी, रक्त तपासण्या, नेत्र तपासणी, बालकांच्या तपासण्याही मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यासाठी डॉ. मनोज चोपडा, डॉ. ललेश नहाटा, डॉ. ललिता जोशी, डॉ. सतिश पाटील, डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांची फळी सामाजिक जाणीवेतून कार्यरत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश, सिजीलुसी या कंपन्यांच्या सीएसआर या सामाजिक उपक्रमातून आर्थिक सहाय्य अर्पण ब्लड बँकेला लाभते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौरभचे उपकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुका पातळीवरील शालेय विज्ञान प्रदर्शनात त्याने एका शक्तिशाली मोटरवर चालणारी क्रेन पाहिली आणि आपल्याच घरात टाकाऊ समजून बाजूला पडलेल्या उपकरणातील मोटरीच्या वापरातून आपणही एक मिनी हँडल इलेक्ट्रीसिटी जनरेटर बनवावा, अशी भन्नाट कल्पना त्याला सुचली. संशोधकवृत्तीने त्यानंतर त्याला स्वस्थ बसू दिले नाही. बघता बघता त्याच्या प्रयोगशिलतेतून साकार झालेल्या मिनी हँडल इलेक्ट्रीसिटी जनरेटरला राष्ट्रीय पातळीवर शाबासकीची थाप मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याची निवड झाली आहे.

ही यशकथा आहे, मालेगाव शहरातील सौरभ सागर बागुल या बालवैज्ञानिकाची. येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाच्या एल. आर. काबरा विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. दिल्ली आयआयटीच्या प्रांगणात पाचव्या इन्स्पायर अॅवार्ड २०१५ राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात त्याच्या अनोख्या प्रयोगाने राज्यात द्वितीय तर देशात नववा क्रमांक पटकावला. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी देखील त्याच्या या अभिनव प्रयोगाला शाब्बासकीची थाप दिली.

या प्रदर्शनात देशातून एकूण ६९० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात राज्यातून ४३ बालवैज्ञानिकांना प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली. २५ जुरींच्या परीक्षणाअंती राज्यातील पाच प्रयोगशील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सौरभला विज्ञान विषयाची आवड असल्याने घरात नादुरुस्त असलेल्या टाकाऊ इलेक्ट्रिनिक उपकरणावर तो नेहमी प्रयोग करीत असे. यातूनच त्याचा मनात अगदी सहज हाताळता येईल, असा जनरेटर बनवण्याची कल्पना आली. यासाठी घरातील बंद कूलरची मोटर त्याने वापरली. याबाबत शाळेतील मुख्याध्यापिका पाठक, विज्ञान शिक्षक एम. बी. बागड व किशोर जाधव यांची त्याने मदत घेतली. तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य अशा वेगवेगळ्या पातळीवर सौरभच्या या जनरेटरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय पातळीवर त्याची निवड झाली. दिल्ली येथील प्रदर्शनात मिळालेल्या यशानंतर आता आंतराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या इन्स्पायर अॅवार्ड प्रदर्शनसाठी त्याची निवड झाली आहे. भविष्यात नासा, इस्रो या संस्थेत काम करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

मिनी जनरेटरची भन्नाट कल्पना साकारताना अनेक अडचणी होत्या, त्यावर मात केली. राष्ट्रीय पातळीवर प्रयोग सादरीकरण करण्यासाठी त्यात अनेक सुधारणा केल्या. इन्स्पायर अॅवार्ड प्रदर्शनात मिळालेल्या यशाबद्दल आम्हाला सौरभचा अभिमान वाटतो. वैज्ञानिक होण्याचे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने त्याचे हे पहिले पाऊल म्हणावे लागेल.

- महेश बागड, विज्ञान शिक्षक, काबरा विद्यालय, मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हागणदारी मुक्तीकडे महापालिकेचे पाऊल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत महापालिकेने हागणदारी मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकत शहरात शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. शहरात उघड्यावर शौचास बसणार्‍या ६ हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना, तर एक हजार लाभार्थ्यांना २२५ ठिकाणी सामूहिक शौचालय जानेवारी अखेरपर्यंत बांधून दिले जाणार आहे. त्यासाठी आठ एजन्सीजचीही नियुक्ती महापालिकेने केली असून, चार हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदानही जमा केले आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत नाशिक हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्टे असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली आहे.

या अभियानात महापालिकेने सर्व्हेक्षणमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या कुटुंबियांच्या घरी आता शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेने पाच महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण ५१ हजार ५८५ कुटुंबांच्या घरात शौचालय नसल्याचे समोर आले होते. यात ४४ हजार ६८१ कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो. त्यामुळे उर्वरीत ७ हजार १७४ कुटुंबे उघड्यावरच शौचास बसत असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने या कुटुंबांना स्वच्छ भारत अभियानातून शौचालय बांधून घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या कुटुंबाकडून अर्ज भरून घेण्यात आले आहे.

८७७ अर्ज तांत्रिक मुद्यावरून बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे ६ हजार ७३ कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जाणार असून, त्यांना त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान अदा केले जाणार आहे, तर उर्वरित लाभार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्याकरिता २२४ ठिकाणी सामूहिक शौचालय उभारले जाणार आहेत. पालिकेने या कामांसाठी ४ हजार २१७ लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा केले आहे. उर्वरित रक्कम नंतर दिली जाईल.

दिशाभूल केल्यास गुन्हा!
शौचालयासाठी दिलेल्या अनुदानाचा वापर शौचालय बांधण्यासाठीच करणे बंधनकारक आहे. त्यामुळे थेट बँक खात्यात पैसे दिले जाणार आहे. बांधकाम सुरू असतांनाचे व पूर्ण झाल्याचे फोटो दाखल केल्यानंतर त्याची महापालिकेतर्फे तपासणी केली जाईल. तपासणीत गडबड आढळल्यास व पैशांचा गैरवापर केल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी दोघांना दहा वर्षे ​सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघा आरोपींना शुक्रवारी कोर्टाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली. सन २०१२ मधील हे प्रकरण असून, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी नवनाथ कृष्णा म्हसकर हा अद्याप फरार आहे.

बारक्या दगडू हिलम (रा. बोरखिंड, ता.सिन्नर) आणि प्रभाकर महादू मुकणे (वय ५०, रा. सोनंबे, ता. सिन्नर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे २७ जून २०१२ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घराकडे परतणाऱ्या विवाहितेला रस्त्यात गाठून तिघा जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. याबाबत सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये तिघांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांनी गावातून धूम ठोकली. फरार झालेल्या आरोपींपैकी प्रभाकर मुकणे हा महिनाभरानंतर सोनंबे गावातच विवाहितेस दिसून आला. याबाबत माहिती समजताच पोलिसांनी त्याला सोनंबे गावातून अटक केली. त्यानंतर हिलमला सुध्दा पोलिसांनी जेरबंद केले. या दोघांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या गुन्ह्यातील तिसरा संशयित म्हसकर अद्याप फरार आहे. दरम्यान, या दोघांविरोधात पी. एम. चव्हाण यांच्या कोर्टात सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. सुनीता साळवे यांनी कामकाज पाहिले. त्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींविरोधात सबळ पुरावे मिळाल्याने कोर्टाने दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरला उपनगराध्यक्षपदी नवसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत संजय नवसे यांची बिनविरोध निवड झाली. नामदेव लोंढे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी संजय नवसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

नगरपालिकेत माजी आमदार माणिकराव कोकाटे गटाची सत्ता असून, उपनगराध्यक्षपदी नामदेव लोंढे यांना काम करण्याची संधी देण्यात आली होती. आवर्तन पद्धतीनुसार त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. गुरुवारी निवडणूक कार्यक्रम निश्चित केला. नगरपालिकेतील पक्षीय बलाबल विचारात घेता माजी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे १५ तर विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाचे १० नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी कोकाटे गटाकडून संजय नवसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images