- आचारसंहिता संपताच महापालिकेकडून प्रारंभ - उद्दिष्टापैकी ७० टक्के बांबूंची लागवड - सहाही विभागांत ७६ ठिकाणी होणार लागवड ... म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत अडकलेली महापालिकेची ५२ हजार वृक्षलागवड मोहीम आता आचारसंहिता सपंताच सुरू होणार आहे. संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ दिल्यानंतर दोनच दिवसात आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. ठेकेदारानेही वृक्षलागवडीची तयारी पूर्ण केली आहे. शहरात ऐन पावसाळ्यात वृक्षांसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले जाणार आहे. राज्य सरकारच्या वन विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत यावर्षी नाशिक महापालिकेला ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेने उद्दिष्ट वाढवून हा आकडा ५२ हजारांपर्यंत नेला. या उद्दिष्टपूर्तीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने कार्यवाही सुरू केली होती. सहाही विभागांत वृक्ष लागवडीसाठी चार मक्तेदारांची नियुक्ती केली होती. रस्त्यावर वृक्ष लागवड यशस्वी होत नसल्याने महापालिकेने विशिष्ट प्रभागांमध्ये जागा निश्चित केल्या होत्या. त्यानुसार सहाही विभागांत ७६ ठिकाणी ५२ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असून, सर्वाधिक १० हजार १७० वृक्ष लागवड ही नाशिकरोडला करण्यात येणार होती. उर्वरित पाच विभागात सरासरी ९ हजार वृक्षांची लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले होते. लावलेले वृक्ष मरू नये यासाठी नव्या ठेक्यात वर्षभर या वृक्षांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली आहे. या मोहिमेअंतर्गत बांबू, वड, पिंपळ, कडूनिंब, सप्तपर्णी, अर्जुन, उंबर, लोखंडी, साग, काटेसांवर, खैरे, बीजा, नांद्रुक, ताह्मण, पुत्रंजिवी, चिंच, टोकफळ, पांगार, रुद्राक्ष, कैलासपती, भिलावा, काळा शिरस, बहावा, कांचन आदी ६२ देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून महापालिका क्षेत्रातील जैवविविधता राखण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. ठेकेदारांना कार्यारंभ आदेश दिल्यानंतर दोनच दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे काम रखडले. परंतु, या आचारसंहितेमुळे ठेकेदारांनी वृक्ष लागवडीची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपताच खड्डे करण्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात वृक्षलागवड सुरू होणार असल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाणही वाढणार आहे. .. नदीकाठावर बांबूंची लागवड यंदाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत प्रथमच अन्य प्रजातींच्या वृक्षांसोबतच बांबूची लागवड केली जाणार आहे. सुमारे ५२ हजार वृक्षांमध्ये ७० टक्के वृक्ष लागवड ही बांबूंची केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही नदी संवर्धनासाठी गोदावरी, नंदिनी या दोन प्रमुख नद्यांच्या काठी बांबूची लागवड केली जाणार आहे. यातून आर्थिक लाभही होईल, असा दावा पालिकेने केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट