धनगर समाजाचा आरक्षणात समावेश करण्यास विरोध
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्याच्या विधानसभेतील मागणीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात शेकडो आदिवासी महिला पुरुषांनी सहभाग घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. येथे तळपत्या उन्हात मार्चेकऱ्यानी ठाण मांडले होते. आदिवासी समाजास आरक्षणाने उन्नतीची संधी मिळाली आहे. शिक्षणाचा प्रसार वाढत असून, नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. धनगरांचा आदिवासी आरक्षणात समावेश झाला, तर नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात हिरावल्या जातील आणि आदिवासी बांधवांच्या भविष्यात अंधकार निर्माण होईल. धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश नको, असे मत माजी आमदार शिवराम झोले यांनी व्यक्त केले.
आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटना संस्थापक संघटक कैलास शार्दुल यांनी आदिवासी बांधवावर अन्याय करणारा हा आरक्षणाचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दात इशारा दिला. जिल्हासंपर्क प्रमुख प्रभाकर फसाळे यांनीही आदिवासींच्या आरक्षणाची विभागणी करू नये, धनगर समाजाचा या आरक्षणात समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी केली. तहसील कार्यालयात आंदोलन पोहोचल्यानंतर तेथे ठिय्या देण्यात आला. यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले होते. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा सरचिटणीस चंद्रभान पोटींदे, नवनाथ खांदे, अलका गाडेकर, शारदा प्रतिके, मधुकर लांडे, गोपाळ लहांगे, नगरसेवक यशवंत भोये, नगरसेविका सिंधुताई मधे, मंदाताई वायाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी निवेदन स्वीकारले. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मोर्चेकऱ्यांच्या मागण्या व तक्रारी
मोर्चाच्या समारोपप्रसंगी झालेल्या ठिया आंदोलनात त्र्यंबक येथील पाबळकर हे रेशन दुकानदार नागरिकांना विशेषत: आदिवासींना धान्य देत नाहीत. महिन्यात केवळ चार दिवस दुकान खुले ठेवतात. तसेच, महिला ग्राहकांशी अरेरावीची भाषा वापरतात, अशा तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. हे दुकान महिला बचतगटाकडे वर्ग करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा कारभार हा जातीयवादी झाला आहे, असा आरोप करण्यात आला. येथील आदिवासी युवकांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे व रहिवासी नसलेल्यांना शिपाई सुरक्षारक्षक अशा नेमणुका देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मंदिरात एका आदिवासी युवकास बेदम मारहाण केली, याचा देखील उल्लेख करण्यात आला. तसेच, गंगाद्वार आणि परिसरात असलेल्या मेटांच्या वस्तीवर तातडीने पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आदिवासी समाजास जातीचे दाखले देताना पुराव्यांसाठी नाहक वेठीस धरण्यात येते. याबाबत सुधारणा करण्यात यावी आणि दाखले देण्यात यावेत, तसेच अनेकांना रेशनकार्ड मिळालेले नाही ते देण्यात यावे. वाहनतळावर अवैध धंदे सुरू आहेत याची दखल पोलिसांनी घ्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. तहसीलदार नरेशकुमार बहीरम यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट