समृद्धी महामार्गावर साकारणार पहिले सेंटर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता महावितरण कंपनीने त्याबाबत कार्यवाही चालू केली आहे. राज्यातील प्रमुख मार्गांवर इलेक्ट्रिक कार चार्जिंग सेंटर स्थापण्याचे महावितरणने निश्चित केले असून, पहिले सेंटर समृद्धी मार्गावर साकारण्यात येणार आहे.
प्रदूषणाच्या पातळीने उच्चांक गाठला असून, ती कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. यातील काही वाहने ही एकदा चार्ज केल्यानंतर १२० किलोमीटर धावत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे या गाड्या लांब पल्ल्यावर नेताना अडचण येऊ नये म्हणून महावितरणकडून महामार्गांवर कार चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यातील पहिले चार्जिंग सेंटर हे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सुरू होणार आहे. हा महामार्ग ८२० किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गावर ५० ठिकाणी चार्जिग सेंटर उभारले जाणार आहेत. नाशिक, औरंगाबाद, जळगाव आणि अमरावतीसारख्या शहरांमध्ये हे केंद्र मोठ्या प्रमाणात बसवली जातील. येथे उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग सेंटरसाठी राज्य व केंद्रीय मंत्रालयाकडून निधी दिला जाणार आहे.
राज्यात येणाऱ्या इलेक्ट्रीक कारची संख्या पहाता महावितरणकडून २०२० पर्यंत राज्यभरात ५०० केंद्र उभारण्यात येणार आहेत. पहिल्या फेजमध्ये मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे आणि मुंबई-रत्नागिरी कॉरिडॉर हे चार्जिंग सेंटर कार्यान्वित केले जाणार आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूंनी सहा-सहा असे १२ केंद्र तयार केले जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सात भूखंड आरक्षित केले आहेत. हे सर्व चार्जिग सेंटर महावितरण चालवले असून, यामुळे उत्पन्नही मिळणार आहे.
दर २५ किलोमीटरवर सेंटर
राज्य महामार्गांवर आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करून शासनाचा ई-वाहनांच्या दिशेने प्रवास सुरू आहे. मुंबई-नागपूर समृद्धी कॉरिडॉरच्या प्रत्येक २५ किमीवर एक स्टेशन उभारण्यात येणार आहे. लोकांनी इलेक्ट्रिक कारकडे वळावे, यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.
--
मोबिलिटी मिशननुसार उभारणी
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोबिलिटी मिशन २०२० नुसार, ऊर्जा विभागाने पेट्रोल व डिझेल वाहनांच्या बदल्यात १० हजार बॅटरीवर चालवणाऱ्या कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रानेही इलेक्ट्रिकल वाहन धोरण २०१८ तयार केले आहे. त्यामुळे महामार्गावर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यात येत आहे. मुंबईत नुकतीच बेस्टने काही मार्गांवर इलेक्ट्रीक बस चालवणे सुरू केले आहे. मुंबई-नागपूर मार्गावर चार्जिंग सेंटर झाल्यास या ठिकाणीही बसेस धावू शकणार आहेत. एमएसईडीसीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'मुंबई-नागपूर महामार्गावर दररोज ३० ते ४० हजार प्रवासी वाहने धावत असतात.
--
महाराष्ट्राने इलेक्ट्रीक व्हेईकल धोरण आखल्याने संपूर्ण राज्यातील प्रमुख महामार्गांवर कार चार्जिंग सेंटर उभारले जाणार आहेत. यामुळे राज्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. यात महावितरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
- पांडुरंग पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण