म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक बजेटमधील मंजूर कामांवरून महासभा आणि स्थायी समितीला झटका देणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला पुन्हा एक झटका दिला आहे. आयुक्तांनी स्थायी समितीवर पाठविलेले प्रस्ताव १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीत प्रलंबित राहिल्यास त्यास स्थायी समितीची मान्यता मिळाल्याचे समजून प्रशासनामार्फत कार्यवाही केली जाईल, असा इशाराच मुंढे यांनी दिला आहे. स्थायी समितीवर सादर होणाऱ्या प्रस्तावांवर आता थेट कलम ७३ (क)चा उल्लेख करण्यात येत असल्याने अनेक दिवस प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्या स्थायी समितीची अर्थकोंडी झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यापासून तुकाराम मुंढे प्रशासकीय शिस्तीवर जोर देत, सत्ताधाऱ्यांना दणके देण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवक निधी गोठवल्यानंतर नगरसेवकांच्या विकासकामांनाही ब्रेक लावला आहे. त्यामुळे बजेटवरून सत्ताधारी भाजप आणि मुंढेंमधील वाद चिघळला आहे. यामुळे नगरसेवकांमध्ये मुंढेंविषयी नाराजीचा सूर असतानाच करवाढीचा मोठा बाउन्सर आयुक्तांनी टाकत, सत्ताधाऱ्यांची पुरती कोंडी करून ठेवली आहे. करवाढीमुळे भाजपचे नुकसान होऊ नये, म्हणून दिलासा देणाऱ्या महापौरांवरच पद गमावण्याची खेळी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीपाठोपाठ शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुंढेच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठविण्यावर लोकप्रतिनिधींना मर्यादा होत्या. आता आचारसंहिता संपल्यानंतर आयुक्तांच्या कार्यशैलीविरोधात बंडाच्या तयारीत असलेल्या सत्ताधाऱ्यांना आयुक्त मुंढेंनी आणखी एक दणका दिला आहे. मुंढे यांनी कायद्यातील तरतुदींवर बोट ठेवत स्थायी समितीलाच झटका दिला आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार आयुक्तांनी स्थायी समितीवर पाठविलेल्या प्रस्तावावर समितीने १५ दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित आहे. या कालावधीत या प्रस्तावावर निर्णय घेतला न गेल्यास तो मंजूर समजून त्यावर अंमलबजावणीचे अधिकार प्रशासनाला प्राप्त होतात. नाशिकरोड येथे महापालिकेच्या वतीने उभारलेल्या नवीन बिटको रुग्णालयाच्या इमारतीसाठी अग्निप्रतिबंधक व आगशोधक यंत्रणा बसविण्याच्या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याबाबतच्या प्रस्तावात महापालिका कायद्यातील या तरतुदीचा संदर्भ देत स्थायी समितीला मुंढे यांनी इशारा दिला आहे. यापूर्वी अशा प्रकारचा उल्लेख होत नव्हता; परंतु आता यापुढे स्थायी समितीला पाठविल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रस्तावात या तरतुदीचा उल्लेख असणार आहे. त्यामुळे स्थायी समिती विरुद्ध आयुक्तांमध्ये वाद अटळ मानला जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट