Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आकांक्षापुढती गगन ठेंगणे- सिंधू काकडे

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: उमेदीच्या काळात युवा मुलाचे आकस्मात निधन झाले. मुलाचा विरह पित्याला सहन होणारा नव्हता. पण, आपल्या वाट्याला आलेल्या दु:खापेक्षा इतरांचे दु:ख मोठे असल्याची जाणीव मनात ठेवणाऱ्या सिंधू काकडे यांनी स्वत:ला शिक्षणात झोकून दिले. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या काकडे यांनी पतीच्या इच्छेसाठी शिक्षण पूर्ण तर केलेच, पण महाराष्ट्रात प्रथमच नॅबसारख्या संस्थेवर पीएचडी करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला.

तो काळ १९६० मधील. शिक्षणाचा आणि आयुष्य जगण्याचा तसा कोणताही संबंध नसलेल्या विश्वात विदर्भातील सध्याच्या वाशीम जिल्ह्यात एका छोट्याशा गावात सिंधू इंगोले यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पाचवी, सातवी आणि नंतर नववीपर्यंत अनेकदा सिंधू इंगोले यांची शाळा सुटावी म्हणून प्रयत्न झाले. शेवटी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सिंधू यांचा इंजिनीअर असलेल्या प्रल्हाद काकडे यांच्याशी विवाह ठरला. शिक्षणाचा एक टप्पा पार करून काकडे यांनी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली. सिंधू यांच्या शिक्षणाबाबत काहीतरी चूक झाली याची जाणीव असलेल्या प्रल्हाद काकडे यांची काही वर्षातच नाशिकला बदली झाली. आपण इंजिनीअर तर आपली पत्नी शालेय शिक्षण पूर्ण न झाल्याची खंत कुठेतरी काकडे यांच्या मनात होती. त्यामुळे नाशिकला येताच सिंधू काकडे यांचे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षण सुरू झाले. अपत्य संगोपन आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत काकडे यांनी बी. ए., एम. ए पूर्ण करून एम. फिलची तयारी सुरू केली. याच दरम्यान त्यांच्या २३ वर्षांच्या मुलाचा आकस्मात मृत्यू झाला. ही घटना काकडे कुटुंबास हादरवून सोडणारी होती. तरुण मुलाच्या अचानक मृत्यूचा परिणाम प्रल्हाद काकडे यांच्यावर झाला. दोन-तीन वर्षांत त्यांचाही कॅन्सरने मृत्यू झाला. दोन मुली आणि सिंधू काकडे यांची आयुष्याची लढाई यानंतर अधिक तीव्र झाली. शोक करीत बसले तर मुलींचे भविष्य धोक्यात येईल, याची जाणीव मनात ठेवत सिंधू काकडे यांनी पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा तसेच नियतीने आपल्यापेक्षा जास्त दु:ख दिलेल्यांना मदतीचा हात देण्याचे ठरविले. आज त्या एसएमआरके कॉलेजमध्ये समाजशास्त्र या विषयाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून, सावित्री फाउंडेशन या संस्थेमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. समाजात मोकळ्या मनाने फिरले की आपल्यापेक्षा इतरांचे दु:ख मोठे वाटायला लागते. दु:खाचा वर्षाव फक्त आपल्यावर होत नाही ही, जाणीव झाली की जीवन जगणे सोपे वाटायला लागते, ही डॉ. प्रा. काकडे यांची विचारधारणा नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे.

--

पतीच्या इच्छेसाठी

पतीची इच्छा होती की, काकडे यांनी पी. एचडी करावी. पतीच्या निधनांनंतर काकडे यांनी 'नॅब' या संस्थेवर पीएचडी करण्यास सुरुवात केली. पतीची इच्छा पूर्ण करताना नॅबवर पीएचडी करणाऱ्या महाराष्ट्रातील त्या एकमेव ठरल्या. सध्या त्या अंध व्यक्तींना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी सुरू असलेल्या बी. एड. संस्थेच्या चेअरपर्सन आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळीराजासाठी होळी कडू!

$
0
0

पंचवटी

होळी आणि धुलीवंदन सणांना मुंबई आणि इतर बाजारपेठा बंद असल्याने नाशिक बाजारात आवक कमी असूनही गुरुवारी (दि. १) रोजी भाजीपाल्याचे दर घसरले. दुपारच्या लिलावास आलेल्या फळभाज्यांचे घाऊक दर १ ते २ रुपये किलो इतके खाली आले. भाज्यांचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. २८) रोजी दुधी भोपळा बाजारातच फेकून दिला होता.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई आणि गुजरातला भाजीपाला मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येतो. होळीच्या सणामुळे या भागातील भाजीबाजार बंद असल्याने येथे शेतमाल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांनी खरेदी करणे बंद केलेली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला असून तीन दिवसांपासून दरात घसरण होत गेली. त्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाला पिकण्याचे वेग वाढलेला असल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक वाढत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

होळीच्या सणामुळे मजूर आपापल्या गावी परतले आहेत. अशा परिस्थितीत शेतातील भाजीपाला काढण्याची शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. भाजीपाल्याचा उत्पादन खर्च भरून निघणे तर सोडाच पण शेतापासून बाजारापर्यंत भाजीपाला वाहतुकीचा खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

भाज्यांना रुपयाचा भाव


फळभाज्यांच्या दुपारच्या लिलावात १ रुपया प्रति किलो असा दर फळभाज्यांना मिळाला. टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, दुधी, भोपळा यांचे दर बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. त्यापेक्षा भाज्या शेतातच सडू दिल्या असत्या तर बरे झाले असते असे शेतकरी म्हणत होते.

भाजीपाल्याचे गुरुवारचे दर (रुपयांमध्ये)

भाजीपाला .............आवक (क्विंटलमध्ये)............दर प्रति किलो

टोमॅटो ...............७५५.....................................१ ते ४

दुधीभोपळा...........६४५.....................................२ ते ४

कोबी...................३८५......................................१ ते ३

फ्लॉवर................२९४.....................................२ ते ४

वांगी..................२३०......................................३ ते ६

ढोबळी.................१७६......................................१२ ते २२

भेंडी....................३८.......................................२८ ते ३३

कारले...................१६......................................२३ ते ४०

दोडका.................१५.......................................२० ते ३०

पिकॅडोर...............१०........................................१२ ते १८

गिलके................१० ......................................८ ते १२

..

पालेभाज्या ......................आवक (जुडी)...........दर (प्रति जुडी)

कोथिंबीर........................४८,०००...................६ ते १५

मेथी ............................१४,६०० ..................२ ते ६

शेपू...............................१३,७००...................४ ते ९

कांदापात......................१२,८००......................४ ते १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची लोकसभा तयारी सुरु

$
0
0

नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून लोकसभेची तयारी सुरू केली असून, त्यासाठी जिल्ह्यातील तीन मतदार संघाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी व माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंतराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी या स्वतंत्र बैठका नाशिकमध्ये होणार आहेत.

बैठकीला शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून सुरुवात होणार आहे. पहिली बैठक चांदवड येथे होणार असून, त्यात दिंडोरी व धुळे मतदार संघाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील येवला, नांदगाव, दिंडोरी, पेठ, निफाड, कळवण, सुरगाणा, चांदवड, देवळा या तालुक्यांसाठी ही बैठक असणार आहे. तर धुळे लोकसभा मतदार संघातील बागलाण व मालेगाव तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक असणार आहे. चांदवड येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात ही बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता नाशिक लोकसभा मतदार संघातील नाशिक शहर व तालुका, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात होणार आहे.

माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्यासह पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंतराव टकले हे देखील या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. या बैठकांना सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’मुळे ९६ टक्के जलपूर्ती

$
0
0

नाशिक

जलयुक्त शिवार योजनेमुळे २०१६-१७ या वर्षी निवडलेल्या विभागातील ९०० पैकी तब्बल ९६ टक्के म्हणजेच ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान आणि नरेगा या योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीच्या संदर्भात विभागीय आयुक्तालयात मावळते विभागीय आयुक्त महेश झगडे बोलत होते. यावेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. जलपूर्ती झालेल्या गावांमधील लोकांचे आयुष्यमानच बदलले. या वर्षीच्या आराखड्यातील नियोजित कामे सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

जलयुक्त शिवार अभियानामुळे टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या वर्षी नाशिक विभागातील ९०० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. या गावांत प्रस्तावित २५ हजार ८०५ इतक्या कामांपैकी ९० टक्के अर्थात २३ हजार ५३५ इतकी कामे पूर्ण झाली. ८६१ गावांची टंचाईतून मुक्तता झाली. पूर्ण झालेल्यापैकी २१,१३६ कामांचे जिओ टॅगिंगचे कामही पूर्ण झाले आहे. या कामांमुळे नाशिक विभागात १ लाख ४१ हजार ८३३ टीसीएम क्षमतेची पाणीसाठा निर्मिती झाली असून त्याद्वारे २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचनासाठी एक पाणी देता येणे शक्य होणार आहे. या कामांवर ४९८ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. पेयजल संबंधी बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांची फेरतपासणी प्रांताधिकाऱ्यांमार्फेत केली जाणार आहे. कमी पावसाच्या क्षेत्रात मजगीच्या कामांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी झगडे यांनी सांगितले.

जलयुक्तचा लेखाजोखा (२०१७-१८)

गावांची निवड : ८४७

प्रस्तावित कामे : २१,३६७

आराखडा निश्चिती :४८९ कोटी रुपये

कार्यारंभ आदेश : ३,५९५ कामे

प्रत्यक्ष सुरुवात : ९७९ कामे

क्षेत्रीय स्तरावर नियोजन

मजगीमुळे रब्बी व उन्हाळी हंगाम असुरक्षित होणार असेल तरीही अशी कामे आता होणार नाहीत. या पुढील वर्षाचा आराखडा व उद्दिष्ट आता शासनाकडून दिले जाणार नाही. क्षेत्रीय स्तरावरच नियोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमविवाहास विरोध, नर्सने केली आत्महत्या

$
0
0

नाशिक: नाशिकमधील अपोलो हॉस्पिटलच्या नर्सिंग हॉस्टेलमध्ये एका २४ वर्षीय नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (गुरूवारी) रात्री घडली. अश्विनी केके असे या नर्सचे नाव असून ती मूळची केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने अश्वनीने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटवरून स्पष्ट होत आहे.

अश्विनी नोकरीनिमित्त गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये राहात होती. गुरुवारी अश्विनीची नाईट शिफ्ट होती. नऊ वाजून गेल्यानंतरही ती न आल्यामुळे मैत्रिणींनी तिच्या रुममध्ये धडक दिली. मात्र मृतावस्थेत पडलेल्या अश्विनीला पाहून त्यांना धक्काच बसला. अश्विनीने मांजाच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

अश्विनीच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटनुसार, अश्विनीचे एका मुलावर प्रेम होते. मात्र त्या मुलाबरोबर लग्न करू नये असे अश्विनीच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. घरच्यांचा लग्नाला नकार असल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे तिने नोटमध्ये नमूद केले आहे. मात्र, आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये असेही अश्विनीने लिहिले आहे.

दरम्यान, नाशिमधील आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी आज आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विज्ञान विद्यापाठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन २७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक घेणार होते. मात्र, चार दिवस उलटूनही अद्याप ही बैठक न झाल्याने या कर्मचाऱ्यांसह सीटू संलग्न कर्मचारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी आंदोलन करून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे.

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. गेल्या पाच ते दहा वर्षांपासून त्यांना सात हजार रुपये पगारावर समाधान मानावे लागत आहे. अल्प पगारात त्यांच्याकडून उच्चस्तरीय दर्जाचे काम करवून घेतले जाते. या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दोन वर्षांपासून कर्मचारी मागण्यांबाबत पाठपुरावा करीत आहेत. मात्र, दखल घेतली जात नसल्याने तीन महिन्यांपासून ते बेमुदत संपावर आहेत. पालकमंत्री महाजन यांची त्यांनी भेट घेतली. मंत्रालयात २७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ प्रशासन आणि संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, चार दिवस उलटूनही ही बैठक झालेली नाही. या निषेधार्थ शनिवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. डी. एल. कराड, अॅड. वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे आदींनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा करीत आहोत. मात्र, सरकार त्याची दखल घेत नाही. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक रविवारी झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री हेच राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घ्यायला हवी. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आंदोलन सुरूच राहील. वेळप्रसंगी आंदोलन तीव्रही केले जाईल.

- डॉ. डी. एल. कराड, सीटू नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा पालिकेचा अर्थसंकल्प १०७ कोटींचा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कोणतीही कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा देत पाणीपुरवठा योजना, स्वच्छता, रस्ते अशा विविध मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच ३१ लाख ६८ हजार शिलकी अंदाजपत्रकालाही मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. येथील पालिका सभागृहात नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. या पूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत १०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्याला आज झालेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.

यावेळी उपाध्यक्षा सुवर्णा नंदाळे, गटनेते महेश देवरे, काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, सुनीता मोरकर, दीपक पाकळे, मुन्ना शेख, डॉ. विद्या सोनवणे, मनोहर देवरे उपस्थित होते.

अशी आहे तरतूद

पाणीपुरवठा योजनांसाठी ३८ लाख ५० हजार

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १५ कोटी

केटीवेअर बंधाऱ्यांसाठी ३३ लाख

विंधन विहिरीसाठी ११ लाख

मलनिस्सारण केंद्र भूसंपादनासाठी ५ कोटी

गटारी दुरूस्तीसाठी १५ लाख

घनकचरा संकलनासाठी २० लाख ५० हजार

जंतुनाशके फ वारणीसाठी १६ लाख ५० हजार

भुखंड विकसित करण्यासाठी २ कोटी

विशेष योजनंतर्गत १ केाटी १० लाख

सुशोभीकरणासाठी ५५ लाख

रस्ते काँक्रीटीकरण, डांबरीकरणासाठी १ कोटी ९९ लाख

शौचालय उभारणे, जलवाहिन्या टाकण्यासाठी २ कोटी

इदगाह परिसर, कब्रस्थान व अल्पसंख्याक परिसर विकासासाठी ४० लाख

शहरातील विविध विकासकामांसाठी २ कोटी २० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसाकाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड साखर कारखाना कार्यान्वित करण्याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. निसाकाबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मंत्री देशमुख यांनी निफाडचे आमदार अनिल कदम यांची नाशिक येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी आमदार कदम यांनी निसाकाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत देशमुख यांना माहिती देत निसाकावर अवलंबून असलेल्या कामगारांची अवस्था, तसेच निफाड तालुक्यातील सहकारी संस्थांच्या अडचणी मांडल्या. रानवड साखर कारखाना कार्यान्वित झाला, तसाच निसाकाबाबत निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी केली. या वेळी आमदार राहुल आहेर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका वैशाली कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष होळकर, सोमनाथ निमसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थाटात निघाले बाशिंगे वीर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

होळीनंतर धूळवडीला गोदाकाठी नाशिक शहरातील मानाच्या वीरांची वेगवेगळ्या देवदेवतांच्या पेहरावात सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यंदाही ढोल ताशांच्या गजरात वीरांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जुन्या नाशिकमधील दाजीबा वीरांची मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

शहरात धूळवडीच्या दिवशी शहरात मानाच्या वीरांची फाल्गुन वद्य प्रतिपदेला सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यंदाही परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात आल्याने गोदाकाठी यात्रेचे स्वरुप आले होते. या यात्रेत जुन्या नाशिकमधील मानाच्या दाजीबा वीराची मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. बाशिंगे वीर म्हणून त्यांची ख्याती आहे. दुपारी दोन वाजेपासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावर जागोजागी भाविकांकडून पूजा केली जात होती. हातात मोठी तलवार व डोक्यावर बाशिंगे लावलेला मुखवटा अशा पेहरावात जुन्या नाशकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. दुपारी दोन वाजता निघालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

रामकुंडावर वीरांची यात्रा

धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या पूर्वजांच्या टाकांना वाजतगाजत मिरवून आणण्याची परंपरा आहे. शहरातील अनेक कुटुंबांनी संध्याकाळी घरातील टाकांची मिरवणूक काढली. यात विविध पेहराव करण्यात आले होते. ही मिरवणूक रामकुंडावर पोहचल्यानंतर तेथे टाकांना अभिषेक घालण्यात आला. यावेळी चौकाचौकातील होळ्यांभोवती फेर धरुन वीर नाचवले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुडाचे घर ते आंतरराष्ट्रीय ट्रॅक!

$
0
0


fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : विपरीत परिस्थिती मनुष्याला नियतीपुढे गुडघे टेकायला भाग पाडते. मात्र, समाजात अशाही काही व्यक्ती असतात की त्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतात. ताई बामणे यातीलच! आपल्या जिद्दीच्या जोरावर आकाशाला गवसणी घालण्याचा ताईचा प्रयत्न म्हणूनच उजवा ठरतो.

कविता दिदीसारखे मला धावपटू व्हायचे आहे, अशी मनीषा बाळगून ताईने प्रवास सुरू केला. ती आज एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहचली आहे. ताईचा हा खडतर प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

ताई बामणे हिच्यातील धावपटू बनण्याचे कसब हिरकुड सरांनी ओळखले. ही मोठी धावपटू होणार अशी आशा बाळगून ताईच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. कांदिवलीच्या स्पर्धेला जाताना ताईकडे पैसे नव्हते. वयाच्या नवव्या वर्षी अनवाणी धावणाऱ्या ताईने महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेत २०१३ साली ब्राँझ मिळवले. इतरांचे बूट आपल्या पायाला लागतील म्हणून तिने धावण्याचा वेग कमी केला. सगळ्या स्टेडियमने उभे राहून ताईचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

ताईचे गाव दलपतपूर. हरसूलपासून १० किलोमीटर अंतरावर. वाट नागमोडी चढ-उताराची. गावात सिमेंटचे रस्ते आता झालेत. शेणाने सारवलेले घर. एकदा हिरकुड सरांनी शाळेत दुसरीच्या वर्गाची शर्यत लावली. ताईने सगळ्यांना निम्मे अंतर ठेवत शर्यत पूर्ण केली. हेच ती तिसरी, चौथी आणि पाचवीच्या मुलामुलींच्या शर्यतीच्या बाबतीत सहज करायची. एका शिक्षकाची नजर किती काम करते हे पाहायचं झालं तर हिरकुड हे उल्लेखनीय आहेत.

गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर हरसूलच्या दिशेने असलेला रस्ता आणि शेतातील एक पट्टा ताईच्या सरावासाठी त्यांनी वापरायचा ठरवला. ७ वर्षांची मुलगी एक स्वप्न मनाशी धरते, मला कविता दीदिसारखं व्हायचं. हा अंधार जरी येथल्या रोजच्या जीवनाचा भाग असला तरी हे वय कष्ट करण्यासाठी तयार होणे अप्रूप आहे. ताईचे हे धाडस असून, त्याला वनवासी आयुष्याची निर्मळता लाभली आहे. सायंकाळचा सराव येथेच पार पडायचा. ताई आज भोसला शाळेत आहे, पण या सरावात कुठेही खंड नाही. ताई अबोल, शांत स्वभावाची आणि तितकीच नम्र. भोसलाच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेची आठवीची विद्यार्थिनी. तिचे जिंकणे हेही अगदी सहज आणि सोपे असते. स्पर्धा जिंकल्यानंतरसुद्धा ती सहज, साधी वावरत असते. शाळेत अभ्यासात तितकेच काळजीपूर्वक लक्ष देणारी. ताईचे आजचे भोसलातील साईचे प्रशिक्षक विजेंद्रसिंह तेही सतत तिच्या पाठीशी असतात.

आंतरराष्ट्रीय ओळख

ताई गेल्या वर्षापासून १७ वर्षांखालील गटातून ४०० मीटर आणि ८०० मीटर या दोन स्पर्धांवर भर देत आहे. एनवायसीएसच्या माध्यमातून प्रसिद्ध गेल इंडिया या कंपनीने ताईस २०२० ऑलिम्पिक तयारीसाठी दत्तक घेतले आहे. वर्षभरापूर्वी थायलंडमधील एशियन स्कूल स्पर्धेसाठी तर नैरोबीत होणाऱ्या वर्ल्ड स्कूल स्पर्धेसाठी देखील तिची निवड झाली होती. यावर्षी खेलो इंडिया या स्पर्धेनंतर लगेच महिनाभराच्या जमेका येथे होणाऱ्या उसेन बोल्ट क्लब येथे प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली आहे. गेल्या चार वर्षांत बामणे हिने थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक घेतलेली आहे. जमैका अॅथलेटिक्समध्ये ८०० मीटरमध्ये ताईने सुवर्णपदक जिंकले आहे. कविता राऊतच्या यशाने हरसूलसारख्या वनवासी भागात आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकण्याचा एक आत्मविश्वास आणि इतिहास निर्माण केला आहे. तीच प्रेरणा ताईने तिच्या कृतीतून जागवली आहे. कविता, ताई आज घराघरात पोहोचली आहे. आपापल्या गाव, तालुका, नाशिक या ओळखीबरोबर त्यांची ओळख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून कारवाईची धूळवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धुलिवंदन तसेच रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मद्यपी वाहनचालक, प्रेशर हॉर्नचा वापर करून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी शहर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी विशेष मोहीम राबवली. यात तब्बल ८०० बेशिस्त वाहनचालकांना दंडाचा दणका देण्यात आला.

शहरात धुलिवंदन तसेच रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाते. धुलिवंदनात सातपूरसह देवळाली कॅम्प अग्रेसर असते. इतर भागांत थोड्याफार प्रमाणात धूळवड साजरी केली जाते. मागील वर्षी धूळवडीसह रंगपंचमीच्या दिवशी बेदरकारपणे वाहने चालविण्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तयारी केली होती. शुक्रवारी शहरात २६ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिस स्टेशनच्या पथकाने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. विशेषत: ओव्हर स्पीड, ट्रिपल सीट, हेल्मेट तसेच सीट बेल्टचा वापर न करणे, राँग साइड यासंदर्भात कारवाई करण्यात आली. याबाबत वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे म्हणाले की, सण उत्सवाच्या दरम्यान रस्त्यावर बेशिस्तपणा वाढतो. याचा परिणाम गंभीर ते किरकोळ अपघातांच्या वाढत्या संख्येतून जाणवतो. त्यामुळे धुलिवंदन तसेच रंगपंचमीच्या दिवशी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान संध्याकाळपर्यंत ८०० पेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. रंगपंचमीच्या दिवशीदेखील याच पद्धतीने कारवाई होणार असून, वाहतूक नियमांचे पालन सर्वांनीच करावे, असे आवाहन देवरे यांनी केले आहे.

पंडित कॉलनीत दुसऱ्या दिवशी कारवाई

'वन वे' केल्यानंतरही नियमांना हरताळ फासणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी १ मार्च रोजी येथे १०६ वाहनचालकांवर कारवाई करीत दंड वसूल केला होता. यात पाच शासकीय वाहनांचादेखील समावेश होता. याशिवाय १० सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवरदेखील कारवाई करण्यात आली. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या ठिकाणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उचलला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाब विचारणे म्हणजे विरोध नव्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांना अडचणीतून काढण्यासाठी ऐतिहासिक कर्जमाफी केली असली तरी शेतकरी समाधानी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा आहेत. मी सत्तेत असो अथवा नसो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार. त्यासाठी सरकारला जाब विचारणार. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणे म्हणजे विरोध नव्हे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले.

येथील भायगाव रोडवरील राजीव गांधी तंत्रशिक्षण स्कूल येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रसाद हिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मामको बँकचे हरिलाल अस्मर हे होते. भाजपनेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्रसाद हिरे, इंदिराताई हिरे, आमदार सुधीर तांबे, डॉ. तुषार शेवाळे, दीपक पवार, राजेंद्र भोसले, हेमलता पाटील, अमृता पवार, प्रतिभा सूर्यवंशी, शांताराम लाठर, माणिकराव बोरस्ते, देवराज गरुड आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यात प्रसाद हिरे यांच्या जीवनावर आधारित श्रीकांत वाघ यांनी संपादित केलेले 'सर्वसामन्यांचे बापू' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

खडसे यांनी प्रसाद हिरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत हिरे घराण्याविषयी असलेल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा विकासाचा अनुशेष गेल्या ७० वर्षांत देखील भरून निघालेला नाही, अशी खंत बोलून दाखवली. खडसे म्हणाले की, शासनाने हजारो कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी दिली. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. असे असले तरी शेतकरी समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत. शेतीकरिता पाणीच्या पाण्यासाठी संघर्ष करण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. हा संघर्ष करण्यासाठी मी पुढे राहणार आहे. अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणार असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली. पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी नार-पारच्या माध्यमातून गिरणा-मोसम खोऱ्यात वळविण्याची गरज आहे. तरच या भागातील पाणी प्रश्न कायमचा सुटेल असेदेखील त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतमालास योग्य भाव, पिक विम्याचे संरक्षण, सिंचनासाठी पाणी आणि शाश्वत शेतीचा पर्याय स्वीकारणे आवश्यक असल्याचे खडसे यांनी नमूद केले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केवळ सरकारने नव्हे तर सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. दादा भुसे म्हणाले, शेतकरी अडचणीत सापडला आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र हा प्रश्न केवळ मागील तीन वर्षात निर्माण झाला नसून, गेल्या काही वर्षातील शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे. सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी दिली असली तरी शिवसैनिक म्हणून सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही लावून धरली आहे. उत्तम कांबळे यांनी शेतकऱ्यांची व्यथा या विषयावरील व्याख्यानात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विज्ञान व तंत्रज्ञाचा शेतीतील वापर आदींविषयी आपले विचार व्यक्त केले.

नाथाभाऊ तुम्हीही दावेदार आहात...

खडसे यांनी गेल्या ७० वर्षांत उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही अशी खंत बोलून दाखविली. भाऊसाहेब हिरे, प्रतिभा पाटील, मधुकर चौधरी, बाळासाहेब थोरात, रोहिदास पाटील अशा अनेकांची पात्रता असतांना देखील उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळवू शकले नाही, असे ते म्हणताच व्यासपीठावरून व श्रोत्यांमधून 'नाथाभाऊ आपण देखील मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आहेत' असे उत्स्फूर्तपणे बोलून दाखवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव विभागातील वीज थकबाकी कोटीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव विभागातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करणे डोकेदुखी ठरते आहे. मालेगाव विभागात १ लाख ८० हजार ४३८ वीजग्राहक असून, यातील एक लाख ग्राहकांकडे २१५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही बाकी वसूल करण्यासाठी आता वीज वितरण कंपनीकडून पावले उचली जात आहेत.

वीज ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी शहरातील द्याने, गोल्डननगर भागात गेलेल्या महावितरणच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना मंगळवारी घडली. यानंतर महावितरणच्या थकबाकीचा विषय ऐरणीवर आला आहे. मालेगाव विभागातील थकबाकीदरांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार कृषिपंपधारक आहेत. ४० हजार कृषिपंप धारकांकडे १७५ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. त्याखालोखाल ५० हजार घरगुती वीजग्राहकांकडे १३ कोटी ७२ लाख रुपये इतकी थकबाकी वसूल होणे बाकी आहे. तसेच ४४ हजार व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहक थकबाकीदार असून त्याच्याकडे देखील १६ कोटींची थकबाकी आहे.

महावितरणने थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता पावले उचलायला सुरुवात केली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत प्रथमतः ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सुमारे १२ हजार ग्राहकांकडे थकबाकी भरण्यासाठी तगादा लावला जाईल. त्यानंतर ५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल केली जाणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. थकबाकीची वसुली व्हावी यासाठी महावितरण कर्मचारी जादा वेळ देखील काम करीत आहेत.

मालेगाव विभागातील ग्राहक आणि थकबाकी -

- घरगुती - ग्राहक ५०३२८, थकबाकी १३.७२ कोटी

- व्यावसायिक - ग्राहक ४३३३६, थकबाकी २.५० कोटी

- औद्योगिक - ग्राहक ९८२, थकबाकी १.७८ कोटी

- पाणी पुरवठा - ग्राहक ११६, थकबाकी २.२५

- शेतीपंप - ग्राहक ४००४३, थकबाकी १७५.२४ कोटी

- पथदीप - ग्राहक ४३९, थकबाकी ५.४६ कोटी

- इतर - ग्राहक ५४९१, थकबाकी १४.४१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक रॅलीचा अनुभवा थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षभर महिला ज्या खास बाइक रॅलीची वाट पाहत असतात ती वुमेन्स बाइक रॅली मोठ्या थाटात रंगणार आहे. महिला दिनानिमित्त आपल्या हक्काच्या रस्त्यावर महिलांना बाइक चालवण्याची संधी मिळणार आहे. बुलेटपासून अगदी मोपेड बाइकपर्यंत कोणतीही बाइक घेऊन सहभागी होता येईल. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने आयोजित वुमेन्स बाइक रॅली यंदा ११ मार्च रोजी होणार आहे. अनेक महिलांनी यासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. तुम्हीदेखील सामील व्हा... गृहिणींपासून नोकरदार महिलांपर्यंत अन् सर्व कॉलेजच्या तरुणींनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा.

आजच्या अपडेटेड युगात पुरुषांना प्रत्येक कामात टक्कर देत आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख महिला निर्माण करीत आहेत. महिलांच्या या शौर्याला आणि कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने वुमेन्स बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची ही 'ऑल वुमेन्स बाइक रॅली' नाशिकसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये एकाचवेळी होणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत या वुमेन्स बाइक रॅलीला महिलांचा कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. नाशिकमध्ये ही रॅली ११ मार्च रोजी होणार आहे.

बाइक रॅलीमध्ये मोपेड बाइकपासून अगदी बुलेटपर्यंत कोणत्याही बाइकवरून महिलांना सहभागी होता येणार आहे. यापूर्वीच्या बाइक रॅलीत जावा, येझडी, हायबुझा, एफझेड या विदेशी बाइक्ससमवेत महिला सहभागी झाल्या होत्या. ही वुमेन्स बाइक रॅली म्हणजे नाशिककर महिलांचा जल्लोष अन् नारी शक्तीची एकता दर्शविणारी रॅली असते. यामुळेच यंदादेखील या रॅलीसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. कॉलेजियन्स तरुणींचे अनेक ग्रुप्स यात सहभागी होत आहेत. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्या मैत्रिणींसोबत ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे त्वरित नावनोंदणी करीत ऑल वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी व्हावे.

ऑनलाइन नोंदणीसाठी

रॅलीत सहभागी होण्यासाठी www.allwomenpowerrally.com या वेबसाइटला भेट द्यावी. तेथे रजिस्ट्रेशन या सेक्शनला भेट दिल्यानंतर नाव नोंदवता येईल. मोबाइल एसएमएसद्वारे नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी PowerrallyNSK हा मेसेज टाइप करून तो ५८८८८ या क्रमांकावर पाठवायचा आहे.

फॅशनचा दाखवा जलवा

ऑल वुमेन्स बाइक रॅली केवळ बाइक चालवण्यापुरतीच मर्यादित नाही, तर या निमित्ताने तरुणी-महिलांना फॅशनचा जलवा दाखवण्याची खास संधी मिळणार आहे. यासाठी अनेक फॅशनेबल न्यू ट्रेंड असलेले कॉस्च्युम तुम्ही परिधान करू शकतात. अगदी पारंपरिक नववारी साडी अन् फेटा यांपासून वेस्टर्न आउटफिट परिधान करीत फॅशनचा खास जलवा दाखवू शकतात. नारी शक्तीची एकजूट दर्शवत विविध मेसेजेस या माध्यमातून देऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कराच्या आमिषाने ९ कोटींना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नाशिकसह जळगाव आणि इतर ठिकाणी शेकडो युवकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या लष्करातील पळून आलेल्या सुभेदारासह त्याच्या कुटुंबीयांविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी सुभेदाराला अटक केली असून, फसवणुकीचा आकडा नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख याच्यासह पत्नी रेश्मा आणि मुलगा वजीर (सर्व रा. अहमदनगर) आणि इम्रानखान मेहबूबखान पठाण (रा. मांगलीदार, ता. कळवण, जि. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हुसनोद्दीन लष्करात सुभेदार या पदावर कार्यरत असताना पळून आला. हुसनोद्दीन मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील असून, कुटुंबासह तिथेच वास्तव्य करतो. सैन्यात असल्याचा फायदा घेत हुसनोद्दीनने जळगावसह नाशिक जिल्ह्यातील तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी बैठकी सुरू केल्या. ठिकठिकाणी तोंडी प्रचारामुळे एकमेकांच्या ओळखीतील अनेक तरुण हुसनोद्दीनच्या जाळ्यात सापडले. भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून पैसे घेतल्यावर त्यांना बनावट नियुक्तीपत्र पाठवण्याचे काम संशयितांकडून सुरू होते. या प्रकरणी सर्वांत प्रथम पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. तेथील पोलिसांनी लागलीच अहमदनगर येथे पोहोचून हुसनोद्दीनच्या मुसक्या आवळल्या. २४ फेब्रुवारी रोजी अटक केलेल्या हुसनोद्दीनच्या पोलिस कोठडीत एकदा वाढ करण्यात आली असून, तो ८ मार्चपर्यंत चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात असणार आहे.

पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शरद सोमवंशी यांनी सांगितले, की पहिली तक्रार दाखल झाल्यापासून आमच्याकडे ३०० तक्रारदार आले असून, फसवणुकीचा आकडा सात कोटींच्या घरात पोहोचला आहे. याशिवाय आमच्याकडे नाशिक येथील फसवणूक झालेले तक्रारदार आले होते. फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये झालेला असल्याने त्यांना तिथे पाठवण्यात आले. दरम्यान, नाशिकमध्ये फसवणूक झालेल्या तरुणांचा आकडा मोठा असून, या प्रकरणी तुळशीदास पाटील (रा. अभोणा, ता. कळवण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इंदिरानगर पोलिसांनी ६८ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तीन वर्षांपासून फसवणूक

इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी सांगितले, की २०१४ पासून फसवणुकीचा उद्योग सुरू असून, यात तक्रारदारांची संख्या वाढते आहे. नाशिकमध्ये सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा कयास असून, पाचोरा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयिताचा ताबा घेतल्यानंतर अनेक बाबी समोर येतील, असे न्याहाळदे यांनी स्पष्ट केले.

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास?

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, जळगाव, नाशिक, तसेच इतर काही जिल्ह्यांमिळून फसवणुकीचा आकडा नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक पोहोचू शकतो. यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार अपघातात दोन तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

धावत्या कारचे टायर फुटल्याने कार उलटल्याने अपघातात खामगाव येथील दोन तरुण जागीच ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी मनमाड-मालेगाव मार्गावरील कुंदलगाव शिवारात घडली. जखमी दोघांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात ठार झालेल्या दोघांचे मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव येथील चौघे कारने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जात होते. मात्र मनमाड-मालेगाव मार्गावरील कुंदलगाव शिवारात कारचे मागील टायर अचानक फुटले. या

भीषण अपघातात कार मधील विशाल लेकवाणी व हर्षल चंदानी हे दोघे तरुण जागीच ठार झाले. लखन केशवाणी व सनी केशवाणी हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर चौघांना मनमाड येथे उपचार करण्यासाठी आणण्यात आले. पण तत्पूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. तर लखन व सनी यांना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी पाठपिण्यात आले येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत निश्चितच महासत्ता होईल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

लोकशाही आणि विविधतेत एकता ही भारतीयांची खरी ताकद आहे. विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, शेती, उद्योगासह विविध क्षेत्रात भारतीयांची वेगाने घौडदोड सुरू आहे. त्यामुळे भारत भविष्यात निश्चितच महासत्ता म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन जर्मनीतील ब्रेमरहेवन विद्यापीठाचे कुलगुरू गेऱ्हार्ड फिल्डमायर यांनी केले.

मविप्र संस्था आणि भारत-जर्मनी मंडळातर्फे पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात जर्मनीतील रोजगार, शिक्षण, उद्योग व्यवसायाच्या संधी याबाबत गेऱ्हार्ड फिल्डमायर यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. एस. एस. घुमरे, ब्रेमरहेवनच्या मादाम कारीन मोनिक, भारत-जर्मनी मंडळाचे समन्वयक प्रा. दीपक मगरे, उपप्राचार्य डॉ. एस. वाय. माळोदे, डॉ. जितेंद्र साळी, प्रा. व्ही. जे. पाटील, चिन्मय शेवाळे, प्रा. विजय गायकवाड उपस्थित होते. प्राचार्य डॉ. घुमरे यांनी प्रास्ताविक केले.

फिल्डमायर म्हणाले, की दोन महायुद्धांमुळे, तसेच प्रभावी राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळे जर्मनीला महासत्ता होता आलेले नाही. भारताची मात्र त्या दृष्टीने प्रगती सुरू आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्योगात प्रगती करायची असेल तर सुसंवाद, सुसंबंध, आधुनिकतेची कास, आत्मविश्वास, साहस आदींची गरज आहे. सध्याचे युग हे जागतिकीकरणाचे आहे. संकुचित दृष्टिकोन सोडून आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित केल्याशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होणार नाही. त्यामुळेच भारत- जर्मनी यांच्यात सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यापार, उद्योग सहकार्य वाढविण्यात येत आहे. ब्रेमरहेवन हे छोटे शहर असले तरी कार उत्पादनात जगात आघाडीवर आहे. ब्रेमरहेवन विद्यापीठात मीडिया प्रॉडक्शन, लॉजिस्टिक, इंजिनीअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, मॅनेजमेंटसह विविध विषयांचे अभ्यासक्रम आहेत. भारतासह ६३ देशांचे विद्यार्थी येथे उच्च शिक्षण घेत आहेत. जर्मनीत पदव्युत्तर अभ्यासक्रम दहा सत्रांत पूर्ण होतो. पदवीसाठी साडेतीन, तर पदव्युत्तरसाठी दीड वर्षे लागतात. पदवीपुढील शिक्षण मोफत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जर्मनीत उच्च शिक्षणाच्या विपुल संधी आहेत. त्याचा लाभ घ्यावा. प्रा. सुसान लॉरेन्सिया यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अश्विनी कदम यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एजंटांचा सुळसुळाट अन् आर्थिक लूट

$
0
0


bhavesh.brahmankar@timesgroup.com

Tweet - BhaveshBMT

नाशिक : अन्न व औषध प्रशासन आणि शॉप अॅक्ट या दोन्ही विभागांनी त्यांचे कामकाज ऑनलाइन केले असले तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची बाब समोर आली आहे. या दोन्ही विभागांच्या कार्यालयाबाहेर एजंटांचा सुळसुळाट झाला असून, व्यापाऱ्यांकडून शेकडो रुपये उकळले जात आहेत. यासंदर्भात कुठलीही दखल संबंधित विभागाकडून घेतली जात नसल्याने व्यापारी हैराण झाले आहेत.

आयटीआय सिग्नलच्या ठिकाणी सातपूर औद्योगिक वसाहतीत उद्योग भवन आहे. याच भवनामध्ये अन्न व औषध प्रशासन आणि शॉप अॅक्ट ही दोन्ही कार्यालये कार्यरत आहेत. नवीन दुकान किंवा कार्यालय सुरू करण्यासाठी शॉप अॅक्ट परवाना गरजेचा असतो. तो मिळण्यासाठी आता ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची सुविधा आहे. तर किराणा दुकानांसह खाद्यपदार्थांची विक्री करणारे, साठवणूक करणारे, उत्पादन करणारे या सर्वांना अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना दिला जातो. त्याचे कामकाजही ऑनलाइन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार हा परवाना दिला जातो. परवान्याचे कामकाज ऑनलाइन केल्याबाबत दोन्ही विभागांनी कुठल्याही प्रकारची जनजागृती केलेली नाही. त्यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक हे या दोन्ही विभागाच्या कार्यालयातच येतात. तेथे आल्यानंतर त्यांना ऑनलाइन अर्जाची माहिती दिली जाते. तसेच, यासंदर्भात भवनाच्या तळमजल्यावर असलेल्या सायबर कॅफे किंवा झेरॉक्स दुकानात जाण्याचे सांगितले जाते. याठिकाणी अर्ज करण्याचे तब्बल ७०० ते ८०० रुपये घेतले जातात. तर सरकारी शुल्क नियमाप्रमाणे ऑनलाइन दिले जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांना विनाकारण ७०० ते ८०० रुपयांचा भुर्दंड बसत आहे. त्याशिवाय या दोन्ही कार्यालयांना एजंटचा विळखा आहे. याठिकाणी व्यापारी किंवा व्यावसायिक येताच एजंट त्याला गाठतात. अर्ज करण्यापासून ते परवाना मिळण्यापर्यंत सर्व कामे जलदगतीने करून देतो असे सांगत व्यापाऱ्यांना गंडविले जात आहे. शेकडो रुपये उकळून एजंट त्यांचा स्वार्थ साधत असले तरी दोन्ही विभागांच्या कृपेमुळेच हा सारा प्रकार सुरू असल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. मात्र, त्याकडे अद्याप गांभीर्याने पाहिले जात नाही.

राज्य सरकारने पारदर्शकतेसाठी ऑनलाइन कामकाज स्वीकारले आहे. पण, जे लाभार्थी आहेत त्यांचा विचार व्हायला हवा. व्यापाऱ्यांमध्ये ऑनलाइनची जागरुकता करण्यात आलेली नाही. परिणामी, शेकडो रुपयांची फसवणूक झाल्यानंतर व्यापाऱ्यांना परवाना मिळतो. याची कुठलीही दखल घेतली जात नाही. याप्रश्नी सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करू.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाशे कोटी द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे १२५ कोटींच्या अर्थसाह्याची मागणी केली आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले आहे.

सहकारमंत्री देशमुख शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी सहकार विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर आहेर यांनी देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे बँकेला आर्थिक साह्य मिळण्याबाबत साकडे घातले. भांडवल पर्याप्त राखण्यासाठी राज्य सरकारकडे १२५ कोटींची मागणी केली, तसेच अडीच टक्के रकमेवरील व्याज परताव्याची २७ कोटींची रक्कम मिळावी, याबाबत निवेदन दिले. सुभाष देशमुख यांनीही सकारात्मक निर्णय घेऊन बँकेला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बकाल यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली व बँकेचे भांडवल पर्याप्त राखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक गणपत पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, अनिल कदम, धनंजय पवार, संदीप गुळवे, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यासाठी भाजपने अडवला रस्ता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या एनडी पटेल रोडवरील वसंतस्मृती कार्यालयात बैठकीसाठी आलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बैठकीदरम्यान चक्क रस्ताच बंद करण्याचा प्रकार घडला आहे. भाजप कार्यालयासमोर मंत्र्यांच्या ताफ्यापाठोपाठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही थेट रस्त्यावरच पार्किंग केल्याने दीड तास पूर्ण रस्ताच बंद झाला. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी असल्याने हा रस्ता वापरणाऱ्या नागरिकांना दुसरीकडे जाताना तारेवरची कसरत करावी लागली. भाजप, तसेच मंत्र्यांनी रस्ता अडविल्याने स्थानिकांना मात्र दीड तास मनस्ताप सहन करावा लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीयआपी संस्कृती मोडीत काढत जनतेमध्ये गेल्यावर सर्वसामान्यांसारखे वागा, असे आदेश भाजपचे पदाधिकारी आणि केंद्र व राज्यातील मंत्र्यांनाही दिले. मात्र, भाजपचे मंत्री आणि पदाधिकारीच प्रधानसेवकाच्या आदेशाची पायमल्ली करीत असून, त्याचा प्रत्यय शुक्रवारी भाजप कार्यालयाबाहेर आला. भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात शुक्रवारी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची शनिवारी बैठक झाली. बैठकीसाठी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपल्या वाहनांची पार्किंग केली. त्यानंतर आलेल्या मंत्री महोदयांच्या ताफ्याने मात्र यावर कडी केली. देशमुख कार्यालयात पोहोचले. मात्र, त्यांच्या ताफ्यातील वाहने रस्त्याच्या मधोमधच उभी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण रस्ताच रहदारीसाठी बंद झाला. या रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या सर्वसामान्यांचे मात्र या वेळी हाल झाले. रस्ताच बंद झाल्याने स्थानिकांना व रहिवाशांना मात्र अन्यत्र जाताना थेट रस्ता बदलूनच प्रवास करावा लागला. जवळपास दीड तास बैठकीदरम्यान सर्व वाहने रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतरच हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला झाला. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत होता.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>