Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉक्टर्स करताहेत प्राणवायूचे प्रत्यारोपण

$
0
0

ग्रीन रिव्होल्यूशनने जगविली २० हजार रोपे

-

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : येणाऱ्या पिढ्यांसाठी गुंतवणूकच करायची असेल तर ती केवळ पैशांची करून चालणार नाही. प्रदूषणाचा विळखा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने प्राणवायूचीही गुंतवणूक करणे अनिवार्य ठरू लागले आहे. शहरातील अनेक डॉक्टर्सला याचीच जाणीव झाल्यामुळे त्यांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा वसा स्वीकारला आहे. हाच वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी रविवारी (दि. १ जुलै) रोजी निसर्गाच्या सानिध्यात रोपांची लागवड करून अनोख्या पद्धतीने ठिकठिकाणी डॉक्टर्स डे साजरा केला जाणार आहे.

आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रे तंतर

अरं जगणं मरणं एका श्वासाचं अंतर

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेमधील या ओळीतून ऑक्सीजनचा आणि जगण्याचा थेट संबंध अधोरेखित होतो. रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स उपचारांद्वारे एकप्रकारे रुग्णांच्या श्वासांमध्ये कधी अंतर पडू देत नाहीत. श्वासासाठी महत्त्वाचा असतो तो ऑक्सीजन. हा ऑक्सीजन मोफत पुरविणाऱ्या झाडांचीच दुर्दैवाने कत्तल होऊ लागली आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून, पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. ही परिस्थिती बदलावी यासाठी शहरातील काही डॉक्टर्सने तीन वर्षांपूर्वी वृक्षारोपणाची एक मोहीम हाती घेतली. चुंचाळे शिवार येथील एका टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. केवळ रोपे लावून ही डॉक्टर मंडळी थांबली नाही. तर ती जगावीत यासाठी सर्वतोपरी योगदानही दिले. चुंचाळे येथील आनंदकानसह त्र्यंबकरोडवरील वासाळी, बेळगावढगा आणि पेठरोडवरील तवली फाटा येथे सुमारे २० हजार रोपे लावून ती जगविण्यात आली आहेत. या रोपांच्या संवर्धनासाठीच्या सर्व उपाययोजना सुरूवातीला काही डॉक्टर्स आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी स्वखर्चाने केल्या. परंतु या मोहिमेचा वेलू गगनावरी जाऊ लागला तसा सीएसआरमधून वस्तूरुपात या मोहिमेला मदत मिळू लागली. रोपांसह पाणी पुरविण्याचे पाइप, खते, बि-बियाणे या स्वरुपात ही मदत मिळत आहे. ग्रीन रिव्होल्यूशन ही खऱ्या अर्थाने क्रांती ठरत असून त्यामध्ये आता विविध क्षेत्रातील मान्यवरही जोडले जाऊ लागले आहेत. प्रत्येक रविवारी किमान दोन तास वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी दिले जात असून, येथे वनराई वाढू लागली आहे. कळवण आणि सिन्नर तालुक्यातही ग्रीन रिव्होल्यूशन अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले असून, ही रोपेही आता बाळसे धरू लागली आहेत.

---

..कोट..

ग्रीन रिव्होल्यूशन ही मोहीम तीन वर्षांपूर्वी सुरू झाली. ३५ ते ४० डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर या मोहिमेत आहेत. आम्ही आतापर्यंत २० हजार रोपे जगविली आहेत. वृक्ष ही उघड्यावरची संपत्ती आहे. लोकसहभाग वाढावा याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत. रविवारी १ जुलै रोजी आम्ही दोन हजार रोपांची लागवड करीत आहोत.--डॉ. संदीप आहेर, ग्रीन रिव्होल्यूशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवघ्या २० दिवसांत विनयभंगाच्या गुन्ह्याचा निकाल

$
0
0

आरोपीस तीन वर्षांची सक्तमजुरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस कोर्टाने तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या २० दिवसात ही सुनावणी पूर्ण करीत हा निकाल दिला.

राजू मोतीराम चव्हाण असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ७ जानेवारी २०१८ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ११ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरात पाणी भरीत होती़ एकटी मुलगी असल्याची संधी साधून आरोपी राजू चव्हाण (वय ४२) घरात घुसला़ पीडित मुलीला उचलून घेत त्याने तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर चव्हाण पळून गेला़ दरम्यान झालेला प्रकार मुलीने वडिलांना सांगितला. त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी लागलीच विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. महिला पोलिस उपनिरीक्षक सी. एस. पाटील यांनी तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले. अॅड. शिरीष कडवे यांनी सुनावणी दरम्यान नऊ साक्षीदार तपासले. कोर्टात पीडित मुलीची आणि आरोपीला घटनास्थळावरून पळून जाताना पाहणारा साक्षीदार या दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्याआधारे कोर्टाने चव्हाण यास दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. विनयभंग तसेच बलात्कारच्या घटनांमध्ये जलद सुनावणी निकाल लागला तर निश्चितच अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, अशी भावना यामुळे व्यक्त होत आहे.

--

खटल्याचा घटनाक्रम

७ जानेवारी २०१८-गुन्हा घडला

८ जानेवारी - गुन्हा दाखल

९ एप्रिल - दोषारोपपत्र दाखल

११ जून - खटल्याच्या कामास सुरुवात

२९ जून - खटल्याची सुनावणी पूर्ण, निकाल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीचा मालेगावी जागर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या वतीने १ ते ३१ जुलै दरम्यान १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी उपविभागीय वनविभाग, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, सामाजिक वनीकरण विभाग व शहरातील शाळा-महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व जनजागृती फेरी काढण्यात आली. यानिमित्ताने शहरातील कॅम्प रस्त्यावरील वनविभाग कार्यालय आवारात वृक्ष लागवडीचा जागर पाहायला मिळाला.

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील येथील वनविभागाकडून वनमहोत्सवाअंतर्गत १४ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. यानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी आयोजित करण्यात आली होती. विविध शाळांमधून आलेल्या रॅलीचे वन विभागाच्या कार्यालय आवारात समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन यू. आर. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, सामजिक वनीकरण विभागाचे शामकांत देसले आदी उपस्थित होते. समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखील पवार यांनी केले. वृक्ष लागवड व संवर्धन करणारे खातून एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शेख रिजवान अब्दुल मुतलीफ व दीपक बच्छाव यांना वृक्षमित्र पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व वृक्ष भेट देऊन गौरविण्यात आले.

या जनजागृती फेरीत शहरातील र. वी. शाह विद्यालय, या. ना. जाधव विद्यालय, काकाणी विद्यालय, मदर आयेशा विद्यालय, काबरा विद्यालय, के. बी. एच. विद्यालय, ए. टी. टी. हायस्कूल, आर. बी. एच. विद्यालय, जागृती विद्यालय, शुभदा विद्यालय, जेएटी गर्ल्स हायस्कूल, नवभारत विद्यालय, सानेगुरुजी विद्यालय, विनय मंदिर विद्यालय, अजिंठा विद्यालय आदी शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू अड्डे, वाळू वाहतूक बंद करण्याचा ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

लोहोणेर येथे सुरू असलेले गावठी दारूअड्डे, अवैध वाळू वाहतूक, गावठी दारू बनविण्यासाठी लागणारा गूळ व नवसागरसह इतर रसायन विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी असा महत्वपूर्ण ठराव विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मजूर करण्यात आला. लोहोणेर गावालगत गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्ट्या बिनबोभाट चालू आहेत. याबाबत वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच गुन्हे शाखेच्या वतीने धाड सत्र सुरू करण्यात आले होते. सुमारे तीन लाखाचा ऐवज गुन्हे शाखेच्या हाती लागला होता. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या हातभट्ट्यांमुळे गावातील बहुतांश तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. या व्यवसायाला आळा घालण्यासाठी तसेच लोहोणेर गावालगत गिरणा नदीच्या पात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक थांबावी यासाठी लोहोणेर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयवंता बच्छाव होत्या. या ठरवास उपस्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांनी हात उचवून अनुमोदन दिले. अवैध गौण खनिज प्रतिबंध दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच बच्छाव, सदस्य यू. बी. खैरनार, ग्रामविकास अधिकारी, ए. आर. पूरकर, अरविंद उशीरे, पोलिस पाटील, विष्णू वाघ, कोतवाल यांची या दक्षता समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगसाधनेने अवतरेल ‘वसुधैव कुटुंबकम्’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

योगशास्त्रामध्ये माणसातील माणूसपण जागविण्याचे सामर्थ्य आहे. योगामुळे आपसातील संघर्ष मिटून माणूस माणसाशी जोडला जातो आहे. आज समाजाने मानसिकता बदलली, तर योगसाधनेने 'वसुधैव कुटुंबकम्' प्रत्यक्षात अवतरेल. स्वर्ग-नरक काहीही नसून, योगामध्ये परमार्थ साधून पृथ्वीचा स्वर्ग करण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन योगविद्याधाम गुरुकुलचे कुलगुरू डॉ. विश्वासराव मंडलिक यांनी केले.

योगविद्या प्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना गेल्या वर्षीपासून दिला जाणारा पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मंडलिक यांचा योगविद्याधाम योग व निसर्गोपचार केंद्र व 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, योगविद्याधामचे अध्यक्ष मनोहर कानडे, पौर्णिमा मंडलिक, श्यामला राईकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, महापालिकेचे निवृत्त उपायुक्त दत्तात्रेय गोतिसे, प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओमकार प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर 'दिशादिशांतून नाद निनादे, योग शिका अन् योग जगा'चा संदेश उत्कर्षा हांडोरे, भक्ती हांडोरे, ईश्वरी हांडोरे यांनी योगगीतातून दिला.

प्रास्तविकातून सुनील जाधव यांनी पुरस्कार निवडीविषयी माहिती दिली. शिल्पा शर्मा यांनी पाहुण्यांचा, प्रवीण देशपांडे यांनी सत्कारमूर्तींचा, तर विदित गुजराथी यांनी संस्थेचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. मंडलिक यांना गौरविण्यात आले. डॉ. मंडलिक यांनी योग समजून घेत समाजात तो परावर्तित केला असून, त्यासाठी केवळ योगसाधक न घडवता त्यांनी योगशिक्षकही घडविले असल्याचे गौरवोद्गार शैलेंद्र तनपुरे यांनी काढले. या वेळी २१ योगशिक्षकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रथम १० योग प्रवेश साधकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सायली काळे यांनी योगविद्या वर्गाबाबत माहिती दिली. डॉ. निवेदिता खोत व अनुजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नलिनी कड यांनी आभार मानले. योगविद्याधामचे सर्व साधक, शिक्षक या वेळी उपस्थित होते. विश्वकल्याण प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

योगशिक्षकांचा सन्मान

समाजात अधिकाधिक योगविद्येचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने २१ जून रोजी जागतिक योगदिनी संयुक्त वर्गात मोफत योगप्रवेश वर्ग शिकविणाऱ्या योगशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिल्पा शर्मा, पूजा रायकिसानी, पूजा उभ्रानी, सचिन कुमावत, अर्चना भावसार, उद्धव हांडोरे, सायली काळे, कामिनी तनपुरे, निवेदिता खोत, सोनाली पाटील, हर्षद पटेल, नलिनी कड, भारती शेट्टी, चेतना कुलकर्णी, वर्षा मोरे, दीप्ती पट्टे, चैतन्य कुलकर्णी, राम गोतिसे, प्रियांका डोळस, आकाश नेहरे, दिलीप नेरकर, विभा लोहिया, स्मिता लोहार आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान एक हेल्पलाइन

$
0
0

साक्षी कल्पवृक्ष

SAKSHI KALPAVRUKSH

९५.२० टक्के

--

शिवणकाम करीत साक्षीने मिळविले यश

--

gautam.sancheti@ timesgroup.com

Tweet - gsanchetiMT

--

नाशिक : आईवडील शिवणकाम करून घरखर्च भागवत असले तरी त्यातून संपूर्ण कुटुंबाचा रहाटगाडा चालवणे मुश्किल होते. अशा बिकट परिस्थितीतही न डगमगता आईला शिवणकामात मदत करणाऱ्या साक्षी कल्पवृक्षने दहावीत ९५.२० टक्के गुण मिळवून श्रीराम विद्यालयात पहिला येण्याचा मान मिळवला. तिला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. मात्र, यासाठी तिला दानशूरांच्या मदतीचा हात हवा आहे.

गोदाकाठावर असलेल्या शनीचौकात सिंधी वाड्यात राहणाऱ्या कल्पवृक्ष कुटुंबीयाची गुजराण ही शिलाई कामावर आहे. वडील मोतीलाल हे एका दुकानात शिलाईचे काम करतात, तर आई घरातच पिको फॉल व हातशिलाईचे काम करते. या कामातून कल्पवृक्ष कुटुंबीयाच्या हातात जेमतेम सहा ते सात हजार रुपये पडतात. त्यानंतर घराचे भाडे व इतर खर्च जातात. फारसे पैसे शिल्लक राहत नाही. तुटपुंज्या पैशातून कल्पवृक्ष कुटुंबीयाने मात्र मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले आहे. साक्षी पाचवी ते दहावीपर्यंत श्रीराम विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिला प्रोत्साहन व मार्गदर्शन केल्यामुळे तिने कोणतीही शिकवणी न लावता हे यश मिळवले आहे. जुनी पुस्तके व वाट्याला आलेले आर्थिक दारिद्र्य याला न डगमगता साक्षीने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. साक्षीचा भाऊ रोहित सातवीत असून, तो वर्गात पहिला येण्याचा मान मिळवतो. कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील बागकोट हे या कुटुंबीयाचे मूळ गाव आहे.

- सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पगडी’ने सुटला हॉटेल ट्रेडमार्कचा गुंता

$
0
0

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

--

फ्रँचाइसी करार रद्द झाल्यानंतर नावात थोडेबहुत बदल करीत इतर बाबी पूर्वीप्रमाणेच ठेवणाऱ्या नागपुरातील हॉटेल मालकास मुंबई हायकोर्टाने दणका दिला. सात दिवसांत नावासह इतर बाबी बदलून नव्याने व्यवसाय करण्यासाठी सात दिवसांची मुदत हायकोर्टाने दिली असून, यावर पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. या प्रकरणी हॉटेल पंचवटी गौरवतर्फे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

नाशिकमधील हॉटेल पंचवटी गौरवच्या मुंबई, पुणे, गुडगाव, बेंगलुरू, इंदूर, नोएडासह इतर शहरांमध्ये फ्रँचाइसी आहेत. नागपूरमध्येसुद्धा पाच वर्षांपासून अक्षय आणि अश्विन लिंबाना या पिता-पुत्रांनी पंचवटी गौरव हॉटेल सुरू केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला लिंबाना यांनी हा करार संपवण्याबाबत पंचवटी गौरवच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, काही दिवसांतच लिंबाना यांनी पंचवटी गौरव हे नाव बदलून पंचरत्न राघव या नावाने आहे तेच दुकान सुरू केले, तसेच पंचवटी राघव या नावाच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी अर्ज सादर केला. याबाबतची माहिती नाशिक येथील गौरव चांडक यांना समजल्यानंतर त्यांनी अॅड. हिरेन कमोद यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांच्या कोर्टात धाव घेतली. गेल्या शुक्रवारी याबाबत युक्तिवाद झाला. सुरुवातीलाच या दोन नावांमध्ये साम्य नसल्याचा मुद्दा काथावाला यांनी उपस्थित केला. त्यावर अॅड. कमोद यांनी युक्तिवाद करताना लिंबाना जाणीवपूर्वक पंचवटी गौरव हॉटेलचा ट्रेडमार्क असलेल्या पगडीचा वापर करीत असल्याचे सांगितले. ही पगडी ट्रेडमार्कमध्ये समाविष्ट आहे. नावात थोडासा बदल असला तरी त्यासाठी वापरण्यात आलेली फाँटसाइज एकच आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, तेथील वातावरण, जेवण आदी सर्व हॉटेल पंचवटी गौरवच्या धर्तीवर असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी कोर्टात उपस्थित केले. पंचवटी हा शब्द शहराची ओळख असून, त्याच्याच आधारे अशिलाचा व्यवसाय इतक्या वर्षांपासून सुरू असल्याचे कमोद यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा न्यायमूर्ती काथावाला न्यायनिवाडा करण्याच्या तयारीत असताना लिंबाना पिता-पुत्रांनी झालेली चूक मान्य केली. मात्र, चूक मान्य करून या प्रकरणावर पडदा पाडणे चुकीचे होईल. पंचवटी गौरवची कोणतीही ओळख, खाणाखुणा हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना दिसणार नाहीत, अशा पद्धतीने यात सुधारणा व्हावी, अशी विनंती अॅड. कमोद यांनी केली. कोर्टाने ती मान्य करीत हा बदल करण्यासाठी लिंबाना पिता-पुत्रास सात दिवसांचा कालावधी दिला. कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले की नाही, याचा आढावा घेण्यासाठी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

तीन ते चार दशकांपासून एकत्रित कुटुंबाने केलेल्या तपश्चर्येचे फळ आता कुठे मिळण्यास सुरुवात झाली आहे. पंचवटी गौरव हा ब्रँड म्हणून समोर येत असताना त्याचा गैरवापर झाला. हा पहिलाच प्रकार असल्याने त्याची गंभीर नोंद घेऊन याचिका दाखल केली होती.

- गौरव चांडक, हॉटेल पंचवटी गौरव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडीवऱ्हेच्या प्लास्टिक कारखान्यावर धाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात प्लास्टिकबंदी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र कारवाईचे सत्र सुरू झाल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन सुरू असलेल्या वाडीवऱ्हे येथील एका कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीत प्लास्टिक पिशव्या व कच्चा माल जप्त केल्याची चर्चा आहे. दरम्यान, अशी कोणतीच कारवाई केली नसून, उत्पादन बंद करण्याच्या सूचना दिल्याची माहिती कारखानदाराने दिली.

वाडीवऱ्हेच्या या कारखान्याविरुद्ध पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर त्यांनी थेट कारवाईचे आदेश मुंबईच्या पथकाला दिले. त्यानंतर ही कारवाई झाली. या कारवाईबद्दल नाशिकच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला कोणतीच माहिती नव्हती. त्यांना धाड टाकल्याचे समजताच ते नंतर तेथे पोहोचले. याबाबत नाशिकच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानेही माहिती देण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंढेंचा अल्टिमेटम धुडकावला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रीनफिल्ड लॉन्स प्रकरणात माफीनामा सादर करावा लागल्यामुळे संतप्त झालेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी किन्सिंग्टन प्रकरणात संचालक विक्रांत मतेंनी नोटिसांवर नोटिसा देणाऱ्या आयुक्तांना शनिवारी तीन पानी लिफाफा पाठवून महापालिकेची कारवाईच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेच्या अल्टिमेटममध्ये दीड कोटी रुपये भरण्यास नकार देत, आयुक्तांनाच कायद्याचे धडे शिकवले आहेत. चौकशी न करता कोणालाही नोटीस देणे बेकायदेशीर असून, उलट आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकार कोणत्या कायद्यान्वये वापरले व निधी जमा करण्याचे आदेश कोणत्या कायद्यान्वये दिले, याचा खुलासा करण्याचे आव्हान महापालिकेला दिले आहेत. उलट आमच्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी महापालिकेवर केला आहे. त्यामुळे मुंढे आणि मते यांच्यातील वाद आणखीच चिघळला आहे.

आयुक्त मुंढेंना ग्रीनफिल्ड प्रकरणी झालेली मानहानी जिव्हारी लागली असून, ग्रीनफिल्डचे संचालक मते यांच्यातील वादाला शनिवारी नवी कलाटणी मिळाली आहे. चांदशी शिवारातील मते यांच्या मालकीच्या किन्सिंग्टन क्लबच्या संरक्षक भिंतप्रकरणी महापालिकेकडून नोटिसांचा फार्स सुरू आहे. ग्रीनफिल्ड प्रकरण उद्भवल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी संरक्षक भिंत कोसळल्यानेच महापालिकेचे रस्ते, तसेच गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मते यांना १ कोटी ४० लाखांच्या नुकसानभरपाईची नोटीस देत, ४८ तासांत पैसे भरण्याचा अल्टिमेटम दिला होता. पाठोपाठ 'किन्सिंग्टन' क्लबच्या संरक्षक भिंती कोसळून गोदावरी नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शुक्रवारी पर्यावरण विभागानेही नोटीस बजावली आहे. आयुक्तांनी दिलेली मुदत शनिवारी संपली असून, मतेंनी दीड कोटी रुपये भरण्यात नकार दिला आहे. उलट महापालिकेची कारवाईच बेकायदेशीर ठरवली असून, महापालिका चुकीच्या पद्धतीने न्यायप्रविष्ट प्रकरणांत काम करीत असल्याचा ठपका ठेवला आहे. विक्रांत मतेंनी शनिवारी आयुक्तांना खुलासा सादर करीत, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपण या प्रकरणात कारवाई करू शकत नाही, असा दावा केला आहे. गॅबियन वॉल ही नैसर्गिक आपत्तीमुळे कोसळली असून, त्याचा आमच्या क्लबशी संबंध नाही. याउलट आम्हीच महापालिकेला २३ ऑक्टोबर २०१७ रोजी वस्तुस्थिती अहवाल पाठवला होता. मात्र, त्यावर कारवाई करण्याऐवजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये आमच्यावर कारवाई केली जात आहे. महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला असून, एक कोटी ४० लाख भरण्याचे आदेश आपण कोणत्या कायद्यान्वये दिला, अशी विचारणा केली आहे. आपत्ती व्यवस्थापनाने कोणतीही चौकशी न करता कारवाई का केली, अशी उलट विचारणा केली आहे. संरक्षक भिंत व रस्त्याचे डिझाइन शहर अभियंत्यामार्फत प्रमाणित करून घेण्याचे निर्देश कोणत्या कलमांद्वारे मनपाने दिले आहेत, याचा बोध होत नाही. बफर झोनमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम केलेले नाही. लॉन्स केलेले नाही. जमिनीची धूप होऊ नये यासाठी गवत लावलेले आहे. नदीकाठच्या रस्त्याची जागा महापालिकेने संपादित केलेली नाही. सिंहस्थाचे कारण देत मतेंच्या मालकीच्या नदीकाठच्या जागेवर मनपाने रस्ता बांधला. रस्त्याची जागा लवकरात लवकर संपादित करून मोबदला अदा केला जाईल, असे आश्वासन मनपाने दिल्याने रस्ताबांधणीस हरकत घेतली गेली नाही. आजतागायत भूसंपादनाची कार्यवाही मनपाने केलेली नसताना रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी करणे कायदेशीर नसल्याचे मते यांनी या खुलाशात नमूद केले आहे.

मुंढेंच्या भूमिकेकडे लक्ष

महापालिकेने किन्सिंग्टन प्रकरणात आतापर्यंत चार नोटिसा दिल्या आहेत. संबंधित क्लब हा चांदशी शिवारात असतानाही, केवळ ग्रीनफिल्डचा बदला म्हणून मतेंच्या मालमत्तांना लक्ष्य करण्याचे काम मनपाकडून सुरू आहे. त्यामुळे मतेंनीही हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा केला असून, त्यांनी कायद्याचा अभ्यास करून आयुक्तांना जशास तसे उत्तर दिले आहे. दीड कोटी भरण्याचा अल्टिमेटम झुगारत, उलट महापालिकेला कायद्याचे अगाध ज्ञान नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एक प्रकारे हा मुंढेंनाच डिवचण्याचा प्रकार असून, या खुलाशावर आता मुंढे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाभर आजपासून वृक्षारोपण मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या ५० कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत यंदा राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातही ठिकठिकाणी सरकारच्या विविध विभागांसह सामाजिक संघटनांतर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ही वृक्षारोपण मोहीम एक ते ३१ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून, तिचा प्रारंभ धोंडेगाव येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

वन विभाग, सॅमसोनाइट साउथ एशिया प्रा. लि व तैनवाला फाउंडेशनतर्फे धोंडेगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता वृक्षलागवड होणार आहे. ही मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहील. जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये एक कोटी २३ लाख २५ हजार रोपे तयार असून, त्यामध्ये नीम, सिसू, शिरस, बाभूळ, शिसम, खैर, आवळा, शिवम, करंज, साग, अंजन, वावळा, आपटा, खाया, आंबा, चिंच, जांभूळ, सीताफळ, वड, पिंपळ, उंबर, बेहडा, हिरडा, रिठा, अर्जुन सादडा, कवठ, अमलतास या रोपांचा समावेश आहे.

त्रिपक्षीय करारांतर्गत नाशिक वनवृत्तातील पश्चिम भाग विभागांतर्गत सॅमसोनाइट नाशिक यांच्यामार्फत मौजे धोंडेगाव व देवरगाव येथे ४५ हेक्टर क्षेत्रावर ४९,५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याखेरीज सरकारच्या ३४ विभागांमधील अधिकारी, कर्मचारीदेखील विविध ठिकाणी वृक्षारोपण करणार आहेत. त्यासाठीची ठिकाणे निश्चित झाली असून, तयारीदेखील पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनेही ठिकठिकाणी वृक्षारोपण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १०५ टक्के पाऊस

$
0
0

मालेगावात १४६, तर निफाडमध्ये अवघा २४ टक्के पाऊस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना अनेक दिवस प्रतीक्षा करावयास लावणाऱ्या पावसाने महिनाअखेरीस चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने जूनची सरासरी ओलांडली. जिल्ह्यात १०५ टक्के पाऊस झाला असून, मालेगावात सर्वाधिक १४६ टक्के पाऊस झाला आहे. निफाड तालुक्यात सर्वांत कमी २४ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने चौफेर फटकेबाजी केली. विशेष म्हणजे १ जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, यंदा मात्र पावसाने नाशिककरांना प्रतीक्षा करायला लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर तो गायब झाला. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मात्र दोन- तीन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी २३२४ मिलिमीटर पाऊस होतो. याचाच अर्थ प्रत्येक तालुक्यात सरासरी १५४.९७ मिलिमीटर पाऊस होतो. मात्र, यंदा १ ते ३० जून या कालावधीत २४४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी आठ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. मालेगाव १४६.६, नाशिक १४५.२, बागलाण १४१.३, इगतपूरी १२७.१, चांदवड १२६.४, सिन्नर ११८.५, देवळा ११७.२, पेठ १०६.६ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय कळवण तालुक्यात ९९.५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. अन्य तालुक्यांमध्ये मात्र पावसाने निराशा केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ८०.७, सुरगाण्यात ६७.७, नांदगावात ५९.९, दिंडोरीत ५४.३ आणि निफाडमध्ये सर्वांत कमी २४ टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सरासरी १६२.७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्इ -वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी सी. ए. व्हायचंय!

$
0
0

Pravin.chaudhari@timesgroup.com

आई-व‌डील कमी शिकले असले तरी त्यांनी आम्हाला संस्कार दिले. या संस्काराच्या शिदोरीतूनच प्रतिकूल परिस्थितीतही धीराने व कष्टाने मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत लक्ष्य साधले. घरात आजीच्या आजारपणाचा खर्च करून दोन मुलांना शिकवतांना वडिलांची होणारी ओढाताण ही कुठीतरी थांबली पाहिजे, असे सारखे वाटायचे. त्यातूनच मला चांगला अभ्यासाची प्रेरणा मला मिळाल्याचे सृष्टी वाणी सांगते. सृष्टीने प्रतिकुल परिस्थितीतदेखील जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवले. तिला आर्इ-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी सी. ए. व्हायचंय!

सृष्टी महेश वाणी ही नंदिनीबार्इ वामनराव विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. महाबळ परिसरातील एका जुन्या घरात ती कुटुंबासह राहते. वडील महेश वाणी वृत्तपत्र वाटपाचे काम करतात. आर्इ गृहिणी आहे. लहान भाऊ ८ वीच्या वर्गात शिकतो. आजी पक्षघाताच्या आजाराने ग्रस्त असल्याने त्या बेडवर असतात. वडिलांच्या मिळकतीवर जेमतेम घर चालते. त्यात आजीच्या आजारावरही बराच खर्च होतो.

आर्इ-वडील कमी शिकलेले असले तरी मुलगी हुशार असल्याने तिचे शिक्षण पूर्ण करायची त्यांची इच्छा. त्यांच्या या इच्छेला सृष्टीने अभ्यासाच्या जोरावर बळ दिले. दहावीच्या वर्षात दररोज चार तास अभ्यास केला, उर्वरित वेळेत आर्इला घरकामात मदत आजारी आजीची सेवा करून तिने हे यश संपादन केले. सृष्टी लहानपणापासूनच शांत, सुस्वभावी, हुशार आणि समंजस आहे. परिस्‍थितीअभावी तीला अनेक गोष्टींसाठी तडजोड करावी लागली. पण तिने कधीच तक्रार केली नाही किंवा हट्ट धरला नसल्याचे वडील महेश वडील कौतुकाने सांगतात. सृष्टीला अकरावी कॉमर्सला प्रवेश घेवून सी. ए. व्हायचे आहे. मात्र, तिच्या कुटुंबास शिक्षणाच्या खर्चाची चिंता आहे.

नाव - सृष्टी महेश वाणी
SRUSHTI MAHESH WANI
गुण - ९२.६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’साठी मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) २९ जुलै रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्रीला रविवारी सुरुवात झाली. पण, पहिल्या दिवशी एकही अर्ज गेला नाही. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत असल्यामुळे या निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. २९६४ सदस्य असलेली निमा ही जिल्ह्यातील उद्योजकांजी शिखर संस्था असून, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी गटाविरुद्ध पॅनल तयार करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. विरोधी गटानेसुद्धा चाचपणी सुरू केली असून, तगडे उमेदवार उभे करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. गेल्या वेळी बिनविरोध निवडणूक झाली होती. पण, यंदा तशी शक्यता कमी आहे. या निवडणुकीत नूतन अध्यक्षांसह सहा पदाधिकारी व ३४ कार्यकारीणी सदस्यांची निवड केली जाणार आहे. मोठ्या उद्योग गटासाठी यंदा अध्यक्षपद राखीव आहे. त्यामुळे दोन्ही गट अध्यक्षपदाचा उमेदवार शोधण्याची चाचपणी करीत आहेत. दोन उपाध्यक्ष (लहान व मोठे उद्योग गटातून प्रत्येकी एक), मानद सरचिटणीस (कोणत्याही गटातून), दोन सचिव (लहान व मोठे उद्योग गटातून प्रत्येकी एक) आणि खजिनदार (एक जागा, कोणत्याही उद्योग गटातून) अशा पदाधिकाऱ्यांसह एकूण ४१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून व्ही. के. भूतानी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२९ जुलै रोजी मतदान होणार असून ३० ला मतमोजणी होणार आहे. पण, उमेदवारी अर्ज १२ जुलैपर्यंत भरावे लागणार असल्यामुळे त्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्तीच्या दिवशीच शिक्षकांना पीएफ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

'सरकारी काम अन् सहा महिने थांब' या उक्तीची प्रचिती सरकारदरबारी नेहमी येते. परंतु, जिल्हा परिषदेच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाने जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी सेवानिवृत्त झालेल्या ३३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशीच देण्यात आली. वेतन पथकाच्या या कामकाजामुळे जिल्हाभरातील माध्यमिक शिक्षकांनी वेतनपथक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

कोणत्याही आस्थापनेवरुन सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावरील अंतिम रक्कम मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात महिनो न महिने खेट्या माराव्या लागतात. परंतु, नाशिक जिल्हा परिषदेच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाने ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांतील ३३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे अंतिम प्रदान सेवानिवृत्तीच्या दिवशीच केले. वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाचे अधीक्षक उदय देवरे यांच्यासह या कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी ही रक्कम वेळेत मिळवून दिली. यावेळी या शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.

जिल्ह्यातील शाळांतून सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंतिम भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव बऱ्याच वेळा उशिरा प्राप्त होतात. त्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांना वेतन पथक कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. परंतु, जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतून निवृत्त होणाऱ्यांचे प्रस्ताव तीन महिने आधी पाठविल्यास संबंधितास सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफ देणे शक्य होईल.

-नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिसांच्या १०० वाहनांवर जीपीएस

$
0
0

मुख्यालयातून वरिष्ठांची असणार करडी नजर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गस्तीवरील आणि पोलिसांसाठी वापरण्यात येणाऱ्या ९३ वाहनांवर ग्रामीण पोलिसांनी ग्लोबल पोझिशिनग सिस्टिम (जीपीएस) प्रणाली कार्यन्वित केली आहे. शंभराहून अधिक वाहनांवर जीपीएस बसवण्यात येणार असून, यामुळे आडगाव मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील वाहनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

ग्रामीण पोलिस दलाचा कारभार मोठा असून, प्रत्येक तालुक्याची रचना आणि तेथील गुन्हेगारीची पद्धत भिन्न ठरते. तालुक्यातील पोलिस स्टेशनचा प्रत्येक गावात संपर्क होतोच असे नाही. या पार्श्वभूमीवर जीपीएस यंत्रणा खूप फायदेशीर ठरू शकते, असे मत पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केले. पॅट्रोलिंग, पोलिस स्टेशनची वाहने दामिनी पथक, दरोडा विरोधी पथक अशा सर्वच प्रकाराच्या वाहनांना जीपीएस लावण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याभरातील पोलिस दलातील वाहने नेमकी कोठे आणि काय करीत आहेत, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, फिरते पोलिस स्टेशन ही एक नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली असून, प्रत्येक तालुक्याला एक या प्रमाणे यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पोलिस स्टेशनचे पथक ठराविक दिवशी आपल्या हद्दीतील गावांमध्ये पोहचेल. तिथे वेगवेगळ्या सूचना करणे आणि लोकांच्या तक्रारी संबंधित पथकातील अधिकारी व कर्मचारी नोंदवून घेतील. यानंतर हे पथक पोलिस स्टेशनला पोहचून आवश्यकतेनुसार कारवाई करेल. याबाबत अधीक्षक दराडे यांनी स्पष्ट केले, की जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता दुर्गम भागातील खेड्यापाड्यातील नागरिक तालुक्याला किंवा पोलिस स्टेशनला येण्याचे टाळतात. त्यामुळे अनेक वाद वर्षानुवर्षे सुरूच राहतात. त्यातून हत्यासारखे प्रकार घडतात. या तक्रारी लक्षात घेऊन सदर योजना सुरू करण्यात आली आहे. थेट पोलिसच तक्रार ऐकण्यासाठी येत असल्याचा विश्वास गावकऱ्यांमध्ये निर्माण झाल्यास संभाव्य गुन्हे टळतील, अशी अपेक्षा दराडे यांनी व्यक्त केली.

आज उद्घाटन

नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे जीपीएस प्रणालीने सुसज्ज गस्ती पथकाची वाहने आणि फिरते पोलीस ठाणे उपक्रमास सोमवारी (दि. २) सकाळी ११ वाजता ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा व आरोग्यमंत्री गिरीश महाजन आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारख क्लासेसमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील आशा ग्रुप संचलित पारख क्लासेसमध्ये रविवारी ७० वा चार्टर्ड अकाउंटंट्स डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी सीए लोकेश पारख व सीए नीलेश पारख यांनी सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मागील सात दशकांमधील सीएची भूमिका व सीएचे महत्त्व यात झालेले बदल सांगण्यात आले. सर्व सीए अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबद्दल आपली भूमिका मांडली. पंडित कॉलनी शाखेत झालेल्या या कार्यक्रमाम पारख क्लासेसच्या संचालिका सपना पारख व सीए अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस स्टँडचे काम रखडलेलेच!

$
0
0

सातपूर

बस स्टँडचे काम रखडलेलेच!

सातपूर बस स्टँडचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ते अजून किती वर्षांनी पूर्ण होणार? येथील काम रखडल्यामुळे कामगारवर्गासह परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींदेखील पुढाकार घेण्याची गरज आहे.

-सविता महाजन

सिडको

पावसाने पेव्हर ब्लॉकची दुर्दशा

अभियंतानगर, उंटवाडी येथे रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे पहिल्याच पावसाळ्यात दिसून येत आहे. त्यामुळे येथील कामाचा दर्जा तपासून योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. परिसरात अन्यत्रदेखील अशी स्थिती दिसून येते.

-शुभम गाडे

शहर परिसर

स्वच्छता मोहीम राबवावी

शहरात ठिकठिकाणी असा कचरा पडलेला दिसतो. आता पावसाळा सुरू झाला आहे. असा कचरा भिजून कुजल्याने विविध साथींचे रोग डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या पावसाची उघड असल्याने महापालिकेने वेळीच शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

-अश्विनी चव्हाण

शहर परिसर

ट्री गार्ड नेमके कशासाठी?

हा फोटो पाहिल्यानंतर ट्री गार्ड नेमके कशासाठी आहेत, असा प्रश्न पडतो. झाडे मोठी झाली, तरी अनेक ठिकाणी छोट्या रोपांना सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले ट्री गार्ड काढले जात नाहीत. त्यामुळे अशा झाडांची वाढ खुंटण्यासह नागरिकांचे पैसेही वाया जातात. महापालिकेने ही उधळपट्टी थांबवावी.

-वैभव बडगुजर

तिडके कॉलनी

दुभाजकातील झाडे धोकादायक

चांडक सर्कल येथे दुभाजकातील झाडे अशी अस्ताव्यस्त वाढली आहेत. त्यांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या झाडांमुळे पलीकडील वाहने अथवा पादचाऱ्यांचा अंदाजच येत नसल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या झाडांना योग्य आकार द्यावा.

-चंद्रशेखर पोटे

त्रिमूर्ती चौक

मोकाट कुत्र्यांची दहशत

मोकाट कुत्र्यांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे अलीकडे दिसून येत आहे. सिडकोसह अनेक भागात कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला करून चावे घेण्याच्या घटना अनेकदा घडताना दिसून येतात. त्रिमूर्ती चौकात यामुळे नुकताच अपघातही झाला. महापालिकेचे यावर नियंत्रण कसे नाही?

-राहुल बाविस्कर

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात जीएसटीचा वर्षपूर्ती सोहळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभर एकाच वेळी लागू करण्यात आलेल्या जीएसटी कर पद्धतीला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सीजीएसटी व जीएसटी कार्यालयातर्फे वर्षपूर्तीचा सोहळा अंबड येथील इंजिनीअरिंग क्लस्टर येथे साजरा करण्यात आला. या वेळी जीएसटीवर आधारित वेगवेळ्या फिल्म दाखवण्याबरोबर मान्यवरांनी मार्गदर्शन करत वर्षभराचा आढावा घेतला.

प्राप्तिकर विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमिशनर अशीमकुमार, महापौर रंजना भानसी उपस्थित होते. केंद्राच्या सीएसटी विभागाचे आयुक्त श्रीकांत पाटील व अपील कमिशनर नवनीतसह ऑडिटचे अतिरिक्त कमिशनर ए. जे. वर्मा, जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त एस. डी. टिळेकर, जॉइंट कमिशनर एच. ए. बाखरे उपस्थित होते. देशभर लागू केलेल्या या करपद्धतीमुळे सुरुवातीला व्यापाऱ्यांनी विरोध केला; पण नंतर यातील अनेक वस्तूंना वगळण्याबरोबरच काहींचे कर कमी केल्यामुळे त्याला विरोधही कमी झाला. त्यामुळे वर्षभरात जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्नही वाढले असल्याचे मान्यवरांनी सांगितले. देशाला जोडणारी ही करपद्धत असल्यामुळे त्याचा सर्वांना फायदा झाला असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाच्या धडकेत बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षाने दिलेल्या धडकेत १३ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला तर, आणखी दोघे जखमी झाले. मद्यधुंद रिक्षाचालकाविरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवर घडली.

दुर्गेश दीपक गिरी (१३, रा. फुलेनगर) असे या अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. तर मोतीराम शिवाजी लिलके (४५, रा. वज्रेश्वरी झोपडपट्टी) आणि देवीदास तुकाराम गांगुर्डे (४८, रा. फुलेनगर) हे दोघे या अपघातात जखमी झाले. रिक्षाचालक दिलीप शंकर पगारे (४८, रा. म्हसरूळ) याने मद्यधुंद अवस्थेत कपिल गॅस एजन्सीचे गॅस सिलिंडर पोचविले. यानंतर तो आपली अॅपेरिक्षा (एमएच १५, इजी ३१७३) घेऊन भरधाव वेगाने म्हसरूळच्या दिशेने जात होता. पाटाजवळ दुर्गेश रस्त्याच्या बाजुला खेळत होता. तर गांगुर्डे आणि लिलके रस्त्याने पायी जात होते. मद्यधुंद अवस्थेतील रिक्षाचालक पगारेने भरधाव रिक्षा त्यांच्या अंगावर घातली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुर्गेश आणि दोघांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी तपासून दुर्गेशला मृत घोषित केले. गांगुर्डे व लिलके यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक पगारे यास अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठात नाईक जयंती

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. स्वप्नील तोरणे समन्वयक होते. नितीन कावेडे, प्रमोद पाटील, संतोष कोकाटे, डॉ. पायल बन्सल, संदीप राठोड, हेमंत कर्डक, नितीन शिंदे, गजानन सूर्यवंशी, सुभाष खैरनार, दिलीप राजपूत, पी. एम. मोहिते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images