नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच प्रकारची पिके घेतली जात असल्याने नाशिकला 'राज्याचे किचन' म्हंटले जाते. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा कृषी व औद्योगिक जिल्हा आहे. नाशिक जिल्हा द्राक्ष, कांदा यासाठी देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. कांदा, द्राक्ष, टोमॅटो व फुले निर्यातीत नाशिक राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात शेतीवर आधारित उद्योगधंद्यांचे जाळे पसरले आहे. साखर कारखाने, बेदाणा केंद्र, वाइनरी, शीतगृहे यामुळे रोजगार निर्माण झाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे नाशिकची पीकसंस्कृतीही बदलत चालली आहे. अशा या नाशिक जिल्ह्याच्या कृषिसंस्कृतीवर आजच्या (१ जुलै) कृषिदिनानिमित्त टाकलेला प्रकाश.
नाशिकमधील पिके
नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, बाजरी, ज्वारी, हरभरा, मका, गहू, ऊस, पेरू, कापूस, भात, नाचणी, वरई, मूग, मठ, कुळीद, उडीद, तूर, फूलशेती याशिवाय भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. कांदा, द्राक्ष व टोमॅटो निर्यातही केले जाते.
पीकपद्धती व प्रमुख पिके
द्राक्ष, कांदा, भात, गहू, मका, बाजरी, डाळिंब ही नाशिकमधील प्रमुख पिके आहेत. १९९५ पूर्वी बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, हरभरा या पिकांवर नाशिकचा भर होता. मात्र, यानंतर कृषी क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेला. आज द्राक्ष, कांदा, टोमॅटो या नगदी पिकांवर शेतकऱ्यांचा भर आहे. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, सिन्नर, बागलाण ही तालुके द्राक्ष शेतीसाठी ओळखली जातात. मालेगाव, कळवण, देवळा, बागलाण, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड या तालुक्यांत प्रामुख्याने कांदा व डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा ही तालुके भात, नाचणी, वरईच्या पिकांसाठी ओळखली जातात.
नाशिकमधील निर्यात होणारी पिके
मंत्रभूमी म्हणून नाशिक ओळखले जात असले तरी जिल्ह्याची खरी ओळख कृषीमुळेच होते. नाशिकमधून कांदा व द्राक्ष जगभरात निर्यात केले जातात. देशात सुमारे ३३ टक्के कांदा महाराष्ट्रातून पुरवला जातो. यामध्ये जिल्ह्याचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. द्राक्ष निर्यातीतही राज्यात नाशिक आघाडीवर आहे. याशिवाय टोमॅटोचीही निर्यात केली जाते. यामुळे देशाला परकीय चलनही प्राप्त होते. सरकारी धोरण कुचकामी असतानाही नाशिकमधून दरवर्षी हजारो टन कांदा, द्राक्ष व टोमॅटोची निर्यात होते.
द्राक्ष निर्यातीची आकडेवारी (टनमध्ये)
वर्ष……....…….. निर्यात
२०११-२०१२....…२८,०००
२०१२-२०१३.....…४८,४६५
२०१३-२०१४….....६७,२४४
२०१४-२०१५.....…४९,७६८
२०१५-२०१६….....१,००,००८
या आकडेवारीवर नजर टाकल्यास शेती विकसित होत गेली तसतशी निर्यातही वाढत गेली. १९९९ मध्ये अवघी चार हजार टन निर्यात होत होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांच्या आकडेवारी नजर टाकल्यास दरवर्षी त्यात वाढच होत गेली. २०१५-२०१६ मध्ये एक लाख टन विक्रमी निर्यात झाली. नाशिकच्या बदलत्या शेतीचे हे सुखावह व आनंददायी चित्र आहे.
कांदा निर्यात
वर्ष ..................निर्यात (टन लाखात)
२०११-१२..............१५.५२
२०१२-१३...............१८.२२
२०१३-१४..............१३.५८
२०१४-१५..............१०.८६
२०१५-१६..............११.१४
२०१६-१७...............३५.०
भारतातून कांदा निर्यात वाढत गेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३३ टक्के असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा वाटा ७० टक्के आहे.
नाशिकमधील बदलेली पीकपद्धती
जिल्ह्याच्या प्रारंभी ज्वारी, बाजरी, मका, कुळीद ही पिके प्रामुख्याने घेतली जात होती. शेतीचा विकास होत गेला तशीतशी पीकपद्धतही बदलत गेली. आज फूलशेती, स्ट्रॉबेरीचेही पीक घेतले जाऊ लागले आहे. कॉफीचे पीक घेण्याचाही प्रयोग नाशिकमध्ये झाला आहे. शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला आहे. पिकांचे लागवडीखालील क्षेत्रही झपाट्याने वाढले आहे. शेतकरी गटशेतीही करू लागले आहेत. यामुळे शेतात एकाच वेळी वेगवेगळी पिके घेता येणे शक्य होत आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा), चायना (चांदवड, येवला, नांदगाव) असे विभाजन केले जाते. याशिवाय त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी ही आदिवासी तालुके म्हणून ओळखली जातात. निफाड व दिंडोरी ही कृषीतील आघाडीची तालुके आहेत. सिन्नर या दुष्काळी तालुक्यानेही नवी ओळख निर्माण केली आहे. भाजीपाल्याबरोबर द्राक्ष व डाळिंब शेती येथे झपाट्याने विकसित झाली आहे.
कसमादे पट्टा
कसमादे पट्ट्यात ४० ते ५० वर्षांपूर्वी बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, गहू व हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जात होती. पावसावर शेती अवलंबून होती. यामुळे ही पिके घेणे सोयीचे ठरत होते. मात्र, शेतीचा विकास होत गेल्याने शेतकरी प्रयोग करू लागला. यामुळे आज बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, गहू, हरभरा ही दुय्यम पिके झाली असून, सटाणा व कळवणमध्ये द्राक्ष, डाळिंब, ऊस व कांद्याने प्रथम स्थान घेतले आहे. या नगदी पिकांमुळे या तालुक्यातील अर्थकारण झपाट्याने बदलले आहे. मालेगाव व देवळा या दुष्काळग्रस्त तालुक्यांतही पीकपद्धतीत बदल झाला आहे. बाजरी, मका, कुळीद या पिकांबरोबरच कांदा आणि डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. याशिवाय मालेगाव तालुक्यात कपाशीचेही उत्पादन घेतले जात आहे. या भागात तीन साखर कारखाने असल्याने काही शेतकरी उसाचेही उत्पादन घेत आहेत.
चायना पट्टा
चायना म्हणजे चांदवड, येवला व नांदगाव. या तालुक्यांतील शेतकऱ्यांनीही वेगवेगळे प्रयोग करून पीकपद्धतीत आमूलाग्र बदल आणला आहे. या तालुक्यांमध्ये बाजरी, मका, भाजीपाला ज्वारी ही पारंपरिक पिके शेतकरी आजही घेत आहेत. मात्र, उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी शेतीतही नवनवीन प्रयोग करून विकास साधला आहे. चांदवड तालुक्यात द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय फूलशेतीचा प्रयोग येथे यशस्वी झाला आहे. येवला तालुक्यात आज कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले आहे. द्राक्ष शेतीही येथे केली जात आहे. यामुळे नाशिकची कृषिसंस्कृती दिवसागणिक बदलत चालल्याचे दिसून येत आहे. नांदगावमध्ये कपाशी, गहू, डाळिंब पिकाने मोठे क्षेत्र व्यापले आहे. यामुळे पर्जन्यमान कमी असूनही शेतकरी पिकांमध्ये बदल करू लागला आहे.
आदिवासी तालुक्यातील शेती
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा ही आदिवासी तालुकेही शेतीमध्ये प्रयोग करू लागली आहेत. येथे पर्जन्यमान अधिक असल्याने भात, नाचणी, वरई, हरभरा ही पारंपरिक पिके आजही प्रामुख्याने घेतली जातात. या पिकांवर अवलंबून न राहता येथील शेतकरी नव्या पिकांकडे वळले आहेत. सुरगाणा तालुक्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनात महाबळेश्वर आघाडीवर असले तरी सुरगाण्यातही या पिकाने चांगले बस्तान बसवले आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये टोमॅटो शेती केली जात आहे. याशिवाय फळशेती करण्याकडेही या तालुक्यांचा कल वाढू लागला आहे.
-
सिन्नर, निफाड, दिंडोरी व नाशिक
सिन्नर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, या तालुक्याने शेततळे निर्माण करून आपली दुष्काळी ओळख जवळपास पुसून टाकली आहे. यामुळे या तालुक्यात आज शेतीला बहर आला आहे. बाजरी, गहू, भाजीपाला या पिकांबरोबर आज द्राक्ष, कांदा व डाळिंब ही पिके शेतकरी मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. निफाड व दिंडोरी ही सधन तालुके म्हणून ओळखली जातात. या तालुक्यांमध्ये बहुपीक पद्धत पाहायला मिळते. द्राक्ष, कांदा, गहू, मका, फूलशेती व भाजीपाला अशी विविध पिके घेण्यात ही तालुके आघाडीवर आहेत. द्राक्ष निर्यातीत निफाड व दिंडोरी ही जिल्ह्यातील आघाडीची तालुके आहेत. पाण्याची व्यवस्था असल्याने या तालुक्यांमध्ये सुरुवातीपासून नगदी पिके घेण्यात येत आहेत. पाण्यामुळे या तालुक्यांतील लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे.
निफाड तालुका (४७ वर्षांची आकडेवारी)
वर्ष ..……. एकूण क्षेत्र…...लागवडीखालील क्षेत्र
१९८०…….......१०५१०३…...... ७६,९८१
१९९०…….....१०५१०३….......७९,२०१
२०००……......१०५,१०३.......……८१,८१२
२०१०…...... १,०५,१०३......……८४,२३१
२०१७….......१०५,१०३..…... ८४,९२५
या एका तालुक्याचा जरी आढावा घेतला तरी लागवडीखालीत क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.
शेतीवर आधारित उद्योगधंदे
साखर कारखाने
नाशिकमध्ये जवळपास सर्वच प्रकारची पिके घेतली जात असल्याने, त्यावर आधारित अनेक उद्योगधंद्यांचे जाळे जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात छोटी-मोठी २४ धरणे आहेत. यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे ऊसशेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने साखर कारखान्यांचा पाया रोवला केला. जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून एकून नऊ साखर कारखाने सुरू करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे आपले साखर कारखाने मिळाले, तर स्थानिकांना रोजगार मिळाला. उसामुळे जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणले गेले. कादवा, वसाका, निसाका, गिरणा, नासाका, रानवड या सहकारी कारखान्यांबरोबरच रावळगाव, द्वारकाधीश, केजीएस या कारखान्यांनी जिल्ह्याच्या कृषी व्यवसायाला बळकटी दिली. यामुळे कृषी व्यवसायाला नवा आयाम मिळाला.
वायनरी उद्योग
द्राक्षपंढरी म्हणून नाशिकने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दर्जा व गुणात्मक द्राक्ष उत्पादनामुळे द्राक्षांची मागणी वाढली. यामुळे द्राक्ष क्षेत्रातही वाढ झाली. द्राक्षांचे उत्पादन वाढल्याने त्यावर आधारित उद्योगांची गरज निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यात वायनरी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. देशाची वाइन कॅपिटल म्हणून नाशिक नावारूपाला आले. यामुळे द्राक्षांना विदेशीबरोबरच स्थानिक बाजारपेठही उपलब्ध होऊन चांगले दर मिळण्यास मदत झाली. यामुळे रोजगारवाढीलाही चालना मिळाली. जगातील सुमारे २० देशांत नाशिकची वाइन जाते. सुला विनियार्ड, यॉर्क वायनरीज, फ्लेमिंगो, व्हिनटेज, एनडी, सोमो अशा नामांकित वाइनरींनी नाशिकचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. याशिवाय बेदाणा उद्योगही वाढीस लागला.
पोल्ट्री, गोटफार्म व दुग्धव्यवसाय
पोल्ट्री व्यवसायही भरभराटीस येत आहे. उद्योगांसारखा व्यवसायातही रोजगार निर्माण होत आहे. नाशिकमध्ये पोल्ट्री व्यवसायाने प्रगती करीत देशात दुसरे स्थान मिळवले आहे. सिन्नर, देवळा, मालेगाव, सटाणा, चांदवड, निफाड, कळवण या भागांत बारमाही पिके घेऊ न शकणारे शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळाले आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे पाच हजार पक्ष्यांची क्षमता असलेले ५२०० पोल्ट्री युनिट्स आहेत. या उद्योगातून सुमारे २५ ते ३० हजार युवकांना रोजगार मिळाला आहे.
शेतीचे क्षेत्र कमी होत गेल्याने शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन व गोटफार्म हा जोडधंदा म्हणून पसंती दिली. सद्य:स्थितीत सिन्नर तालुक्यात सर्वाधिक गोटफार्म आहेत. अलीकडे या व्यवसायाने मोठी प्रगती केली आहे. शेळ्यांची बाहेरील देशात निर्यात होऊ लागल्याने गोटफार्मची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी सक्षम होण्यास मदत झाली. नाशिक दूध उत्पादनात सक्षम असून, बाहेरील जिल्ह्यातही दूध पुरवले जाते. मुंबईला भाजीपाल्याबरोबरच दुधाचाही पुरवठा केला जातो. यामुळे शेतीवर आधारित जोडधंदा वाढीस लागण्याबरोबर रोजगारही उपलब्ध झाला.
(संकलन : अनिल पवार)