म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आता जिल्ह्यातील आंदोलन तीव्र झाले आहे. बुधवारी भाजप वगळता शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, माकपने रामकुंडात उतरून पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत, भाजपवर जोरदार टीका केली.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून ३.३४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील पाणीप्रश्न आता चांगलाच पेटला आहे. अर्धा जिल्हा दुष्काळात होरपळत असताना आणि पिण्यासह शेतीच्या पाण्याचे वांधे असताना जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाने नाशिकमध्ये संतप्त वातावरण आहे. भाजप वगळता सर्व पक्षांनी या निर्णयाविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. न्यायालयात याचिका दाखल करण्यासोबतच बुधवारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, माकप या पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत गोदावरी रामकुंडावर निषेध आंदोलन केले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, माजी खासदार देवीदास पिंगळे, माकपचे श्रीधर देशपांडे, नगरसेवक सुधारकर बडगुजर, काँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. रामकुंडाच्या पाण्यात उतरून या नेत्यांनी निषेध आंदोलन करीत, निर्णयाला तीव्र विरोध केला. नाशिकवर नेहमीच अन्याय केला जात असून, आता एकही थेंब पाणी जायकवाडीला जाऊ देणार नाही, असा इशारा यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आमदारांच्या घरावर ढोल बडविण्यासह पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या दिल्या घोषणा!
'नागपूरचा 'पोपट', जळगावचा 'कावळा' काय म्हणतो, नाशिकला पाणी नाही म्हणतो'
'भाजप सरकार मुर्दाबाद'
'धरण उशाशी ,कोरड घशाशी'
'पाणी चोर, हरामखोर'
'फेकू सरकारचा निषेध असो'
भाजप नेते दूरच
सर्वपक्षीय आंदोलनात भाजपच्या आमदारासंह नेत्यांना पाणी सोडण्याविरोधातील आंदोलनाला बोलाविण्यात आले होते. परंतु, पत्रकार परिषदा घेऊन आंदोलनाची भाषा करणारे भाजपचे आमदार, महापौर आणि नेते मात्र या आंदोलनापासून दूर राहिले. त्यामुळे भाजप नेत्यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आंदोलनात भाजप नेत्यांनी सरकारकडे जाऊन काय केले, याचा जाब विचारला जाण्याची भीती होती. त्यामुळे भाजपने अंतर राखल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती.
नाशिकमध्येच दुष्काळाची स्थिती भीषण असताना, मराठवाड्याला पाणी देऊन नाशिककरांचा गळा घोटण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. या निर्णयाच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी आता सरकारने ठेवावी.
- विजय करंजकर, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही नाशिकचे पाणी पळवले जात आहे. पाण्यावरून भांडणे सुरू झाले असून, हे आंदोलन नव्हे तर सरकारला आमचा हा इशारा आहे. सर्व मतभेद विसरून आम्ही आता मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर ढोलनाद आंदोलन करणार आहोत. पालकमंत्र्यांना नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवले जातील.
- अशोक मुर्तडक, माजी महापौर
जिल्ह्यातील १५ पैकी ११ तालुके भीषण दुष्काळात असताना आणि जायकवाडीत पुरेसे पिण्यासाठी पाणी असतानाही, पाणी सोडण्याचा अट्टाहास केला जात आहे. नाशिकवर नेहमीच अन्याय केला जात असून, आता तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही. न्यायालयीनसह रस्त्यावरची लढाई आता आम्ही लढणार आहोत.
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
नाशिकमधील धरणांच्या स्थितीचा आणि दुष्काळाचा अभ्यास न करताच महामंडळाने एकतर्फी पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन नाशिककरांवर अन्याय केला आहे. परंतु, आता या निर्णयाविरोधात आरपारची लढाई होणार असून, एक थेंबही पाणी जायकवाडीला जाऊ दिले जाणार नाही.
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, मनपा