Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कॅम्पमधील रस्ते डांबरीकरणाची मागणी

$
0
0

कॅम्पमधील रस्ते डांबरीकरणाची मागणी

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्पमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळा आणि पुढील महिन्यापासून सुरू होणारा रमजान महिना लक्षात घेता कॅन्टोन्मेंट प्रशासनाने त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राशीद सय्यद यांनी केली आहे. देवळालीच्या आठही वॉर्डांत सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्ते गेल्या वर्षीपासून खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यावर फक्त मुरूम टाकून रस्ते सुरळीत करण्याचे काम केले जात आहे. मात्र, पुढे सुरू होणारा पावसाळा व रमजान पर्व लक्षात घेत मशीद परिसरासह आठही वॉर्डांमधील रस्ते त्वरित डांबरीकरण न केल्यास निषेध मोर्चा काढण्यात येईल. या प्रकरणी छावा संघटना पदाधिकारी व नागरिक बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर प्रदीप कौल व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून निवेदन सादर करणार आहे. पंधरा दिवसांत डांबरीकरणाबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचे सय्यद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंबेडकर जयंती - मुक्तीभूमीआंबेडकर जयंती - मुक्तीभूमी

$
0
0

धर्मांतराच्या घोषणेमुळे 'मुक्तीभूमी' नावारुपास

संजय लोणारी, येवला

१३ ऑक्टोबर १९३५ ची येवला शहरातील सायंकाळ, अस्पृश्यांची मुंबई इलाखा सभा आणि या सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व त्यांनी त्यात 'मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी हादरा देणारी केलेली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा म्हणजे भारतीय इतिहासात लिहिलं गेलेलं एक महत्त्वाचे पान. बाबासाहेबांनी येवल्यातील ज्या मैदानवर ही धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली ती सध्याच्या येवला कोर्टाजवळील जागा म्हणजेच 'मुक्तीभूमी'. त्यामुळेच बाबासाहेबांच्या जीवन वाटचालीतील दादरची 'चैत्यभूमी' व नागपूरची 'दिक्षाभूमी'सह येवल्यातील या 'मुक्तीभूमी'ला बौद्ध बांधवासह आंबेडकरी जनतेच्या जिवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ला येवल्यातील सभेत केलेली धर्मांतराची घोषणा ही तत्कालीन समाजव्यवस्थेला मोठा धक्का समजला गेला होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद होतानाच घोषणेमुळे तत्कालीन धर्मसंस्थाने देखील हादरली होती. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले होते. तर अनेकांनी विरोधही देखील केला होता. तरीही केलेल्या संकल्पापासून जराही न ढळता वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करून बाबासोहबांनी पुढे १४ ऑक्‍टोबर १९५६ रोजी लाखो समाजबांधवांसह नागपुरात बौद्ध धम्माचा स्वीकार केला. येवल्यात १३ ऑक्‍टोबर १९३५ ला दुपारी दोनला 'मुंबई इलाखा दलितवर्गीय परिषद' भरली होती. या परिषदेचे वक्ते होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सभेतील आपल्या दीड तासाच्या भाषणात त्यांनी 'हिंदू म्हणून मी जन्माला आलो, हिंदू म्हणून मी मरणार नाही' अशी गर्जना केली होती. त्यांनी केलेल्या या धर्मांतराच्या घोषणेला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व मिळाले. म्हणूनच धर्मांतराची घोषणा केली, ती जागा म्हणजेच येवला शहरातील सध्याच्या कोर्ट इमारती जवळील मैदान. हे मैदान 'मुक्तिभूमी' नावाने ओळखले जाते. या घोषणेमुळे मुक्तिभूमी बौद्ध धर्मियांचे तीर्थस्थानच बनले आहे. येथे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करून तब्बल तब्बल २१ वर्षांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर १४ ऑक्‍टोबर १९५६ ला लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची धम्मदीक्षा दिली. त्यामुळेच येवला हा धर्मांतराचा पाया, तर नागपूर हा कळस मानला जातो. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या येवल्यातील याच 'मुक्तिभूमी'वर दरवर्षीच्या १३ ऑक्टोबरला धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. तेव्हापासून प्रत्येक वर्षी १३ ऑक्‍टोबरला येथे भव्य स्वरूपात कार्यक्रम होतात. देशभरातून बौद्ध बांधव येथे येतात. लाखो भीमसैनिक या भूमीवर नतमस्तक होतात. बरोबरच बाबासाहेबांची जयंती असो की बुद्ध पौर्णिमा ही मुक्तीभूमी आंबेडकरी जनतेच्या पावलांनी गजबजून जात असते.

--

येवल्यात अस्पृश्यांची सभा

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या येवला शहर या मुख्यालयात १३ ऑक्टोबर १९३५ रोजी संध्याकाळी अस्पृश्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या परिषदेपुढे बोलताना, अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते असे काही अभ्यासक सांगतात. येवल्यातील घोषणेनंतर बाबासाहेबांनी लागलीच धर्मांतर केले नाही. त्यांनी हिंदू धर्मात सुधारणा होण्याची वाट पहिली. दोन दशके उलटूनही बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या सुधारणा दृष्टीक्षेपात न आल्याने त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या 'दीक्षाभूमी'वर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

----

७८ वर्षांनंतर 'मुक्तीभूमी'ला झळाळी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतराच्या घोषणेमुळे नावारूपास आलेल्या येवल्यातील मुक्तीभूमीचे रुपडे तब्ब्ल ७८ वर्षांनी पालटले ते राज्य शासनाने टाकलेल्या पावलांमुळे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तब्ब्ल साडेचौदा कोटींचा निधी उपलब्ध करून देताना या मुक्तीभूमीला खऱ्या अर्थाने झळाळी मिळाली. मुक्तीभूमीवरील ३.३० हेक्टर जागेवर उभारल्या गेलेल्या वास्तू सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दाद देखील देऊन जातात. ५० फूट उंचीचा भव्यदिव्य गोलाकार असा विश्वभूषण स्तुप, तळमजल्यावरील विपश्यना हॉल, टॉयलेट ब्लॉक, क्रांती स्तंभ, पाठशाळा, कार्यशाळा, ज्ञानभवन व भिक्कू निवास, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, बगीचा व त्यातील हिरवीगावर हिरवळ, लँड स्केपिंग, स्तूप व परिसर उजळून टाकणारे दीप, पथदिवे, स्तुपाच्या आतील बाजुस दोन्ही मजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व चळवळीवर प्रकाशझोत टाकणारी अनेक भिंतीशिल्पे, भगवान गौतम बुद्धांचा पंचधातूपासून खास बनविलेला तीन टन वजनाचा आसनस्थ पुतळा, स्तूपाच्या बाहेरील डॉ. आंबेडकर यांचा भव्य असा पूर्णाकृती ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा मुक्तीभूमीचे सौंदर्य खुलवून जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तरी ८३ टक्के जमीन करधाडीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील शेतकऱ्यांच्या जनरेट्यापुढे नमते घेत आणि उभ्या राहणाऱ्या जनआंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कराच्या जाचातून हरित पट्ट्यातील १७ टक्के जमीन वगळली असली तरी, ८३ टक्के पिवळ्या पट्ट्यातील जमिनीवरील करआकारणी कायम ठेवली आहे.

विशेष म्हणजे विकास आराखड्यातील ८३ टक्के पिवळ्या क्षेत्रातही जवळपास ३५ टक्के क्षेत्र हे शेतजमीन असल्याने आयुक्तांच्या चलाखीने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेतकरी अन्याय कृती निवारण समितीसह सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्ष शिवसेना संपूर्ण करमाफीवर कायम राहिले आहेत.आयुक्तांचा प्रयत्न हा शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारा असल्याने सत्ताधाऱ्यांनी महासभेत हा विषय मांडण्याची तयारी सुरू केली असून, समितीने जनआंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन मिळकतींच्या करयोग्य मूल्यदरात चार ते पाच पटीपर्यंत वाढ करताना शेतीक्षेत्रावरही कर लादण्याच्या आयुक्त मुंढे यांच्या अन्यायकारक निर्णयाचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. शहरातील जमिनीवर करयोग्य मूल्य हे ३ पैशांवरून ४० पैशांवर नेले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधी पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेने या करवाढीला तीव्र विरोध केला होता. मुंढेंच्या या निर्णयाविरोधात सत्ताधारी भाजपच मैदानात उतरले होते. शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या माध्यमातून जनआंदोलनाची तयारी सुरू झाली होती. त्यामुळे शुक्रवारी तुकाराम मुंढे यांनी नरमाईची भूमिका घेत, हिरव्या पट्ट्यातील शेतजमीन ही कराच्या आकारणीतून वगळल्याची घोषणा केली होती. तसेच जमीनीवरील करयोग्य मूल्य हे ४० पैशांवरून २० पैशांवर आणत आंदोलनाची व संतापाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुंढेंच्या या चलाखीमुळे दिलासा देणारे चित्र उभे राहिले असले तरी, त्यांच्या शब्दच्छलामुळे शेतकऱ्यांमध्येच फूट पडणार असल्याचे चित्र आहे.

तुकाराम मुंढेंनी हरितक्षेत्रातील शेती करातून वगळली असली तरी, हे क्षेत्र विकास आराखड्याच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ १६.९८ टक्के एवढेच आहे. शहरात सद्य:स्थितीत १६.९८ टक्के हिरवा पट्टा तर उर्वरीत ८३.०२ टक्का जमीन ही पिवळ्या पट्ट्यात आहे. पिवळ्या पट्ट्यातही ४७.९९ टक्के क्षेत्र हे निवासी वापराचे आहे. त्यामुळे जवळपास ३५ टक्के जमीन ही पिवळ्या पट्ट्यातील रिक्त आहे. यातील बिल्डरांच्या जमिनी १० टक्के असल्या तरी जवळपास २५ टक्के क्षेत्रावर आजही शेती होत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या निर्णयाने शहराभोवतालच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी, बहुतांश शेतकरी अजूनही कराच्या जाचात कायम राहिले आहेत. तसेच करयोग्य मूल्य हे २० पैशांवर आले असले तरी, एक-एका क्षेत्रावर जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त कर आकारणी होणार असल्याने शेतकरी या करवाढीने भरडलाच जाणार आहे. त्यामुळे आयुक्तांच्या चलाखीने १७ टक्के शेतकरी सुखावले असले तरी, उर्वरित क्षेत्रातील शेतकरी मात्र जात्यातच अडकले असल्याने करवाढीचा वाद कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची कोंडी

पिवळ्या पट्ट्यातही सध्या मोठ्या प्रमाणावर शेती केली जात आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे पिवळ्या पट्ट्यातही शेतजमिनीवर मोठी करआकारणी होणार असल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी सुरू होणार आहे.एकरी ६० हजारापेक्षा जास्त कर देणे शेतकऱ्यांना देणे शक्य नसल्याने त्यांच्याकडे आहे, ती जमीन विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बिल्डरांनी शेतकऱ्यांवर जाळे टाकण्यास सुरुवात झाली असून मुंबई, पुण्यातील बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा दाखवून त्यांच्याकडून जीपीओ करण्याचे प्रयत्न बिल्डरांकडून सुरू झाले आहेत. त्यामुळे करवाढीने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी सुरू झाली आहे.

भाजप आक्रमक

दरम्यान तुकाराम मुंढें करवाढीवरून बॅकफूटवर आले असले तरी, सत्ताधारी भाजप मात्र आक्रमक झाले आहे. भाजपने आयुक्तांना घेरण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने कोणते पक्ष आणि नगरसेवक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी १९ तारखेला विशेष महासभा बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवरील करवाढ मागे घेण्यात यावी आणि सामासिक अंतरावरील करवाढही मागे घेण्यासाठी भाजप आग्रही आहेत. भाजपच्या दोन आमदारांनी करवाढी विरोधातील आघाडी कायम ठेवली असून महासभेत आयुक्तांना नगरसेवकांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.

शहरात जेथे जथे शेती होते, तेथे घरपट्टीचा कर आकारला जाऊ नये अशी भाजपची भूमिका आहे. आयुक्तांच्या निर्णयाने शहरातील शेतकरीही आत्महत्या करतील. त्यामुळे या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून संपूर्ण करवाढ माघे घेण्याची मागणी आहे. जमीनीवर ले-आउट पडल्यास कर आकारणी करावी. आमचे आंदोलन कायम आहे.

- बाळासाहेब सानप, आमदार, भाजप

शिवसेनेचा संपूर्ण करवाढीला विरोध आहे. आजच्या निर्णयाने फार फरक पडणार नाही. महासभेत आम्ही या करवाढीचा सत्ताधाऱ्यांसह आयुक्तांना जाब विचारणार आहोत. भाजपच्या सर्व आमदारांनीही या करवाढीसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. कोणत्याही परिस्थिती ही करवाढ माघे घेण्यास आम्ही सत्ताधाऱ्यांसह आयुक्तांना भाग पाडणार आहोत.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

आयुक्तांचा आजचा निर्णय हा तोडा फोडा आणि राज्य करा असा आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण झाला असून, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. पिवळ्या पट्ट्यातील शेतकऱ्यांचा व भूखंडधारकांवरील संकट कायम आहे. त्यामुळे आमचे जनआंदोलन कायम राहणार असून ते अधिक तीव्र करण्यात येईल.

उन्मेश गायधनी, समन्वयक, अन्याय निवारण कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहाण भागविण्यासाठी धावताहेत टँकर

$
0
0

जिल्ह्यात २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टंचाईग्रस्त गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर होऊनही आणि नाशिक या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात आघाडीवर असूनही अनेक ठिकाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अशा दुष्काळग्रस्त गावांमधील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविण्यात येत असून, गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत यंदा सुमारे दुप्पट टँकर मंजूर करण्यात आले आहेत.

उन्हाळा तीव्र होत असताना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांना विशेषत: महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषदेकडे टँकरची मागणी होऊ लागली आहे. टँकर मंजूर करण्याबाबत सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी आखडता हात घेतल्याच्या तक्रारी ग्रामपंचायती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधिंकडून केल्या जात होत्या. परंतु आजमितीस जिल्ह्यात तब्बल २२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यात १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यंदा २२ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

येवल्यात पाणी टंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. येथील २६ गावे आणि एक वाडी अशा २७ ठिकाणी ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल बागलाण तालुक्यात आठ गावे आणि एका वाडीमध्ये सात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सिन्नर तालुक्यात यंदा काहीशी समाधानकारक परिस्थिती असली तरी दोन गावांमधील रहिवाशांची एका टँकरद्वारे तहान भागविली जात आहे. पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने चालू वर्षात आतापर्यंत सहा विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. त्यापैकी पाच विहिरी बागलाणमधील तर एक विहीर मालेगावातील आहे. गेल्यावर्षी १३ एप्रिल रोजी जिल्ह्यात १७ गावे आणि चार वाड्या अशा २१ ठिकाणी १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र यंदा अधिक टँकर सुरू आहेत. टँकरच्या मागणीचा प्रस्ताव आल्यास तो तत्काळ मंजूर करा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने येत्या काही दिवसांत गावोगावी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढेल अशी शक्यताही व्यक्त होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी मालेगावीमहिलांचा मेणबत्ती मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जम्मू कश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात व उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील काँग्रेसच्या माजी महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

मुलींवर झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यासाठी शहरातील अशोक लॉज ते गांधी पुतळा दरम्यान मोर्चा निघाला. मार्चात सहभागी महिलांच्या हातात 'भाजप के दरिंदो से बेटी बचाव', 'बलात्कारी विधायक को फांसी दो', 'मोदी योगी की सरकार बंद करो यह अत्याचार', असे फलक होते. यावेळी अनेकांनी हातात पेटत्या मेणबत्त्या होत्या. मोर्चात शेख यांच्यासह अनिता अवस्थी, फैजुल्ला रिजवान, जैबुन्निसा मुस्तफा, नूरजहा मुस्तफा, फातमा हरून आदींसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस कमिटीत प्रतिमापूजन

$
0
0

काँग्रेस कमिटीत प्रतिमापूजन (फोटो)

नाशिक : काँग्रेस कमिटीत शहर काँग्रेस आणि महिला काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत प्रत्यक्षात येण्याच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. सध्या देशात निर्माण झालेल्या जातीपातीच्या राजकारणाने देशाचे नुकसान होत असल्याचे मत काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी व्यक्त केले. शहराध्यक्ष शरद आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सचिव अश्विनी बोरस्ते, महिला शहराध्यक्षा वत्सलाताई खैरे,ज्युली डिसूझा, चारुशीला काळे, लक्ष्मण जायभावे, बबलू खैरे, उद्धव पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् सुटला वाजवडचा पाणीप्रश्न

$
0
0

सोशल नेटवर्किंगकडून पाणी प्रकल्पाचे लोकार्पण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियानांतर्गत पेठ तालुक्यातील वाजवड गावाला टँकरमुक्त करणारी पाणी पुरवठा योजना गावकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाड्याचा पाणी प्रश्न सोडविल्यानंतर पेठ तालुक्यातील वाजवड गावाचे ग्रामस्थ फोरमच्या पदाधिकाऱ्यांना भेटले आणि गावाची समस्या मांडली. त्यानंतर गावाची प्रत्यक्ष पाहणी करून फोरमच्या सदस्यांनी फेब्रुवारीत वाजवडचे काम हाती घेतले. अतिशय दुर्गम भागात असलेल्या दरीतील विहिरीपर्यंत वीज पोहोचवण्याचे तसेच डोंगर चढणीतून पाइपलाइन आणण्याचे काम करून अखेर वाजवडकरांच्या दारात पाणी पोहोचविण्यात सोशल फोरमला यश मिळाले. या प्रकल्पाचे गावातील ज्येष्ठ महिलांच्या  हस्ते लोकार्पण करण्यात आले.     

अतिशय डोंगराळ प्रदेशात वसलेले वाजवड हे गाव उंचावर वसलेले आहे. पाण्यासाठी गावात प्रचंड हाल आहेत. कधीतरी टँकर येतो. दरीत असलेल्या विहिरीतून डोंगर पायवाटेवरून पाणी आणावे लागते. ही परिस्थिती पाहून इंजिनिअर प्रशांत बच्छाव आणि भूगर्भ शास्रज्ञ डॉ. जयदीप निकम यांनी त्या विहिरींची पाणी क्षमता तपासली. आणि तेथून पाइपलाइनने गावात पाणी आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावात पाण्याची टाकी बांधण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने घेतली. सोशल मीडियावर गावाची परिस्थिती पोस्ट करताच प्रतिसाद मिळाला. डॉ. अप्पासाहेब पवार, डॉ. पंकज भदाणे, डॉ. विकास गोर्हे, डॉ. आनंद तांबट, डॉ. रवींद्र शिवदे यांनी ५० हजार रुपयांची मदत दिली. त्यानंतर डॉ. माधवी गोरे मुठाळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबई येथील एम. जी. एम. मेडीकल कॉलेजच्या १९९८ बॅचने एक लाख रुपये दिले. उर्वरित निधी सोशल नेटवर्कर्सच्या देणगीतून उभा राहिला. अशा प्रकारे केवळ अडीच लाख रुपयांत वाजवडचा पाणीप्रश्न सुटला.

सोशल नेटवर्कींग फोरम सातत्याने आदिवासी ग्रामीण भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवत आहे. लोकसहभाग वाढल्यास अजून काही गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचा आमचा मनोदय आहे.

प्रशांत बच्छाव,

सदस्य, सोशल नेटवर्कींग फोरम.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयुक्त, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेहरू गार्डन परिसरातील व्यावसायिकांना हटवू नये, असे कोर्टाचे आदेश असताना महापालिकेने १२ एप्रिल रोजी कारवाई केली. यामुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाला असून, आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी श्रमिक हॉकर्स सेनेने केली आहे. मागणीचे निवेदन भद्रकाली पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.

शहरात सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू असून, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बंदोबस्तात नेहरू गार्डन येथील तीन हातगाड्या व इतर साहित्य जप्त केले. या वेळी महापालिकेचे विभागीय अधिकारी नितीन नेर, जयश्री सोनवणे यांच्यासह ५० कर्मचारी होते. मात्र, या कारवाईमुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा दावा श्रमिक हॉकर्स सेनेचे अध्यक्ष सुनील बागूल यांनी केला आहे. २०१७ मध्ये मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या एका रिट पिटिशनमध्ये हायकोर्टाने या व्यावसायिकांना नैसर्गिक बाजारपेठ असल्याने हटवू नये, असे आदेश पारित केले होते. महापालिकेने स्ट्रीट वेंडर्स अॅक्ट २०१४ आणि प्रोटेक्शन ऑफ लाइव्हलिहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट अॅक्ट व्हेडिंग नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या कारवाईमुळे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून, महापालिकेने या प्रकरणी फेरीवाला समितीलाही विश्वासात घेतले नव्हते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांसह अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, पश्चिम, तसेच पूर्व विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बागूल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेने या प्रकरणी भद्रकाली पोलिसांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पन्नास मालमत्तांचा लिलाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बड्या थकबाकीदार मालमत्ताधारकांना आणखी एक झटका देण्याची तयारी सुरू केली असून, जप्तीच्या नोटिसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या पन्नास मालमत्तांचा पहिल्या टप्प्यात जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील जाहीर नोटीस व अधिसूचना दोन दिवसांत काढली जाणार असून, २५ एप्रिल रोजी या मालमत्तांचा लिलाव होणार आहे.

महापालिकेने आतापर्यंत ४१३ बड्या थकबाकीदार मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा दिल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. दरम्यान, काँग्रेस भवनवरही लिलावाची टांगती तलवार असून, थकबाकी भरण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आठवडाभराचा अवधी मागून घेतला आहे. महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करासह पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम तीव्र केली होती. जवळपास ९० हजार थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्याच्या नोटिसा दिल्या असून, बड्या थकबाकीदारांची थेट मालमत्ताच जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत प्रथमच मालमत्ता कराची थकबाकी ९० कोटींच्या आसपास वसूल झाली आहे. नियमित मालमत्ता कर भरणाऱ्यांनी थकबाकी भरली असली, तरी वर्षानुवर्षे नोटिसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर महापालिकेने डोळे वटारले होते. नोटिसा बजावूनही दाद न देणाऱ्या या बड्या संस्था आणि व्यक्तींच्या मालमत्ता आता थेट जप्त केल्या जात आहेत.

महापालिकेने आतापर्यंत शहरातील ४१३ बड्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. हायकोर्टाच्या आदेशान्वये मालमत्ता 'सील' करता येत नसल्याने त्यांच्यावर जप्तीच्या नोटिसा बजावल्या असून, यामध्ये बड्या संस्था आणि व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांना थकबाकी जमा करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या मुदतीपर्यंत या संस्था किंवा व्यक्तींनी थकबाकी जमा केली नाही, तर थेट या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा कायदेशीर अधिकार महापालिकेला आहे. महापालिकेने या बड्या संस्था, तसेच व्यक्तींना नोटिसा दिल्यानंतर यातील जवळपास शंभर मालमत्ताधारकांनी कोट्यवधींची थकित रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. परंतु, अजूनही मोठ्या प्रमाणावर बडे थकबाकीदार असल्याने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया महापालिकेच्या मूल्य व कर निर्धारण विभागाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जप्त केलेल्या ४१३ पैकी शहरातील पन्नास मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याची अधिसूचना महापालिका दोन दिवसांत काढणार आहे. येत्या २५ तारखेला या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.

महापालिकाच घेणार कब्जा!

मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्यात येणाऱ्यांमध्ये मोठ्या संस्थांसह शहरातील बड्या व्यक्तींचाही समावेश आहे. मालमत्ता जप्त केली, तरी त्यासाठी लिलावात बोली येत नसल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पुढील पर्याय म्हणून महापालिकेकडून अशा मालमत्तांवर स्थायी समितीच्या अधिकारात महापालिकेचे नाव लावून एक रुपया बोली लावून त्यांचा कब्जा घेतला जाणार आहे. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे.

काँग्रेस भवनवरील संकट कायम

महापालिकेने जप्तीची कारवाई केल्यानंतर 'सावाना'ने आपली थकबाकी भरली आहे. परंतु, काँग्रेस भवनकडे अजूनही २६ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या २७ मार्च रोजी काँग्रेस भवनावरही जप्तीची कारवाई करण्यात आली होती. काँग्रेस भवनलाही २१ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, तोही पूर्ण होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात काँग्रेस भवनाचाही लिलाव करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिकेकडे पुन्हा आठवडाभराची मुदत मागितली आहे. त्यासंदर्भातील पत्रही उपायुक्तांना देण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास पहिल्या टप्प्यातील लिलावातून काँग्रेस भवन सुटले असले, तरी त्यावरील लिलावाचे संकट कायम आहे.

--

जप्त केलेल्या मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्यासाठी २१ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यातील काहींनी थकबाकी भरली आहे. परंतु, अजूनही काही थकबाकीदारांनी थकबाकी जमा न केल्याने पहिल्या टप्प्यात येत्या २५ एप्रिल रोजी पन्नास मालमत्तांचा जाहीर लिलाव केला जाणार आहे.

-रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त, कर संकलन व मूल्यनिर्धारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोलो बोलो जय भीम...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डीजेवर वाजविली जाणारी भीमगीते... त्यावर बेभान होऊन नाचणारे अबालवृद्ध... एकच साहेब बाबासाहेब... बोलो बोलो जय भीम... अशा घोषणा देत भीमसैनिकांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. आकर्षक चित्ररथ, जिवंत देखावे अन् डोळ्यांचे पारणे फेडणारी रोषणाई यामुळे मिरवणुकीची रंगत वाढली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शहर आणि जिल्ह्यात जल्लोषात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला, तसेच प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले भीमसैनिक आणि आणि निळ्या साड्यांतील महिला, युवती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून, तसेच होर्डिंग्जद्वारे शुभेच्छा देत जयंतीचा आनंद द्विगुणित करण्यात येत होता.

दर वर्षीप्रमाणे यंदाही शहरातील पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. वाकडी बारव येथून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार जयंत जाधव, प्रा. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेनेचे महेश बडवे यांच्यासह लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी साडेपाचला मिरवणुकीला सुरुवात झाली. आकर्षक चित्ररथ, त्यावर केलेली नेत्रदीपक रोषणाई, डीजेचा दणदणाट, त्यावर थिरकणारी तरुणाई यामुळे यंदाही जल्लोषमय वातावरण पाहावयास मिळाले.

चित्ररथांनी वेधले लक्ष

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठा राजवाडा येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीसाठी २० मंडळांनी नोंदणी केली होती. गतवर्षी हीच संख्या २३ होती. फुले, तसेच रोषणाईने सजविलेले चित्ररथ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. त्यावर भगवान गौतम बुद्ध, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. वाकडी बारवमार्गे निघालेल्या या मिरवणुकीमध्ये शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. डोक्यावर निळा फेटा, सफेद सलवार कुर्ता, निळ्या, तसेच पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करून महिला व तरुणी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या. ढोल-ताशांचा गजर अन् डीजेच्या दणदणाटात मिरवणूक मार्गस्थ झाली. भद्रकाली, मेनरोडमार्गे शालिमारला पोहोचलेल्या या मिरवणुकीचा रात्री उशिरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ, निरीक्षक मंगलदास सूर्यवंशी आदींनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले होते.

या मंडळांनी नोंदवला सहभाग

मिरवणुकीमध्ये भीमशक्ती मित्रमंडळ, राहुल मित्रमंडळ, धम्मजागृती सांस्कृतिक युवा मंच, सम्राट बहुउद्देशीय संस्था, विद्रोही दलित पँथर, राहुलवाडी सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ, उत्कर्षनगर मित्रमंडळ, संत कबीरनगर सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ, शिवशक्ती मित्रमंडळप्रणीत त्रिशरण मित्रमंडळ, श्री बालाजी मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ, शिवराज मित्रमंडळ, दीपक डोके फ्रेंड सर्कल गंजमाळ, त्रिशरण सांस्कृतिक मंडळ, भीमक्रांती मित्रमंडळ आदी सहभागी झाली होती. काही रथांवरील डॉ. आंबेडकरांची, तर काही रथांवरील गौतम बुद्धांची मोहक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आकर्षक चित्ररथांसाठी यंदा प्रथमच पोलिसांच्या वतीने बक्षीसही ठेवण्यात आले होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अतिक्रमण निर्मूलन कारवाई करीत गरिबांना उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन करणारा चित्ररथावरील देखावाही नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. सहभागी मंडळांपैकी आठ मंडळांनी डीजे लावला होता. वीजतारांना स्पर्श होऊन अनुचित घटना घडू नये याकरिता वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा-कॉलेजांमध्ये धर्माधिष्ठित शिक्षण देण्याची गरज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आजच्या तरुण पिढीने राष्ट्राचा विचार करावा, असे वाटत असल्यास शाळा-कॉलेजांमध्ये धर्माधिष्ठित शिक्षण दिले पाहिजे. आज कुणी राष्ट्राचा विचार करावयास तयार नाही. देवाजवळ मागताना मी, माझे या विषयावरच सर्व जण मागत असतात. मात्र, कधी तरी माझा हिंदू धर्म शिखरावर जावा म्हणून कुणी मागते का? त्यासाठी अभ्यासक्रमात हे शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन नारदीय कीर्तनकार विवेक नरहरी गोखले यांनी केले.

श्रीरंग अवधूत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित प. पू. भाऊ महाराज स्वर्गे व्याख्यानमालेप्रसंगी 'श्री दत्त संप्रदाय' या विषयावर गोखले बोलत होते. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ही व्याख्यानमाला सुरू आहे.

गोखले म्हणाले, की परमेश्वराने प्रत्येकाला विहित कर्म दिलेले आहे. त्यानुसारच आचरण व्हायला हवे. हे विहित कर्म करणे म्हणजे धर्म. कर्तव्याचे पालन म्हणजे धर्म. आणि कर्म कशासाठी तर चित्त शुद्ध व्हावे म्हणून. अध्यात्म हे अदृश्यरीत्या पाठिंबा देण्यासाठी आहे. सीमेवर जवान लढतात; परंतु त्यांच्या पाठीशी अध्यात्म ठामपणे असते.

चैतन्याविषयी बोलताना गोखले म्हणाले, की चैतन्य अनेक जन्माच्या व कर्मांच्या संस्कारामुळे काळवंडलेले असते. आतमध्ये नित्य मुक्त चैतन्य आहे; परंतु ते झाकोळले गेले आहे. त्यामुळे चित्ताच्या शुद्धीसाठी उपासना केली पाहिजे. जपजाप्य, तीर्थाटन हे चित्ताच्या शुद्धीसाठी असते. परमार्थ हा उथळपणे करण्याचा विषय नाही. तो अतिसूक्ष्मपणे हाताळण्याचा विषय आहे. गुरूस्थानाविषयी बोलताना गोखले म्हणाले, की आपण जेव्हा एखाद्या गुरूस्थानावर जातो तेव्हा आपण त्यांना पाहू शकलो नाही तरी ते आपल्याला पाहत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे आशीर्वाद मागून घ्यावयाचा असतो. परमार्थासाठी तरलता पाहिजे, सूक्ष्मता पाहिजे, अधिकाधिक सूक्ष्माकडे गेले पाहिजे, असा विचार केल्यानंतर आपल्याला पहिल्या पायरीपर्यंत जाता येते.

आजचे व्याख्यान

विषय : श्री दत्त महत्त्व

वक्ते : विवेक नरहरी गोखले

स्थळ : डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाविष्कारांनी बहरला तामिळ संगम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि...' या गणेशवंदनेस भरतनाट्यमच्या सादरीकरणाची साथ देत ज्योती प्रिया यांनी सादर केलेला नृत्याविष्कार, तामिळनाडूच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलाविष्कार आणि तामिळी हास्य कलाकारांनी अफलातून सादरीकरणाने आणलेली रंगत, अशा वातावरणामुळे 'तामिळ संगम' हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी उत्तरोत्तर बहरत गेला.

जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, नवी मुंबईचे आयुक्त एन. रामास्वामी, उपायुक्त अंदू सेल्वम, संदीप विद्यापीठाचे कुलगुरू एन. रामचंद्रन, कर्नल पेरियार स्वामी प्रमुख पाहुणे होते. तामिळ नववर्षाच्या स्वागतासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाशिकमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून तामिळी कुटुंब निवासाला आहेत. या सर्व कुटुंबांचे एकत्रीकरण व्हावे, परस्पर संवाद वाढावा या उद्देशाने तामिळ बांधवांच्या वतीने तामिळ संगम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम झाला. शहर आणि जिल्हाभरातून तामिळ बांधवांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. या वेळी तामिळनाडूमधील विख्यात हास्य कलाकार वाडिवेल गणेशन यांच्या हास्यविनोदाच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

नाशिकच्या विकासात योगदान

पर्यावरण, प्रशासन, उद्योग, सामाजिक क्षेत्र आदी क्षेत्रांमध्ये विशेष योगदान तामिळी बांधवांनी देऊन नाशिकच्या विकासालाही हातभार लावल्याचे गौरवोद्गार या वेळी उपस्थित मान्यवरांनी काढले. नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी तामिळ बांधवांनी विशेष प्रयत्न केले आहे. याशिवाय येथील औद्योगिक विकासासाठीही त्यांनी विशेष योगदान दिल्याचा उल्लेख मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिरत्न जयंती

$
0
0

नाशिक : स्टेप फाऊंडेशन, नाशिक व छत्रपती विचार मंच यांच्यामार्फत पाटील पार्क, सातपूर- अंबड लिंक रोड, चुंचाळे शिवार येथे समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम झाला. समाजातील जातीय तेढ कमी होऊन सर्वांनी एकोप्याने राहावे व समाजातील अंधश्रद्धा झुगारून सशक्त समाज निर्माण व्हावा यावर शाहिरी गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भ्रूणहत्या, सर्वसामान्यांना शिक्षण बेरोजगारी या सामाजिक विषयावर भाष्य करणारी गीते याप्रसंगी साजरी करण्यात आली. गोकुळ मेदगे, सचिव दीपक देवरे, राहुल भगुरे, विशाल गायकवाड, सनी बंदावणे, गोल्डी पाटील, रोशन मेदगे, आकाश काळे, तुषार बंदावणे, बबलू जगताप, गणेश नवगिरे, बबलू जगताप, राहुल अहिरे, सचिन हागवणे, नीलेश हागवणे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख महाविद्यालयातडॉ. आंबेडकर जयंती

$
0
0

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'आधुनिक भारताच्या विकासाचे प्रतिमान' या विषयावर प्रा. डॉ. विजयकुमार वावळे यांचे व्याख्यान झाले.

प्रा. भास्कर नरवटे यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब जनसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून सर्वांनी त्यांचे लेखन वाचले पाहिजे. त्यांचे विचार जाणून घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ. विजयकुमार वावळे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. आंबेडकर हे एक विकासपुरुष होते. डॉ. आंबेडकरांनी प्रतिगामी पद्धतीने कररचना निर्माण केली होती, असे विचार त्यांनी मांडले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना पांढरे अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. संदीप गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. जीवन सोळंके यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर, इगतपुरीत बेकायदा मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ड्राय डे घोषित झाल्याची संधी साधत विक्रीसाठी बेकायदा मद्यसाठा साठवून ठेवणाऱ्या इगतपुरी आणि सातपूरमधील तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. या कारवाईत मारुती कारसह तब्बल दोन लाखांहून अधिक देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई भरारी पथक क्र. १ ने केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सर्व पथके सतर्क केली होती. त्यानुसार भरारी पथक क्र. १ चे निरीक्षक प्रवीण मंडलिक यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी बुधवारी इगतपुरी तालुक्यातील गंभीरवाडी येथे छापा टाकला. त्या वेळी भाऊराव पिचड याच्या घरात तब्बल ७० हजारांचा बेकायदा विदेशी मद्यसाठा आढळला. दुसऱ्या घटनेत सातपूर परिसरातील प्रबुद्धनगर येथे मयूर नामदेव लोहारे आणि वैभव बाळू साबळे (दोघे रा. वाल्मीकनगर) या दोघांना बेकायदा मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हे दोन्ही संशयित शुक्रवारी कारमधून मद्याची वाहतूक करताना आढळले. त्यांच्या ताब्यातून कार आणि मद्यसाठा असा एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, जवान विष्णू सानप, वीरेंद्र वाघ, विलास कुवर, सुनील पाटील, विजेंद्र चव्हाण, गौरव तारे आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भवती महिला कैदी रुग्णालयातून पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मालेगाव येथील शायदा शफिक पठाण (वय ३०) या गर्भवती महिलेला पोट दुखत असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत ही महिला शुक्रवारी दुपारी सिव्हिलमधून फरार झाली असून, तिची सर्वत्र शोधाशोध सुरू आहे. तिचा शनिवारी सायंकाळपर्यंत ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी या प्रकरणी प्रसूतितज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेला माहिती दिली असून, तिचे छायाचित्रही ठिकठिकाणी वितरित करण्यात आले आहे.

मालेगाव येथील शायदा आणि तिच्या पतीवर हत्येचा आरोप असून, नोव्हेंबर २०१७ मध्ये दोघांना अटक करण्यात आली होती. अटक झाली त्या वेळी शायदा गर्भवती होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे मालेगावच्या पवारवाडी पोलिसांनी या दोघांना १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नाशिक सेंट्रल जेलमध्ये धाडले. शायदाला अरबाज हा दोन वर्षांचा मुलगा आहे. शायदाने १२ एप्रिल रोजी पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यानुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जेलमध्ये येऊन तिची तपासणी केली. गर्भपिशवीचे तोंड उघडण्यास सुरुवात झाली असल्याने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार जेल प्रशासनाने शायदा आणि अरबाजला पाठवले. अॅडमिट झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे डॉक्टरांनी शायदाचे सिझर करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया कधी करायची हे १३ एप्रिल रोजी निश्चित होणार होते. दरम्यान, शायदा सतत अरबाजबरोबर खेळत होती. वार्डाबाहेर जाणाऱ्या अरबाजाला ती परत घेऊन येत होती. बराच वेळ हा खेळ सुरू होता. सुरुवातीला लक्ष देणाऱ्या जेल प्रशासनाच्या महिला कर्मचारी यामुळे थोड्या निर्धास्त झाल्या. याचाच फायदा उचलत शायदा अरबाजला घेऊन पसार झाली. या प्रकरणी छाया भाकरे या तुरुंग रक्षक महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले, की तिची परिस्थिती फार दूर जाण्यासारखी नाही. कधीही तिचे बाळंतपण होऊ शकते. यामुळे गायनॅकोलॉजिस्ट सोसायटीला याबाबत माहिती देण्यात आली असून, विविध हॉस्पिटलमध्ये तिचा तपास सुरू आहे. या प्रकरणी मालेगावच्या पवारवाडी पोलिस स्टेशनलाही माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमाला विरोध, तरुणीच्या कुटुंबावर हल्ला

$
0
0

नाशिकरोड : प्रेमसंबंधांना विरोधाच्या कारणावरून सिन्नर फाटा येथील दोन कुटुंबांत वाद होऊन तरुणीच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींनी हल्लेखोरांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सिन्नर फाटा येथील स्टेशनवाडीत किराणा दुकान चालवितात. त्यांच्या शेजाऱ्यांच्या नातेवाइकासोबत दोन आठवड्यांपूर्वी फिर्यादीची मुलगी गेली होती. नंतर फिर्यादीने तिला परत आणले होते. त्यावरून शनिवारी मध्यरात्री दीड वाजता हाणामारीचा प्रकार घडला. तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकरांना अपेक्षित घटना लागू झाल्यास देश महासत्ता

$
0
0

डॉ. संजय जाधव यांचे प्रतिपादन

म. टा.खास प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी घटना लागू झाल्यास देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. अजूनही आपण जाती वाटलेलो आहोत, बलात्कार झालेल्या स्त्रीची जात पाहिल्यानंतर मोर्चे कुणी काढायचे हे ठरते, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे, असे विचार डॉ. संजय जाधव यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या डॉ. आंबेडकर जयंतीप्रसंगी व्यक्त केले.

कादंबरीकार राकेश वानखेडे, कवी अॅड. अशोक बनसोडे, कवी काशिनाथ वेलदोडे प्रमुख पाहुणे होते. या वेळी राकेश वानखेडे म्हणाले, की महापुरुषांच्या जीवनातील ठळक घटना घेऊन त्यांचे चरित्र कथन केले जाते. मात्र, महापुरुष त्याहून व्यापक विचार व कार्य करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र समकालाशी संबंधित सांगण्याची आज सर्वाधिक अपेक्षा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी ती गोष्ट महत्त्वाची ठरेल.

ग्रंथ सचिव बी. जी. वाघ यांनी प्रास्ताविक केले. सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, सहाय्यक सचिव अॅड. भानुदास शौचे, अर्थसचिव शंकरराव बर्वे, बालभवन प्रमुख संजय करंजकर, वसंत खैरनार, उदयकुमार मुंगी, देवदत्त जोशी, माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, प्रभाकर धात्रक, शशिकांत राऊत, शारदा गायकवाड, सुधीर खैरनार, श्याम पाटील, प्रशांत केंदळे, श्याम दशपुत्रे, श्यामराव वराडे, नंदू वराडे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती निवारणासाठी आराखडे तयार करण्याचे निर्देश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा उन्हाच्या झळा अधिक तापदायक ठरतील असे वर्तविले जात असले तरी पाऊसही जोरदार होईल, असा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. सरासरीएवढा किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासह दरडप्रवण क्षेत्रही निश्‍चित करण्याचे निर्देश तालुका स्तरावर देण्यात आले आहेत.

नाशिकवर सर्व ऋतू मेहेरबान असतात हे सातत्याने अनुभवास येते. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रचलित असलेल्या नाशिकमध्ये उन्हाळाही तेवढाच तापदायक असतो. मुसळधार पाऊस नाशिककरांना झोडपून तर काढतोच; परंतु पुराच्या रूपाने निसर्गाचे रौद्र रूपही दाखवून देतो.

गेली दोन वर्षे जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून, त्याने सरासरीही ओलांडली आहे. गेल्या वर्षी ११३ टक्के एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता. यंदाही सरासरीएवढा किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात नाशिकसह, दिंडोरी, निफाड या तालुक्यांना पुराचा अधिक धोका असतो. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांसह अन्य तालुक्यांमध्येही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास काय खबरदारी घ्यावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तीन पानाची चेकलिस्टच तालुक्यांना वितरित केली आहे. त्यानुसार तालुका प्रशासनाला माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये बाधित होऊ शकणारी पूरप्रवण गावे, वाड्या- वस्त्यांची यादी करावी, तेथील रहिवाशांची माहिती संकलित करावी, या भागांना जोडणारे कच्चे व पक्के रस्ते कोणते, रस्त्यांवरील पूल यांचीही सद्य:स्थिती या आराखड्यांमध्ये नमूद करावी लागणार आहे. आपत्ती निवारणासाठी तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीची यादीही आराखड्यामध्ये समाविष्ट करणे अभिप्रेत आहे. अशी साधनसामग्री हाताळू शकतील अशा जवळपासच्या तज्ज्ञ व्यक्तींची नाव, पत्ता व त्याचा संपर्क क्रमांकही आवर्जून घ्यावा लागणार आहे.

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा निश्चिती

पूरबाधित ठिकाणांवरील रहिवाशांसाठी सुरक्षित निवारे, त्यांच्यासाठी जेवण, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणे, आपत्तीत हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅडसाठीची जागा निश्‍चित करणे, पूरस्थितीत वैद्यकीय मदत देणारे पथक, जीवरक्षक, शोध व बचाव पथके तयार करण्याबाबतही तालुका स्तरावर सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १० जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. ही शक्यता गृहीत धरून तालुका प्रशासनाला आराखडे सादर करण्यासाठी मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त आराखड्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख रामदास खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते बदल केले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गोडावूनला मालेगावी आग

$
0
0

लाखोंचे साहित्य खाक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील दोन वेगवेगळ्या भागात शनिवारी मध्यरात्री व दुपारी लागलेल्या आगीच्या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. सुदैवाने या दोन्ही आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्नीशमन दलाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

शहरातील सटाणा नाका भागातील शिवरोडवरील हरी ओम टेंट हाऊसच्या गोडावूनला शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता भीषण आग लागली. अश्विनी अनिल भावसार यांच्या मालकीचे हे गोडावन असून आजूबाजूला अनेक रहिवासी असल्याने आग पसरण्याची भीती होती. रात्री मोठे धुराचे लोट व आग दिसू लागल्याने हा प्रकार नागरिकांना लक्षात आला. गोडाऊनमध्ये नुकतेच लग्नसमारंभसाठीचे सजावट साहित्य खरेदी करून ठेवण्यात आले होते. मात्र भीषण आगीत हे सगळे साहित्य जाळून खाक झाले. सुमारे २५ ते ३० लाखाचे साहित्य या आगीत जाळून खाक झाल्याचा अंदाज आहे.

अग्निशामक विभागास माहिती मिळताच आग विझविण्यासाठी ४ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक अधिकारी संजय पवार यांच्यासह शकील अहमद, मनोहर तिसगे, शफिक खान, जीवन नाहीरे, प्रकाश भोसले आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पहाटे साडे चार वाजता अग्निशामक दलास आग विझविण्यात यश आले. यासाठी ४ बंबांनी १० ते १२ फेऱ्या केल्या. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गोडावूनही खाक

सटाणा नाका परिसरातील आग आटोक्यात आली तोच शनिवारी दुपारी मुंबई आग्रा महामार्गावर असेलल्या स्टार हॉटेल मागील प्लास्टिक गोडावूनला आग लागली. इरफान खान नसीम खान असे यांचे हे गोडावून आहे. गोडावून बाहेरील ओपन स्पेसमध्ये असलेल्या प्लास्टिकला आग लागल्याने धुराचे लोट आकशात दिसत होते. अग्निशामक विभागास माहिती मिळताच आग विझवण्यासाठी बंब दाखल झाले. सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images