म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
देशाला कृषी उत्पादनाच्या उद्दिष्टाची चिंता नाही तर कृषी मालाला भाव कसा चांगले मिळेल, याची चिंता असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांनी व्यक्त केली.
अंबड येथील द ताज गेट वे हॉटेल येथे बाँबे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजच्या अॅग्रिकॉर्प-२०१७ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत निती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांनी मार्गदर्शन केले. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजचे महासंचालक विजय श्रीरंगन, सहसंचालक एस. जयकुमार, समिती सदस्य राजन राजे, एस. के. गोयल आणि समिती सदस्य चेतन डेढिया उपस्थित होते.
देशांतर्गत शेतमालाच्या उत्पादनाला आणि व्यापाराला एक ठोस दिशा देण्याची गरज असून, शेतमालाच्या किमतीचा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रचलित बाजारव्यवस्थेत बदलत्या काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. प्रचलित बाजारव्यवस्थेचे आयुष्य आता संपले असून, सध्याचा जमाना मॉडर्न व्हॅल्यू चेनचा आहे. व्हॅल्यू चेन अर्थात मूल्यवर्धित सेवांच्या शृंखलेचा आहे. आणि तसेच बदल बाजारव्यवस्थेत गरजेचे असल्याचेही डॉ. रमेश चंद म्हणाले.
डॉ. चंद यांनी या परिषदेतून कृषी मालाला चांगला भाव मिळेल यासाठी रोड मॅप देण्याचे आवाहनही केले. हा रोड मॅपवर निती आयोगात चर्चा करून धोरणात काय बदल करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे शेतमालाच्या किंमती प्रत्येक राज्यानुसार बदलताना दिसतात. किंमतीतील हा बदल कशामुळे निर्माण होतो, याचाही विचार होणे आवश्यक आहे. बाजार समिती कायद्यात सुधारणांचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला. परंतु या सुधारणा काही राज्यांमध्ये अंमलात आल्या नाहीत.
काही राज्यांमध्ये या सूचनांच्या अंमलबजावणीकडेही म्हणावे तसं लक्ष दिले गेले नाही. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत महाराष्ट्र नेहमी अग्रेसर रहात आला आहे. महामँगो, महाग्रेप, सह्याद्री फार्मिंग, जैन इरिगेशन अशी काही उदाहरण यासंदर्भात देता येतील, असे प्रयत्न व्यापक स्वरुपात होण ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिषदेचा उद्देश
या परिषदेत बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजतर्फे संचालक विजय श्रीरंगन यांनी स्वागत करतांना परिषद घेण्यामागील उद्देशही स्पष्ट केलाकृषी क्षेत्रातील उत्पादकांपासून सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी एक सशक्त मुल्य शृखंला (व्हॅल्यु चेन) तयार करणे, या शृंखंलेमध्ये अधिकाअधिक गुंतवणूक व्हावी यासाठी मार्ग सुचविणे, उत्पादकांची माहिती देणे. त्याचप्रमाणे शेतकरी, शेतीमाल उत्पादक संस्था, लघू व मध्यम संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, बँका, वित्तसंस्था, आणि राज्य व केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांना एकत्र आणण्यासाठी एकच व्यासपीठ तयार करणे हे या मागील उद्दिष्ट आहे. जैन इरिगेशनचे डॉ. डी. एन. कुलकर्णी यांनी या परिषदेचे महत्व सांगितले. ईपीसी इंडस्ट्रीजचे संजीव मोहिनी यांनी प्रेझेंन्टेशन सादर केले.
राज्य सरकारच्या कृषी विभागाचे सचिव डॉ. एस. के. गोयल, निचेम सोल्युशनचे सीईओ रंजन राजे, सह्याद्रीचे विलास शिंदे, महाफेडचे योगेश थोरात, नाबार्डचे डॉ. यू. एस. सहा, वरुण अॅग्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर मनिषा धात्रक यांनी सहभाग घेतला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट