आयुक्त मुंढेंच्या निर्णयास महासभेची स्थगिती; आचारसंहिता भंगाची तक्रार करण्याचेही महापौरांचे आदेश
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
करवाढीसंदर्भात महासभा व स्थायी समितीच्या अधिकारांना आव्हान देणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या करयोग्य मूल्यासह करवाढीचा निर्णय सोमवारी महासभेतील वादळी चर्चेनंतर महापौर रंजना भानसी यांनी बेकायदेशीर ठरवला. करवाढीसंदर्भात आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली असून, महासभेच्या या निर्णयामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयाने आयुक्त विरुध्द भाजप असा संघर्ष शिगेला पोहोचणार आहे.
आयुक्त मुंढेंनी करयोग्य मूल्यात चौपट वाढ करण्यासह नवीन करवाढीसंदर्भात ३१ मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेविरोधात सोमवारी महापौर रंजना भानसी यांनी महासभा बोलावली होती. या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अभूतपूर्व एकजूट करीत आयुक्तांसह प्रशासनाने करवाढीसंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय हा बेकायदेशीर असल्याचा सूर काढला. या निर्णयामुळे नाशिकवर मोठा अन्याय होणार असून, नागपूरचे भले करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला. बिल्डर आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोपही केला. करवाढीचे अधिकार आयुक्तांनाच असल्याचा प्रशासन तसेच उपायुक्तांचा दावा महासभेत सदस्यांनी खोटा ठरवत प्रशासनाच्या बेकायदेशीर कामकाजाचा निषेध केला. गुरुमीत बग्गा, सुधाकर बडगजुर, अजिंक्य साने, अजय बोरस्ते यांनी कायदेशीर पद्धतीने प्रशासनाचा दावा खोडत प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सुधाकर बडगुजर यांनी या अधिसूचनेमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत आयुक्तांसह प्रशासनाची कोंडी केली. सर्व सभागृहाने एकमताने हा ठराव बेकायेदशीर असल्याचे सांगत आयुक्तांनीही आचारसंहिता भंग केल्याचा दावा केला. तब्बल नऊ तासांच्या वादळी चर्चेनंतर महापौरांनी मुंढेंचा निर्णय फिरवला आहे.
सभागृहाच्या तसेच जनसामान्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत महापौर भानसी यांनी आयुक्तांनी ३१ मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेला स्थगिती दिली. हा आदेश प्रभाग क्र. १३ मध्ये आचारसंहिता सुरू असताना काढल्याने मतदारांवर त्याचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे या अधिसूचनेसंदर्भात आयुक्तांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे त्यांनी प्रशासनाला आदेशित केले आहे. तसेच, करवाढीसंदर्भात नव्याने स्थायी समितीमार्फत महासभेवर प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देत आयुक्त मुंढेंना जोरदार दणका दिला. या निर्णयामुळे भाजपने मुंढेंना दणका देऊन महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार अबाधित ठेवले आहेत.
-
...तर खंदारेंची पुनरावृत्ती
लोकसभेची आचारसंहिता लागू असताना तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी कर्मचाऱ्यांना पदोन्नती, ठेकेदारास १६ लाखांची सवलत, ठराविक बचतगटांना अनुदान देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे निर्णयाची संजय चव्हाण व सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने त्याची गंभीर दखल घेत खंदारेंची बदली केली होती. त्यामुळे मुंढेंच्या विरोधातही हाच निर्णय अवलंबण्याची तयारी सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू झाली आहे.
-
दिवसभर आंदोलन
आयुक्त मुंढेंच्या या करवाढीच्या निर्णयाने सोमवारी महापालिका परिसर आंदोलने आणि निषेधांच्या घोषणांनी दणाणला होता. शहरातील शेतकरी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, व्यापारी, वकील यांनी अन्याय निवारण कृती समितीच्या माध्यमातून दिवसभर ठिय्या आंदोलन करीत करवाढीचा निषेध केला.
-
आयुक्तांविरोधात करणार तक्रार
प्रभाग क्र.१३ मधील आचारसंहितेच्या काळात अधिसूचना काढल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचे सभागृहाचे मत झाल्याने आयुक्तांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. करवाढ करायची असल्यास स्थायी समितीच्या माध्यमातून महासभेवर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. एकूणच महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासनाला प्रशासनप्रमुख आयुक्तांविरोधात तक्रार करावी लागणार आहे.