म. टा. वृत्तसेवा, येवला दुष्काळाच्या दाहकतेत होरपळणाऱ्या येवला तालुक्यातील काही गावांना सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. देशमाने गावापासून त्यांनी दुष्काळी दौऱ्याची सुरुवात करीत नगरसूल व राजापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणीसमस्या जाणून घेतली. सर्वांच्या सहकार्याने या संकटाला सामोरे जायचे आहे, अशी साद महाजन यांनी जनतेला घातली. पालकमंत्री महाजन यांचे सोमवारी दुपारी देशमाने गावात आगमन झाले. जिल्ह्यातील मांजरपाडा योजनेच्या बोगद्याचे प्रलंबित काम चांदवड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक निकालानंतर सुरू केले जाईल, असे सांगत गेल्या १५ वर्षांपासून मांजरपाडा प्रश्नावर निवडणुका जिंकून येथील आमदारांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची केवळ आश्वासनावर बोळवण केली असल्याचा आरोपही महाजन यांनी केला. आम्ही याप्रश्नी प्रत्यक्षात काम करून दाखवले असून, येत्या पावसाळ्यात पहिल्या पावसात पाणी कालव्यात सोडले जाईल, असेही पालकमंत्री महाजन म्हणाले. येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे दुष्काळाचा सामना करताना येणाऱ्या विविध अडचणींविषयी पालकमंत्री महाजन यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये मजुरांच्या हातांना काम हवे असल्यास त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेसह सरकारच्या विविध योजनांतर्गत कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे मजुरांनी कामांची यादी द्यावी, त्यांना त्वरित कामे उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले. तालुक्यातील नगरसूल व राजापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महाजन यांनी केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार, शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, येवला तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता पवार, पंचायत समितीच्या सभापती कविता आठशेरे, शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शरद लहरे, दिलीप मेंगळ, विठ्ठल आठशेरे, भाजपचे प्रमोद सस्कर, तालुकाध्यक्ष राजू परदेशी, नाना लहरे, समीर समदडिया, नगरसूलचे सरपंच प्रसाद पाटील, मनोज दिवटे आदींसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व येवला तालुक्यातील शिवसेना-भाजपचे पदाधिकारी दौर्यात सहभागी झाले होते. 'जमीन लिलाव स्थगित करण्याचे नियोजन' दुष्काळी परिस्थितीबाबत आम्ही आपल्या पाठीशी आहोत' असे सांगताना पालकमंत्री महाजन यांनी जिल्हा बँकेच्या कारवाईबाबत शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकीत कर्जवसुलीसंदर्भात जाहीर झालेल्या नोटिशीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, की या संदर्भात आपण जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबतीत पुढील दोन दिवसांत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमीन जाहीर लिलावाबाबतची प्रक्रिया स्थगित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आमचे नियोजन आहे. कांदा अनुदानासह विविध शासकीय योजनांमधील उर्वरित शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. दौऱ्यात अधिकाऱ्यांनाही मुभा! पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सोमवारच्या येवला दौऱ्यादरम्यान आचारसंहिता कारणास्तव विविध शासकीय विभागाचे अधिकारी दूर राहिले होते. निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकाद्वारे आजपासून त्याला स्थगिती दिली असून, उद्यापासून संपूर्ण राज्यात मंत्र्यांच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आल्याची माहितीही पालकमंत्री महाजन यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली. दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला दिलासा येतानाच जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला बरोबर घेऊन लवकरच या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशीही ग्वाही महाजन यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट