Tweet : BidvePravinMT
नाशिक :
राजदेरवाडी विकासाच्या नकाशावर झळकण्यासाठी धडपडणारं गाव. अवघी १३९७ लोकसंख्या अन् ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्नही अवघे ७० हजार रुपये. गतवर्षी येथे सरासरीच्या निम्माच पाऊस पडला. तरीही यंदा गावाला पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या नाहीत. त्याचे कारण तमाम ग्रामस्थांनी श्रमनिष्टने केलेले पाण्याचे नियोजन. तुलनेने अधिक पाऊस होऊनही आसपासची गावे टँकरखाली ओंजळ धरत असताना या गावात तप्त उन्हातही जलसमृध्दी नांदते आहे.
राजदेर, इंद्रायणी आणि कोलदेर तीन किल्ल्यांच्या कुशीत राजदेरवाडी (ता. चांदवड) वसले आहे. शेती आणि त्यातही कांद्याचे उत्पादन हेच बहुतांश गावकऱ्यांच्या रोजीरोटीचे साधन. सुमारे २५१ कुटुंब आणि १ हजार ३९७ येथील लोकसंख्या. ग्रामस्थांच्या भाषेत सांगायचं तर येथील जमीन हलकट. म्हणजेच फारशी कसदार नसलेली. परंतु, जलसंवर्धनाची कामे, माती परीक्षणानुसार पीक लागवड अन् आगपेटीमुक्त बांध यांसारख्या उपाययोजनांद्वारे ग्रामस्थांनी अशा जमिनीवर हिरवं शिवार फुलविलं आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी डोंगर उतारावर चाऱ्या खोदून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्याचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले. त्यांच्या जिद्दीला पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेची साथ मिळाली. दिवसभर चरितार्थसाठी काबाड कष्ट करणारे शेतकरीबांधव सायंकाळी सात ते रात्री १२ या वेळेत गावहितासाठी श्रमदान करू लागले. सुमारे ८७५ ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी ४५ दिवस स्वतःला या भगीरथी प्रयत्नांत झोकून दिले. यातून पाणी अडविणे आणि ते साठविण्यासाठीची सीसीटी, डीप सीसीटी, दगडी बांध, माती नाला बांध, नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण, विहीर पुनर्भरण, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन बंधारे, साखळी बंधारे आदी कामे करण्यात आली.
गावात दरवर्षी सरासरी ८०० ते ८५० मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र ४५० मि.मी. पाऊस झाला. तरीही जलसंधारणाच्या कामांचा फायदा आजही होतो आहे. दरवर्षी फेब्रुवारीतच ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. यंदा एप्रिल उजाडूनही गरजेपुरते पाणी गावातच उपलब्ध होते आहे. अत्यल्प पाऊस होऊनही उपाययोजनांमुळे ९५ टक्क्यांपर्यंत क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा आणि शेती उत्पन्नातही २५ टक्के वाढ झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. गावात विविध प्रकारच्या १५०० झाडांची लागवड करून ती जगविण्यात आली आहेत. याखेरीज गावात माती परीक्षणाचा प्रयोग १६६ शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये यशस्वी झाला आहे. रासायनिक खतांचा तसेच, पाण्याचा वापर कमी झाला. गावातच कंपोस्ट तयार केले जाते. सेंद्रिय शेतीकडे लोक वळत आहेत.
यंदा पावसाने साथ दिली तर गाव पाणीटंचाईच्या समस्येपासून कायमचे मुक्त होऊ शकते. गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच गावाची वेगळी ओळख निर्माण होते आहे. पाणी फाउंडेशनच्या राज्यस्तरावरील वॉटरकप स्पर्धेत गावाचा समावेश झाला आहे. याखेरीज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान या राज्यस्तरावरील स्पर्धेतही गाव आहे. तंटामुक्तीचा जिल्ह्याचा विशेष पुरस्कार मिळविण्याचाही आमचा प्रयत्न आहे.
- मनोज शिंदे, उपसरपंच, राजदेरवाडी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट