Tweet: @ArvindJadhavMT
नाशिक: उमेदीच्या काळात युवा मुलाचे आकस्मात निधन झाले. मुलाचा विरह पित्याला सहन होणारा नव्हता. पण, आपल्या वाट्याला आलेल्या दु:खापेक्षा इतरांचे दु:ख मोठे असल्याची जाणीव मनात ठेवणाऱ्या सिंधू काकडे यांनी स्वत:ला शिक्षणात झोकून दिले. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या काकडे यांनी पतीच्या इच्छेसाठी शिक्षण पूर्ण तर केलेच, पण महाराष्ट्रात प्रथमच नॅबसारख्या संस्थेवर पीएचडी करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला.
तो काळ १९६० मधील. शिक्षणाचा आणि आयुष्य जगण्याचा तसा कोणताही संबंध नसलेल्या विश्वात विदर्भातील सध्याच्या वाशीम जिल्ह्यात एका छोट्याशा गावात सिंधू इंगोले यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पाचवी, सातवी आणि नंतर नववीपर्यंत अनेकदा सिंधू इंगोले यांची शाळा सुटावी म्हणून प्रयत्न झाले. शेवटी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सिंधू यांचा इंजिनीअर असलेल्या प्रल्हाद काकडे यांच्याशी विवाह ठरला. शिक्षणाचा एक टप्पा पार करून काकडे यांनी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली. सिंधू यांच्या शिक्षणाबाबत काहीतरी चूक झाली याची जाणीव असलेल्या प्रल्हाद काकडे यांची काही वर्षातच नाशिकला बदली झाली. आपण इंजिनीअर तर आपली पत्नी शालेय शिक्षण पूर्ण न झाल्याची खंत कुठेतरी काकडे यांच्या मनात होती. त्यामुळे नाशिकला येताच सिंधू काकडे यांचे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षण सुरू झाले. अपत्य संगोपन आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत काकडे यांनी बी. ए., एम. ए पूर्ण करून एम. फिलची तयारी सुरू केली. याच दरम्यान त्यांच्या २३ वर्षांच्या मुलाचा आकस्मात मृत्यू झाला. ही घटना काकडे कुटुंबास हादरवून सोडणारी होती. तरुण मुलाच्या अचानक मृत्यूचा परिणाम प्रल्हाद काकडे यांच्यावर झाला. दोन-तीन वर्षांत त्यांचाही कॅन्सरने मृत्यू झाला. दोन मुली आणि सिंधू काकडे यांची आयुष्याची लढाई यानंतर अधिक तीव्र झाली. शोक करीत बसले तर मुलींचे भविष्य धोक्यात येईल, याची जाणीव मनात ठेवत सिंधू काकडे यांनी पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा तसेच नियतीने आपल्यापेक्षा जास्त दु:ख दिलेल्यांना मदतीचा हात देण्याचे ठरविले. आज त्या एसएमआरके कॉलेजमध्ये समाजशास्त्र या विषयाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून, सावित्री फाउंडेशन या संस्थेमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. समाजात मोकळ्या मनाने फिरले की आपल्यापेक्षा इतरांचे दु:ख मोठे वाटायला लागते. दु:खाचा वर्षाव फक्त आपल्यावर होत नाही ही, जाणीव झाली की जीवन जगणे सोपे वाटायला लागते, ही डॉ. प्रा. काकडे यांची विचारधारणा नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
--
पतीच्या इच्छेसाठी
पतीची इच्छा होती की, काकडे यांनी पी. एचडी करावी. पतीच्या निधनांनंतर काकडे यांनी 'नॅब' या संस्थेवर पीएचडी करण्यास सुरुवात केली. पतीची इच्छा पूर्ण करताना नॅबवर पीएचडी करणाऱ्या महाराष्ट्रातील त्या एकमेव ठरल्या. सध्या त्या अंध व्यक्तींना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी सुरू असलेल्या बी. एड. संस्थेच्या चेअरपर्सन आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट