\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक
जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे विल्होळी परिसरात साकारण्यात आलेल्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाला 'मटा'च्या वाचकांनी रविवारी भेट देत हा प्रकल्प समजावून घेतला. यावेळी सर्वांनीच ओला अन् सुका कचरा विलगीकरणाचा संकल्प केला. 'मटा'तर्फे आयोजित या उपक्रमात वाचकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत महापालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या या 'पायलट प्रोजेक्ट'ची तपशीलवार माहिती घेतली.
शहरातील विविध प्रकल्प, संस्था आदींच्या कामकाजाची माहिती वाचकांनाही व्हावी आणि त्यांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने 'जाणून घेऊ या मटासंगे' हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. त्याअंतर्गत 'वेस्ट टू एनर्जी' हा महापालिकेचा वीजनिर्मितीचा पथदर्शी प्रकल्प जाणून घेण्यास इच्छुक वाचकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडक वाचकांना रविवारी प्रकल्प भेटीसाठी नेण्यात आले होते.
महापालिका क्षेत्रातील २० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून येथे वीजनिर्मिती केली जाणार आहे. जर्मनीची जीआयझेड कंपनी या प्रकल्पाची सल्लागार कंपनी आहे. हैदराबादच्या रामकी या कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पाची मालकी महापालिकेचीच राहणार आहे. दरमहा एक लाख युनिट वीज मिळविण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २० टन ओला कचरा व १० टन मलजल महापालिकेतर्फे उपलब्ध करून दिले जाण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, जोपर्यंत सामान्य नागरिकांमध्ये ओला आणि सुका कचरा विलगीकरण करण्याविषयी प्रबोधन होत नाही, तोपर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक तेवढा कचरा जमा होणे शक्य होत नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम अपेक्षित वीजनिर्मितीवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कटाक्षाने ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी यावेळी 'मटा'च्या वाचकांशी संवाद साधताना केले. या आवाहनाला शहराच्या विविध भागातून उपस्थित असलेल्या नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कचरा विलगीकरणाचा संकल्प केला.
पहिलाच 'पायलट प्रोजेक्ट'
शहरातील विविध हॉटेल्समधून वाया जाणाऱ्या अन्नपदार्थांचे संकलन करून जैविक कचरा या प्रकल्पाच्या ठिकाणी जमा केला जातो. या प्रकल्पासाठी जर्मन सरकारने सात कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. अशाप्रकारे ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा हा देशातील पहिलाच 'पायलट प्रोजेक्ट' असल्याने देशाचे याकडे लक्ष लागले आहे. या प्रकल्पाचे अभियंते तथा समन्वयक सुनील खैरनार, साइट इन्चार्ज वसिम, सहकारी प्रवीण कांबळे आदींनी यावेळी वाचकांना या प्रकल्पाविषयीची माहिती सांगितली.
तज्ज्ञ अन् नागरिक म्हणतात...
'वेस्ट टू एनर्जी' हा राज्यातील पहिलाच प्रकल्प उत्तम रीतीने उभारला आहे. या ठिकाणी अनेक कामे कर्मचारीवर्गाकडून केली जात असली, तर काही यंत्रे वापरली तर निश्चितच फायदा होईल. येथून जादा प्रमाणात वीजनिर्मिती झाली पाहिजे.
-सी. व्ही. इंगळे, उपकार्यकारी अधिकारी, महावितरण
या प्रकल्पाला चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी नाशिककरांचे योगदान आवश्यक आहे. याबाबत असंख्य नाशिककर अनभिज्ञ असून, अधिकाधिक नागरिकांना या प्रकल्पाची माहिती दिली, तर अनेक जण कचरा विलगीकरणास प्राधान्य देतील. येथे तसे करण्यात खूप वेळ जात आहे.
-व्ही. डी. चौधरी
या प्रकल्पातून जास्तीत जास्त वीजनिर्मिती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. या प्रकल्पाची माहिती आम्हालासुद्धा नव्हती. 'मटा'च्या उपक्रमामुळे ती आम्हाली मिळाली. सर्व नागरिकांना याची माहिती दिली पाहिजे, तरच नागरिकांचाही सहभाग यात वाढेल. हा प्रकल्प कायम सुरू राहावा.
-सुरज माळी
कचऱ्यापासूनही किती फायदा होऊ शकतो हे या प्रकल्पामुळे समजले. या प्रकल्पाची माहिती नागरिकांना प्राधान्याने करवून देणे गरजेचे आहे. खत प्रकल्प सर्वांनाच माहिती आहे. मात्र, हा प्रकल्प माहिती नसल्याने नागरिकांत जनजागृती दिसून येत नाही. नाशिककरांना हा प्रकल्प खुला केला पाहिजे.
-भय्यासाहेब कोठावळे
----
अँकर
लोगो : जाणून घेऊ या मटासंगे
---
(फोटो : सतीश काळे)
राजन जोशी या बातमीशी संबंधित प्रतिक्रिया व चौकट ऑफिसच्या इ मेल देणार आहेत. त्या बातमीस जोडाव्यात.)\B