मालेगाव, सटाणा, नांदगाव, निफाड, येवला तालुक्यात अल्प पाऊस
टीम मटा
पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही कसमादेसह निफाड, येवला तालुक्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
निफाड : तालुक्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. ज्या भागात पाऊस झाला त्या भागातील लोकांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. पण गेल्या आठड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने केलेली पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीची संकट शेतकऱ्यांसमोर आहे. निफाड तालुक्यात मागील आठवड्यात तुरळक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र आता पावसाने पुन्हा पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे.
निफाड तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मकाची पेरणी केली आहे. सोयाबीनपेक्षा मका अधिक प्रमाणात पेरलेला आहे. पहिल्या पावसाने जमिनीत थोडी ओल असल्यामुळे पेरलेले बियाणे उगवले आहे. मात्र या कोवळ्या पिकांना पावसाची नितांत गरत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
एक एकर क्षेत्र मशागतीसह पेरणीसाठी जवळपास ७ ते ८ हजार रुपये खर्च आलेला असताना पुन्हा दुबार पेरणीचे संकट असल्याने शेतकऱ्यांनी पावसाला साकडे घातले आहे. याऊलट दररोज उन्हाळ्यासारखे कडक उन असल्यामुळे जमितीतून वर आलेले कोवळे पिकही संकटात सापडले आहे.
द्राक्षबागाही संकटात
पावसाने ओढ दिल्याने सध्या द्राक्षबागांना टँकरने पाणी दिले जात आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही पाऊस लांबला तर द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
इगतपुरीतही पावसाची विश्रांती
घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाउसाने दडी मारल्याने तालुक्यातील धरणांमधील वाढत जाणारा जलसाठाही आता स्थिरावला आहे.
इगतपुरी तालुक्याला यंदा प्रथमच टँकरवर तहान भागवावी लागली. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होईल, अशी सर्व शेतकऱ्यांना आशा होती. सुरुवातील रुसलेल्या पावसाने जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावली. मात्र हे आठ दिवस वगळता पावसाने पुन्हा दडी मारली आहे. या पावसामुळे तालुक्यातील धरणसाठ्यांत पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून ही आशा पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणसाठ्यातील वाढही थांबली आहे. तसेच तालुक्यातील बहुतांश भागातील भात लागवडीची कामेही रखडली आहे.
धरणसाठा (टक्क्यांत)
भावली -- ७८.५१
दारणा -- ७१.५५
भाम -- ५७.५७
कडवा -- ५१.२४
मुकणे -- २२.८५
वाकी - ३३
बळीराजाच्या ऊरी धडधड
म. टा. वृत्तसेवा, येवला
उशिराने आलेल्या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीचा जणूकाही जुगार खेळल्याचेच चित्र सर्वत्र दिसत आहे. गेल्या सात दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसाने दिलेली मोठी ओढ लक्षात घेता पेरणी केलेल्या पिकांचे काय होणार? या चिंतेतून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उरात धडधड होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात महसूल यंत्रणेच्या येवला मुख्य मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असली तरी, तालुक्यातील इतर सर्वच मंडळे आजही अत्यल्प पर्जन्यमानामुळे पिछाडीवर आहेत. मान्सूनचे उशिराचे आगमन, कुठे काहीसा जोर तर कुठे अगदी कमजोर अशा पावसाने केलेल्या भेदभावातही तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात यंदा मका, सोयाबीन, बाजरी, कपाशी या पिकांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या सात ते आठ दिवसांपासून तालुक्यात पावसाने मोठी दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी पुरेशा पावसाअभावी अद्यापही खरीप हंगामातील पेरणीचे शेतीचक्र अडखळून पडले आहे. येत्या पाच-सहा दिवसात पर्जन्यसरी पडल्या तरच ही पिके उभारी घेण्यास मदत होणार आहे. अन्यथा पिके करण्याच्या शक्यता आहे.
मालेगावला दमदार पावसाची प्रतीक्षा
मालेगाव : दुष्काळाने होरपळून निघालेल्या मालेगाव तालुक्याला जुलैचा पहिला आठवडा संपला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पहिल्या पावसापासून मालेगाव तालुक्यावर सावत्र भाव दाखविणाऱ्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून दडी मारल्यामुळे नुसतेच निरभ्र आकाश पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यात ८ जुलै अखेर निम्मेच पेरण्या झाल्या असून पावसा अभावी पेरण्य खोळंबल्या आहेत. आता तरी पावसाचा दुजाभाव संपून मालेगावात दमदार सरी कोसळतील अशी आस शेतकऱ्यांना लागली आहे. गेल्यावर्षी समाधानकारक पाउस न झाल्याने यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. जून महिना सुरु झाला आणि वरुणराजा दमदार बरसेल अशी सर्वांच आस होती. मात्र जून महिन्याच्या अखेरीस पावसाने तुरळक हजेरी लावत सलामी दिली. जून महिन्यात तालुक्यात ५८ मिमी इतकाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जूनच्या अखेरीस पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे आजा दुबार पेरणीचे संकट तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत आहे.
धरणेही कारेडीच
पावसाआभावी पेरण्या खोळंबल्या असतांना गिरणा व मोसमनदी पात्रे देखील अद्याप कोरडी आहेत. गिरणा खोऱ्यातील चणकापूर, केळझर, नाग्यासाक्या धरणे अजून कोरडीच असून हरनाबारी, गिरणा धरणात किरकोळ पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गिरणा मोसम खोऱ्यात पावसाआभावी पाण्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत.