म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हजारो भाविकांची गर्दी होणाऱ्या पंचवटी परिसरात चोरट्यांची अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे. बुधवाराच्या बाजारात तर मोबाइल, मंगळसूत्र किंवा दुचाकी घेऊन जावे की नाही, असा प्रश्न नाशिककारांना पडत आहे. त्यातच पोलिसांची भूमिका चोरट्यांना सहाय्यक ठरत असल्याने मोबाइल 'चोरांची मजा आणि सर्वसामान्यांना सजा' असे चित्र दिसून येत आहे.
साधारणतः दीड महिन्यापूर्वी व्यावसायिक मनीष अग्रवाल यांचा १५ हजार रुपयांचा नवीन मोबाइल बुधवारच्या बाजारतून चोरी गेला. चोरी करणाऱ्या चोरट्यांस अग्रवाल यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या
स्वाधीन केले. मात्र, अग्रवाल यांनी चोरट्यास पकडण्यापूर्वीच मोबाइल त्याच्या साथीदाराकडे स्वाधीन झाला होता. पकडलेल्या चोरट्याचे नाव वांग्या आहे. अट्टल चोरटा असलेला वांग्या वज्रेश्वरी नगर झोपडपट्टी राहतो.
पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, मोबाइल साथीदाराकडे असल्याचे वांग्याने पोलिसांना सांगितले. हा घटनाक्रम संपेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. त्यामुळे उद्या सकाळी येऊन मोबाइल घेऊन जा, असे पोलिसांनी अग्रवाल यांना सांगितले. दुसऱ्या दिवशी आणखी एका चोरट्यास अटक करण्यात आली असून, त्याने तुमचा मोबाइल भद्रकालीत राहणाऱ्या दीप्या नावाच्या चोरट्यास दिला असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे संशयित दिप्याचा फोटो सुध्दा पोलिसांनी अग्रवाल यांना दाखवला. मात्र, मोबाइल चोरीची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळटाळ केली. संशयित आरोपी अल्पवयीन असल्याने ते लागलीच जामिनावर सुटतील. तसेच कोर्टातून मोबाइलही लवकर मिळणार नाही, अशी धास्ती पोलिसांनी अग्रवाल यांना दाखवली. आता या घटनेस दीड महिन्याचा कालावधी उलटला असून, पोलिसांनी ना तक्रार दाखल केली ना अग्रवाल यांना मोबाइल मिळाला.
अग्रवाल यांच्याप्रमाणे मोबाइल हरवलेले अनेक नागरिक पोलिस स्टेशनच्या खेटा घालत आहे. हरवलेल्या मोबाइलनंबरचा दहशतवादी किंवा समाजकंटकांनी उपयोग केला तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न हवालदिल झालेल्या अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.
बुधवारच्या बाजारावर दहशतीचे सावट
बुधवारच्या बाजारादरम्यान रामकुंड परिसरात अनेक चोऱ्या होतात. त्यातील बहुतांश चोऱ्यांची नोंदच होत नाही. झालीच तर फिर्यादीची बोळवण होते. अपरिहार्यकारणांमुळे बुधवारच्या दिवशी रामकुंड परिसरात जाणाऱ्या नागरिकांना मोबाइल, मंगळसूत्र, पाकिटे घरीच काढून ठेवावी लागतात. बाजारात बसणाऱ्या व्यवसायिकांना देखील चोरट्यांचे वर्णन, काम करण्याची पध्दत याची संपूर्ण माहिती आहे. मात्र, याविषयी काही बोलायचे झाल्यास लागलीच पोलिस दमबाजी करतात, असे एका वृध्द भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले. यामुळे बुधवारचा बाजार हा जणू चोरट्यांचा बाजार भासू लागला आहे. पोलिस कारवाई होईना यामुळे दाद मागावी तरी कुणाकडे, असा सवालही काही भाजी विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पोलिसांना चोर, त्यांची काम करण्याची पध्दत याविषयी सगळे माहित आहे. माझ्यासारख्या नोंद न झालेल्या अनेक तक्रारदारांची यादी तयार केली तर कोट्यवधी रुपयांचा माल हडप झाल्याचे लक्षात येईल. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
- मनीष अग्रवाल, व्यावसायिक
पंचवटीच्या धार्मिक महत्त्वामुळे येथे पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र, पोलिस संरक्षण पुरवण्यात अपयशी ठरले आहेत. मोबाइल, दुचाकी चोरी तसेच पाकीटमारीचे प्रकार सर्रास घडतात. मात्र, पोलिसच चोरांच्या मदतीला असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे जायचे.
- जगदीश रामैय्या
बुधवाराच्या बाजारात सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारला जातो. भाविकांची तर सर्रास लूट होते. पोलिसांना याविषयी माहित असते. एखाद्या मोठ्या व्यक्तिचा परिचय असेल तर हरवलेली वस्तू अर्धा तासात परत केली जाते. मात्र, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते.
- देवांग जानी, स्थानिक रहिवाशी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट