म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या एकतर्फी करवाढीचे तीव्र पडसाद सोमवारी महासभेसह सभागृहाबाहेरही उमटले. आयुक्तांच्या करवाढीच्या निर्णयाला सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकसुरात विरोध करीत, ही जिझिया करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीही अधिक आक्रमक होत, आयुक्तांवर एकाधिकारशाही, प्रशासकीय राजवट आणि आडमुठेपणाचा ठपका ठेवत करवाढीला स्थगिती देण्याची मागणी केली.
नगरसेवक सुधाकर बडगुजर, गुरुमित बग्गा, अजिंक्य साने यांनी संबंधित करवाढ बेकायदेशीर असल्याचे कायदेशीर पुरावे सादर करीत, प्रशासनाचीच कोंडी केली. प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. विशेष म्हणजे आचारसंहितेच्या काळात काढलेली अधिसूचना बेकायदेशीर असल्याचे सांगत, आयुक्तांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. करवाढीच्या मुद्द्यावर प्रथमच महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये अभूतपूर्व एकजूट दिसून आली. सर्वांनी आयुक्तांच्या एककल्ली कारभाराचा निषेध केला.
आयुक्त मुंढे यांनी नवीन तसेच जुन्या मिळकतींसंदर्भात ३१ मार्च २०१८ रोजी काढलेल्या ५२२ क्रमांकाच्या अधिसूचनेमुळे नाशिककरांवर भरमसाठ करवाढ लादली गेली. या अधिसूचनेमुळे शहरातील नव्या जुन्या मिळकतींचे करदर हे गगनाला भिडणारे असून, या अधिसूचनेच्या विरोधात सत्ताधारी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेसह विविध संघटना मैदानात उतरल्या. प्रथमच शेती, शाळा, मंदिरे यांच्यावरही कर लावण्यात आला आहे. करयोग्य मूल्य ठरविण्याचे अधिकार आयुक्तांना असल्याचा दावा आयुक्त मुंढे यांनी केला होता. या निर्णयाच्या विरोधात महापौर रंजना भानसी यांनी सोमवारी महासभा बोलावली होती. त्यात आयुक्तांच्या या अधिसूचनेलाच आव्हान देण्यात आले. सभागृहनेते दिनकर पाटील यांनीच प्रस्ताव सादर करीत, अशी अशांतता शहरात कधी पसरली नाही असा दावा केला. तसेच ही करवाढ रद्द करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी तर इंग्रजांना लाजवेल अशी ही करवाढ असून, नाशिककरांना आपल्या दारावर न्यायासाठी बसावे लागते, हे आपले दुर्दैव असल्याचे म्हटले. शहरात काय मोगलाई व हिटलरशाही सुरू आहे का, असा सवाल करीत महासभा व स्थायी समिती गेली कुठे, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला. नाशिक उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप केला.
दोरकुळकरांची एकतर्फी लढाई
उपायुक्त रोहिदास दोरकुळर यांनी महापालिकेच्या मान्यतेने आयुक्तांना करयोग्य मूल्य ठरवण्याचे अधिकार असल्याचा दावा सभागृहात केला. त्यावर नगरसेवकांनी महापालिका म्हणजे काय असे विचारल्यावर दोरकुळकर यांनी 'महासभा' असे उत्तर दिले. त्यामुळे करवाढीबाबतचा प्रशासनाचा डावच नगरसेवकांनी उलटवला. गुरुमित बग्गा यांनी तर प्रशासनाच्या चिंधड्या उडवित सुधारणेच्या नावाखाली ही करवाढ केली जात असल्याचा आरोप केला. आयुक्तांकडून महासभेच्या अधिकाराचे हनन होत असल्याचा आरोप करीत, हा नागपूरला पुढे नेण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. एकीकडे रेरामध्ये कार्पेट एरियाने घरे विकण्याचा कायदा होत असताना, दुसरीकडे बिल्टअप एरियाप्रमाणे घरपट्टी का, असा सवाल त्यांनी केला. उद्धव निमसे यांनीही प्रतिएकरी २० हजार महापालिकेने आम्हाला द्यावेत, आम्ही शेती देतो असे आव्हान दिले. करवाढ ही वृत्तपत्रातून समजते हेच सभागृहाचे दुर्दैव असल्याचा आरोप डॉ. हेमलता पाटील यांनी केला. शशी जाधव यांनी तर मनपा बरखास्त करा असे सांगत निषेध केला.
पक्ष नव्हे, मी नाशिककर
महासभेत करवाढीच्या मुद्द्यावर सभागृहात प्रथमच 'मी नाशिककर' या झेंड्याखाली एकजूट दिसून आली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी करवाढीचा निषेध, मुद्दे मांडताना एकमेकांना मदत केली. त्यामुळे सभागृहात प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे एकमेकांना मुद्दे देऊन त्यांची मांडणी करण्यासाठीही नगरसेवक एकमेकांना करीत होते. नगरसेवक गजानन शेलार यांनी महासभेतील नगरसेवकांना 'मी नाशिककर' नावाची टोपी भेट दिली. त्यामुळे सर्व नगरसेवक या टोप्या घालून महापालिकेत आले होते. पालिकेच्या सभागृहात प्रथमच असे चित्र दिसून आले. शिवसेनेचे सदस्य तर करवाढीच्या निषेधार्थ काळे कपडे परिधान करून पालिकेत आले होते.
अधिकाऱ्यांची बोलती बंद
सुधाकर बडगुजर यांनी आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत, आयुक्तांसह अधिकाऱ्यांची बोलती बंद केली. अतिरिक्त आयुक्त ते प्रशासन अधिकारी व उपायुक्तांना उत्तरे देताना घाम फुटला. बडगुजर यांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिरिक्त आयुक्तांनाही उत्तरे देता आली नाहीत. कायदेशीर बाबींत आपण अडकू नये म्हणून अधिकारी चक्क चुकीची आणि उडवाउडवीची उत्तरे देत होते. आचारसंहिता भंग झाली नाही, असे उत्तर देणाऱ्या प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव यांना ही अधिसूचना प्रभाग १३ मध्ये लागू होत नाही, का असा सवाल बडगुजर यांनी केला. तेव्हा मात्र अधिकाऱ्यांचीच बोलती बंद झाली.
महापौरांचा रौद्रावतार
महासभेत संयमी भूमिका घेणाऱ्या महापौर रंजना भानसी या प्रथमच सभागृहात आक्रमक दिसून आल्या. महापौरांसह सभागृहाच्या अधिकारावर अतिक्रमण करणाऱ्या आयुक्तांसह प्रशासनालाही त्यांनी खरी खोटी सुनावली. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्यासाठी अधिकाऱ्यांना त्या फर्मान सोडत होत्या. विशेष म्हणजे चुकीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांची सभागृहात कानउघाडणी करत होत्या. काही मुद्दे उकरून काढू नका, असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांचेही त्या ऐकत नव्हत्या. त्यामुळे महापौरांचा हा रौद्रावतार पाहून अधिकारीही अचंबित झाले होते.
आयुक्त मात्र सुटीवर
आयुक्त मुंढेंच्या करवाढीच्या निर्णयाविरोधात महासभा बोलवली असताना, आयुक्त मुंढे खासगी कामाचे कारण देत सोमवारी एक दिवसाच्या रजेवर गेले. सभागृहात नगरसेवकांना दोन दोन तास सुनावणारे आयुक्त अचानक सुटीवर गेले कसे, असा सवाल कृती समितीसह नगरसेवक करीत होते. आयुक्तांच्या अनुपस्थितीतही नगरसेवकांनी आक्रमकपणे आयुक्तांविरोधात आवाज उठवत, बेकायदेशीर कामकाजाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
कोण काय म्हणाले?
शशिकांत जाधव- मनपा बरखास्त करा अन् प्रशासकीय राजवट सुरू करा. मी या करवाढीचा निषेध करतो.
सलिम शेख- ही करवाढ अन्यायकारक असून ती रद्द करण्यात यावी. नगरसेवकांवर टीका करणाऱ्या अभय कुलकर्णींवर कारवाई करावी.
सतीश सोनवणे - करवाढ कायम राहिल्यास नगरसेवकांना प्रभागात फिरणे मुश्किल होईल. ती तातडीने रद्द करा.
दीपाली कुलकर्णी- शेतकऱ्यांना एकीकडे कर्जमाफी आणि दुसरीकडे जाचक करवाढ हे चुकीचे आहे.
गजानन शेलार - गांजा व अफूची शेती करायला आम्हाला आता परवानगी द्या. अधिकाऱ्यांचे बिल्डरांशी संगनमत आहे.
सतीश कुलकर्णी- पालिकेत जी एकाधिकारशाही चालली आहे, ती बरोबर नाही. शहराला उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे.
अजिंक्य साने - प्रशासनाने कायद्याचे थेट उल्लंघन केले आहे. प्रशासन आडमुठेपणाने काम करत आहे.
सुधाकर बडगुजर- अधिसूचनेमुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे कारवाई केली जावी.