म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शिक्षण क्षेत्रात जेथे विविध प्रकारचे पॅटर्न प्रचलित झाले अशा शहरांत हल्ली स्पर्धेतून शिक्षकांचे खून पडत आहेत. शिक्षण क्षेत्रात धंदेवाईकपणा बोकाळला असून, त्यामुळेच हे क्षेत्र कुरुक्षेत्र बनले आहे. शिक्षणाचे वस्त्रहरण रोखून त्याला गुरुक्षेत्र बनविण्याची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले. महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना विद्यालय या मातृशाळेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात देशपांडे बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र समाजसेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, संस्थेचे पदाधिकारी निरंजन ओक, शांताराम आहिरे, सुधाकर साळी, विजय डोंगरे, अलका गाजरे, शीतल पवार, संगीता टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 'शिक्षण गुरुक्षेत्र की कुरुक्षेत्र' या विषयावर डॉ. देशपांडे यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाबरोबरच अंगी शिस्त बाणविण्यासाठी सैनिकी शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. हल्ली राष्ट्रगीत ऐच्छिक, पण हेल्मेटसक्तीचे बनू पाहत आहे. डोके सुरक्षित राहाणे महत्त्वाचे आहेच. परंतु, त्याहूनही डोक्यातील विचार सुरक्षित राहाणे अधिक महत्त्वाचे आहे. हल्ली मुलांना शर्टचे तुटलेले बटणही लावता येऊ नये, ही शोकांतिका आहे. हल्लीच्या पाठ्यपुस्तकांत फार काही नाही. आगामी काळ हा कौशल्यविकासचा असून, नव्या जाणिवेने कौशल्यविकासाचे काम सुरू करायला हवे. स्वावलंबी शिक्षण रुजवावे कुटुंबातील सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना घरातील फॅन, मिक्सर, मोबाइल, शेतपंपाची मोटार यांसारख्या उपकरणांची किमान जुजबी दुरुस्ती करता यायला हवी. येणाऱ्या पिढीने स्वत:च्या पायावर उभे राहावे याकरिता अशा प्रकारच्या स्वावलंबी शिक्षणाचे मूल्य त्यांच्यामध्ये आतापासूनच रुजवायला हवे. हल्ली मुलांना गोष्टी सांगणेच बंद झाले आहे. मुलांवर संस्कार होण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून जे साध्य करता येते ते अन्य कशातूनही होऊ शकत नाही. आपला प्रवास राइट टू एज्युकेशनपासून राइट वे ऑफ एज्युकेशनच्या दिशेने व्हायला हवा, असे मतही डॉ. देशपांडे यांनी यावेळी मांडले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट