म. टा. वृत्तसेवा, सिडको/सातपूर मुंबईमध्ये कामगार रुग्णालयात आग लागल्याने दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शहरातील कामगार रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुढे आला आहे. सातपूर आणि अंबड येथे कामगार रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणी अग्निसुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्याची बाब उघडकीस आली आहे. मुंबईच्या घटनेनंतर तरी या रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकमध्ये सातपूर आणि अंबड येथे औद्योगिक वसाहत आहे. तर, सिन्नर येथे माळेगाव, मुसळगाव येथे औद्योगिक वसाहत आहे. नाशिक शहरालगत गोंदे, वाडीवऱ्हे येथेही खासगी उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. दिंडोरी तालुक्यातही औद्योगिक वसाहत आहे. या सर्व औद्योगिक वसाहतींत काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी अवघी दोनच रुग्णालये नाशिकमध्ये आहेत. त्यात सातपूर आणि अंबड येथील रुग्णालयाचा समावेश आहे. सातपूर येथे १०० बेडचे रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी अग्नी सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत. यासंदर्भात प्रशासनाला विचारले असता निधी उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. तर, अंबड येथील रुग्णालयात साधे सिलेंडरही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये भीषण घटना घडल्यानंतर तरी या दोन्ही रुग्णालयात अग्नी सुरक्षा उपाययोजना व्हाव्यात, अशी कामगारांची मागणी आहे. मटा भूमिका कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांप्रमाणेच त्यांच्यासाठी असलेली रुग्णालयेही दशकानुदशके सलाइनवर आहेत. डॉक्टर, कर्मचाऱ्यांबरोबरच आवश्यक सामग्रीची टंचाई त्यांच्या पाचवीलाच पूजलेली असते. अस्वच्छतेसह इतर मूलभूत सुविधांचीही या रुग्णालयांत नेहमीच बोंब असते. आता मुंबईतील कामगार रुग्णालयातील अग्नितांडवामुळे अग्निसुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. कुठेतरी काही अनुचित प्रकार घडले की मग सरकारी यंत्रणेसह साऱ्यांनाच या रुग्णालयांची आठवण होते. मग तात्पुरते उपाय वा मलमपट्टीचा खेळ दाखवून रुग्णालये पुन्हा वाऱ्यावर सोडली जातात. खरेतर कामगारांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करुन या रुग्णालयांना आवश्यक ती मदत पुरवत सुसज्ज करण्याची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट