चिंटू हा सहावीत शिकणारा चुणचुणीत मुलगा. पण, कुठल्याच गोष्टीत तो सातत्य व नियमितता ठेवत नसे. परीक्षा जवळ आली तरच तो अभ्यास करीत असे. आई त्याला रोजच्या रोज अभ्यास करायला बसवत असे. पण, चिंटूला अभ्यासाचा कंटाळा येत असे म्हणून त्याने एक दिवस अभ्यास केलाच नाही. पूर्ण दिवस खेळून टाइमपास केला. चिंटूच्या अशा वर्तणुकीमुळे आईला राग आला. पण, आईने त्यावेळी शांत राहण्याची भूमिका घेतली. आईने मनाशी ठरवले, की चिंटूला सातत्य व नियमितता आपल्या जीवनात किती आवश्यक आहे हे ओरडून सांगण्यापेक्षा कृतीनेच सिद्ध करून दाखविणे योग्य राहील. कारण, बोलण्यापेक्षा कृती केव्हाही उत्तम व श्रेष्ठ असते. त्या दिवशी आईने स्वयंपाकच केला नाही, ना घरात कोणती साफसफाई केली. त्यामुळे घरात सर्वत्र पसारा व धूळ होती. घरात साचलेली धूळ व पसारा पाहून चिंटू आईला म्हणाला, 'आई, आज तू घर स्वच्छ न केल्याने किती धूळ साचली आहे व पसारापण झालाय. हे आरोग्यला चांगले नाही ना!' नंतर भूक लागली म्हणून किचनमध्ये जाऊन पाहतो तर काय, आईने खाण्यास काहीही बनवले नव्हते. त्यामुळे चिंटू जरा विचारातच पडला. चिंटूची ही अवस्था पाहून आई म्हणाली, की मी एकदा घरात स्वच्छता नाही केली तर धूळ साचली ना? एक वेळ स्वयंपाक नाही केला, तर तू हिरमुसलास! जशी घरात स्वच्छता आवश्यक आहे तशीच अज्ञानरुपी धूळ आज तू अभ्यास न केल्याने तुझ्या मनावरही साचली गेली आहे. धूळ वेळीच साफ केली, तरच घर स्वच्छ दिसते, तसेच वेळच्या वेळी व नियमित अभ्यास केला, तरच ज्ञान अद्ययावत राहते. सगळ्याच गोष्टींचा कंटाळा करणे योग्य नाही. आळस, कंटाळा हे मानवाचे मोठे शत्रू आहेत. आज आळस, कंटाळा केल्याने आजच्या दिवसापुरती आपली प्रगती थंडावते. जीवनात प्रगतिशील व विकसित होण्यासाठी आळस झटकून कामाला लागले पाहिजे. आईने एक दिवस कंटाळा केला, तर जेवायला मिळेल का, हा विचार कर. हे ऐकून चिंटूला आपली चूक लक्षात आली आणि त्याने आईची क्षमा मागितली. खरं तर बालवयातच मुलांवर योग्य संस्कार करणे हितावह ठरते. तात्पर्य : नियमितता ही मोठी शक्ती असून, तिच्या बळावरच अज्ञानरुपी धूळ झटकता येते. -स्नेहा शिंपी, नाशिक -- बालकथा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट