पोलिस महासंचालकासह २० अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे फर्मान
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी न करता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिल्याची फिर्याद घेऊन एक व्यक्ती थेट कोर्टापर्यंत पोचली. कोर्टाने हा दावा दाखल करून घेत विविध जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिस महासंचालकांनाही हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जी. पी. देशमुख यांच्या कोर्टात प्रकरण आले असून, यात नेमकी काय घडामोड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची बुधवारी (दि. ३०) सुनावणी होणार आहे.
या प्रकरणी दिलीप तुकाराम निकम (रा. बालाजी सदन, नागचौक, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. निकम यांनी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका जागेबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागिवली. हे काम तसे किरकोळ मात्र, यानंतर सुरू झाली वादाची मालिका. निकम यांच्या फिर्यादीनुसार ग्रामसेवक अरुण रंगाराव देशमुख यांनी वेळेत माहिती दिली नाही. यानंतर सदर प्रकरणात निकम यांनी अपील केले. तेथून हे प्रकरण त्र्यंबक नाका येथील माहिती आयोगापर्यंत पोहचले. मात्र, महसूल, पोलिस, माहिती आयोग, ग्राहकमंच आदी विभागांनी मिळून आपल्याला न्याय मिळू दिला नसल्याचा मजुरी काम करणाऱ्या निकम यांचा दावा आहे. आपणला काहीवेळा मारहाण आणि दमबाजीही झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस महासंचालकांनीही सर्वांना पाठीशी घातल्याचा आरोप करीत निकम यांनी जिल्हा कोर्टात खासगी फिर्याद दाखल केली.
कोर्टाने सदर फिर्याद दाखल करून घेतली असून, विविध पदांवर कार्यरत असलेल्या २० अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याबाबत आदेश दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार आहे. माहिती अधिकाराबाबत दोन टोकाच्या भूमिका नेहमीच पुढे येतात. त्यामुळे हे दुधारी अस्त्र नेमकी कोणावर उलटणार, हे लवकरच कोर्टात स्पष्ट होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यांना हजर राहण्याचे आदेश
विश्वास ढवळे (ग्राहकमंच, बुलढाणा), विनायक लोंढे (ग्राहक मंच, अकोला), एम. एम. नाईक (ग्राहक मंच, अहमदनगर), मोहन चव्हाण (राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, औरंगाबाद), पंढरीनाथ पाटील (निवृत्त, उपनगर), अरुण देशमुख (ग्रामसेवक, जळगाव), हेमंत भंगाळे (वकील, जळगाव), नेमीनाथ मुगदूम (प्रबंधक, ग्राहक मंच, जळगाव), पूनम मलिक (ग्राहक मंच, जळगाव), संतोष परदेशी (ग्राहक मंच, जळगाव), घनेश सोनवणे (ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव), संजय बोरवाल (ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव), डॉ. जालिंदर सुपेकर (पोलिस अधीक्षक, जळगाव), लक्ष्मीकांत पाटील (पोलिस उपायुक्त, नाशिक), र. सा. सोनार (राज्य माहिती आयोग, नाशिक), जी. आर. राठोड (पोलिस, पेठ पोलिस स्टेशन), सु. सा. चौधरी (राज्य माहिती आयोग, नाशिक), रवींद्रकुमार सिंगल (पोलिस आयुक्त, नाशिक), सतीश म्हात्रे (पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई), गोविंद माईनकर (ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मुंबई)