संकलन : प्रवीण बिडवे
मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी राज्य सरकार मानव विकास कार्यक्रम राबवित असून, या कार्यक्रमांतर्गत मुलींचे शिक्षण आणि महिलांच्या आरोग्याबाबत चांगले परिणामही दिसू लागले आहेत. ग्रामीण भागात मुलींचा शिक्षणाचा टक्का वाढत असून, बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. परंतु, हे प्रमाण शून्यावर आणणे अजूनही शक्य होऊ शकलेले नाही. नाशिक विभागातील अहमदनगरमधील एकही तालुका या कार्यक्रमात समाविष्ट नाही. दुर्दैवाने याच जिल्ह्यात बालक आणि माता मृत्यूचे प्रमाण अधिक आढळले आहे. त्यामुळे तालुके विकासाचा इंडेक्स तयार करून मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या अन्य तालुक्यांनाही या कार्यक्रमात समाविष्ट करून घ्यावे लागणार आहे.
-
अंमलबजावणीत नाशिक आठव्या स्थानी
राज्यातील २३ जिल्ह्यांमधील १२५ अतिमागास तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मानव विकास मिशन राबविले जाते. या मिशनच्या अंमलबजावणीच्या क्रमवारीत नाशिक जिल्हा आठव्या क्रमांकावर आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी वार्षिक दोन कोटींचा निधी दिला जातो.
-
निवडीच्या निकषांत दुरुस्तीची गरज
मानव विकास निर्देशांक उचांवण्यासाठी राज्य सरकारने २९ जून २००६ रोजी मानव विकास मिशनची स्थापना केली. सन २००१ च्या जनगणनेनुसार तालुक्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण आणि २००२ च्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे प्रमाण हे दोन निकष विचारात घेऊन मानव विकास निर्देशांक वाढीसाठी तालुक्यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, कळवण, दिंडोरी, बागलाण आणि नांदगाव या तालुक्यांचा मानव विकास कार्यक्रमात समावेश होतो. परंतु, अहमदनगरमधील अनेक तालुक्यांत हे मिशन राबविण्याची गरज आहे. येथील एकही तालुका त्यामध्ये सहभागी नाही हेच आश्चर्यकारक आहे. काळानुरूप निकषांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. अहमदनगर जिल्ह्यात गतवर्षात सर्वाधिक ९४६ बालकांचा मृत्यू झाला आहे.
-
बालमृत्यू धक्कादायक
केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर नाशिक विभागात बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. विभागात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या गेल्या वर्षभरात ३ हजार १४३ बालकांचा मृत्यू झाला आहे. आदिवासी तालुक्यांमध्ये त्यातल्या त्यात हे प्रमाण काहीसे अधिक आहे. कुपोषण हे बालमृत्यूचे एक कारण असले तरी ते एकमेव कारण नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात आठ आदिवासी तालुके असूनही जेवढे बालमृत्यू नाही तेवढे दोनच आदिवासी तालुके असलेल्या नगर जिल्ह्यात आहेत. कुपोषणाची तीव्रता नसतानाही हे बालमृत्यू होणे चिंताजनक आहे. टीबी, हृदयातील दोष, न्यूमोनिया यांसारख्या आजारांनी बालकांचा मृत्यू होतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मार्च २०१९ अखेर जिल्हानिहाय बालमृत्यू
जिल्हा बालमृत्यूची संख्या
अहमदनगर ९४६
जळगाव ८३५
नंदुरबार ७०६
नाशिक ४५१
धुळे २०५
-
गर्भवती माता व बालकांसाठी घेतलेली आरोग्य शिबिरे- १२७२
या शिबिरांवर केलेला खर्च - २ कोटी २ लाख
बुडीत मजुरीच्या लाभार्थी बाळंत महिला - २८ हजार २४४
बालभवन विज्ञान केंद्रास भेट देणारे विद्यार्थी - २१ हजार ७५८
मुली शिकल्याने समस्या दूर
ग्रामीण भागात पैशांची चणचण आणि तत्सम अनेक कारणांमुळे बऱ्याचशा मुली केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतात. शिकण्याची इच्छा असूनही त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. प्रत्येक तालुक्यात काही गावांसाठी मिळून किमान एक माध्यमिक शाळा व महाविद्यालय आहे. या शाळा किंवा महाविद्यालयाचे अंतर ३ ते १५ किलोमीटरपर्यंत असते. या मुलींना किमान १२ वीपर्यंत शिक्षण घेता यावे या उद्देशाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत योजना राबविली जाते. मुलींनी शिक्षण घेतले तर बालविवाहाचा प्रश्नही आपसूकच निकाली निघतो. याशिवाय कुपोषित बालकांचा प्रश्न निकाली निघण्यासही या योजनेमुळे अप्रत्यक्षरित्या हातभारच लागत आहे.
-
मुलींच्या सुरक्षेत वाढ
घरापासून पाच किलोमीटर अंतरात शाळा असणाऱ्या विद्यार्थिनीला मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल देण्याची व्यवस्था केली जाते. सायकल खरेदीसाठी या मुलींच्या बँक खात्यावर सरकारद्वारे साडेतीन हजार रुपये दिले जातात. या पैशांद्वारे त्या हवी तशी सायकल खरेदी करू शकतात. त्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडू नये हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे गळतीचे प्रमाणही कमी झाले आहे. आठवी ते बारावीच्या मुलींना सायकल दिली जाते. विद्यार्थिनी गरजू हवी, एवढा एकच निकष त्यासाठी आहे. लहानग्या भावांना सायकलवर बसवून मुली शाळेत येतात. त्यांचा वेळ वाचतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुली एकत्रितरित्या सायकलवर येत असल्याने त्यांची सुरक्षितताही वाढली आहे.
-
विद्यार्थिनींची सोय, एसटीला उत्पन्न
गावापासून पाच किलोमीटरहून अधिक अंतरावरील शाळेत जाण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत विशेष बस सुविधा पुरविली जाते. प्रत्येक तालुक्यात सात याप्रमाणे आठ तालुक्यांमध्ये ५६ बसेस धावतात. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस बस सज्ज असतात. बसमध्ये प्रत्येक मुलीला बसण्यासाठी जागा मिळेल याची खबरदारी घेतली जाते. त्याव्यतीरिक्त जागा शिल्लक असली तरच अन्य प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळतो. या बस प्रवासाचा खर्च राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जिल्हा नियोजन समिती अदा करते.
-
सायकलवाटपाची स्थिती (२०१३-२०१९)
तालुका - लाभार्थी-खर्च (लाखांत)
सुरगाणा २५९३ ७२.०८
त्र्यंबकेश्वर २५२९ ७१.११
पेठ १८६८ ५८.१५
इगतपुरी ३२३५ ९१.३४
कळवण १७४७ ६८.३५
दिंडोरी ३२३५ ३१.४
बागलाण ३०६१ ९४.६८
नांदगाव ३२३२ ९९.८७
एकूण २१,५०० २३५.०१५
-
थेट बँक खात्यावर रक्कम
मानव विकासच्या विविध योजनांतर्गत येणारी आर्थिक मदत लाभार्थींना सुरुवातीच्या काळात धनादेशाद्वारे दिली जात होती. परंतु, हे लाभार्थी निरक्षर किंवा अल्पशिक्षित असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आदिवासी आणि अतिग्रामीण भागामध्ये राहावयास असतात. अनेकांना बँकिंग व्यवहारांची माहिती नसते. प्राप्त धनादेश त्यांच्याकडून चुरगळले जातात. काहीवेळा गहाळही होतात. अनेकदा मुदतीत वटविले जात नाहीत. त्यामुळे लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे लाभार्थींच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची व्यवस्था नियोजन विभागाने केली आहे.
-
गतवर्षी १५ कोटी खर्च
अतिमागास भागाचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या या कार्यक्रमात गेल्या वर्षात नऊ योजनांवर १५ कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आला. त्यातील ८ वी ते १२वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या ४ हजार २७३ गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले. त्यावर सुमारे दीड कोटींचा खर्च करण्यात आला. गाव ते शाळा वाहतूक बसेस सुविधा पुरवण्याची दुसरी योजनाही राबविण्यात आली. विद्यार्थिनींना शाळांपर्यंत पोहोचविण्याचे काम ५६ बसेस करत आहेत. ५ हजार ८५० मुलींनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर ३ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. गर्भवती मातांसाठी दोन योजना असून त्यावर ८ कोटी ७२ लाख खर्च करण्यात आले आहेत.
-
घरी प्रसूतीचे प्रमाण झाले कमी
आशा, आरोग्य सेविकांच्या माध्यमातून गर्भवती मातांचे ट्रॅकिंग केले जाते. त्यांना आरोग्य तपासणीसाठी वाहनाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणण्यात येते. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येते. जिल्ह्यातील ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रांत महिन्याला दोन आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. आदिवासी भागात एका शिबिरावर १८ हजार रुपये तर बिगर आदिवासी भागात १६ हजार रुपये खर्च केला जातो. या शिबिरांमुळे गर्भवती महिलांची वेळच्या वेळी तपासणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे दवाखान्याबद्दलची भीती नाहीशी होऊन घरच्या घरी प्रसूती करण्याचे प्रमाणही त्यामुळे कमी झाले आहे.
-
मानव विकास कार्यक्रमात सहभागी तालुके
नाशिक -जळगाव-धुळे-नंदुरबार
सुरगाणा-चाळीसगाव-शिरपूर-अक्क्लकुवा
त्र्यंबकेश्वर- चोपडा-साक्री-अक्राणी
पेठ-जामनेर-धुळे -तळोदा
इगतपुरी-बोदवड-शिंदखेडा-नवापूर
कळवण-मुक्ताईनगर-नंदुरबार
दिंडोरी-अंमळनेर-शहादा
बागलाण-एरंडोल
नांदगाव
-
तज्ज्ञ डॉक्टरांबाबत अनिश्चितता
इगतपुरी तालुक्यात २०११-१२ पेक्षा बालमृत्यूंचे प्रमाण २६ वरुन ११ वर येण्यास, तर माता मृत्यू १५६ वरून ६५ पर्यंत येण्यास मदत झाल्याचा दावा येथील वैद्यकीय सूत्रांनी केला आहे. कळवण तालुक्यात २०१२ मध्ये बालमृत्यूची संख्या ६० होती. यंदा ती ३८ आहे. मातामृत्यूची संख्या २०१२ मध्ये ६ होती. यंदा एकही माता मृत्यू झालेला नाही. २०१२ मध्ये अर्भक मृत्यूची संख्या ५२ होती. यंदा ती २८ पर्यंत खाली आली आहे. तालुक्यात या कार्यक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. अशीच स्थिती त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आहे. २०१५ मध्ये ० ते ५ वयोगटातील बालमृत्यूचा दर ७ होता. २०१६ आणि २०१७ मध्ये तो चारपर्यंत खाली आला. परंतु गतवर्षात तो शून्य झाला. मातामृत्यूचे प्रमाण मात्र १५३ वरून २२६ पर्यंत वाढल्याची धक्कदायक बाब पुढे आली आहे. अपुरे आणि अवेळी येणाऱ्या अनुदानामुळे स्थानिक पातळीवरील यंत्रणेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तालुक्यांमध्ये स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची कमतरता असते. शहरातूनही प्रत्येकवेळी असे तज्ज्ञ उपलब्ध होतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे कामांच्या आणि योजनेच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
-
बुडीत मजुरीचा योग्य विनियोग गरजेचा
बुडीत मजुरीपोटी गर्भवती महिलांच्या बँक खात्यात सरकार ४ हजार रुपये देते. परंतु या पैशांचा विनियोग महिलांना पोषक आहारासाठी होईलच याची शाश्वती नाही. पैशांचा योग्य विनियोग होऊन महिलांच्या आरोग्याला त्याचा लाभ होतो की नाही, की हे पैसे कुटुंबातील अन्य व्यक्ती अन्य कामांसाठीच वापरतात याची शहानिशा करणारी यंत्रणाही असणे गरजेचे आहे. कारण माता बालक मृत्यू रोखण्यासाठी संबंधित महिला आणि बाळास पौष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे.
-
शिकवणी वर्ग केले बंद
२०१२ च्या दरम्यान प्रारंभी दोन वर्ष दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा नापास झालेल्या रीपिटर विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले होते. या वर्गात २५ विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी आणि विज्ञान यांचे दररोज नियमीत मार्गदर्शन करण्यात येत होते. त्यासाठी प्रत्येक विषयासाठी शिकवणीवर्ग चालक अथवा शाळेतील विषय शिक्षक यांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येत होते. तथापि, याची पाहिजे तशी अंमलबजावणी झाली नाही. विद्यार्थी पुन्हा नापास झाले त्यामुळे हे वर्ग बंद करण्यात आले.
-
कोट
विभागात अहमदनगर जिल्ह्यातील एकही तालुका मानव विकास निर्देशांकात नाही. परंतु, भविष्यात येथील तालुक्यांची निवड होऊ शकते. उर्वरित जिल्ह्यांत २५ तालुक्यांत मानव विकास कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमात आरोग्य उपकेंद्र नवीन इमारत बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधकाम आणि गौण वनोपजांचा उपभोग यांसारख्या काही योजना नव्याने समाविष्ट केल्या आहेत.
प्रदीप पोतदार, उपायुक्त नियोजन विभाग
मानव विकास कार्यक्रम हा सरकारच्या अन्य योजनांव्यतिरिक्त राबविण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर अतिरिक्त खर्च केला जात आहे. साधारणत: प्रत्येक तालुक्यात या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर दोन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. खऱ्या अर्थाने या तालुक्यांमधील रहिवाशांचा राहणीमानाचा दर उंचवावा हा त्यामागील उद्देश आहे.
-हेमंत आहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास
मानव विकास कार्यक्रम ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविला जातो. गर्भवती महिलांसह त्यांच्या शून्य ते सहा महिने वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टर करतात. गर्भवती महिलांना चार हजार रुपये बुडीत मजुरी डीबीटीद्वारे दिली जाते. लाभार्थी महिलांची नावे जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहेत. या योजनेमुळे माता मृत्यू, बालमृत्यू रोखणे शक्य होते आहे.
-डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
-
जिल्ह्यात विद्यार्थिनी गळतीचे प्रमाण रोखणे मानव विकास कार्यक्रमामुळे शक्य होते आहे. पूर्वी मुली फारतर आठवीपर्यंत शिकत. आता सकृतदर्शनी त्या किमान दहावीपर्यंत शिक्षण घेत असल्याचे आमचे निरीक्षण आहे.
- नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद
-
मानव विकास कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समिती
जिल्हाधिकारी - अध्यक्ष
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी : सहअध्यक्ष
संबंधित विभागाचे जिल्हा प्रमुख - सदस्य
जिल्हा परिषदेने नियुक्त केलेले सभापती - सदस्य
अशासकीय सेवाभावी संस्था - सदस्य
अग्रणी बँकेचे अधिकारी - सदस्य
जिल्हा नियोजन अधिकारी - सदस्य सचिव
-
तालुका स्तरावर समिती
गट विकास अधिकारी - अध्यक्ष
तहसीलदार किंवा नायब तहसीलदार - निमंत्रित सदस्य
बालविकास प्रकल्प अधिकारी - सदस्य
गट शिक्षणाधिकारी - सदस्य
तालुका आरोग्य अधिकारी - सदस्य
अशासकीय सेवाभावी संस्था - सदस्य
पंचायत समितीने नियुक्त केलेला सभासद - सदस्य
विस्तार अधिकारी (पंचायत) - सदस्य सचिव