मिसळ पार्टीतून उमेदवार, पदाधिकाऱ्यांनी झटकली मनातील किल्मीष
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे निर्माण झालेली कटुता आणि दुरावा कमी करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित सर्वपक्षीय मिसळ पार्टीत एकमेकांविरोधात लढलेले उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी एकाच पंक्तीत बसून नाशिकच्या तर्रीदार मिसळवर ताव मारत आपल्या मनातील किल्मीष झटकून टाकली. आता नाशिकचा खासदार कोणीही होवो, नाशिकच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद, मनभेद विसरून एकत्र यायचे, नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकदिलाने काम करायचे, असा निर्धार यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला गेला.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याच पक्षाचा खासदार व्हावा यासाठी झपाटल्यागत निवडणूक प्रचाराला लागले होते. नाशिकमध्ये झालेल्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभांमुळे निवडणूक ज्वर अधिकच चढला. थेट आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. काही प्रमाणात झाल्याने राजकीय वातावरण गढूळ बनले. सोशल मीडियावर उमेदवारांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडत होते. मतदान पार पडल्यानंतर हा सगळा आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा बसला असला तरी नेते आणि कार्यकर्त्यांची मने मात्र कलुषितच होती. अशा धगधगत्या राजकीय वातावरणात रंजन ठाकरे यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मिसळपार्टीने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मनातील एकमेकांविरोधातील मतभेद दूर करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
नाशिकमधील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या मिसळ पार्टीला राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह आमदार सीमा हिरे, शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक गुरुमित बग्गा, शिवाजी गांगुर्डे, नंदू बनकर, सुरेश वैश्य, निवृत्ती अरिंगळे, नाना महाले, 'रिपाइं'चे प्रकाश लोंढे, शेफाली भुजबळ यांच्यासह विविध दैनिकांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकारांनीही हजेरी लावली.
राजकीय गुपितेही उघड
समीर भुजबळ यांनी अॅड. कोकाटे यांच्याशी खुल्यादिलाने हस्तांदोलन करत आस्थेने चौकशी केली. अपक्ष असूनही आपला 'ट्रॅक्टर' कसा धावला, सिन्नरकरांनी ही निवडणूक कशी अस्मितेची केली अन् नाशिकमध्ये स्थानिक सिन्नरकरांचा कसा प्रतिसाद लाभला, हे कोकाटे यांनी सांगितले. तर भुजबळ यांनीही राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या प्रचाराचे काटे शहरासह ग्रामीण भागातही कसे वेगाने फिरले, याबाबत सांगितले. बोरस्ते आणि सीमा हिरे यांनी पक्षाच्या प्रचाराची रणनीती विषद केली. यावेळी आपापल्या प्रचाराची गुपितही उमेदवारांनी उघड केली आणि विविध किस्स्यांमधून उडालेल्या हास्यकल्लोळात विरोधाची धारही बोथट होत गेली. मिसळ पार्टीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक प्रचारातील कटुता दूर झाल्याचे चित्र दिसले.
महापालिका निवडणुकीतही आयोजन
निवडणुकांमध्ये नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरोधात तयार झालेली कटूता दूर करण्यासाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्याची मुहर्तमेढ ही महापालिका निवडणुकांवेळेस रोवली गेली होती. महापालिकेत आरोप-प्रत्यारोपांचे राळ उठल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी ठाकरे यांनी यापूर्वीही मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्यांदा असे आयोजन करण्यात आले. यापुढील सर्व निवडणुकांमध्ये अशा मिसळ पार्ट्या करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
निवडणुकांमध्ये सर्वजण आपापल्या राजकीय पक्षांच्या विचारधारेनुसार काम करतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही होतात. मात्र, आता निवडणुका संपल्याने एकमेकांविरोधातील कटुता दूर करून सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी काम करायला हवे.
- समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे उमेदवार
निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय विचारांची लढाई लढली जाते. आता निवडणुका संपल्या असून कार्यकर्त्यांनीही नेत्यांप्रमाणे कटुता विसरून एकत्र यायला हवे. त्यासाठी मिसळ पार्टी चांगला संदेश देणारी ठरेल. आता विकासाचे राजकारण व्हावे.
- ॲड. माणिकराव कोकाटे, अपक्ष उमेदवार
नाशिकची मिसळ जशी सर्वदूर प्रसिद्ध आहे. तसाच नाशिकच्या संस्कृतीचाही नावलौकिक आहे. निवडणुका संपल्या की विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, हाच संदेश या मिसळपार्टीतून महाराष्ट्रभर जाणार आहे. एकोप्याचे वातावरण निर्माण होण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.
- अजय बोरस्ते, शिवसेना नेते
निवडणुकीनंतर विकास आणि प्रगतीचे राजकारण झाले पाहिजे. नेते, कार्यकर्त्यांमधील कटुताही दूर झाली पाहिजे. याच उद्देशाने या मिसळ पार्टीचे आयोजन केले. या निमित्ताने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पुन्हा मनोमिलन होणार आहे.
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस