म. टा. प्रतिनिधी, नाशिक जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्था आणि व्यक्ती पुढे येऊ लागल्या आहेत. सिन्नरसह मालेगाव आणि येवला तालुक्यात छावण्या सुरू करण्याबाबतचे काही प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले असून, पुढील आठवड्यात जिल्ह्यात चारा छावणीचा श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे. यंदा राज्याचा बहुतांश भाग दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. नाशिक जिल्हादेखील त्याला अपवाद नाही. जिल्ह्यात निम्म्याहून अधिक म्हणजेच आठ तालुके गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळाचा सामना करीत आहेत. याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही दुष्काळाचे चटके कमी अधिक प्रमाणात जाणवत आहेत. पाण्यासाठीची ग्रामस्थांची पायपीट कमी व्हावी याकरीता टँकरद्वारे वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्याचा पर्याय प्रशासनाने अवलंबला आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य तीव्र स्वरुपात जाणवत असून, त्यासाठी काही किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे वास्तव आहे. पाण्याबरोबरच जनावरांसाठीचा चारा हादेखील ग्रामीण आणि विशेषत: दुष्काळी तालुक्यांमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे. जिल्हा प्रशासनाकडे सद्य:स्थितीत पुरेशा प्रमाणात चारा असला तरी त्याची मागणीदेखील मोठी आहे. त्यामुळे चारा टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच चारा छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव मागविले होते. परंतु, एप्रिल अखेरपर्यंत प्रशासनाच्या या आवाहनाला जिल्ह्यातून अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे मेचा पहिला आठवडा उजाडूनही चारा छावण्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. छावणी सुरू झाली तर जनावरांना तेथे ठेवणे आणि तेथेच त्यांना चारा-पाणी पुरविणे शक्य होणार आहे. चारा छावण्यांसाठी प्रस्तावांचा ओघ वाढू लागल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सिन्नर तालुक्यातील शेतकरी नामदेव सांगळे यांनी गुळवंच भागात चारा छावणी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची त्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती यांसह अन्य काही बाजार समित्यांशी प्रशासनाची चर्चा झाली असून, त्यांनीदेखील चारा छावण्या सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. याखेरीज नाशिक शहरातील निर्माण ग्रुप, मालेगाव येथील गोवंश रक्षा समिती यांनीही चारा छावण्या सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती प्रशासनाने दिली. नांदगावात प्रस्तावांची प्रतीक्षा बीड आणि नगर जिल्ह्यात शेकडो छावण्या कार्यरत झाल्या असताना नाशिकमध्ये मात्र तीन आठवड्यांपूर्वी आवाहन करूनही चारा छावण्या सुरू करण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. नांदगाव तालुक्यात दुष्काळाची भीषणता अधिक आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी आणि चाराटंचाईने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. येथे जनावरांची संख्या मोठी असून, चाऱ्याची मागणीदेखील अधिक आहे. परंतु, या तालुक्यात अद्याप एकही व्यक्ती अथवा संस्था चारा छावणी सुरू करण्यासाठी पुढे आलेली नाही. त्यामुळे या तालुक्यात छावण्या सुरू करण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे. चारा छावणी सुरू करावी यासाठी मी सिन्नरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. गुळवंच येथेच छावणी सुरू करण्याची तयारी या प्रस्तावातून दर्शविली आहे. छावणी सुरू करण्यासाठीच्या निकषांची पूर्तता करण्याची तयारी मी दर्शविली आहे. सोमवारी या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होण्याची शक्यता असून पुढील आठवड्यात छावणी सुरू होईल. - नामदेव सांगळे, गुळवंच
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट