जितेंद्र तरटे
jitendra.tarte@timesgroup.com
--
माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो अन् सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो, त्याच्या या अप्पलपोट्या वृत्तीवर संत कबीरांची परखड वाणी प्रहार करते....
गावकुंसाकडे जाणाऱ्या एखाद्या निर्जन पायवाटेच्या दुतर्फा पसरलेल्या दाट झाडीतून एखाद्या दुपारी दोन वीतभर लांबीचं मुंगूस मुखदर्शन देऊन चपळाईन झाडांच्या दाट सावलीत पसार व्हायचं. त्यावेळी त्या पायवाटेवरून जाणाऱ्या प्रवाशाच्या तोंडातनं सहज शब्द बाहेर पडायचे, 'मुंगसा, मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शपथ'.
आता पायवाटेनं आपल्या मार्गाला जाणाऱ्या वाटसरूचं मुंगसाचं तोंड पाहण्यापासून काय अडलं, अगदी त्यासाठी त्याने त्याला थेट रामाची शपथ का बरं घालावी, असे प्रश्न मोठ्यांची कृती बघून त्यावेळी लहानांनाही पडायचे. पण, निसर्गातल्या विविध प्रतीकांभोवतीही मानवी मनाचं भावविश्व घिरट्या घालतं. या प्रतीकांबाबतच्या संपर्कातून काळानुसार काही मिथके जन्माला आली. काही मिथकांना तत्कालीक अर्थ होता, काहींमागे विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे आडाखे होते, तर काहींच्या मागे तर्कबुध्दीचे आडाखे होते. काळगतीनुसार हे आडाखे अपभ्रंशात परावर्तीत होऊन त्यांच्या दंतकथा, लोककथा कधी बनल्या हे कुणाच्याही लक्षात आले नाही.
लोकजीवनात असलेली मुंगसाची प्रतिमाही याच मिथकांच्या संदर्भाने अधिक उजळून निघाली. तसे पाहता विज्ञानाच्या दृष्टीने या प्राण्याचे भूतलावरील अस्तित्व म्हणजे अन्नसाखळीतला एक दुंवा इतकेच. पण, या निरस शास्त्रीय विश्लेषणामागे अनेक रम्य अन् सुरस समज-गैरसमज, मिथकांचा पाऊस पडलेला असतो अन् एका प्रतिमेचे अनेक अन्वयार्थ असू शकतात हे आपल्याला या विषयांकडे नव्या दृष्टीने बघितल्यावर लक्षात येते.
सस्तन व संमिश्र प्राण्यांच्या व्हायव्हेरिडी कुलातील हर्पेस्टीनी उपकुलात या जीवाचा समावेश होतो. भारतीय उपखंडासह हा छोटासा प्राणी आफ्रिकेमध्येही आढळून येतो. भौगोलिक क्षेत्रातील फरकांनुसार यांच्या विविध जातीही अस्तित्वात आहेत. निमुळत्या तोंडाचा, आखूड कानांचा, अंगावर पिवळसर केसांचा साज मिरविणारा, आखूड पाय अन् लांब शेपटीचा हा इवलासा भासणारा हा जीव आक्रमक अन् हिंस्त्र म्हणून ओळखला जातो. पण साप, नाग, विंचवासारख्या शत्रूंसाठीच तो प्रामुख्याने आक्रमक आहे. एरव्ही तो माणसाळला तर माणसाच्या सान्निध्यात मांजरीसारखाही राहू शकतो. सर्पाचा काळ म्हणून मुंगसाची ओळख आहे. साप-नागांचे मर्दन करताना त्यांच्याशी कडवी झुंज देण्याच्या त्याच्या अनोख्या क्षमतेमुळे तो मानवी समूहाच्या आकर्षणाचा विषय पूर्वीपासून ठरत आला. कारण, मानवाच्या भावविश्वात सर्पकुळाचीही अशीच मोठी धास्ती आहे. या सर्पधास्तीवर मुंगूस त्याच्या नैसर्गिक गुणांमुळे उतारा ठरू शकतो असे मानवाला वाटत आले, हे ही त्याला शुभलक्षणी मानण्यामागचे एक कारण असावे. सर्पाची अंडी नष्ट करण्यापासून ते त्याच्या हालचालीवर बारीक कटाक्ष ठेवून त्याचा खात्मा करेपर्यंत मुंगसाचा आक्रमकपणा कायम असतो. या अर्थाने मानवावरचा संकटनिवारक म्हणून त्याला शुभ मानण्यात आले. पुढे हेच मुंगूस इसापनितीतल्या कथांमधून डोकावले. माणसाला नीती शिकविणाऱ्या यातील एका कथेत मुंगूस माणसाशी कृतज्ञ असल्याने पण माणूस त्याच्याशी कृतघ्न असल्याचे दर्शविण्यात आले. यासारख्या कथांनीही मुंगसासारख्या प्राण्याची मानवी भावविश्वातील प्रतिमा उंचावली.
मुंगसाचा अधिवास जमिनीखाली तीक्ष्म नखांनी खणलेल्या बिळांमध्ये असतो. महाभारतातील एका दृष्टांत कथेत याच मुंगसाचा अर्धा देह सोन्याचा असल्याचा उल्लेख आहे. युधिष्ठीर राजा सर्वश्रेष्ठ राजसूय यज्ञ केल्याचा अभिमान होतो. त्यावेळी यज्ञस्थळी एक अर्धे शरीर सोन्याचे असलेले मुंगूस प्रकट होऊन या यज्ञाची खिल्ली उडविते. त्यावेळी युधिष्ठीराला आपण पाहिलेला मोठा यज्ञ सांगताना हे मुंगूस एका ब्राह्मण जोडप्याची कथा युधिष्ठीरास सांगते. ती कथा अशी, एका गरीब ब्राह्मणाच्या घरात अनेक दिवसांनी चूल पेटली. त्यातही मोजके अन्न हाती असताना अर्ध्या रात्री दारी याचक उभा राहिला. तेव्हा स्वत:साठी काही न बाळगता या कुटुंबाने घरातले सर्व अन्न त्या याचकाला दिले. या पुण्यकर्माच्या प्रभावाने एक चमत्कार घडला. या घरात जमिनीवर सांडलेल्या चिमूटभर धान्यात लोळण्याचा मला मोह झाला अन् लोळण घेताच माझा अर्धा देह सोन्याचा झाला. मला उर्वरित देहसुध्दा करायचा आहे. त्यासाठी मी मोठ्या यज्ञकर्त्या यजमानाच्या प्रतीक्षेत आहे. पण तसे अद्याप घडलेले नाही, असे मुंगसाने युधिष्ठीराला सांगताच यज्ञकर्मातील उणिवांची जाणीव होऊन त्याचे डोळे उघडले असावेत. या यज्ञात विपूल धन खर्च केले पण त्या खर्चण्यात मनाच्या भावाचा अभाव होता. त्यामुळे तुझे पुण्यकर्म पुरेसे प्रभावी होऊ शकलेले नाही, हे सांगण्यासाठी रचनाकाराने मुंगसाचे रूपक या कथेत वापरले आहे. मुंगसाचा अधिवास अफ्रिकेसारख्या खंडात आढळत असला तरीही त्याच्या भारतातील प्रजातींचे अस्तित्व हे महाभारतकालीन खंडापेक्षाही जुने असावे, असे ही महाभारतील मुंगूस विषयक दृष्टांत कथा सांगते.
मुंगसाविषयीच्या आपल्या समाजातील मिथकांमध्ये हा प्राणी सर्पविषापासून बचावासाठी मुंगूसवेल नामक वनस्पतीची मुळे खात असल्याचाही एक समज आहे. प्रत्यक्षात जीवशास्त्रीय दृष्टीने या प्राण्याच्या पाठीवरील राठ केस हे बाणाप्रमाणे टोक घेऊन उभे राहून शत्रूचा प्रतिकार करतात. जेणेकरून सर्पाला दंश करण्यात ते बाधा उत्पन्न करतात. परिणामी त्याचे रक्षण होते. अशी मिथके केवळ आपल्याचकडे आहेत असे नाही तर जगाच्या पाठीवरील अनेक देश त्याला अपवाद नसतात. मुंगसाच्या जिभेचा पृष्ठभाग हा खडबडीत असून, सर्पविषावरील उतारा त्याघ्या याच वैशिष्ट्यात दडलेला असतो, अशी समजूत ब्रह्मदेशात आहे.
श्री गुरूचरित्रासाख्या धार्मिक ग्रंथातही मुंगसाचा उल्लेख एकोणतिसाव्या अध्यायात आढळून येतो. सन ४८७ ते ५५० या कालावधीत होऊन गेलेल्या भूगर्भजल अभ्यासक विराहमिहिरच्या विख्यात ग्रंथांमध्येही मुंगसाचे संदर्भ आहेत. जमिनीच्या पोटातील पाण्याचा ठिकाणाचा आडाखा वर्तविताना विराहमिहिर मुंगसाच्या विशिष्ट पध्दतीतील वावरण्याचे संदर्भ देतात.
आपल्या हितशत्रूंपासून किंवा आप्तेष्टांपासूनही माणसे अनेक पिढ्यांपासून धन लपवित आली. माणसाला धनाची विशेष लालसा असते. हे धन लपविण्यासाठी माणसांनी पूर्वीपासून निर्जन जमिनीचा आधार घेतल्याचे असंख्य संदर्भ आहेत. मुंगसाचा अधिवासही निर्जन जमिनीखालील खोल बिळांमध्ये असतो. या घरट्याचे निर्माण हा प्राणी आपल्या तीक्ष्ण नखांनी करतो. त्याच्या या नैसर्गिक स्वभावामुळेच त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडली गेली असावी.
निसर्गाने दिलेले जीवन समरसपणे जगणाऱ्या जीवांमध्येही माणसाने सोयीस्कर भेद निर्माण केले. 'टिटवी...' विरहाचा संदेश देते, म्हणून ती लोकांच्या शिव्यांची धनीण झाली. मुंगूस सुवर्णात लोळण घेणारे असल्याच्या आख्यायिकेमुळे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतीने त्याला थेट रामाच्या नावाने तोंड दाखविण्याची गळ घातली गेली.
माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो अन् सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो, त्याच्या या अप्पलपोट्या वृत्तीवर संत कबीरांची परखड वाणी प्रहार करते. कबीर म्हणतात,
बुरा जो देखन मै चला!
बुरा न मिलीया कोय!!
जो दिल खोजा अपना !
मुझसे बुरा न कोय !!
या दुनियेमध्ये मी वाईट काय याचा शोध सुरू केला पण मला कुणीही वाईट असं सापडलं नाही. पण जेव्हा मलाच माझं अंतर्मन शोधण्याची प्रेरणा झाली म्हणजे 'जो दिल खोजा अपना...' या पायरीनंतर जे मला गवसलं ते अतिशय धक्कादायक आहे. ते म्हणजे, 'मुझसे बुरा न कोय...' माझ्या अंतर्मनाला वाईटाची जी किनार लगडली आहे ना, त्यापेक्षा अधिक वाईट या दुनियेत असूच शकत नाही, असं कबीरवाणी सांगते. त्यामुळे मुंगसाचा शकून शुभ किंवा अशुभ वर्गात लोटण्याअगोदर आपलं मन कुठल्या वर्गात बसतं त्याला महत्त्व द्या, असंही कबीर ठणकावून सांगतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट