\Bवेध विधानसभेचा
बागलाण\B
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपला मिळालेले मताधिक्य हे भाजपच्या संभाव्य उमेदवाराला विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या राजमार्गापर्यंत घेऊन जाणारे ठरणार असले तरीही गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांपासून सातत्याने बोरसे- चव्हाण यांच्यातील सरळ सामनाच पुन्हा एकदा रंगणार की नवा भिडू नवा राज येणार, हे आगामी निवडणुकीत चित्र स्पष्ट करणारे ठरणार आहे.
१९६२, ६७, ७२ या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण खुला असलेला मतदारसंघ १९७८ पासून अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव झाला. तो आजतायागत कायम आहे. यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक मातब्बर इच्छुक असले तरीही राखीव जागेच्या अडचणीमुळे मोठी गैरसोय झाली आहे. असे असले तरी आमदार आपल्याच हुकमाचा ताबेदार असावा, यासाठीदेखील ही मातब्बर मंडळी ऐनवेळी आपले पत्ते टाकत असल्याने निवडणुकीचा निकाल बदलत असल्याचा अनुभव गत पाच विधानसभांपासून दिसून येत आहे. १९९० पासून बागलाण विधानसभा मतदारसंघ माजी आमदार दिलीप बोरसे व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या कुटुंबीयांसाठीच राखीव झालेला आहे. या मतदारसंघात उमेदवारांची भाकरी फिरविली जाते ती केवळ बोरसे व चव्हाण परिवारासाठीच, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, यंदा बोरसे व चव्हाण यांच्यासोबतच नवे चेहरेदेखील रिंगणात उतरण्यास इच्छुक असले तरीही पक्षीय पातळीवर कोण उमेदवारी मिळवून बाजीगर ठरणार, यावर निवडणुकीचे गणित ठरणार आहे. बागलाण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व चेहरे ज्या पद्धतीने कायम आहेत, त्याच पद्धतीने बागलाणचे शेती सिंचनापासून तर विकासाचे प्रश्नदेखील कायम आहेत. राज्यात सत्ता असलेल्या पक्षाविरोधात आमदार निवडून देणारा बागलाण विधानसभा मतदारसंघ असल्यामुळेदेखील या मतदारसंघाचे प्रश्न रखडले असावेत.
सन १९६२ पासून २०१४ पर्यंत लक्ष्मण तोताराम पवार यांचा अपवाद वगळता एकदाही आमदार दुसऱ्यांदा निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघाने जोपासलेली नाही. यामुळे आगामी निवडणूकदेखील बोरसे व चव्हाण यांच्यासाठी अत्यंत अटीतटीची ठरू शकेल.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील बागलाण विधानसभा मतदारसंघाने भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना ७२ हजार मतांची दिलेली आघाडी विधानसभा निवडणुकीचे रागरंग दाखविणारी ठरू शकेल. विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांनी मतदारसंघातील संपर्क, विकासकामे, विधानसभेतील आपल्या कार्यशैलीचा ठसा मतदारसंघात उमटविला असला तरीही राज्यात भाजपचे सरकार असल्याने तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी आमदार चव्हाण यांच्या कार्याला मर्यादा आणून ठेवल्या. विकासाचे सारेच प्रश्न आपणच सोडविल्याचा दावा व विकासकामांचा बार स्वत: भामरे यांनी उडविल्याने आमदार चव्हाणांना श्रेयनामावलीपासून दूर राखले. यामुळे आमदार चव्हाण व खासदार डॉ. भामरे यांच्यात अनेक वेळा तू तू मैं मैं झाली आहे.
तालुक्यातील शेती सिंचनासह शहरातील महत्त्वाचा बायपासचा प्रश्न कायम आहे. शहराच्या दृष्टीने पुनद पाणीपुरवठा योजना महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यास विद्यमान आमदार व खासदारांना यश आलेले आहे. ही दोघांच्या दृष्टीने जमेची बाजू असली तरीही बायपासप्रश्नी दोघांना जाब द्यावा लागणार आहे. विद्यमान जि. प. सदस्या साधना गवळी, माजी आमदार ए. टी. पवार यांच्या कन्या गीतांजली पवार, राकेश घोडे व जयवंत पवार यांनी या वेळी भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे भाजपत इच्छुकांची मांदियाळी आहे.
नवीन चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरीही शेवटी निवडणुकीत आर्थिक गणितात वरचढ ठरणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आतापर्यंत या तालुक्याने पाहिले आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेल्या या उमेदवारांनाच उमेदवारी मिळणार असल्याने या स्पर्धेत कोण बाजी मारेल हे सांगणे कठीण नाही. यामुळे आगामी निवडणूक ही पुन्हा एकदा बोरसे विरुद्ध चव्हाण अशीच ठरल्यास नवल वाटू नये.
पक्षनिहाय इच्छुक उमेदवार
भाजप : दिलीप बोरसे, साधना गवळी, पोपट गवळी, जयवंत पवार, राकेश घोडे, गीतांजली पवार
राष्ट्रवादी : दीपिका चव्हाण, पोपट अहिरे, गणेश अहिरे
काँग्रेस : गणेश अहिरे, डॉ. जयश्री बर्डे
विधानसभेसाठी २०१४ मध्ये झालेले मतदान
दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) : ६८,४३४
दिलीप बोरसे (भाजप) : ६४२५३
साधना गवळी (शिवसेना) : ९,१०८
जयश्री बर्डे (काँग्रेस) : ६,९४६
लोकसभेसाठी २०१९ मध्ये झालेले मतदान
डॉ. सुभाष भामरे (भाजप) : १,१७,९५४
कुणाल पाटील (काँग्रेस) : ४५,७२३
नबी अहमद (वंचित आघाडी) : ४,४८४