Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अलंकारिक शैलीतील ‘आनंद‌’चित्रे

$
0
0

कुणाल गोराणकर

चित्रकार व चित्ररसिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या या जगप्रसिद्ध आर्ट गॅलरीत एकट्याने चौदा प्रदर्शने भरवणे हे नक्कीच एक मोठे दिव्य आहे. खरंतर या गॅलरी सहजासहजी जागा उपलब्ध होत नाही. त्यासाठी किमान चार ते पाच वर्षे वाट पाहाण्याची तयारी कलाकारांना दाखवावी लागते. येथून पुढे देखील कठीण असे नियम पार केल्यावर गॅलरी उपलब्ध होते. मात्र सोनार यांची चिकाटी व चित्र निर्मितीतील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच त्यांनी १९७७ ते २०१५ या कालावधीत चौदा चित्र प्रदर्शने भरविली आहेत. नाशिक शहरातील सर्वाधिक चित्र प्रदर्शने भरवणारे ते एकमेव चित्रकार असावेत. यापूर्वी जहाँगीरमध्ये अनेक चित्रकारांनी भरवलेली प्रदर्शने ग्रुपने किंवा दोघांनी एकत्रपणे केलेली आहेत. दोन-पाच चित्र प्रदर्शनानंतर अनेकजण थांबलेले आहेत

सोनार यांचे ग्रुप शोदेखील बऱ्याच ठिकाणी झाले असून, देशात व परदेशात त्यांच्या चित्रांना मागणी व आदराचे स्थान आहे. निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, क्रिएटिव्ह रचना चित्रे या विषयांवर अनेक चित्रकार चित्र निर्मिती करतात. त्यांना समोर प्रत्यक्ष वस्तू वा संदर्भ असतो. मात्र सोनारांना वा. गो. कुलकर्णी यांच्या सारख्या चित्रमहर्षी गुरूंचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभल्याने त्यांनी निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे या विषयातही प्रगती साधली आणि वेगळी वाट निवडली. लहानपणी मनात ठसलेल्या धार्मिक कथांच्या अभ्यासातून व लघुचित्रे निरीक्षणातून स्वतंत्र अशी भारतीय अलंकारिक चित्रशैली विकसित केली. त्यात अनेक प्रयोग केल्याने त्यांना हे यश मिळाले.

याविषयी सोनार म्हणतात, निसर्ग चित्र, व्यक्तीचित्रांसाठी समोर संदर्भ आकार पाहून दृश्य रेखाटून चित्रे रंगवली जातात, पण निव्वळ स्वकल्पनेने रचलेला एखादा विषय आकर्षकपणे मांडून कुठलाही संदर्भ न घेता चित्रनिर्मिती करणे अवघड आहे. गुरूवर्य वा. गो. कुलकर्णी यांनी त्यांना नाशकात आणले, तेव्हा सोनार चाळीशीच्या आसपास होते. जिद्द व चिकाटीने त्यांनी भारतीय अलंकारिक शैलीची मुहूर्तमेढ रोवली. आज जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांची चित्रे पोहोचली आहेत. हे नाशिकसाठी भूषणावह आहे. अनेक विदेशी चित्ररसिक त्यांच्या घरी आवर्जून येत असतात. वयाच्या ऐंशीत पोहोचलेले सोनार

प्रसिद्धीचा गाजावाजा न करता सातत्याने चित्रनिर्मितीत मग्न असतात. त्यासाठी लागणारे श्रम, चिकाटी व कमालीची बैठक एका चित्रासाठी किमान महिना वेळ देतात. तरीही त्यांची चित्रसंख्या वाढती आहे. एखादे चित्र विकले गेले तर त्याच थीमचे दुसरे पेंटिंग ते थोड्याफार फरकाने पुन्हा निर्माण करुन ठेवतात, हे त्यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

अशा मोठ्या चित्रप्रदर्शनातून त्यांची असंख्य चित्रे देशात, परदेशात गेली आहेत. इंग्लंड व पॅरिसच्या खासगी आर्ट गॅलरीच्या चित्ररसिक मालकांनी त्यांची बरीच चित्रे विकत घेऊन प्रदर्शने भरवली आहेत. देशातील अनेक मान्यवर संस्था व चित्रप्रेमींच्या दिवाणखान्यात त्यांची चित्रे सजली आहेत. त्यांचे गुरू व मित्र स्व. चित्रकार शिवाजी तुपे त्यांच्या विषयी नेहमी सांगत 'चित्र तपस्वी वा. गो. कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली गुरूकुल पद्धतीने पाच वर्षांचा पेंटिंगचा डिप्लोमा केलेल्या या माणसाने चित्रप्रदर्शने करुन आर्थिक दुर्बलतेवर विजय मिळविला. तसेच नाशिक शहरात स्वत:चा बंगला, गाडी व स्टुडिओ उभारला. एवढे असूनही वेबसाईट इंटरनेटचा लाभ न घेता प्रसिद्धीपासून लांब राहून स्वत:चे पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा आहे.

सोनारांचे एकूण आयुष्यच थरारक अनुभवांनी समृद्ध आहे हे त्यांच्या 'सोनचित्रे' या पुस्तकातील आत्मकथनातून उलगडते. डांगच्या घनदाट जंगलात १९५७ मध्ये त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. ग्रामसेवक, क्लर्क, ट्रेसर, ड्राफ्टसमन, चित्रकला महाविद्यालयात प्रोफेसर, कलाध्यापक अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. कलेसाठी पंधरा वर्षांची शासकीय नोकरी सोडून धाडसाने कला प्रांतात रमणारा हा एक अवलियाच म्हणावा. अनेक ठिकाणी विद्यार्थी व रसिकांसाठी त्यांनी चित्र प्रात्यक्षिके सादर केली आहेत. कला कार्यशाळा, कलामेळांमध्ये सक्रिय भाग घेतला आहे. अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा यथोचित गौरव करून मानपत्रे दिली आहेत. खूपशी पारितोषिके त्यांच्या स्टुडिओत मांडलेली दिसतात. जून २०१५ मध्ये पुणे येथील जे डब्ल्यू मेरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये सिल्वर एज युटोपीन पुणे, या संस्थेतर्फे मानाचा 'आर्टिस्ट अॅवॉर्ड २०१४' हा पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सोनारांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या चौदाव्या चित्रप्रदर्शनासाठी खूप शुभेच्छा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅपल स्कूलच्या विद्यार्थ्यांची अॅथलेटिक्ससाठी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव बसवंत येथील अॅपल मीडियम स्कूलने मालेगाव येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने शाळेच्या १९ खेळाडूंची राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली. राज्यस्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धा सांगली येथे होणार असून, या स्पर्धेसाठी निवड झालेल्या अॅपल स्कूलच्या १९ खेळाडूंचा सत्कार संस्थेचे संचालक विनोद मराठे, प्राचार्या प्रियांका मराठे यांनी केला. क्रीडाशिक्षक योगेश जठार यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले

निवड झालेले खेळाडू ः श्लोक जाधव, वेदान्त रणशिंगे, रवी प्रसाद, नील देशमुख, देवाशिष कोहक, आदित्य शिंदे, पुष्कर राठी, ओम काळे, पीयूष आहेर, मोहीब शेख, शिवकार्तिक, कुमुदिनी बोरसे, श्रद्धा तलवारे, स्वस्तिक मोरे, सानिका सुडके, मनराज धारिवाल, प्राजक्ता जाधव, सिद्धिका निफाडे आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन विभागाने पुन्हा शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी सोमवारी ७५ बेशिस्त आणि बेफिकीर वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

हेल्मेट सक्ती मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी पेठ रोड आणि मुंबई-आग्रा महामार्गावर ही मोहीम राबविण्यात आली. हेल्मेटचा वापर न करणारे ७२ मोटरसायकलस्वार आणि सीटबेल्टचा वापर टाळणाऱ्या तीन कारचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

संबंधित वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. वाहन चालविण्याचा परवाना आणि आरसी बुक जप्त करण्यात आले असून, संबंधित वाहनधारकांना समुपदेशनासाठी शनिवारी पेठरोड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

आज दिंडोरी, त्र्यंबक रोड

मंगळवारी दिंडोरी रोड आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ही कारवाई करण्यात येणार असून, वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञानाची परंपरा सशक्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या विकासासाठी विज्ञान हे महत्त्वाचे माध्यम आहे. करिअर आणि राष्ट्रसेवा यांचा ताळमेळ विज्ञानामधील करिअरमध्ये निश्चितच जमू शकतो. देशामध्ये विज्ञानाची परंपरा अधिकाधिक सशक्त करा, असे आवाहन सपकाळ नॉलेज हबमध्ये आयोजित पाच दिवसीय कॅम्पमध्ये तज्ज्ञांमार्फत करण्यात आले.

या कॅम्पमध्ये आयोजित विविध सत्रांमध्ये डॉ. चंद्रशील भागवत, डॉ. सुवर्णा कुलकर्णी, डॉ. अविनाश खरे, डॉ. पुष्पा खरे, डॉ. शेखर मांडे, डॉ. उर्मिला मांडे, डॉ. आनंद पटवर्धन, डॉ. अंजन बॅनर्जी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या पाच दिवसीय सत्रात लेखी, प्रात्यक्षिक तसेच सामान्यज्ञान अशा विविध स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत तारांगण, मुद्रा संग्रहालय या स्थळांना भेटी दिल्या. सांयकाळच्या सत्रातही विज्ञान विषयक चित्रपट व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

'वॉक द टॉक' या विशेष सत्रात विद्यार्थ्यानी तज्ज्ञांसोबत मुक्तसंवाद साधला. समारोपाच्या सत्रात पद्मश्री डॉ. शरद काळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. जे. गोंड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी-नाशिक जिमखानामध्ये अंतिम लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित कै. भाऊ मालुसरे टी-२० चषक स्पर्धेत दिंडोरी क्रिकेट अकॅडमी व नाशिक जिमखाना यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली.

महात्मानगर क्रिकेट मैदानावर ही बाद फेरी खेळविण्यात आली. कै. भाऊ मालुसरे टी-२० चषक संजय मालुसरे व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे गेल्या पाच वर्षांपासून पुरस्कृत करण्यात येत आहे. या मोसमात एकंदर ६० संघांचे १६ गट करण्यात आले होते. प्रत्येक संघास ३ साखळी सामने खेळावयास मिळाले, त्यातूनच सर्वाधिक गुणविजेते १६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. त्यामध्ये उपउपांत्य पूर्व, उपउपांत्य व उपांत्य फेरी खेळविण्यात आली. नाशिक प्रिमियर लीगसाठी निवड करताना स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केला जाणार आहे. उपांत्य फेरीत दिंडोरीने पंचवटी संघावर ५४ धावांनी तर नाशिक जिमखान्याने जंबो संघावर ७ गडी राखून विजय मिळविला.

पहिला उपांत्य सामना: दिंडोरी २० षटकांत ६ बाद १७२ धावा. (विराज ठाकूर ६८, प्रशांत नाठे ३९, जितेंद्र कालेकर ३ बळी) वि. पंचवटी २० षटकांत ९ बाद ११८ धावा (गालिब पटेल ३३, सलिल आघारकर व मुझमिल खान प्रत्येकी ३ बळी). दिंडोरी संघ ५४ धावांनी विजयी.

दुसरा उपांत्य सामना: जंबो २० षटकांत सर्वबाद १०६ धावा ( जय चौधरी २३ व मनोज परमार २१, रोहित परब ३ बळी) वि. नाशिक जिमखाना १८ षटकांत ३ बाद १०८ धावा (विकास वाघमारे नाबाद २३ व सौरभ देवरे नाबाद २१, वैभव पुरे २ बळी) नाशिक जिमखाना ७ गडी राखून विजयी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘या ही वळणावर’ १० जानेवारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५५ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी २ जानेवारीपासून पनवेल येथे सुरू होणार आहे. राज्यभरात आयोजित नाट्यस्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या नाटकांचे सादरीकरण येथे होणार आहे. दि. २ ते २१ जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होईल.

स्पर्धेत रविवार १० जानेवारी रोजी लोकहितवादी मंडळ निर्मित 'या ही वळणावर' हे ना‌शिकचे नाटक सादर करण्यात येणार आहे. नाटकाचे दिग्दर्शन हेमंत देशपांडे यांनी केले असून, लेखन मुकंद कुलकर्णी यांचे आहे. जे काही बरे वाईट घडेल ते पूर्वसंचितावर आधारित, प्रारब्धात असेल तरच घडते अन्यथा नाही अशा विचारांवर आधारित ओ हेन्री यांची 'अ रोड टू डेस्टिनी' ही कथा आहे. त्यावर 'या ही वळणावर' हे नाटक बेतलेले आहे.

नाटकात मिलिंद भणगे, नरेंद्र दाते, रसिका पुंड, हेमंत पवार, राजेंद्र सोनजे, स्वाती शेळके, शिरीष कठाळे, प्रशांत देशपांडे, डॉ. राजेश आहेर, पूजा चांदवडकर, गीतांजली घोरपडे, महेंद्र चौधरी, चारूदत्त कुलकर्णी, रमेश काळे, अनिकेत कुलकर्णी, विवेक पाटणकर, मुकुंद मोरे यांनी भूमिका केल्या.

नेपथ्य किरण समेळ, नेपथ्य निर्माण बाळकृष्ण तिडके, प्रकाशयोजना प्रबोध हिंगणे, प्रकाश योजना सहाय्य आकाश पाठक, पार्श्वसंगीत प्रसाद भालेराव, निषाद हलकर्णी, केशभूषा व वेशभूषा अपूर्व सौचे, सहाय्य शुभदा केळकर, रंगभूषा माणिक कानडे, नृत्य दिग्दर्शन चिरंतनी हलकर्णी यांचे आहे.

नाशिक विभागीय फेरीत 'या ही वळणावर' नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे अंतिम फेरीसाठी या नाटकाची निवड झाली आहे. गेल्या वर्षी अंतिम फेरीमध्येही लोकहितवादी संस्थेच्या 'न ही वैरेन वैरा‌नि' या नाटकाने पहिल्या क्रमांकाने बाजी मारली असल्याने यंदाही नाशिककर रंगकर्मींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतही हे नाटक छाप पाडले, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वीज पेरूया अंगात’ बालनाट्य अव्वल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकापेक्षा एक सरस सादर झालेल्या बालनाट्य स्पर्धांचा निकाल जाहीर झाला असून, १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ या संस्थेच्या 'वीज पेरूया अंगात' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. याच नाटकाने दिग्दर्शनातील पहिले व प्रकाशयोजनेचे द्वितीय पारितोषिकही पटकावले.

सप्तरंग थिएटर्स, अहमदनगरच्या 'सर, तुम्ही गुरूजी व्हा' या नाटकाला द्वितीय तर नाशिकच्या प्रबोधिनी विद्यामंदिर संस्थेच्या 'शहाणपण देगा देवा' या नाटकाला अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. ही तीनही नाटके अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहेत. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक 'वीज पेरूया अंगात' या नाटकासाठी सोनाली वासकर हिला जाहीर झाले. द्वितीय पारितोषिक दीपक ओहोळ यांना 'सर, तुम्ही गुरूजी व्हा' या नाटकासाठी तर अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक रमेश वनीस यांना 'शहाणपण देगा देवा' या नाटकासाठी जाहीर झाले.

प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषिक ईश्वर जगताप यांना 'सपान' नाटकासाठी तर द्वितीय पारितोषिक पीयूष रावळ यांना 'वीज पेरूया अंगात' या नाटकासाठी जाहीर झाले. नेपथ्य प्रथम नाना मोरे 'भेट' नाटकासाठी, द्वितीय राजेश भालेराव यांना सपान नाटकासाठी तर रंगभूषेचे प्रथम पारितोषिक माणिक कानडे यांना 'पुन्हा नको रे बाबा', द्वितीय नारायण देशपांडे यांना 'एबी-२' नाटकासाठी जाहीर झाले. उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक संस्कार गुंदेचा (सर तुम्ही गुरूजी व्हा) पंकजा कऱ्हाळे हिला भेट नाटकासाठी जाहीर तर अभनियासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे साक्षी भटकर (वीज पेरूया अंगात), मुग्धा घेवरीकर (अवताराची गोष्ट), सई मोराणकर (सपान), कृष्णा चव्हाण (मुलं देवाघरची फुलं), तेजस्विनी ठाकरे (पंखातील आभाळ), चिन्मय जगताप (जॅकी आणि तो), ऋषिकेश पर्वतीकर (सुटका), लक्ष वायकर (बुडबुडे), अजय सोनार (मु.पो, कळमसरा) तर मार्दव लोटके यास भेट नाटकासाठी जाहीर झाले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ७ ते १२ डिसेंबर या काळात जल्लोषात या बालनाट्य स्पर्धा झाल्या. स्पर्धेत एकूण २९ प्रयोग सादर करण्यात आले.

परीक्षक म्हणून रमाकांत मुळे, के. ए. पुप्पुलवाड व नवीन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

नाशिकच्या प्रबोधिनीला अपंग उत्तेजनार्थ

प्रबोधिनी विद्यामंदिरच्या 'शहाणपण देगा देवा' या नाटकाला अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक सादर झाले. प्रबोधिनी ही मानसिक अपंगांची शाळा म्हणून प्रसिध्द आहे. पारितोषिक प्राप्त नाटकाचे लेखन मनीषा नलगे यांनी तर दिग्दर्शन रमेश वनीस यांनी केले होते. नेपथ्य मिलिंद मून, संगीत वसंत सानप, प्रकाशयोजना कांचन इप्पर, रंगभूषा प्रमिला पालवे, वेशभूषा आशा राजगुरू तर विशेष मार्गदर्शन रोहिणी ढवळे यांचे होते. नाटकात नवनीत वाघ, सौरभ साळुंके, हिमांशू गोस्वामी, निखील पवार, कौत्सुभ शर्मा, प्रतीक शिंदे, हर्ष जोशी यांनी भूमिका केल्या. केदारनाथ, बद्रीनाथ, माळीण, जम्मू, काश्मीर व चेन्नई येथे झालेल्या महाप्रलयाला निसर्गाचे बिघडलेले संतूलन कारणीभूत आहे. निसर्गाचे संतूलन बिघडण्यासाठी मानव जबाबदार आहे तो प्राण्यांच्या जागेवर अतिक्रमण करतो हे प्राण्यांनी अतिशय नाट्यमय रितीने नाटकात सादर केले.

राज्य बालनाट्यमध्ये काम करताना नॉर्मल मुलांच्या अटीशर्ती पाळून काम करावे लागते. नॉर्मल मुलांमध्ये उतरून बक्षिस मिळवले यामुळे आमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढला. नाटकाच्या निमित्ताने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला.

- मनीषा नलगे, लेखिका, शहाणपण देगा देवा

या मुलांसमवेत काम करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. कारण, ही मुले विसरण्याची शक्यता जास्त असते. लेखक, नेपथ्यकार व अन्य कलावंतांनीही खूप मेहनत घेतली. एकजुटीने काम केले त्याचे हे फळ आहे.

- रमेश वनीस, दिग्दर्शक, शहाणपण देगा देवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य शालेय फुटबॉल टेनिस स्पर्धेत सिम्बॉयसिस विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापूर यांच्या वतीने अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल टेनिस स्पर्धेमध्ये येथील सिम्बॉयसिस शाळेच्या संघाने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात डबल्स प्रकारात विजेतेपद मिळवले.

समृद्धी पवार, प्रतीक्षा देवांग, पूजा छाजेड यांच्या संघाने विजेतपद मिळविले तर सिंगल्समध्ये माधुरी सुलताने हिने रौप्य पदक मिळविले.

समृद्धी पवार, प्रतीक्षा देवांग यांची पुढील महिन्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. समृद्धी पवार हिची शालेय राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. संघाच्या यशस्वी कामगिरीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सबरवाल, क्रीडाशिक्षक बी. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रासबिहारी’च्या विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे शिवाजी स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या १४ वर्षांखालील वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचे तीन विद्यार्थी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सातवीतील यश गंगवाल, विप्लव माने आणि आठवीतील मितेश काळे यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेला विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. यात नाशिक संघाने उस्मानाबाद आणि बीड या संघांविरुद्ध ५-० ने, तर औरंगाबाद संघाविरुद्ध ३-१ ने असा दणदणीत विजय मिळवला. यात रासबिहारी शाळेच्या यश गंगवाल याने उस्मानाबाद संघाविरुद्ध उत्तम कामगिरी करत दोन गोल, तर बीड संघाविरुद्ध एक गोल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन हिवाळ्यात गावे तहानली

$
0
0

जिल्ह्यात १५ गावे, ६२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकचा नावलौकीक असला तरी यंदा धरणेच तहानल्याने ऐन हिवाळ्यातही जिल्हा प्रशासनाला गावोगावी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील १५ गावे आणि ६२ वाड्यांमध्ये १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गतवर्षी डिसेंबरमध्ये केवळ सिन्नर तालुक्यातील दोन गाव आणि ५३ वाड्यांमध्ये दुष्काळाच्या झळा बसत होत्या. तेथे नऊ टँकरची मदत घेण्यात येत होती. यंदा बागलाण, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यांचीही त्यामध्ये भर पडली असून, टँकरची संख्याही दुप्पट झाली आहे.

यंदा मान्सूनने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे ५० टक्केही भरू शकली नाहीत. जिल्ह्यातील २३ धरणांमध्ये आजमितीस केवळ ३७ टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जून २०१६ पर्यंत जिल्ह्यातील ५० लाखांहून अधिक लोकसंख्येला पाणी पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. म्हणूनच शहरात पाणी कपातीला सुरुवात झाली असून, नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर, गंगापूर धरण समूहामध्ये ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरण समूहात ४७ टक्के तर गिरणा खोरे समूहामध्ये केवळ २४ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. धरणांमध्ये २४ हजार ६३३ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असला तरी त्यामध्ये जिल्हावासीयांची तहान कशी भागणार याची चिंता प्रशासनाला भेडसावत आहे.

सिन्नर तालुक्यात सर्वाधिक वाड्यांना पाण्याच्या दुर्भिक्ष्‍याचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात ६ गावे आणि ३१ वाड्या अशा एकूण ३२ ठिकाणी आठ सरकारी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल बागलाण तालुक्यातील ६ गावे आणि एक वाडी पाण्यासाठी तहानलेली आहे. तेथे पाच टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. नांदगावमध्ये दोन गावे आणि ३२ वाड्यांमधील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तेथे चार पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाने चार टँकरची मदत घेतली आहे. याच तालुक्यातील बाणगाववासीयांनीही टँकरची मागणी केली आहे. मालेगाव तालुक्यातील एक गावही यंदा पाणी टंचाईचा सामना करीत आहे. तेथेही एका टँकरची मदत घेण्यात येत आहे. सध्या सिन्नरमध्ये २५, नांदगावमध्ये १९ आणि बागलाणमध्ये १७ आणि मालेगावात टँकरच्या दोन फेऱ्या होत आहेत.

आठ विहिरींचे अधिग्रहण

केवळ टँकरने पाणीपुरवठा करून तहान भागत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून विहिरींचेही अधिग्रहण करण्यात येते. जिल्ह्यात एकूण १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापैकी एकट्या बागलाण तालुक्यात सहा, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यात प्रत्येकी एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एकट्या बागलाण तालुक्यात दोन विहिरी केवळ टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव शहरात स्वच्छता अभियान राबविणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येणे गरजेचे आहे. शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानात शासकीय विभागांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

मनपा सभागृहात स्वच्छता अभियानासंदर्भात आयोजित विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, कमरुद्दीन शेख आदी उपस्थित होते. दिलीप स्वामी म्हणाले की, अस्वच्छतेमुळे आरोग्याचे विविध प्रश्न निर्माण होत असल्याने देशपातळीवर शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. देशासह राज्यात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहराची विविध भागात विभागणी करावी. लोकप्रतिनिधींनी आपापल्या वॉर्डात स्वच्छता अभियान विषयक जनजागृती करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी शाळा, कॉलेजांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतील आणि अभियानाचा आढावा स्वत: जिल्हाधिकारी घेतील. अभियानात लोकसहभाग, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग असणार आहे. विविध संघटना, सेवाभावी संस्था यांचीही मदत घेण्यात येईल. महानगरपालिकेने शहराचे सर्वेक्षण करून नियोजन करावे. स्वच्छता अभियानासाठी काय आवश्यक आहे याचा आराखडा महानगरपालिकेने तयार करावा. प्रत्येक विभागाने नव्या संकल्पना सूचवाव्यात, खुल्या प्लॉटवरील स्वच्छतेसाठी संबंधित मालकांना नोटिसा बजवाव्यात. त्यांनी सूचनांचे पालन केले नाही, तर महानगरपालिकेने तो भाग स्वच्छ करून त्याचा खर्च प्लॉट धारकाकडून वसूल करावा, असेही स्वामी यांनी नमूद केले.

यावेळी आयुक्त बोर्डे यांनी मालेगाव शहरात स्वच्छता अभियानाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगून शहर स्वच्छता व मोसम नदी स्वच्छतेचे लवकरच नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. मालेगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने या अभियानात आपले योगदान नोंदविले पाहिजे, अशी अपेक्षा प्रांताधिकारी अजय मोरे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला टोल नाक्यावर ४० प्रवाशी तासभर वेठीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यावर रविवारी रात्री टोल व्यवस्थापकाच्या तसेच तेथील कर्मचाऱ्यांच्या अरेरावी व दंडेलशाहीमुळे मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसला मोठा त्रास सहन करावा लागला.

मध्यप्रदेश परिवहन मंडळाची (एमपी-११,पी -४४५५) आराम बस रविवारी पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यावर आली. येथील कर्मचारी व व्यवस्थापक यांनी तू आम्हाला कट मारला, असे म्हणत बसचालकाला मारहाण केली. कंडक्टर शेखर यांनाच खाली उतरविण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. येवला पोलिस ठाण्याचे निरीक्षक वाघमारे यांच्यासह सरपंच विनोद ठोंबरे, स्नेहल गायकवाड यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवून ही गाडी पुढे रवाना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचा ठेका पुन्हा अधांतरी

$
0
0

नगरविकास विभागाकडून हस्तक्षेप; स्थायी समितीकडून महिनाभराची मुदतवाढ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचा वादग्रस्त घंटागाडीचा ठेका दहा वर्षावरून पाच वर्ष करण्यावर थेट मंत्रालयात आक्षेप घेण्यात आल्याने हा ठेका पुन्हा अंधातरी लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर विकास विभागाने या संदर्भात आयुक्तांना तूर्त तरी कारवाई थांबविण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यामुळे घंटागाडी ठेक्याचा वाद कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समितीने मंगळवारी घंटागाडी ठेक्याला एक महिन्याची मुदतवाढ देत, महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेच्या घंटागाडी ठेक्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. महासभेने घंटागाडी ठेक्याला दहा वर्षांसाठी देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, मनसेसह सत्ताधारी महाआघाडीतल्या सदस्यांनी दहा वर्षांना विरोध केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी ठेका पुन्हा पाच वर्षासाठी करण्याचा ठराव प्रशासनाला दिला. महासभेत ३०० कोटींच्या या ठरावावर दहा वर्षांचे रुलिंग असतांना ठेका पुन्हा पाच वर्षाचा केल्याने त्या विरोधात नगरविकास विभागाकडे धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे नगरविकास विभागातल्या अव्वर सचिवांना या ठेक्यांसदर्भात अभ्यास करून निर्णय घेण्याचे तोंडी आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत. भाजपच्या आमदारांसह गटनेत्यांनीही घंटागाडीच्या ठेक्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे भाजपने सरकारकडे या संदर्भात तक्रार केली असण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात अद्याप लिखित आदेश प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीत सांगितले. आपण या संदर्भातील माहिती तपासून निविदा प्रक्रियेची कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा ठरावच आता अधांतरी लटकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन आठवड्यात राबवा निविदा प्रक्रिया

नव्या घंटागाडीच्या ठेक्याची निविदा प्रक्रिया होईपर्यंत वर्तमान घंटागाडीच्या ठेक्यांना चार महिन्याची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला. वारंवार मुदतवाढ देणे योग्य नसल्याचे सदस्यांचे मत होते. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आयुक्तांनी केली. त्यावर तीन आठवड्याच्या आत तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश सभापती शिवाजी चुंभळे यांनी देत सध्याच्या ठेकेदारांना एक महिन्याची मुदतवाढीला मंजुरी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकाम पाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

मखमलाबाद शिवारातील घाडगे मळा समोरील श्रीहरी विठ्ठल सोसायटीमधील तुळशीराम भगत यांचे अनधिकृत बांधकाम महापालिका प्रशासनाने मंगळवारी पाडले. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या अधिपत्याखाली पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ आणि नगररचना विभागाचे शाखा अभियंता जगताप यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविले. यापूर्वी, भागत यांना सूचना देण्यात आल्या होत्या. बांधकाम वा अतिक्रमण निमूर्लन विभागाची सूचना मिळाली असल्यास त्वरित वाढीव अतिक्रमण काढून घ्यावे आणि तसा अहवाल संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना पाठविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा गाळ्यांची परस्पर विक्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरमधील श्री छत्रपती शिवाजी मंडई मधील महापालिकेच्या मालकीचे गाळे परस्पर विकले जात असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य राहुल ढिकले यांनी केली आहे. गाळेधारकांना हा गाळा विकण्याची जाहिरात थेट सोशल मीडियावर टाकल्याचे पुरावे त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणात संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत राहुल दिवे यांनी छत्रपती शिवाजी मंडईतील गाळे विक्रीचा विषय आयुक्तांसमोर मांडला. गाळा क्रमांक ५२ च्या गाळेधारकाने छत्रपती शिवाजी मंडई या व्हॉट्सअप ग्रुपवर गाळा विकणे असल्याचे टाकून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. संबंधित गाळे हे महापालिकेच्या मालकीचे आहेत. त्यांची परस्पर विक्री व पोटभाडेकरू ठेवता येत नाही. तरीही संबंधितांने गाळे परस्पर विकल्याचा आरोप अमित अशोक पाटील या तक्रारदाराने केला आहे. दिवे यांनी या संबंधीचे पुरावे आयुक्त डॉ. गेडाम यांना दिले. आयुक्तांनी तत्काळ चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपायुक्त आर. एस. बहिरम यांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीवर दोघा भावांचा अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मावशीसोबत असलेल्या चौदा वर्षीय मुलीला दमदाटी करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. बलात्काराची घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गोल्फ क्लब मैदानालगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या ओट्यावर झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संशयितांना कठोर शासन करण्याची मागणी केली जाते आहे.

गोल्फ क्लब मैदानाजवळील हॉटेल राजदूतजवळ असलेल्या झोपडपट्टी भागात पीडित मुलगी राहते. कचरा वेचण्याचे काम करणारी ही मुलगी आपल्या मावशीसोबत सोमवारी रात्री पहुडली होती. साधारणतः ११ वाजेच्या सुमारास त्याच भागात राहणारे संशयित आरोपी चंद्रकांत भरत वाघमारे आणि रवि भरत वाघमारे हे दोघे भाऊ तिथे आले. त्यांनी मावशीला दमदाटी करून पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून गोल्फ क्लब मैदानालगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या ओठ्यावर नेले. तिथे संशयितांनी तिच्यावर अत्याचार केला. एवढ्या रात्री मुलीला कोठे नेले या काळजीत असलेल्या मावशीला संशयिताच्या पाशवी कृत्याची माहिती थोड्याच वेळात मिळाली. तिने लागलीच सरकारवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व पुरावे संकलित केले. तसेच संशयितांना ताब्यात घेतले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी संशयित भावांना मंगळवारी कोर्टात हजर केले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने त्यांना २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, ठक्कर बाजार परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या समस्यांचे हेल्पलाइनद्वारे निराकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये या वर्षी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या व्यथा मांडता याव्यात आणि प्रशासनाकडून समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून गारपीट, अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. तो कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये गुंततो आहे. अपेक्षांवर पाणी फेरले जात असल्याने तो आत्महत्येचा मार्ग अनुसरत असल्याचे निरीक्षण जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी नोंदविले आहे. शेतकऱ्यांना प्रशासकीय कामकाज मार्गी लावताना अनेक अडचणी येतात. अनेकदा सहज होऊ शकणारी ही कामे प्रशासकीय यंत्रणेच्या धिम्या कारभारामुळे उद्यावर ढकलली जातात. निसर्गाच्या प्रकोपामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी अशा किरकोळ स्वरुपाच्या समस्यांमुळेही व्यथित होतो. अशा स्वरुपाच्या समस्या शेतकऱ्यांना मांडता याव्यात, त्याबाबत मार्गदर्शन मिळावे तसेच शक्य त्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची मदत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. नववर्षात हा क्रमांक कार्यान्वित होऊ शकणार आहे.

समस्याग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येऊ शकते, त्यांच्या कोणत्या समस्यांचे निराकरण करणे प्रशासनाला शक्य आहे आणि त्याचे समुपदेशन करण्यासाठी काय केले जाऊ शकते, कोणत्या समस्या किती दिवसांमध्ये सोडविल्या जाऊ शकतात, याबाबत प्रशासनामार्फत अभ्यास करण्यात येत आहे.

तज्ज्ञांची मदत

शेतकऱ्यांचे मानसिक सबलीकरण आणि समुपदेशनासाठी उपाययोजना करण्याचे कामही जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत दिरंगाईचे मजले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शंभर मीटर परिघातल्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागात जाण्यासाठी ठरावांना तब्बल साडेपाच महिन्यांचा कालावधी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थायी समितीने नांमजूर केलेल्या १५ कोटींचा क्रीडांगणाचा भूसंपादनाचा ठराव मिळकत विभागापर्यंत पोहचण्यास तब्बल पाच महिने लागल्याने स्वतः महापालिका आयुक्त आश्चर्यचकीत झाले.

नगरविकास विभागाकडून मिळकत विभागाकडे जाण्यासाठी ठरावाला लागलेला कालावधी संशयास्पद असल्याने आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. आर्थिक गौडबंगालातून हा विषय पुन्हा पुन्हा स्थायीवर आणणाऱ्या मिळकत विभागातील संशयास्पद कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. नाशिकमधील सर्व्हे क्रं. ७०५ पैकी आरक्षण क्रं. ३१३ मधील जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. परंतु, सदरहू जागामालकाने हाय कोर्टामार्फत १२७ ची नोटीस बजावल्याने ते आरक्षण व्यपगत होवू नये म्हणून १५ कोटी ६० लाखांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, सदर प्रस्ताव स्थायीने २४ जून २०१५च्या बैठकीतच नामंजूर केला होता. तरीही तो मंगळवारच्या बैठकीत पुन्हा आला. विषय नामंजूर असतांना तो पुन्हा कसा आला, यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. जागा संपादनाची मुदत ३० नोव्हेंबर असल्याने तो पुन्हा ठेवल्याचा दावा मिळकत व विधी विभागाचे बी. यू. मोरे यांनी केला. प्रस्ताव नामंजूर असतांना डॉकेटमध्ये मात्र तहकूब असल्याचा उल्लेख असल्याने सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर मोरेंची घाबरगुंडी उडाली. त्यामुळे नांमजूर झाल्याचा ठराव आपल्याला आज मिळाल्याचा दावा मोरे यांनी केला. नगरविकास विभाग व मिळकत आणि विधी विभागाचा कारभारच संशयास्पद असल्याचा आरोप सदस्यांनी करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. नगरविकास विभाग व मिळकत विभागातील अंतर हे एका मजल्याचेच आहे. तरीही हा ठराव मिळकत विभागाकडे पोहचायला तब्बल साडेपाच महिने कसे लागले? विशेष म्हणजे हा प्रस्ताव नांमजूर असतांना आयुक्तांच्याच नावाने पुन्हा पटलावर ठेवण्याची हुशारी मिळकत विभागाने दाखवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांच्या आरोग्याची ‘आशां’वर ‌भिस्त

$
0
0

anil.pawar@timesgroup.com

नाशिक : अर्भक व बालमृत्यूबाबत नाशिक जिल्ह्याने मेळघाटालाही मागे टाकले आहे. यामुळे आता तेराव्या वित्त आयोगांतर्गत राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यातील ७८ तालुक्यात आशांमार्फत नवजात शिशूंना आरोगय सेवा त्वरित मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यांचा समावेश आहे. गुरुवारपासून (१७ डिसेंबर) या उपक्रमाला नाशिक जिल्ह्यात प्रारंभ होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सर्वाधिक ७४३ बालमृत्यू झाले. तर, राज्यात गेल्या वर्षभरात ८०४५ नवजात बालकांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यांमधील निवडक तालुक्यात आता आशांमार्फत नवजात बाळांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ० ते ६ महिने वयोगटातील बाळांच्या आरोग्य तपासणीसाठी त्या तालुक्यातील प्रत्येक घरी आशा कार्यकर्त्या ९० भेटी देणार आहेत. तसेच, ७ ते १२ महिने या वयाच्या बाळांच्या पंधरा दिवसांनी भेटी देऊन पाठपुरावा करायचा आहे. कमी वजन असलेल्या बाळाच्या घरी एक दिवसाआड, तर ७ ते १२ महिने वयोगटाच्या बाळाचा दर १५ दिवसांनी पाठपुरावा करावयाचा आहे. सहा महिन्यात आशा कार्यकर्त्या त्या बाळाच्या घरी एकूण बारा वेळा भेटी देऊन त्याचा अहवाल तयार करतील. त्याच्या प्रकृतीचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावयाचा आहे. या पध्दतीनुसार बाळाच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. यामुळे अर्भक व बालमृत्यूचे प्रमाणे रोखण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमामुळे आदिवासी तालुक्यातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना तत्पर आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्या विभागातर्फे हा उपक्रम त्या त्या जिल्ह्यात राबविला जाणार आहे. या आशा कार्यकर्त्या बाळाच्या घरी भेट देऊन त्याचे रिपोर्टींग करतील. बालकांची संख्याही यातून समजू शकणार आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे चाळीस आशा कार्यकर्त्यांवर नियंत्रण राहणार आहे.

बालकाचे जन्मतः वजन नोंदवावे.

भेटीदरम्यान कमी वजनाच्या बाळाचे वजन वाढले आहे की, नाही तसेच प्रश्नावलीनुसार तपासणी करावी.

बाळाला ताप आहे का? किंवा आरोग्यविषयक इतर काही तक्रारी आहेत, याची बाळाच्या वडिलांकडून खात्री करावी.

लसीकरण, योग्य आहार याबाबत मातेचे समुपदेशन करणे.

बाळामध्ये कोणतीही जोखमीची लक्षणे दिसल्याने प्राथमिक स्तरावर उपचार करावा. यासाठी १०८ क्रमांकाचा वापर करावा.

बाळाच्या आरोग्याबाबतचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांना सादर करावा.


आशां कार्यकर्त्यांना मिळणार मानधन

बाळांच्या आरोग्याची ० ते ६ महिने वयोगटानुसार एक दिवसाआड तपासणी करणाऱ्या आशांना एका बाळामागे प्रत्येक भेटीसाठी दहा रुपये मानधन मिळणार आहे. तसेच, ७ ते १२ महिने वयोगटासाठी साडेबारा रुपये मानधन दिले जाणार आहे. आज, बुधवारी आशांचे शेवटीचे ट्रेनिंग होणार असून, गुरुवारपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या तीनही तालुक्यातील आशा कार्यकर्त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठ पदभार विभागीय आयुक्तांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ रविवारी, २० डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठाला याबाबत सूचना मिळाल्याची माहिती कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी दिली.

सन २०१५ मधील तिसरी विद्यापरिषद कुलगुरू डॉ. जामकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विद्यापरिषदेच्या वतीने विद्यापीठाच्या सेवेबद्दल कुलगुरु डॉ. जामकर व प्रति कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर यांचा विशेष सन्मान केला.

डॉ. जामकर व डॉ. राजदेरकर यांचा कार्यकाळ २१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. विद्यापरिषद सदस्य डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. अरुण भस्मे, डॉ. पराग संचेती, डॉ. सतीश डुंबरे, डॉ. के. एस. बांगा, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. पायल बन्सल, हुटोक्सी रायटर यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. जामकर व डॉ. राजदेरकर यांनी आजवर केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. डॉ. जामकर यांचा पदभार डवले यांच्याकडे जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images