म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) आठवडाभरात ही मोहीम हाती घ्यावी, असे आदेश निवडणूक उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिले आहेत. मतदार यादीमध्ये आपला अचूक तपशील यावा याकरीता नागरिकांनीही बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन आनंदकर यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुद्ध मतदार यादी करण्यावर निवडणूक शाखेने भर दिला आहे. या मोहिमेअंतर्गत प्राधान्याने मतदार यादीतील सर्व मयत मतदारांची नावे वगळण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व मयत मतदारांची माहिती एकत्रितरित्या संकलित करून मृत्यूचे दाखले प्राप्त करून घ्यावेत, अशा सूचना बीएलओंना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दुबार मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करून दोषरहीत आणि परिपूर्ण मतदार यादी तयार करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शहरी भागातील काही मतदान केंद्रांवर मतदार यादीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. अशा तक्रारी विधानसभा निवडणूक काळात प्राप्त होणार नाही. यासाठी मतदार यादी शुद्धीकरणाचे काम अत्यंत काटेकोरपणे करा, अशा सूचनाही बीएलओंना देण्यात आल्या आहेत. बीएलओंचे प्रशासनाकडे गाऱ्हाणे मतदार स्वतःची संपूर्ण माहिती देताना टाळाटाळ करीत असल्याचे गाऱ्हाणे बीएलओंनी जिल्हा प्रशासनाकडे मांडले आहे. मतदारांकडून फोन नंबर, मोबाइल नंबर चुकीचे दिले जातात. त्यामुळे ओळखपत्र वाटप किंवा मतदार पावती वाटप करताना मतदारांचा शोध घेणे अवघड होत असल्याची कैफियत बीएलओंनी मांडली आहे. मतदार रंगीत फोटो देत नाहीत, त्यामुळे मतदारांना रंगीत छायाचित्र मतदार ओळखपत्र (स्मार्ट इपीक) देता येत नाही. एका कुटुंबातील लोकांनी वेगवेगळया वेळी अर्ज भरल्यामुळे कुटुंबातील लोकांची नावे वेगवेगळ्या यादी भागांमध्ये गेली आहेत. परंतु नागरिक त्यावरूनही वाद घालत असल्याच्या बीएलओंच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन आनंदकर यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट