Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महासभेत भाजपची ‘शोभा’!

$
0
0

सभागृह नेते-सभापतींदरम्यान कलगीतुरा; टीडीआरप्रकरणी अधिकाऱ्यांचे काढले अधिकार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील क्रीडांगणासाठी आरक्षित सर्वे क्र. ७०५ चा २१ कोटींचा रोखीने मोबदला देण्यावरून भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील आणि स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्यातील वादाचा आणखी एक अंक महासभेत बुधवारी पार पडला. सभागृहनेते आणि स्थायी समिती यांच्यातील कलगीतुऱ्यामुळे भाजपची सभागृहातच 'शोभा' झाली असून, भाजपमधल्या गटबाजीने विरोधकांच्या चेहऱ्यावर मात्र हसू पसरले होते. या दोन पदाधिकाऱ्यांच्या वादामुळे भाजपची बेअब्रू होत असल्याचे लक्षात आल्यावर सभागृहातील जेष्ठ नेत्यांनी खलबते करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी महापौर रंजना भानसी यांनी या प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांचे अधिकार काढण्याचे फर्मान काढत सविस्तर अहवाल पुढील महासभेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वे क्र. ७०५ चा २१ कोटींचा धनादेश देण्यावरून भाजपमध्ये दीड महिन्यापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. स्थायी समितीच्या १३ सदस्यांनी विरोधाचे पत्र दिल्यानंतरही प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या २१ कोटींचा मोबदला देण्यावरून महासभेत बुधवारी चर्चा झाली. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी २१ कोटी रुपये देवू नये यासाठी दहा पत्रे दिल्याचा दावा केला. आर्थिक परिस्थितीचे कारण देत एकीकडे १२ लाख रुपयांचा नगरसेवक निधी दिला जात नसताना जागामालकावर २१ कोटींची खिरापत का वाटली, असा आरोप पाटील यांनी केला. उत्कर्ष वाघ या मध्यस्ताच्या मदतीने या प्रकरणात नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांच्यावर दबाव आणला गेल्याचाही आरोप त्यांनी केला. दबाव टाकून एका तासात चेक काढण्यासाठी प्रयत्न झाल्याचे सांगत, सभापती आहेर-आडके यांच्याकडे पाटील यांनी अंगुलीनिर्देश केला. यावेळी महापौर, नगरसचिवांचेही सवाल जबाब झाले. त्यावर आहेर आडके यांनीही पाटील यांना जशास तसे उत्तर देत स्थायी समितीवर माझ्या कारकिर्दीत या संदर्भातील कोणताही ठराव आला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. यासंदर्भात नगरसचिवांकडूनही त्यांनी स्पष्टीकरण घेत स्थायी समिती सदस्यांनी पत्र दिल्यानंतर विधी समितीकडून अभिप्राय मागवल्याचे आहेर-आडके यांनी स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणाशी आपला कोणताही संबध नसल्याचा दावा केला. त्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संगनमताने ही गडबड केल्याचे सांगत चौकशी करून दोषींवर कारवाई करून रक्कम वसूल केली नाही तर सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. त्यामुळे महापौरांनी तातडीने पाटील यांच्या बाजूने निकाल देत संबंधित प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेण्याचे तसेच पुढच्या महासभेत या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चर्चेदरम्यान भाजपचे रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर आणि वर्षा भालेवराव या नगरसेवकांनी २१ कोटींतील गौडंबगालाबाबत तयार केलेले फलकच महासभेत झळकावले. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच महापालिकेतील गोंधळाबाबत फलक झळकवून भाजपला आरसा दाखवण्याची ही महासभेतील पहिलीच वेळ असावी. यावेळी दोषींवर कारवाई मागणी या तीनही सदस्यांनी पाटील यांच्यासोबत केली.

विरोधकांना उकळ्या

भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या सदस्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सभापती आणि सभागृहनेत्यांदरम्यान आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी सुरू असलेल्या चढाओढीचा आनंद त्यांनी घेतला. या भूखंडाच्या प्रस्तावात भाजपच्याच काही जुन्या नेत्यांच्या सह्या असल्याने या विषयाच्या खोलात जावे, अशी मागणी विरोधकांनी महापौरांकडे केली.

'अण्णा' तर विरोधकांचेही नेते!

भाजपच्याच सभापती आणि सभागृहनेत्यांमध्ये २१ कोटींच्या विषयांवरून सुरू असलेल्या कलगीतुऱ्यामुळे भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची अडचण झाली असताना विरोधकांकडून मात्र यावेळी भाजपवर कोपरखळ्या मारल्या जात होत्या. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या विषयावरून तसेच शिवसेनेच्या विषयांची परस्पर चोरी करण्यावरून अण्णांना टोला लगावला. महासभेत अण्णा आपण भाजपसोबतच विरोधकांचेही नेते असल्याचा टोमणा मारल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. पाटील यांच्याकडून भाजपच्याच अडचणी वाढवल्या जात असल्याने विरोधकांसाठी हा मोठा आधारच असल्याची चर्चा शिवसेनेच्या सदस्यांमध्ये सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेंट्रल पार्कला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेलिकन पार्कच्या जागेत शासनाच्या मदतीने साकारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्क उद्यानाला महासभेत मंजुरी देण्यात आली असून, ३४ कोटींतून उद्यानाचे रुपडे पालटणार आहे.

महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रशांत मगर यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाला प्रशासनाचा विरोध असतानाही महासभेने हिरवा कंदील दाखवला आहे. मगर यांच्याकडील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता यामुळे स्वेच्छानिवृत्ती मंजूर करू नये अशी हरकत प्रशासनाने घेतली होती. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी हा प्रस्ताव तातडीने मंजूर केला. सिडकोतील अंबड पोलिस स्थानकाच्या बाजुला महापालिकेचे बंद पडलेल्या अवस्थेत पेलिकन पार्कचे रुपांतर सेंट्रल पार्कमध्ये केले जाणार आहे. शासनाकडून प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी ३४ कोटी बारा लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर सादर झाला. महापौर भानसी यांनी प्रस्तावाला मान्यता देत असताना सिडकोतील शिवसेनेच्या नगरसेवकांना मत मांडू दिले नाही. अंबड, मोरवाडी गावातील शेतकयांनी प्रकल्पांसाठी जागा दिल्याने भूमिहीन झाले आहेत. सेंट्रल पार्क उभारत असताना तेथे मोरवाडी येथील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्याची मागणी नगरसेविका किरण गामणे यांनी केली. परंतु, महासभेत बोलू न दिल्याने सभागृहाबाहेर नगरसेवकांनी महापौरांचा निषेध केला. या गोंधळातच महापौरांनी त्याला मंजुरी दिली. मगर आणि मुंढे यांच्या जवळीकीमुळे पदाधिकाऱ्यांचे ते नावडते बनले होते. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव महासभेवर सादर होताच तत्काळ मंजुरी देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

ऑफलाइनला परवानगी द्या

महापालिकेच्या ऑटो-डीसीआर संगणक प्रणालीनुसार सिडकोतील बांधकामे मंजूर होत नसल्याने ऑफलाइन पद्धतीने प्रकरणे मंजूर करा. महापालिकेप्रमाणेच सिडकोसाठीदेखील वाढीव एफएसआय व टीडीआर मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांनी लक्षवेधीद्वारे महासभेत मांडली. सिडकोच्या सहा स्कीम महापालिकेकडे हस्तांतरीत झाल्याने नवीन बांधकामे किंवा पुनर्निर्माणाच्या प्रकरणांचे प्रस्ताव महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे सादर करावे लागतात. परंतु, सिडको स्वतंत्र प्राधिकरण असल्याने स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली आहे. त्यामुळे पालिकेच्या डीसीपीआरशी ती जुळत नाही. त्यामुळे प्रस्ताव रद्द होत असल्याने सिडकोचे प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने देण्याची मागणी दातीर यांनी केली. त्यावर महापौरांनी पुढच्या महासभेत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

सहवासनगर वासियांना दिलासा

अधिकृत स्लम असूनही सहवासनगर झोपडपट्टी अनधिकृत ठरवून ती उठविण्याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा डाव उच्च न्यायालयाच्या स्थगितीने उधळला गेल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्यांना या जागेवरून न हटविण्याची आग्रही मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी महासभेत केली. महापौरांनी या मागणीची तातडीने दखल घेत सहवासनगरवासियांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले. त्यामुळे पुनर्वसन केल्याशिवाय झोपडपट्टीधारकांना आता हटवता येणार नसल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

बडगुजर-आढाव वाद

माजी विरोधी पक्षनेते बडगुजर यांनी २५७ कोटींच्या रस्ते विकासाचा प्रस्ताव जादा विषयात सादर करण्याऐवजी विषय पत्रिकेवर आणला असता तर त्याविषयी संशय निर्माण झालाच नसता, असा आरोप करत मुंढे यांच्या प्रभावाखाली येऊन सत्तारूढ भाजपने सभागृहाचे निर्णय फिरवल्याचा दावा केला. बडगुजर यांच्या वक्तव्याला दिनकर आढाव, शिवाजी गांगुर्डे यांनी आक्षेप घेतला. कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनीदेखील या वादात उडी घेत सभागृहातील वाढत्या भाषणांवर हरकत नोंदविली. वाद अधिकच वाढत असल्याचे बघून सभागृहनेते दिनकर पाटील आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. या वादातच महापौर रंजना भानसी यांनी नूतन आयुक्त गमे यांना पुष्पगुच्छ देत स्वागत सोहळा उरकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या पंखांत बळ!

$
0
0

तीन राज्यांतील निकालाने उत्साह; उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची आज बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने काँग्रेसला संजीवनी मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना आता बळ आले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही आता अॅक्टिव्ह झाले असून, बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात गुरुवारी (ता. २०) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार चेल्ला वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) व शहर अध्यक्ष शरद आहेर यांनी दिली. लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची बांधनी नसतानाही तीन राज्यांत काँग्रेसला यश मिळाले. त्यामुळे राज्यातही असे यश मिळू शकते अशी भावना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये बळावली आहे. त्यातूनच अनेक दिवसांपासून कोमात गेलेल्या नाशिक व शहर काँग्रेसलाही यामुळे ऊर्जा मिळाली आहे. जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभांचा आढावा पक्षाकडून घेण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी गुरुवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला रेड्डी यांच्यासह प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आमदार के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. जी. पाटील, आमदार निर्मला गावित, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, नानासाहेब बोरस्ते, काशिनाथ बहिरम, शंकर अहिरे, डॉ.तुषार शेवाळे तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, तालुका अध्यक्ष, फ्रंटल प्रमुख, लोकप्रतिनिधी, सेल अध्यक्ष व सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जिल्हानिहाय आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, बूथ कमिट्या, जनसंपर्क अभियान, पक्षाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरे व वेगवेगळे कार्यक्रम याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाची रणनीती या बैठकीत आखण्यात येणार आहे.

जिल्हाभर नियुक्त्या

काँग्रेसने जिल्ह्यातील जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांनी नवीन नियुक्त्यांची घोषणा केल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष देण्यात आला आहे. रमेश काहंडोळे यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इतर नियुक्त्या पुढीलप्रमाणे : दिंडोरी- विनायक शिंदे, नाशिक- पांडूमामा शिंदे, सिन्नर- उत्तम भोसले, चांदवड- शांताराम लाठार, कळवण- दिगंबर गीते, बागलाण- भगवान खैरनार, इगतपुरी- नंदकुमार कर्डक, मालेगाव- अनिल पाटील, नांदगाव- उत्तम ठोंबरे, देवळा- किशोर कदम, त्र्यंबकेश्वर- रामदास चव्हाण, सुरगाणा- धर्मराज जोपळे, येवला- डॉ. विकास चांदर, मनमाड- सुखदेव देवरे व पेठ साठी जयश्रीताई नगरे यांच्या तालुका प्रभारीपदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीची मागणी

$
0
0

नाशिक : नाशिक पश्‍चिम विभागात पाथर्डी फाटा परिसरात कमाल नागरी जमीन धारणा कायदा विभागाची (यूएलसी) जमीन मराठा वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा करण्यात आली. सरकारच्या ४ मे २०१६ च्या निर्णयानुसार यूएलसीच्या जमिनी प्रथम म्हाडा प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा विचार करून या नियमात बदल करण्याबाबत या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिमहत्त्वकांक्षेची वाताहत मांडणारे ‘डार्लिंग’

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\B

अतिमहत्त्वकांक्षेपोटी प्रसंगी आपल्याच माणसांशी विक्षिप्तपणे वागणाऱ्या माणसांच्या आयुष्याची एका वळणावर कशी वाताहत होते, याचे रहस्यमय सादरीकरण 'डार्लिंग' या नाटकातून करण्यात आले. सिन्नरच्या कामगार कल्याण केंद्राने प. सा. नाट्यगृहात कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत बुधवारी हे नाटक सादर केले.

सत्ता-संपत्ती अन् खोट्या प्रतिष्ठेच्या नादाने वेडावून स्वत:चाच घात करून घेणाऱ्या तरुणीची कहाणी या नाटकातून लेखक विजय साळवी आणि दिग्दर्शक विक्रम गवांदे यांनी मांडली आहे. या कथेत रागिणी, राज आणि सुबोध ही तीन प्रमुख पात्र आहेत. यातील रागिणी ही राज या उद्योजकाशी विवाह करते. मात्र, तिचे विवाहापूर्वी एका तरुणाशी प्रेमसंबंध असतात. राजशी लग्न करण्यामागील तिचे हेतू त्याची संपत्ती बळकविण्याचे असतात. परिणामी, लग्नानंतर ती राजला एका गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवते. यानंतर ती अशाच सुबोध नामक धनवान माणसासोबत लग्न करून पुन्हा त्याचीही फसवणूक करू पाहते. पण अपघाताने सुबोधच्या घरात तिला तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर राज भेटतो. राजची स्मृती एका अपघाताच्या प्रसंगी गेल्याने तो तिला ओळखत नाही. तिचे म्हणणे ऐकू लागतो. पण सुबोध हा राजच्या डोळ्यावरील पडदा फाडून रागिणीचे खरे रुप त्याच्यासमोर आणतो. त्यानंतर ही दोघेही रागिणीच्या आयुष्यातून निघून जातात. ती एकटी पडते. अंतिमत: तिच्या हाती न माणूस मिळतो न त्याची संपत्ती.

पल्लवी ओढेकर, राजेंद्र लोणारे, श्रीराम गोरे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. संदीप महाजन यांनी संगीत दिले आहे तर रंगभूषा नाना कानडे यांनी केली आहे. ईश्वर जगताप यांनी प्रकाश योजना तर अंकिता मुळे व केतकी कुलकर्णी यांनी वेशभूषा केली. निर्मिती प्रमुख म्हणून अनिल बोरसे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुलूस-ए-गौसिया उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांना शुभेच्छा देत अन् एकात्मता आणि शांततेचा संदेश देत जश्न-ए-गौसे-आझम सण शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने शहरातील रोषणाई, पताके आणि कमानी यांनी जुने नाशिक परिसर अधिक सजले. तसेच जुने नाशिक परिसरातून काढण्यात आलेल्या जुलूस-ए-गौसिया या भव्य मिरवणुकीची रौनक सर्वांना आकर्षित करणारी ठरली.

मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले गौस-ए-आझम हजरत शेख अब्दुल कादीर जिलानी रहेमतुल्लाअलैही यांच्या ग्यारवी शरीफ सणानिमित्ताने मंगळवारी सकाळपासून शहरात सर्वत्र उत्साह बघायला मिळाला. मानवता आणि एकात्मतेचा संदेश देत शहरातील सर्व मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यानिमित्ताने जुने नाशिक परिसरातील चौकमंडई येथून दुपारी ३ वाजता 'जुलूस-ए-गौसिया' मिरवणूक काढण्यात आली. दुपारी ४ वाजता चौक मंडई येथून जुलूसच्या प्रारंभ करण्यात आला. बागवानपुरा, मरहूम सलीम अब्बास चौक, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, नाईकवाडीपुरा, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवार पेठ, आदमशाह चौक, काझीपुरा, मुलतानपुरा, बुरुड गल्ली, कोकणीपुरा, दखनीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, पिंजारघाट या मार्गावरून जुलूसची मिरवणूक पुढे सरकत बडी दर्गा येथे पोहोचली. डोक्यावर इस्लामी टोपी आणि पारंपारिक वेश परिधान करून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जुलूसमध्ये सहभागी झाले.

गुलाबजलचा वर्षाव

जुलूसमध्ये डीजे वाजविण्यास बंदी असल्याने लाउड स्पिकरचा मंडळांकडून करण्यात आला. जुलूसच्या मार्गावर विविध सामाजिक संघटनांनी मुस्लिम बांधवांचे स्वागत केले. चिमुरड्यांनी पारंपरिक वेशभूषा करत अन् मिरवणुकीच्या वेळी एकमेकांवर गुलाबजलचा वर्षाव करत जुलूसची शोभा अधिक वाढवली.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुमेह केंद्राचे उद्या उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये घट करण्यासाठी आयएमए संस्थेतर्फे शुक्रवारी (दि. २१) शहरात मधुमेह मुक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महिन्यातील चार दिवस रुग्णांना या केंद्रात मोफत उपचाराचा घेता येणार असल्याची माहिती आयएमएचे सचिव डॉ. नितीन चिताळकर यांनी दिली.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), मेडिकल वेलफेअर ट्रस्ट संचलित सविता देसाई हॉस्पिटल तसेच स्थूलता आणि मधुमेह निर्मूलन समिती (अॅडॉर ट्रस्ट) यांच्यातर्फे 'मधुमेह मुक्ती केंद्र' सुरु करण्यात आले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीस हे केंद्र सुरु झाले असून, महिन्याभरात या केंद्रातर्फे १२५ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या केंद्राचा उद्घाटन सोहळा सायंकाळी ४ वाजता शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये होणार आहे. यासाठी अॅडॉर ट्रस्टचे संस्थापक डॉ. जगन्नाथ दीक्षित उपस्थित असणार आहेत. प्रत्येक बुधवारी दुपारी २.३० ते ६ यावेळेत, हे केंद्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुले असेल. \Bकेंद्रात नोंदणीसाठी \Bडॉ. रत्ना आष्टेकर (९४२२९२३८९८), डॉ. संदीप सोनवणे (९४२२२५६४५०) यांच्याशी संपर्क साधावा.

..............

डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. माधुरी किर्लोस्कर, डॉ. नितिन घैसास आणि डॉ. अजित कुमठेकर हे, चार मधुमेह तज्ज्ञ या केंद्रात रुग्णांची तपासणी करत उपचारपध्दती सांगणार आहेत. या केंद्राचा मधुमेहाच्या रुग्णांनी आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.

\Bअसा घ्या लाभ

\Bमधुमेह मुक्ती केंद्रांतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णांना आयएमएने जाहीर केलेल्या व्हॉटसअॅप क्रमांकावर नावनोंदणी करायची आहे. या क्रमाकांवर नाव नोंदविल्यानंतर रुग्णांना तज्ज्ञांकडून रुग्णाची संपूर्ण माहिती घेण्यात येईल. रुग्णाच्या जीवनशैलीनुसार त्यात काही बदल करण्यास सांगितले जातील. त्याचे अपडेट व्हॉटसअॅपवर घेतले जातील. त्यानंतर तज्ज्ञांकडून मधुमेह मुक्ती केंद्रात येण्याची दिनांक आणि वेळ रुग्णांना सांगितली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटमार करणाऱ्या तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चांदवड तालुक्यात एकाच रात्री दोन घरांमधील व्यक्तींवर शस्त्रांनी वार करून सोने-चांदीचे दागिने लुटून नेणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दीड महिन्याने हा गुन्हा उघडकीस आला असून या टोळीने आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शुभम अनिल काळे (वय २१), विकास ज्ञानेश्‍वर पवार (वय २३, दोघे रा. श्रीरामपूर, जि. नगर) आणि संजय रावसाहेब चव्हाण (वय ३२, रा. पैठण, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चांदवड येथील शेळके वस्तीमध्ये राहणाऱ्या समाधान पुंजाराम शेळके यांच्या घरात १० नोव्हेंबर रोजी चार दरोडेखोर घुसले. समाधान यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची आई सुमनबाई व बहीण सुनिता यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर संशयितांनी डावखरनगर परिसराकडे मोर्चा वळवला. कृष्णा लक्ष्मण पवार या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून पवार कुटुंबीयांना शस्त्रांचा धाक दाखवत दागिने लुटून नेले. या घटनेमुळे चांदवडमध्ये खळबळ उडाली होती.

चांदवड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी लुटमारीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. चांदवड-मनमाड मार्गावरील काही सीसीटीव्हींमध्ये संशयितांच्या हालचाली कैद झाल्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात धाव घेतली. परंतु, संशयित औरंगाबाद जिल्ह्यात गेल्याचे समजले. त्यानुसार, पथकाने औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील नवगाव परिसरात सापळा रचून शुभम काळे आणि विकास पवार या संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांन भरत काळे आणि राहुल काळे यांच्यासोबत चांदवडमध्ये लुटमार केल्याची कबुली चौकशीदरम्यान दिली. दोघेही संशयित औरंगाबादमध्ये संजय चव्हाण याच्या घरात राहत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. सहायक निरीक्षक राम कर्पे, सहायक उपनिरीक्षक अरुण पगारे, हवालदार संजय गोसावी, शिपाई सुशांत मरकड, मंगेश गोसावी, रवींद्र टर्ले, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

संशयित सराईत

पोलिसांनी अटक केलेले संशयित सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी सिन्नर, चांदवड, पैठण या तालुक्यांमध्ये तसेच सातारा, नगर जिल्ह्यांमध्येही दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी व मोटरसायकल चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. संशयित शुभम आणि विकास यांच्याकडे सापडलेली मोटरसायकल धुळे येथून चोरल्याचे उघडकीस आले आहे. तर संजय चव्हाण याने २००६ मध्ये सिन्नरमध्ये घरफोडी व चोरी केल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातातील संशयितांना सश्रम कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव स्कोडा कारने दिलेल्या धडकेत तीन महिला मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी न्यायालयाने संबंधित कारचालकासह आणखी एकास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शेख फैज फारूख, फारूख हबीब शेख (दोघे रा. आयेशानगर, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. २६ मे २०१७ रोजी मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला होता. विनापरवाना स्कोडा सुपर्ब ही कार भरधाव चालवित त्यांनी हर्षद श्यामकुमार पाटील यांच्या स्विफ्ट डिझायर कारला धडक दिली होती. या अपघातात सरिता भामरे, रेखा पाटील व योगिनी भामरे या महिलांचा मृत्यू झाला होता. हर्षद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक एन. जे. कंडारे यांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे मिळविले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. आर. टंडन यांनी शेख फैज फारूख याला दोन वर्षे सश्रम कारावास आणि २७ हजार ६०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. फारूख हबीब शेख याला तीन महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे चंद्रलेखा पगारे यांनी काम पाहिले. पोलिस कर्मचारी महेश मोरे यांनी संशयितांना शिक्षा मिळावी यासाठी पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमागधारकाकडून २० लाखांची वीजचोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मालेगाव येथील यंत्रमागधारकाने थेट वितरण रोहित्रातून केबल टाकून विजेचा चोरून वापर केल्याचे उघडकीस आले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने ही वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधीतविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मोहम्मद फारुक मोहम्मद सुलेमान असे या यंत्रमागधारकाचे नाव असून मालेगाव तालुक्यातील महादले शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याचे ११७ यंत्रमाग (पॉवर लूम) सुरू होते. मोहम्मदने जवळच्याच वितरण रोहित्रात अनधिकृतपणे केबल टाकून चोरी केलेल्या विजेवर त्याचे ११७ यंत्रमाग सुरू असल्याची बाब महावितरणच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली. नाशिक शहर मंडळाच्या भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकला असता १ लाख ७० हजार ६ युनिट इतक्या वीजवापर झाल्याचे उघडकीस आले. जवळपास २० लाख रुपयांची वीज या यंत्रमागधारकाने चोरी करून वापरल्याप्रकरणी महावितरणने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे संचालक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक सुमित कुमार यांच्या नेतृत्वात उप सुरक्षा व दक्षता अधिकारी शमी अन्सारी, भरारी पथकाचे प्रमुख विनय काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलोत्पल तसेच पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील व त्यांच्या पथकाचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर पेटल्याने संसार उघड्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे भागातील अंबोडे पैकी कोडीपाडा येथील विधवा महिलेच्या घराला मंगळवारी (दि. १८) रात्री दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. यात घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, कपडे, भांडीकुंडी, अंथरुण पांघरून खाक झाल्याने महिलेचा संसार उघड्यावर पडला आहे. घरासह साडेतीन लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

सखुबाई त्र्यंबक मोहरे (वय ५५) असे या पीडित महिलेचे नाव आहे. सखुबाई या घरात गाढ झोपेत असताना त्यांना अचानक गरम होऊ लागले. जाग आल्यावर आपले घर पेटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरडाओरडा केल्याने शेजारील मंडळींना त्यांनी जागे केले. मात्र, तोपर्यंत सर्व वस्तू जळून खाक झाल्या. त्यांचा मुलगा शांताराम कामानिमिताने पिंपळगाव परिरासतील द्राक्षेबागेत गेला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी रामदास गायकवाड, विष्णू भोये, सोन्या राथड, केशव भोये, सुरेश घांगळे, पांडुरंग घांगळे, जयराम भोये, नामदेव भोये, हरी मोहरे, सरपंच योगीराज पवार, पोलिस पाटील चिंतामण घांगळे यांनी प्रयत्न केले. अंबोडे सजाचे तलाठी पी. पी. वाघमारे यांनी पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमल्यापेक्षा निफाडमध्ये अधिक कडाका!

$
0
0

तब्बल ६.६ अंश सेल्सिअसची नोंद

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तसे तर थंड हवेचे ठिकाण म्हणून हिमाचल प्रदेशातील सिमला हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. पण सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड सिमल्यापेक्षा काही कमी नाही. येथे बुधवारी ६.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. सिमल्याचे बुधवारचे तापमान ९.४ अंश सेल्सिअस होते.

निफाडमध्ये मागील वर्षी सर्वात कमी तापमान ६.४ होते. त्यामुळे निफाड तालुका बुधवारी ठंडा ठंडा कुल कुल होता. दरम्यान, अजून दोन ते तीन दिवस तापमान कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रब्बी पिकांना ही थंडी फायदेशीर असल्याचे जाणकार सांगत आहेत. मात्र, द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत या हवामानामुळे भर पडली आहे. शरद सीडलेस, परपल, जम्बो या वाणच्या द्राक्ष बागेतील द्राक्ष मण्यात फुगवण होऊन पाणी उतरले आहे. अशा घडातील मणी तडकण्याचा धोका वाढला आहे. द्राक्षमण्यांचे आवरण पातळ असते. थंडी वाढत गेली तर द्राक्ष मणी तडकण्याचे प्रमाण वाढून उत्पादन कमी होण्याचा धोका वाढला आहे. ज्या द्राक्ष बागा फुगवणीच्या अवस्थेत आहेत अशा बागांच्या द्राक्ष मण्यांची फुगवण थांबणार आहे. तर उशिराच्या द्राक्ष बागेतील फुलोऱ्यातील मण्यांची फुगवण एकसारखी होणार नाही थंडीचे प्रमाण वाढल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. औषध फवारणीचा खर्चही वाढणार आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षवेलींना ऊब देण्यासाठी शेतकऱ्यांनी बागेत शेकोट्या पेटवल्या होत्या. थंडीमुळे द्राक्षवेलींना अन्न पुरवठा करणाऱ्या पेशींचे कार्य थांबण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने देणे सुरू केल आहे.

शेकड्यांभोवती ऊबदार चर्चा

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.२ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर थंडीचे प्रमाण वाढत जाऊन बुधवारी ६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठले आहेत. कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकही गारठले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील गारठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जाणवत असलेल्या कडाक्याच्या थंडीत आता आणखी भर पडली असून बुधवारी ७.९ अंश सेल्सियस या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्यामुळे शहरवासीयांना बोचऱ्या थंडीची जाणीव करुन देत आहे.

सकाळी उशिराने प्रकटणारी सूर्यकिरणे, प्रचंड गारठा यामुळे संपूर्ण शहर सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहे. शहराला असलेली थंड हवेच्या ठिकाणाची ओळख यंदाचा हिवाळा आणखीनच गडद करत आहे. दिवस-रात्र थंडीचा सामना नाशिककर करत आहेत. यामुळे साहजिकच आरोग्याच्या तक्रारीही वाढत असून सर्दी, खोकला, ताप या आजार बळावण्याचे प्रमाणही वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी सातत्याने उबदार कपडे घालणे, गरम पाणी पिणे, ताजे अन्न खाणे, व्यायाम करणे, यांतून शरीराची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

\Bपटसंख्येवर परिणाम

\Bकडाक्याची थंडी असली तरी, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे गरजेचेच असते. परंतु, शाळांच्या पटसंख्येवर मात्र थंडी परिणाम करत आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक या सकाळ सत्रातील वर्गांमध्ये उपस्थिती रोडावल्याचे चित्र आहे.

..

दिनांक कमाल तापमान किमान तापमान

१४ डिसेंबर - २८.५ १०.४

१५ डिसेंबर - २६.६ १०.६

१६ डिसेंबर - २५.८ १०.५

१७ डिसेंबर - २५.८ ८.५

१८ डिसेंबर - २६.७ ९.५

१९ डिसेंबर - २६.८ ७.९

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्याशी मंगळवारी संवाद

$
0
0

'आयाम'तर्फे आयोजन; मटा मीडिया पार्टनर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अस्सल कलावंताच्या आयुष्यातील कंगोरे समजावून घेणे अन् त्याच्यातील ओसंडून वाहणाऱ्या प्रतिभेची एका मोठ्या कालखंडानंतर तितक्याच ताकदीने मांडणी करणे हे काम वाटते तितके सोपे नाही. तरीही, '...आणि काशिनाथ घाणेकर' या चित्रसृष्टीवर शब्दश: अधिराज्य गाजविणाऱ्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ही किमया लिलया घडविणारे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हे नाशिककरांच्या भेटीला मंगळवारी, २५ डिसेंबर रोजी येणार आहेत.

'आयाम' तर्फे आयोजित हा उपक्रम दि. २५ रोजी शंकराचार्य न्यास, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. रसिकांना या कार्यक्रमासाठी मुक्त प्रवेश आहे. या कार्यक्रमासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे. मराठी नाट्यसृष्टीस पाच दशकांपूर्वी सोनेरी स्वप्ने दाखविणाऱ्या नटाच्या व्यक्तिमत्वाचे गूढ पदर या चित्रपटात दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी तितक्याच ताकदीने उलगडले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाला उत्तूंग कलाविष्कारातून या चित्रपटाचे नायक सुबोध भावे यांनीही तितक्याच ताकदीची साथ दिली आहे.

कलेसाठी हयातभर संघर्षरत असणाऱ्या कलावंताच्या आयुष्यातील उत्कट भावाविष्कार या चित्रपटात तितक्यात प्रभावीपणे मांडण्यात आल्याने वाचकांना खिळवून ठेवण्यात अन् अभिरुचीच्या कसोटीवर उत्तीर्ण होत नवे झेंडे कलाकृतीने मराठी चित्रसृष्टीत रोवले आहेत. अशा दर्जेदार कलाकृतीचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्याशी कल्याणी पंडित या संवाद साधणार आहेत. या उपक्रमाच्या आयोजनासाठी जयंत जोगळेकर यांचे सहकार्य लाभले असून मीडिया पार्टनर म्हणून 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहकार्य लाभले आहे. या संवाद सोहळ्यासाठी रसिकांना मुक्त प्रवेश आहे. या पर्वणीचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन 'आयाम'चे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, विश्वस्त शुभदा देसाई आणि आयाम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिपत्रिका मार्गदर्शन शनिवारपासून

$
0
0

रेषा केंद्र-'मटा'चा उपक्रम

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bइयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीत कृतिपत्रिकेच्या माध्यमातून अमूलाग्र बदल यंदा विद्यार्थ्यांना अनुभवावा लागणार आहे. दहावीची पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यांच्यात नेमका फरक काय, कृतिपत्रिका सोडविताना काय काळजी घ्याल आदी मुद्द्यांबाबत विद्यार्थी व पालकांसाठी 'समजावून घेऊ या कृतिपत्रिका' हा शैक्षणिक उपक्रम शनिवारी (दि. २२) आणि रविवारी (दि. २३) गंगापूर रोडवरील रेषा शिक्षण केंद्रात पार पडणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'चा या उपक्रम आयोजनात सहभाग आहे.

बदलत्या शैक्षणिक धोरणांमध्ये यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीला कृतिपत्रिकांचा आधार असणार आहे. त्यामुळे पारंपरिक परीक्षेच्या प्रचलित पद्धतीशिवाय कृतिपत्रिका सोडविण्यासाठी आवश्यक घटक कोणते, त्यांची तयारी पालकांनी कशी करून घ्यावी, विद्यार्थ्यांनीही कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावे आदी विषयांवर या उपक्रमात पालक व विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे मार्गदर्शन केले जाणार आहे. उपक्रमात पालकांशी शनिवारी (दि. २२) संवाद साधला जाईल. पालकांना या उपक्रमासाठी मुक्त प्रवेश असेल. तसेच उपक्रमात विद्यार्थ्यांशी रविवारी (दि. २३) संवाद साधला जाईल. विद्यार्थ्यांना यात सहभाग घेण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल. पालकांसाठी दि. २२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तर दि. २३ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत एसएससी बोर्डाच्या मराठी माध्यमातील आणि याच दिवशी दुपारी १ ते दुपारी ३ या वेळेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र पार पडेल.

येथे साधा संपर्क

सर्व उपक्रम ३ बी, कौस्तुभ, एस.टी. कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक या पत्त्यावर होतील. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कराचा बोजा उतरणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या ५९ हजार मिळकतींबाबत महासभेने नागरिकांना दिलासा मोठा दिलासा दिला आहे. सहा वर्ष पूर्वलक्षी प्रभावाने तिप्पट दंडासहीत घरपट्टी वसुली नोटिसांचा निर्णयही महासभेने बेकायदा ठरवत, त्या नोटिसा रद्द केल्या आहेत. या मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला दिले.

महापौर भानसी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महासभा झाली. वाढीव घरपट्टी आणि नवीन मिळकतींना बजावण्यात येत असलेल्या नोटिसांवरून वादळी चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी महासभेत पत्र सादर करीत ५९ हजार मिळकतींना बजावलेल्या चुकीच्या नोटिसा तातडीने रद्द करून खासगी सर्वेक्षणाची फेरतपासणी करण्याची मागणी केली. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांनी रौद्रावतार धारण करीत खासगी मक्तेदाराने केलेल्या मिळकत सर्वेक्षणाची चिरफाड केली. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय कसा बेकायदेशीर होता, याचा पाढाच महासभेत वाचला. अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनीदेखील प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करीत चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या परसेवेतील अधिकाऱ्यांना मूळ शासन सेवेत पाठविण्याची मागणी केली. गुरुमित बग्गा यांनी करबुडवेगिरी करणाऱ्यांवर कारवाईला विरोध नसल्याचे सांगत, खासगी मक्तेदारामार्फत करण्यात आलेल्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे सर्वसामान्य नाशिककरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे स्पष्ट केले. लव्हाटेनगर भागात असलेल्या बंगल्याला बजावलेल्या नोटिशीवर अशोकस्तंभ येथील पत्ता असल्याचे अॅड. वैशाली भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत, या सर्वेक्षणातील बनवेगिरी उघड केली. घरपट्टीच्या अवाजवी नोटिसांमुळे शहरात अराजकता माजण्याचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करीत, नगररचना विभागाचा अभिप्राय न घेता मिळकतींना कशाच्या आधारे नोटिसा बजावल्या, असा सवाल माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित करून त्या रद्द करण्याची मागणी केली.

स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी अवाजवी करवाढीला विरोध दर्शवित शेतीवरील कर रद्द करण्याची सूचना मांडत वाढीव कराबाबतही पुनर्रचना करण्याची मागणी केली. करवाढीविरोधात शिवसेनेने यापूर्वी तीनवेळा लक्षवेधी सादर केल्याचे सभागृहाला स्मरण करून देत विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी अवाजवी नोटिसा रद्द करून मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी महापौरांकडे केली. या मिळकत सर्वेक्षणाच्या आधारे २.६९ लाख मिळकती अनधिकृत ठरविण्याची तत्कालिन आयुक्त मुंढे यांची कृती आततायीपणाची असल्याची टीका करीत यासंदर्भातील ठराव न्यायालयाला परस्पर सादर केला गेला नाही ना, याची शहानिशा करण्याची मागणीही बोरस्ते यांनी केली. करवाढ आणि मिळकतींना येत असलेल्या नोटिसांबाबत नागरिकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी केली. उद्धव निमसे, डी. जी. सूर्यवंशी, पुष्पा आव्हाड, हेमलता पाटील आदींनी या नोटिसांना विरोध दर्शविला. बोगस सर्वेक्षणाच्या आधारे प्रशासनाने बजावलेल्या घरपट्टी वसुलीच्या दंडात्मक नोटिसा रद्द करण्याची, तसेच विभागनिहाय अभियंते, तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करून मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मांडल्यानंतर महापौर भानसी यांनी मुंढे यांचा निर्णय बेकायदा ठरवला. या निर्णयामुळे लाखो रुपयांच्या नोटिसांनी भंजाळून गेलेल्या मिळकतधारकांना दिलासा मिळणार आहे.

पाणीही परस्पर महागले

वाढीव करयोग्य मूल्य आणि मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना मिळणाऱ्या लाखोंच्या नोटिसा बघून नागरिक चक्रावले असताना, घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टीतही तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परस्पर वाढ केल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस गटनेते शाहू खैरे व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. महासभेला डावलून परस्पर हा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न बोरस्तेंनी उपस्थित केला. त्यावर महापौर भानसी यांनी पाणीपट्टी विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांना खुलासा करण्यास सांगीतले. त्यावर मुंढेंच्या आदेश क्र. १३ मुळे पाणीपट्टीचा स्लॅब वाढवल्याचा खुलासा त्यांनी केल्याने सभागृहही अवाक् झाले. यावरही निर्णय घेण्याची मागणी बोरस्ते, खैरे यांनी केली.

सर्वेक्षणच बोगस

मिळकतींबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तक्रारी केल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे आणि करसंकलन विभागाचे उपायुक्त महेश डोईफोडे यांनी या सर्वेक्षणातील त्रुटींची माहिती दिली. मे. जिओ इन्फोसिस टेक्नोलॉजी या खासगी मक्तेदारामार्फत आतापर्यंत ४.६० लाख मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यात नव्याने आढळलेल्या ५९ हजार मिळकतींना घरपट्टी वसुलीसाठी पूर्वलक्षी प्रभावाने नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या तपासणीत २१ हजार मिळकती अधिकृत आढळल्या असून उर्वरित ३७ हजार मिळकतीपैकी ५८७८ मिळकतींचे अद्याप बांधकाम सुरू असताना त्यांना कर लागू नसल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे त्यांचे फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. २५७१ मिळकतींना घरपट्टी लागू असताना त्यांची कर लागू नसल्याची नोंद सर्वेक्षणात घेतली गेली, तर ७५२ झोपड्यांना देखील स्लम चार्जेसऐवजी वाढीव घरपट्टी लावण्यात आल्याचे आढळले आहे, असे नमूद करत हे सर्वेक्षणच बोगस असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच आयुक्त गमे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारींवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

नवीन मिळकतींना नोटिसा देऊ नये अशा सूचना यापू्र्वीच केल्या होत्या. परंतु, मुंढेंच्या दबावामुळे त्या देण्यात आल्या आहेत. या मिळकतींच्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी असल्याने या सर्व नोटिसा रद्द करण्यात याव्यात. पालिकेच्या तज्ज्ञ लोकांकडून त्याचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे.

- रंजना भानसी, महापौर

वाढीव कर आणि ५९ हजार मिळकतींबाबत शिवसेनेने तीन वेळा लक्षवेधी दिली आहे. यासंदर्भात अनेकदा चर्चा झाली असून, आता हे सर्वेक्षणच बोगस असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे या नोटिसा रद्द करण्यात याव्यात. शहरवासियांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, मनपा

करवाढीकडे आपण तटस्थ भावनेने बघत असून, कायदेशीर प्रक्रिया तपासून अंतिम निर्णय घेतला जाईल. या सर्वांबाबत येत्या १७ दिवसांत स्पष्टता येऊन नागरिकांचा संभ्रम दूर केला जाईल. परंतु, घरपट्टीबाबत लोकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.

- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामको निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

$
0
0

नामको मतदानासाठी

तयारी अंतिम टप्प्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील अग्रगण्य सहकारी बॅँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को- ऑपरेटिव्ह बॅँकेसाठी २३ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नाशिकमध्ये १६२, तर जिल्ह्यात १२५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

बँकेचे काही सभासद राज्याबाहेरही असल्याने हैदराबाद व सुरत येथे प्रत्येकी १ मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. १ लाख ७६ हजार २६२ मतदार असून, त्यापैकी ९३ टक्के मतदान हे नाशिकमध्ये आहे, तर उर्वरित ७ टक्के मतदान हे जिल्ह्याबाहेर आहे. या मतदान केंद्रात सकाळी ८ ते ५ या वेळात हे मतदान करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ओळखपत्रांपैकी फोटो असलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी २ हजार २०० कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. पुरुष पोलिस ३०० तर महिला पोलिस १०० याप्रमाणे ४०० पोलिसांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्याबाहेर २६ जिल्ह्यांत ११ हजार ६७२ मतदान असले तरी जास्त मतदान असलेल्या ठिकाणीच हे मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. श्रीरामपूर येथे ३ मतदान केंद्रे असतील. त्यानंतर पुणे, अहमदनगर, राहता, संगमनेर येथे प्रत्येकी दोन तर धुळे, मुंबई, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, राहुरी, येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र असेल. उर्वरित जिल्ह्यांतील मतदार मात्र त्यांना जवळ असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५४ कोटींचा टंचाई आराखडा

$
0
0

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासनाकडून राज्य सरकारला अहवाल सादर

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गत मोसमात उत्तर महाराष्ट्रात ड्राय स्पेलने प्रदीर्घ काळ मुक्काम ठोकल्याने भूजलपातळी घटून तब्बल ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. तेथील ८३ टक्के म्हणजेच १ कोटी ८६ लाख इतकी लोकसंख्या प्रभावित झाली आहे. या तालुक्यांमधील रहिवाशांना दुष्काळाच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी विभागीय महसूल प्रशासनाने राज्य सरकारकडे १५४ कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचा अहवाल पाठविला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांत गत मोसमात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी या पाच जिल्ह्यांतील बहुतेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने टंचाई अहवाल मागविला होता. नाशिक विभागीय आयुक्तालयाने नाशिक विभागाचा १५४ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा अहवाल राज्य सरकारला नुकताच सादर केला आहे. या आराखड्यानुसार विभागात टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करण, जनावरांच्या चारा टंचाईवर शेतकऱ्यांना सहाय्य करणे यासारख्या उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. सरकारकडून निधी उपलब्ध होताच या उपाययोजना तात्काळ राबविल्या जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पिकांच्या नुकसानीचे प्रमाण आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई या मानकांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

धुळे-जळगावमध्ये शंभर टक्के टंचाई

विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार विभागातील धुळे जिल्ह्यातील सर्व ४ आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांत टंचाईस्थिती गंभीर आहे. विभागात ८३ टक्के म्हणजेच १ कोटी ८६ लाख नागरिक दुष्काळाने प्रभावित झाले आहेत. तर प्रत्यक्षात १ कोटी ५५ लाख नागरिकांना तातडीच्या शासकीय मदतीची गरज आहे. विभागातील ५४ पैकी ४९ तालुक्यांतील भूजल पातळी १ ते ३ मीटरने घटली आहे. या तालुक्यांत ३४ लाख जनावरांच्या चारा टंचाईच्या समस्येनेही गंभीर स्वरुप धारण केले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कापसासारख्या नगदी पिकाचेही पाण्याअभावी मोठे नुकसान झाले असून अशा शेतकऱ्यांना पिककर्जाच्या लाभ देण्याचा समावेश या अहवालात करण्यात आलेला आहे.

दुष्काळजन्य परिस्थिती उद्धभवते त्यावेळी सरकारकडून दर चार महिन्यांनी टंचाई आराखडा मागवला जातो. या विषयीचा अहवाल राज्य सरकारला नुकतास सादर केला. पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे तात्पुरता पुरवठा, विहीर अधिग्रहण, चारा उपलब्धता याविषयीच्या उपाययोजना राबविण्यासाठी १५४ कोटी रुपरे खर्चाचा हा आराखडा आहे. पुढील टंचाई आराखडा एप्रिलअखेर पाठविला जाईल.

- राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीला पालिकेचा दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात हायकोर्टाने खरडपट्टी काढल्यानंतर पालिकेच्या पर्यावरण विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) नोटीस बजावली आहे. रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. या दोन्ही वसाहतींतील ४० कारखाने प्रक्रिया न करताच नाल्यांमध्ये पाणी सोडत असल्याचे पर्यावरण विभागाने म्हटले आहे.

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात हायकोर्टात सुना‌वणी सुरू असून, कोर्टाने प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. निरीच्या अहवालानुसार अनेक उपाय करण्याचे आदेश न्यायालयाने पालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिल्या आहेत. परंतु, त्यावर प्रगती झालेली दिसत नाही. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याने दोन दिवसांपूर्वी हायकोर्टाने याबाबत सरकारी यंत्रणांवर ताशेरे ओढले होते. गोदावरीत मिसळणाऱ्या नाल्यांमधून प्रदूषणयुक्त पाण्याचा पाझर सुरू असल्याच्या तक्रारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पालिकेने एकीकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या मलजल शुद्धीकरण केंद्रांची क्षमताही वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली असताना खासगी उद्योगांकडे मात्र दुर्लक्ष केले होते. औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांतील पाणी प्रक्रिया केल्यानंतरच बाहेर सोडावे, असे बंधन आहे. मात्र, अनेक कारखाने लगतच्या नैसर्गिक नाल्यात रसायनयुक्त पाणी सोडतात. या नाल्यांद्वारे हे पाणी थेट गोदावरीत मिसळते. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जवळपास ४० कारखान्यांकडून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याचे समोर आले आहे. सोमेश्वर नाला, बारदान फाटा, नंदिनी, चिखली या नाल्यांत असे पाणी सोडले जात असल्याने त्यासाठी जबाबदार कारखान्यांवर तातडीने कारवाईचे आदेश या नोटिशीद्वारे पालिकेने एमआयडीसीला दिले आहेत. त्यामुळे एमआयडीसीला आता या कारखान्यांवर कारवाई करावी लागणार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळही झाले जागे

हायकोर्टाच्या दणक्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळही कारखान्यांची पाहणी करणार आहे. सातपूर, अंबड या दोन्ही एमआयडीसीतील रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार आहे. यामुळे प्रदूषण रोखण्यास हातभार लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम

$
0
0

वर्षभरानंतर घेतली अंगठी चोरीची तक्रार

चिंतामणी लॉन्समधील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल वर्षभरापूर्वी गंगापूर रोडवरील एक लॉन्सच्या बाथरूममध्ये अंगठी हरवल्याचा गुन्हा गंगापूर रोड पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी पोलिसांनी किरकोळ लेखी घेवून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संबंधिताने पाठपुरावा सुरूच ठेवल्याने या घटनेची वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांनी दखल घेतली आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूररोडवरील पंपीग स्टेशनजवळील चिंतामणी लॉन्स येथे हा प्रकार घडला होता.

शरद किसन गावडे (रा. प्रतिक्षानगर, सायन पूर्व, मुंबई) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. गेल्या वर्षी गावडे यांच्या मोठ्या भावाचा मुलगा सागर याचा शहरात विवाह होता. वधू पक्षाच्यावतीने चिंतामणी लॉन्स येथे व्यवस्था करण्यात आली होती. गावडे कुटुंबिय ९ डिसेंबर २०१७ रोजी तेथे मुक्कामी होते. १० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी शरद हे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. आंघोळीनंतर २० हजारांची सोन्याची अंगठी ते बाथरूममध्येच विसरले. मात्र, ही बाब काही वेळाने त्यांच्या लक्षात आली. त्यांनी बाथरूममध्ये पुन्हा पाहणी केली असता अंगठी बेपत्ता होती. तत्पूर्वीच लॉन्समधील दोन मुले साफसफाई करण्यासाठी बाथरूममध्ये गेल्याचे त्यांच्या पुतण्याचे निदर्शनास आले होते. लॉन्स चालकाशी संपर्क साधून त्यांनी पोलिसातही धाव घेतली होती. किरकोळ लेखी घेवून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. मात्र पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

वृद्धेच्या बॅगमधील रोकड, दागिने चोरी

बसच्या प्रतिक्षेत बसलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतील रोकड आणि दागिने असा सुमारे ७३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना निमाणी बसस्थानकात घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बकुबाई मारूती भाबड (६५, रा. भोकणी-खंबाळे ता. सिन्नर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. बुधवारी आपल्या गावी जाण्यासाठी भाबड निमाणी बसस्थानकात बसच्या प्रतिक्षेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील १५ हजारांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. गर्दीच्या ठिकाणी फिरणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

शिवाजीनगरला घरफोडी

एमआयडीसीतील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मिराबाई चिंधा सोनवणे (रा. सावन रो हाऊस, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोनवणे कुटुंबिय ५ ते १२ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील दीड हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे २६ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

--

दहा जुगारी गजाआड

अंबड एमआयडीसीसह इंद्रकुंड भागात पोलिसांनी छापे टाकून दोन जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाई दहा जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, अंबड आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. अंबड एमआयडीसीतील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी भागातील एका बंधिस्त पडक्या जागेत जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी सायंकाळी अंबड पोलिसांनी छापा टाकला. भीमराव धुरंधर याच्यासह चार जण जुगार खेळताना सापडले. दुसरा छापा इंद्रकुंड भागात टाकण्यात आला. इंद्रकुंड येथील सिद्धी टॉवरवर सुरेश भंडारी व त्याचे चार साथीदार जुगार खेळतांना सापडले. बुधवारी दुपारी पंचवटी पोलिसांनी कारवाई केली.

--

दुचाकींची चोरी

शहरातील दोन दुचाकी चोरीस गेल्या असून, या प्रकरणी सरकारवाडा आणि देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकरोड येथील जव्हार मार्केट भागात राहणारे यश रामप्रसाद राठी यांची अ‍ॅक्टीव्हा (एमएच १५ ईजे २८९९) गेल्या शुक्रवारी (दि.७) शास्त्रीनगर येथील एम. आर. ठक्कर रोडवर भिंतीलगत पार्क केलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना दोनवाडे रोडवरील नाणेगाव येथे घडली. काशिनाथ गणपत आडके (रा. नाणेगाव) यांची स्प्लेंडर (एमएच १५ डीजे ३२६२) गेल्या शनिवारी (दि.८) दुपारी त्यांच्या घरासमोरील कांद्याच्या चाळीत पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. .

घरफोडी करणारे अटकेत

मनमाड : मनमाड येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन घरफोडीच्या घटनांचा तपास करून आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात मनमाड पोलिसांना यश आले आहे. मनमाड परिसरात पंचवटी कॉलनी तसेच नजराणा सोसायटी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिघांना अटक करून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिनेश मोरे यांच्या नजराणा सोसायटी मधील बंगल्यात घरफोडी करून ८३ हजार चा तर पंचवटी कॉलनी मधील विजय सोमीने यांच्या कडील घरफोडीत १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या गुन्ह्यातील संशयितांचा पोलिस तपास करीत होते. पोलिसांनी सखोल तपास करत गुरुवारी रात्री या घरफोडी प्रकरणी सागर उर्फ मायासागर यशवंत गरुड वय (२१ रा. पंचवटी कॉलनी), अभिराज लक्ष्मण उबाळे (वय २६), सचिन पगारे (वय २३ रा. वृंदावन कॉलनी मनमाड) या तिघांना शिताफीने अटक केली. दोन्ही ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images