Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कलेची मांडणी अभ्यासपूर्णच असावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हल्ली कामाकडे पाहण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन अतिशय सहज, कॅज्युअल होत चालला आहे. प्रत्येक कलाकाराने अभ्यासपूर्ण असायला हवे व अभ्यासपूर्णच कलेची मांडणी केली पाहिजे. कलाकृतीच्या दर्जाची काळजी घ्यायला हवी, अशी भूमिका अभिनेता सचिन खेडेकर यांनी मांडली.

शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी खेडेकर बोलत होते. कोणत्याही क्षेत्रात शिस्तीचे महत्त्व मोठे आहे. विनय आपटे, शाम बेनेकर या व्यक्ती माझ्या गुरू आहेत. त्यांच्यामुळे नाटकामध्ये काम करताना त्यातील बारकावे, मांडणी अभ्यासता आली. आपटे यांच्यामुळे नाटकाबाबत लागलेली शिस्त आयुष्यभर कामी आली. शिक्षकही विद्यार्थ्याला अशीच शिस्त लावतो जी त्याला आयुष्यभर पुरते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौतुकाने प्रोत्साहन द्या; परंतु त्यांचे चुकल्यास त्यांना ती चूकदेखील प्रेमाने दाखवून द्या, असे खेडेकर यांनी शिक्षकांना उद्देशून सांगितले.

हेमंत मराठे व मिलिंद चिंधडे यांनी मुलाखत स्वरुपात खेडेकर यांच्याशी संवाद साधला. शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कार्य केलेल्या शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. मधुवती देशपांडे आणि स्वाती मराठे यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे दिलीपसिंग बेनिवाल यांनी प्रास्ताविक केले. राधेय येवले यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान
शिक्षण क्षेत्रातील तुषार उगले, नीता ताकतराव, राजेंद्र भावसार, रामनाथ जाधव, देवेंद्र सोनार, गोपाल बैरागी, रामदास तळपे, भूपेंद्र शुक्ल, नरेंद्र पाटील, हेमलता भामरे, शैलजा भागवत, मकरंद देव, कला क्षेत्रातील नितिन पवार, मकरंद हिंगणे, सुमुखी अथनी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासणी यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिजिटल प्रचारावर इच्छुकांचा भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जासोबत जोडावयाचे दाखले आणि आवश्यक माहिती याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतेही मागर्दशन मिळत नसल्याने उमेदवारांचा घोळ होत असला तरी या हंगामाचा फायदा घेण्यासाठी खासगी मागर्दशन केंद्र पुढे सरसावले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या केंद्राच्या सहाय्याने डिजिटल आणि स्मार्ट प्रचारावर भर दिला आहे.

पालिका कार्यालयासमोरच असे केंद्र कार्यान्व‌ति झाले असून, उमेदवाच्या अर्ज भरण्यापासून ते खर्चाचा तपशील दाखल करण्यापर्यंत सर्व जबाबदारी ठराव‌कि रक्कम आकारून घेतली जात आहे. संगणकीय क्रांतीचा खऱ्या अर्थाने या निवडणुकीत वापर होत असून, हायटेक प्रचारावर भर दिला जात आहे. त्र्यंबक पालिकेत अद्यापही आवश्यक नसलेली शिफारस पत्र देऊन नाहक गोंधळ निर्माण होईल असे प्रकार घडत आहेत.

यादी, मोबाइल मेसेजवर भर

उमेदवारी करणारे अद्याक्षरांच्या क्रमवारीने मतदार यादी तयार करून घेत आहेत. अशी यादी प्रिंट करून देण्याच्या व्यवसायास बरकत आली आहे. अडनावाप्रमाणे, जातीप्रमाणे विभागणी करून मतदारांची वाटणी करण्यात येत आहे. यादीच्या सोबतच मोबाइल मेसज तयार करून तो पाठविणे यावर देखील भर दिला जात आहे.

खर्चाची मर्यादा वाढणार?

नगरसेवकांसाठी दीड लाख आणि नगराध्यक्षांसाठी पाच लाख अशी खर्च मर्यादा आहे. निवडणूक कालावधीत अप्रत्यक्ष खर्च किती होतो, याला काही मर्यादा नसते. डिज‌टिल प्रचार आणि फोरकलर पत्रकांचा पाऊस यावर होणारा खर्च खूप मोठा असेल असे दिसते.

सर्व राजकीय पक्षांच्या मुलाखती होत आहेत. यामध्ये इलेक्टीव मेरिट म्हणून आर्थिक निकष महत्त्वाचे असल्याचे चर्चेतून लक्षात येते. त्र्यंबकची निवडणूक आर्थिक उलाढालींची मानली जाते. एका प्रमुख पक्षाच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीची शहरात चर्चा होत आहे. काही इच्छुक उमेदवार थेट लाखात बोलतात आणि मुलाखतीत खर्च किती करणार याचे उत्तर देतांना तीस पस्तीस लाख करू शकतो असे बेधडक सांगतात, अशीही चर्चा आहे. उद्या, शनिवारी आणि रविवारी अर्ज दाखल करण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळणार नाही. मात्र सोमवारी शहरातील बहुसंख्य उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

उमेदवारी याद्यांबाबत ‘आस्तेकदम’

शहकाटशहाच्या राजकारणाने पक्ष उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. शहरातील सर्व जागांसाठी भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. भाजपच्या उमेदवार जाहीर होण्यावर बहुतेकांचे अंदाज आराखडे अवलंबून असल्याचे लोकचर्चेतून जाणवत आहे. काँग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोष‌ति करून एक पत्ता उघड केला आहे. आणि त्याचा परिणाम भाजपच्या उमेदवारीवर निश्च‌तिच झाला आहे. थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी करतांना विजयासाठी प्रत्येक पक्षाला प्रभागातील सर्व सम‌किरणांचा ताळेबंद मांडावा लागणार आहे.

काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी सुनील अडसरे यांची उमेदवारी जाहीर केली आणि जातीपातीच्या सम‌किरणांची नवी मांडणी करण्याची वेळ इतर पक्षावर येवून ठेपली आहे. भाजपकडे विजयाची उमेदवारी म्हणून पाहिले जाते. तथापि इच्छुकांची संख्या पाहता नाकारलेल्यांची नाराजी घातक ठरणार आहे. बहुतेकांनी एकाच वेळेस दोनपेक्षा अधिक पक्षांकडे उमेदवारीची मागणी केल्याचे निदर्शनास येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी संघर्षाला खिंडार

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाला विरोध करण्यात अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील संघर्ष समितीच्या एका नेत्यानेच या प्रकल्पासाठी जमिन दिल्याने या आंदोलनात फूट पडली आहे. त्यामुळे या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाचा मात्र उत्साह दुणावला आहे. कचरू पाटील-डुकरे यांनी जमीन सरकारच्या घशात घालून आंदोलनाशी गद्दारी केल्याचा आरोप एकीकडे होत असताना आता समृद्धीच्या जमीन संपादन प्रक्रियेला अधिक गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होऊ लागला आहे.

समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मावळावा आणि शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी द्याव्यात यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची मनधरणी सुरू आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत आहे. इगतपुरी तालुक्यात या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविणारे आणि तालुक्यातील विरोधक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे कचरू पाटील-डुकरे यांनी त्यांची जमीन या प्रकल्पासाठी दिली आहे. प्रशासनाने या जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया गुरूवारी (दि. १६) पूर्ण केली. प्रमुख विरोधकाचेच मनपरिवर्तन करण्यात प्रशासनाला यश आल्याने अधिकाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. मोठा मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत अनेक शेतकरी जमिनी देण्यास तयार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जाऊ लागला आहे.

लढण्याचा समितीचा निर्धार
पाटील-डुकरे यांनी जमीन दिल्याने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद व्हॉट्स-अॅप सारख्या सोशल मीडियामधूनही उमटू लागले आहेत. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार समृद्धीबाधितांच्या संघर्ष समितीने केला आहे.

व्हॉट्स-अॅपवर टीकेचा भडीमार
समृद्धीबाधितांचे अनेक व्हॉट्स-अॅप ग्रुप असून या माध्यमातूनही शेतकरी संघटीत झाल्याचे पहावयास मिळते आहे. यापैकी काही ग्रुपवर प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रखरपणे टीका होऊ लागली आहे. त्यामध्ये शिवराळ भाषेचाही वापर होत असून त्यामुळे शाद्बिक वादाचे प्रसंगही उदभवू लागले आहेत.

जमिनीच्या बदल्यात जमीनखरेदी
जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना मिळतो आहे त्यातून गावापासून काही अंतरावरच जमीन खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. जमिनी दिल्याच्या मोबदल्यात जे पैसे मिळतात त्यातून संबंधित शेतकऱ्याने शेतजमीनच खरेदी करावी असा सरकार आणि प्रशासनाचाही आग्रह आहे. शेतकरीही जमिनी खरेदीस पसंती देत असून गावापासून काही अंतरावर तुलनेने माफक किमतीत अधिक जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

समृद्धीसाठी जमीन देणारा मी पहिला शेतकरी नाही. अनेकांनी जमिनी दिल्या आहेत. समृद्धी महामार्गाला विरोध करताना आम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. परंतु, त्यातून काही मार्ग निघेल, असे शेतकऱ्यांना वाटत नव्हते. म्हणूनच शेतकरी जमिनी देऊ लागले. ज्यांचे प्रतिनिधित्व करायचे ते शेतकरीच सोबत नाहीत याची जाणीव होऊ लागली. त्यामुळे प्रकल्पासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला. मी आजही शेतकऱ्यांसोबत असून त्यांना अधिकाधिक मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
- कचरू पाटील-डुकरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरार नोंदणीला ‘ठेंगा’

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : भाडेनियंत्रण कायद्याने सर्व करार मुद्रांक विभागात नोंदणी करणे कायदेशीररित्या बंधनकारक असतांना शहर व परिसरात लिव्ह अॅण्ड लायनसन्स कराराची नोंदणी अल्प होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ ३ हजार २२६ करार लिव्ह अॅण्ड लायसन्सचे नोंदले गेले. या वर्षीच्या तर सात महिन्यात हीच संख्या २ हजार ३९१ इतकीच आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी सुद्धा भाडेकरुंची माहिती पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे. पण, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शहर व परिसरात भाडेकरूंची संख्या मोठी असली तरी त्याची अधिकृत नोंद मात्र प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरली आहे.

घर, फ्लॅट, दुकान किंवा कोणतीही मालमत्ता भाड्याने दिल्यास त्याचा करारनामा केला व त्याची अधिकृत नोंदणी केल्यास त्याचा फायदा मालमत्ताधारकांना होणार असतो.पण, या नोंदणीकडे शुल्क लागत असल्यामुळे त्यांनी पाठ फिरवली आहे. नोंदणीकृत भाडेकरार न केल्याने भाड्याने दिलेल्या घरात भाडेकरूंनी केलेले गैरकृत्य असो की, घर खाली करण्याचा प्रश्न यात कायदेशिर पेच निर्माण होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. त्यामुळे अधिकृत नोंदणी करण्यासाठी आता नोंदणी व मुद्रांक विभागाने मोहीम उघडली आहे. फ्लॅट किंवा कोणतीही मालमत्ता देतांना १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार केला जातो. काही ठिकाणी केवळ कागदावर लिहिले जाते. तर काहीजण तोंडी बोलणी करून भाड्याने मालमत्ता देतात. पण, कायद्याने ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’ची नोंदणी मुद्रांक भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.

कराराचे शुल्क
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’च्या करारनाम्याची नोंदणी करता येते. यासाठी शहरी भागासाठी एक हजार तर ग्रामीण भागासाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. या शुल्काबरोबरच ०.२५ टक्के मुद्राक शुल्क एकूण कराराच्या भाड्याच्या रक्कमेवर घेतले जाते. एक महिन्यापासून तर पाच वर्षांपर्यंत हे ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’चे करार करता येतात.

कायदेशीर महत्त्व
घर असो की कोणतीही मालमत्ता ती खाली करतांना या नोंदणीकृत कराराचा फायदा होतो. हे दस्तऐवज कायदेशीर वैध असल्याने त्याचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे लाखोची मालमत्ता दुसऱ्याला भाडेतत्वाने देतांना कायदेशीर त्याला महत्त्व आहे.

सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे
‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’ करारामध्ये भाडेकरूंची सर्व माहिती अधिकृतपणे नोंद केली जाते. त्यात नाव, आधारकार्ड, पत्ता यासह इतर माहिती असते. त्यामुळे मालमत्ताधारकाला त्याचा फायदाच होतो. हा करारनामा पोलिसांना दिला तर त्याचा उपयोगही कायदेशीररित्या काही प्रसंग उदभवल्यास त्यात होतो.

ऑनलाइनही सुविधा
नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’ करारानाम दस्तऐवज ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा आहे. त्याचा लाभही सर्वांना घेता येणार आहे.

भाडेनियंत्रण कायदा कलम ५५ अन्वये सर्व करारनामे नोंदणीकृत करणे मिळकतधारक यांच्या लाभाचे आहे. अशा करारनाम्यास कायदेशीर सरंक्षण प्राप्त होते. त्यामुळे सर्वांनी ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’चे करारनाने नोंदणी करून घ्यावे. ज्यांचे राहिले आहे, त्यांना सुद्धा ते नोंदवता येणार आहे. यासाठी ऑनलाइन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
- मनोज वावीकर, मुद्रांक जिल्हाधिकारी

मुद्रांक विभागात नोंदणी झालेले करार
कार्यालय....ठिकाण....................२०१६-१७........२०१७-१८ (ऑक्टोबरपर्यंत)
- नाशिक १....जिल्हाधिकारी कार्यालय....१०४२........७६८
- नाशिक २....नाशिकरोड कार्यालय........५७९ - ४३१
- नाशिक ३ /४....त्र्यंबक नाका............९३५........६२३
- नाशिक ५....ठक्कर बाजार कार्यालय........३८७........२४८
- नाशिक ६/७....कांदा बटाटा भवन........२८३........३२१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४८७ शेतकऱ्यांना २३९ कोटींचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गासाठी लवकर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जिल्ह्यात २०४.३९ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २३८ कोटी ५४ लाख रुपयांचे ४८७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्याची उपराजधानी आणि राजधानीला अतिशय वेगवान रस्त्याने जोडण्याचे काम या महामार्गामुळे होणार आहे. १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतजमिनींचे भूसंपादन करावे लागणार आहे. जमीन खरेदी प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहेत. जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधून तब्बल १२९० हेक्टर जमिनीचे संपादन प्रशासनाला करावयाचे आहे. त्यापैकी १ हजार २३१ हेक्टर जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या असून आतापर्यंत २०४.३९ हेक्टर क्षेत्राची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

सिन्नरमध्ये ३१६ शेतकऱ्यांचे एकूण १४० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. २६ पैकी १७ गावांमध्ये २३२ खरेदीखतं झाली असून शेतकऱ्यांना एकूण १५९ कोटी २४ लाख १३ हजार ५७० रुपये मोबदला वितरित करण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातही २३ पैकी १६ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७१ शेतकऱ्यांचे ६४.१४ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या शेत‌कऱ्यांना ७९ कोटी २९ लाख ९४ हजार ४८५ रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ पैकी ३३ गावांमधील ४८७ शेत‌कऱ्यांनी भूसंपादनाला परवानगी दिली आहे. त्यांचे एकूण २०४ हेक्टर क्षेत्र संपादित झाले असून त्यांना २३८ कोटी ५४ लाख आठ हजार ५५ रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ विकास मंडळाच्या प्रचारास वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधीसभा निवडणुकीतील नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून जयकर ग्रुप व विद्यार्थी हक्क समितीच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ विकास मंडळाच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख संस्थांसह मतदारांच्या गोठीभेटी घेऊन जोमाने प्रचार सुरू केला आहे. रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या मांडणी व विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे उमेदवार अॅड. बाकेराव बस्ते यांनी सांगितले.

निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार नाशिकचे प्रथितयश कायदेतज्ज्ञ अॅड. बाकेराव बस्ते, डॉ. भरत कर्डक (नगर), योगेश लांडे (पुणे), महिला प्रवर्गातील तबस्सुम इनामदार, अनुसुचित जाती प्रवर्गातील सुभाष चिंधे, भटक्‍या विमुक्त प्रवर्गातील अमोल खाडे, युवक क्रांती दलाचे प्रदेश कार्यवाह संदीप बर्वे, जिल्हाध्यक्ष सुदाम लगड, स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे अमोल हिप्पागे, वीर भगतसिंग विद्यार्थी संघटनेचे अविनाश शिंदे, श्‍याम लांडे, सागर डाळिंबकर आदींनी या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे.

नवीन युगाच्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाणारी व्यवसायिक शिक्षण पद्धती, सामाजिक व संस्कृतिक मुल्ये जपणारी तसेच रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची मांडणी करणे, विद्याविकासात पूरक उपक्रमांसाठी पाठपुरावा, विद्यार्थी, अध्यापक कल्याण, क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाची नैपुण्य घडविण्यासाठी अभ्यासक्रम, वार्षिक वित्तीय अंदाजपत्रकात विद्यापीठाचे हित जोपासण्यास कायदेपूरक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमचे पॅनेल कटिबद्ध असल्याचे अॅड. बस्ते यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ‘द मॅन विदाउट पास्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. १८) सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फिनलँडचे दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘द मॅन विदाउट पास्ट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे दाखविण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

फिनलँडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकी कौरीस्माकी हे त्यांच्या सहज सुंदर, हलक्या फुलक्या, नर्मविनोदी परंतु तितक्याच चमत्कृतीपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रमुख पात्रे सर्व सामान्य फिनलँडर असतात. सर्व सामान्यांची सुख दुखे:, त्यांच्या जीवनातील चढउतार ते तटस्थपणे नेटकेपणाने टिपतात. हा चित्रपट एका वेल्डरची गोष्ट आहे. काही चोरटे पार्कमध्ये त्याच्यावर हल्ला करतात. डोक्यावरील आघाताने मृत्यू व नंतर तात्पुरती विस्मृती आलेला चित्रपटाचा नायक जणू पुर्नजन्म घेऊन नवे आयुष्य शोधतो. त्यात गत आयुष्याच्या खुणा सापडतात का? हे जाणून घेण्यासाठी ‘द मॅन विदाउट पास्ट’ हा चित्रपट पाहणे रंजक ठरणार आहे. फिनलँड येथे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९७ मिनिटांचा आहे. चित्रपट बघण्यास अधिकाधिक रसिकांनी यावे, असे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन युवतीचा स्टेशनवाडीत विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवागीळ केल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या तरुणाने अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला. ही घटना सिन्नर फाटा परिसरातील स्टेशनवाडी भागात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तरुणास अटक केली असून, त्याच्याविरूध्द विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इकबाल शेरू शेख (रा. गोदरेजवाडी, सिन्नरफाटा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. विष्णूनगर येथील स्टेशनवाडी भागात राहणाऱ्या १७ वर्षीय युवतीच्या फिर्यादीनुसार, संशयित तरुण बुधवारी (दि. १५) सायंकाळी शिवागाळ करीत युवतीच्या घराच्या दरवाजाजवळ आला. आमच्या घरासमोर कोणास शिवीगाळ करतो, असा जाब युवतीने विचारल्याने ही घटना घडली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोमवार पेठेतील दिल्ली दरवाजा परिसरात राहणाऱ्या गणेश जनार्दन पवार (२५, रा. नारायण निवास, दिल्ली दरवाजा) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारने अज्ञात कारणातून शुक्रवारी सकाळी आपल्या राहत्या घरातील लाकडी आड्याला बेडशिट बांधून गळफास लावून घेतला होता. घटनेचा अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातून तीन दुचाकी चोरीस गेल्या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. शिवाजी केशवराव जाधव (रा. बाळकृष्ण अपा, हनुमानवाडी) यांची सुमारे एक लाख रुपयांची बुलेट (एमएच १५ एफएक्‍स ००८७) सोमवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरी गेली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
दुसरी घटना नवीन आडगावनाका परिसरातील स्वामी नारायण नगर भागात घडली. निवृत्ती कुशाबा आहेर (रा. शिवनंदन बंगला) यांची स्प्लेंडर (एमएच १५ बीके ११३८) शनिवारी (दि. ११) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. दरम्यान, उत्तमनगर येथील राजेंद्र वामन नहिरे (रा. आनंद अपा. बुरकुले हॉलजवळ) यांची डिओ (एमएच १५ जीबी ६९१९) शुक्रवारी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी हातोहात लांबवली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली गावात दोघांना लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोघा सख्या भावांना रस्त्यात अडवून तिघांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना देवळाली गावात घडली. घटना घडून गेल्यानंतर तीन महिन्याच्या अंतराने या प्रकरणी कोर्टाच्या आदेशान्वये उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
कुणाल अनिलगिरी गोसावी (३१), सागर अनिलगिरी गोसावी (२९) आणि राम अनिलगिरी गोसावी (२७ रा. तिघे गोसावी बिल्डींग, एमजीरोड, म्हसोबा मंदिर देवळालीगाव) अशी संशयितांची नावे आहेत. दत्तमंदिर परिसरातील गिरीराम अरविंद क्षीरसागर आणि मयुराम गिरीराम अरविंद क्षीरसागर हे दोघे भाऊ २८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास देवळाली गावात गेले होते. काम आटोपून म्हसोबा मंदिर परिसरातून जात असतांना संशयितांनी दोघा भावांचा रस्ता अडवला. तसेच बेदम मारहाण केली. त्यात मयुराम गंभीर जखमी झाले होते. यावेळी संबंधितांनी गिरीराम यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील अंगठी आणि महागडा मोबाइल असा सुमारे ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेत पोबारा केला होता. या घटनेनंतर दोघा भावांनी पोलिसाकडे धाव घेतली. मात्र, संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेत संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पी. बी. बाकले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगरमध्ये उद्या बुद्धिबळ स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे चेस फेस्टिव्हल २०१७ अंतर्गत २२ ते ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या यू-११, बिलो १६०० येलो व तसेच ओपन रेटिंग स्पर्धेसाठी नाशिकमधील खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात खेळण्याची तयारी करण्यासाठी रविवारी (दि. १९) फ्रेंड्स सर्कल बुद्धिबळ स्पर्धा भरविण्यात आली आहे.

बुद्धिबळ स्पर्धा सकाळी नऊ वाजता होणार आहे. खालील प्रमाणे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. खुल्या गटात रोख स्वरुपाचे पारितोषिक देण्यात येईल. अनुक्रमे प्रथम क्रमांक २१०० रुपये, द्वितीय : १५०० रुपये, तृतीय : १००० रुपये व चौथ्या क्रमांकाला ७०० रुपये तर पाचव्या क्रमांकाला ५०० रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. नवीन खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी प्रत्येक गटासाठी ५ ट्रॉफी पारितोषिक म्हणून देण्यात येतील. स्पर्धा गोविंदनगर येथील सागर स्वीटच्याजवळील जिजाऊ हॉलमध्ये होणार आहे. स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी गणेश ताजणे (९७६७७२८५८१) श्रेया चिटणीस, अर्चना कुलकर्णी, वेदांत आमडेकर यांच्याशी संपर्क साधावा. राज्य व जिल्हा संघटना यांच्या सहकायाने ही स्पर्धा भरविली असून ख्यातनाम बुद्धिबळ खेळाडु गणेश ताजणे, संघटनेचे संदीप नागरे, ख्यातनाम कोच ओंकार जाधव यांनी जिल्हा संघटनेने अधिकृत केलेल्या स्पर्धा खेळाव्या असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अक्षरमानव’तर्फे साहित्य कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या अक्षर मानव या साहित्य चळवळीतर्फे शनिवारपासून (दि. १८) शहरात दोन दिवसीय साहित्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत साहित्याच्या विविध प्रकारांवर विविध मान्यवर सहभागींशी संवाद साधणार आहेत.

अक्षर मानवतर्फे विश्वास लॉन्सच्या बोटक्लब हाऊस येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत शनिवारी (दि. १८) आणि रविवारी (दि. १९) अशी दोन दिवस ही कार्यशाळा रंगणार आहे. यात ‘कथा’ या विषयावर ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे हे सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. तर ‘रिपोर्ताज आणि अनुवाद’ या विषयावर पत्रकार अपर्णा वेलणकर या संवाद साधतील. ‘कविता’ या विषयावर प्रकाश होळकर आणि किशोर वाघ गप्पा मारणार आहेत. तर एकूण साहित्य या विषयावर राजन खान हे मार्गदर्शन करणार आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्यांच्या निवास व भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक तरुण लेखक, कवींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अपर्णा क्षेमकल्याणी (९४२०६९५००४) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांविरोधात मुंबईत आज बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाभिक समाजाबद्दल कथित बदनामीकारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाभिक समाजाच्या सर्व संघटनांनी एकजूट करत एल्गार करण्याचा निर्णय घेतला आहे. नाभिक समाज संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी (दि. १८) दुपारी २ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर, बांद्रा वेस्ट, मुंबई येथे होणार आहे.

आगामी काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी समाजाच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक होत आहे. बैठकीनंतरपुढील ध्येय-धोरण ठरविण्यात येणार आहे. बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भगवानराव बिडवे, कल्याण दळे, दत्ता अनारसे, शशिकांत चव्हाण, पुंडलिकराव केळझकर आदींनी केले आहे.

आंदोलनाची रुपरेषा ठरविणार
मुख्यमंत्री नाभिक समाजाची जाहीरपणे माफी मागत नाही तोपर्यंत निषेध नोंदविण्याबरोबर भाजप सरकारविरोधी प्रचार करण्याचा निर्णय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. समाज प्रति‌निधींच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच्या आंदोलनाची रुपरेषा ठरविली जाणार आहे.

दुकाने बंदचा निर्णय मागे
महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकत्र येत दुकाने बंद ठेऊन तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत जाहीर निषेध व्यक्त करण्याबाबत सोशल मीडियाच्या मेसेज फिरत आहे. मात्र, या मेसेजमधील ‘दुकाने बंद’चा निर्णय मागे घेण्यात आला असल्याची माहिती भगवान बिडवे यांनी ‘मटा’शी बोलतांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नाशिक शहर आणि जिल्ह्यातील नाभिक बांधवांनी तीव्र निषेध नोंदविला. नाभिक व्यावसायिकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे नाहीतर समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात फडणवीस यांनी ‘एक न्हावी चार-पाच गिऱ्हाईकांची‌ अर्धी-अर्धी हजामत करतो आणि त्यांना बसवून ठेवतो’, असे नाभिक समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यात ठिकठिकाणी नाभिक समाज बांधवांच्या वतीने निषेध केला जातो आहे. नाशिकमध्येही शुक्रवारी दुपारी नाभिक बांधव काळ्या फित बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निषेधाबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यापूर्वीपासून नाभिक समाज प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि विश्वासू म्हणून ओळखला जातो. अशा इमानदार म्हणून नावलौकिक असलेल्या समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या फडणवीस यांचा यावेळी तीव्र शब्दांमध्ये धिक्कार करण्यात आला. कोणत्याही सलूनमध्ये व्यावसायिक एकाचवेळी चार-पाच ग्राहकांची अर्धी हजामत करून त्यांना बसवून ठेवत नाही. फडणवीस यांनी त्यांचे वक्तव्य सिद्ध करून दाखवावे, असे खुले आव्हान समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिले. फडणवीस यांनी त्यांचे वक्तव्य सिद्ध केल्यास सकल नाभिक समाजातर्फे त्यांचा भव्य सत्कार घडवून आणू, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. मात्र, ते त्यांचे वक्तव्य सिद्ध करणार नसतील तर त्यांनी जाहीरपणे नाभिक समाज बांधवांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये समाजातील पदाधिकारी नारायण यादव, दिलीप तुपे, अशोक सूर्यवंशी, सुभाष बिडवई, राजेंद्र तासकर, संजय वाघ, पंकज पगारे, अरुण सैंदाणे, दिलीप बोरसे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नृत्यमल्हार स्पर्धेत बोरस्ते विद्यालय प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि सह्याद्री वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्यमल्हार या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी नाशिकच्या ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयाचा संघ पात्र ठरला आहे.

भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात नुकतीच विभागीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बोरस्ते विद्यालयाच्या मोठ्या गटाने आदिवासी (पावरी) नृत्य सादर करत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत प्रतीक्षा भरवीरकर, वेदिका हुजरे, पूनम गायकवाड, झोया शेख, गौरी कहार, इच्छा मोरे, प्रज्ञा, रोहन, प्रकाश, ऋषी चौधरी, साहिल यशवंते, नाहीद खाटिक, मोहम्मद खाटीक या विद्यार्थ्यांना सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख मोरे, एस. आर, आगळे, एस. एम. आहेर यांचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य आर. जी. ढिकले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रक्रिया वेळकाढू, घोटाळे गतिमान!

$
0
0

मटा मालिका ः वणवण ठेवीदारांची

भाग ३

---

प्रक्रिया वेळकाढू, घोटाळे गतिमान!

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT



नाशिक : महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) वर्षाकाठी सहा ते सात गुन्हे दाखल होतात. हळूहळू हे प्रमाण वाढत असून, गुंतवणूकादारांनीच घोटाळेबाज कंपन्या अथवा एजंटांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.

एमपीआयडी कायदा आला, त्यावर्षी म्हणजे १९९९ मध्ये तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यातील चेअरमन, लॉइड फायनान्स लिमिटेड कंपनीविरोधात दाखल झालेल्या खटल्याचा अद्याप निकाल लागलेला नाही. त्यानंतर सन २००० मध्ये तीन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. २००१ आणि २००२ मध्ये प्रत्येकी सहा गुन्हे पोलिसांकडे नोंदविण्यात आले. २००३ मध्ये एमपीआयडी कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या आठच्या घरात पोहोचली. यात इंडिया नागरी सहकारी पतसंस्था, मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्ड, सुमन मोटेल्स, महाराष्ट्र अॅग्रिटेक लिमिटेड कंपनी, चेअरमन पीअरसेल फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड अशा मोठ्या प्रकरणांचा समावेश होता.

२००४ मध्ये गुन्ह्यांची संख्या खाली सरकून पाच झाली. २००५ मध्ये सर्वाधिक म्हणजे १० मोठे घोटाळे समोर येऊन त्यांची पोलिसांनी नोंद केली. मोठ्या प्रमाणावर फसवणुकीची प्रकरणे समोर येत असताना संशयित आरोपी किंवा गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. २००६ मध्ये सहा गुन्हे दाखल झाले. २००७ ते २०१३ या काळात नाशिक जिल्हा कोर्टात एकही प्रकरण दाखल झाले नाही. २०१४ मध्ये महाराष्ट्रात गाजलेल्या केबीसी घोटाळ्यासह एकूण पाच प्रकरणे समोर आली. २०१६ मध्ये मैत्रीयसह सहा आणि २०१७ मध्ये हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट, प्रमोद भाईचंद रायसोनी, विनय प्रभाकर फडणीस यांच्यासह नऊ गुन्हे एमपीआयडी कायद्यानुसार दाखल करण्यात आले आहेत.

--

तपासातील त्रुटींचा गैरफायदा

एमपीआयडी कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांतर्गत २००३ पर्यंत एखादा अपवाद वगळता बऱ्याचशा खटल्यांची निर्गती झालेली दिसते. म्हणजे २००३ नंतर बहुतांश दाखल खटले अद्याप निकालासाठी प्रलंबित आहेत. गुन्ह्याची निर्गती होण्याचा कालावधी मोठा असून, गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याचे प्रमाण अवघे ३० टक्केच आहे. बहुतांश गुंतवणूकदार पैसे आणले कोठून व दिले कसे हेच सिद्ध करू शकत नाहीत. अनेकदा तपासकामातदेखील त्रुटी राहत असल्याचा गैरफायदा उचलला जातो.

क्रमशः

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँकांमधूनही आवास योजनेचा लाभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता लीड बॅँकेबरोबरच सहकारी आणि खासगी बॅँकांमधूनही घरकुल लाभार्थ्यांना कर्जासह अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. कागदपत्रांच्या जाचक अटी-शर्तींमुळे लीड बँकांकडून लाभार्थ्यांना कर्ज देताना टाळाटाळ केली जात असल्याने पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता सहकारी बँकांचीही दारे आता उघड करण्यात आली आहे. राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी नाशिक येथे आयोजित बैठकीत या संदर्भातील निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सुरू केली आहे. मुंबईसह राज्यातील ५१ शहरांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची आढावा बैठक शनिवारी प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत विभागीय महसूल आयुक्तालयात पार पडली. या योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी चार घटक ठरविण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या घटकात झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत झोपड्या आहे, त्याच जागेवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. ही योजना फक्त आर्थिक दुर्बल घटकांसाठी असून, त्यातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून १ लाख रुपये व राज्य सरकारकडून १ लाख रुपये असे दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. दुसरा घटक हा कर्जसंलग्न अनुदान योजनेचा आहे. तिसऱ्या घटकात गृहप्रकल्पात ३५ टक्के घरे गरिबांसाठी राखीव ठेवण्यात येतात. त्यात त्यांनाही अडीच लाखाचे अनुदान दिले जाते. चौथा घटक हा वैयक्तिक घरबांधणीसंबंधी आहे. स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे किंवा जुन्या घराची वाढ करणे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून २.५० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आवास योजनेची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी या बैठकीत सादर केली. मात्र, बँकांची अडचण येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर लीड बॅँकेबरोबरच सहकारी, तसेच खासगी बॅँकांमार्फतही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे म्हैसकर यांनी स्पष्ट केले. यासाठी महापालिकेने संबंधित बॅँकांकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा. खासगी जागांवरील झोपडीधारकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारच्या वतीने लवकरच धोरण जाहीर केले जाईल, अशी माहितीही या वेळी म्हैसकर यांनी दिली आहे.

घरकुलांसाठी अर्जांचा पाऊस

झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणात ४५ हजार २४८ लाभार्थी आढळून आले आहेत. याशिवाय मागणी सर्वेक्षणात अर्ज सादर करणाऱ्या ५० हजार ९६३ पैकी ४४ हजार ४७४ लाभार्थी छाननीअंती पात्र ठरले आहेत. यात कर्जसंलग्न अनुदान योजनेसाठी १०,१५७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९३२० लाभार्थी पात्र ठरले आहेत. खासगी विकासक किंवा खासगी कंपन्यांच्या सहभागातून बांधण्यात येणाऱ्या गटाकरिता प्राप्त ३८,७५७ अर्जांपैकी ३४,५४० लाभार्थी पात्र ठरले आहेत, तर खासगी जागेवर वैयक्तिक घरबांधणीसाठी प्राप्त २०४९ पैकी ६११ लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे पालिकेची घरकुल योजना राबवताना कसरत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरे ग्रामपंचायत टेक्नोसॅव्हीच्या दिशेने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी घरबसल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडे मांडता याव्यात यासाठी हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देत एकलहरे ग्रामपंचायत आता टेक्नोसॅव्ही झाली आहे.

एकलहरेच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ग्रामपंचायत हेल्पलाइन क्रमांकाचेही उद्घाटन करण्यात आले. एकलहरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा सरपंच प्रथमच थेट जनतेतून निवडून देण्यात आला. ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी जाधव यांना सरपंचपदाचा मान मिळाला असला, तरी या पॅनलला बहुमत प्राप्त करता आलेले नव्हते. या ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी पदभार स्वीकारला. या कार्यक्रमात माजी सरपंच राजाराम धनवटे, जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे, नगरसेवक प्रशांत दिवे, दीक्षा लोंढे, हरीश भडांगे, दिनेश जाधव, राहुल खाडे आदींच्या उपस्थितीत ग्रामपंचायत हेल्पलाइन क्रमांकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सदस्या वैशाली धनवटे, नीलेश धनवटे, निर्मला इंगळे, सुरेखा जाधव, कांता पगारे, रुपाली कोकाटे, विश्वनाथ होलीन, बबन राजोळे, दिलीप राजोळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

पहिली ग्रामपंचायत

अशी हेल्पलाइन क्रमांक सुरू करणारी एकलहरे ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. ७ हजार ४६९ लोकसंख्या असलेल्या एकलहरेतील नागरिकांना या सुविधेमुळे आता आपल्या समस्या मांडण्यासाठी थेट ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ९८२२८२३७८९ हा एकलहरे ग्रामपंचायतीचा हेल्पलाइन क्रमांक असून, या क्रमांकावर नागरिकांनी समस्या नोंदविल्यास या समस्यांची ग्रामपंचायत प्रशासनाकडून तात्काळ दखल घेऊन सोडवणूक केली जाणार आहे.

सरपंचांचा पुढाकार

एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांनी नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. पाणीपुरवठा व गुणवत्ता, गटार योजना, स्वच्छता, पथदीप, आरोग्य, रस्ते यांसारख्या नागरी सुविधांविषयक प्रश्नांसह ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवांविषयक समस्या या हेल्पलाइनद्वारे नागरिकांना मांडता येणार आहेत. सरपंच स्वतः या हेल्पलाइनद्वारे मिळालेल्या समस्यांची सोडवणूक करण्यावर भर देणार आहेत.

--

एकलहरे ग्रामपंचायत हद्दीचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे नागरिकांना आपापल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधणे गैरसोयीचे व वेळखाऊ ठरत होते. नागरिकांना आपली तक्रार, समस्या सहज व कमी वेळेत घरबसल्या मांडता यावी, या उद्देशाने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.-

-मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडीक जागांवर पीकपेरा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

सरकारच्या कूळ कायदा नियम १९६३ नुसार तीन वर्षांहून अधिक काळ पडून असलेली शेतजमीन महसूल विभागाकडून ताब्यात घेतली जाते. मात्र, नाशिक जिल्ह्यात पीकपेरा लावा अन् गुंतवणूक करा, अशीच काहीशी स्थिती दिसून येत आहे. हजारो एकर शेतजमीन केवळ पीकपेरा लावून पडून असल्याने याप्रश्नी महसूल विभाग कारवाई करणार केव्हा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे धनदांडगे व राजकीय पुढाऱ्यांच्याच शेतजमिनी वर्षांनुवर्षे पडून राहत असल्याने त्याकडे महसूल विभागच कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. देशात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश आहे. त्यातच केंद्र सरकारने नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश केला आहे. त्यामुळे साहजिकच नाशिक शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने गुंतवणूकदारांची संख्याही वाढली आहे. उद्योग, व्यवसाय व शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे नाशिक जिल्ह्यात पसरत असल्याने अनेक मोठे गुंतवणूकदार जिल्ह्यात गुंतणूक करण्यावर भर देताना दिसतात. गुंतणूक वाढत असल्याने नाशिक जिल्ह्याचीही भरभराट होताना दिसत आहे.

अर्थकारणातून दुर्लक्ष?

एकीकडे उद्योगांसाठी जमिनी अधिग्रहित करण्यासाठी संघर्ष सुरू आहे, तर समृद्धी महामार्गाला लागणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी प्रशासनाची मोठी कसरत पाहायला मिळत आहे. त्यातच दुसरीकडे हजारो एकर शेतजमिनी पडून असल्याने महसूल विभागाने त्या तात्काळ ताब्यात घ्याव्यात, अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे शहरालगत पडून असलेल्या जमिनींवर चक्क गहू, ज्वारी, बाजरी व इतर पिके लावलेली असल्याची तलाठ्यांकडे नोंद केली जाते. परंतु, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे पीक या शेतजमिनींवर घेतले जात नसूनदेखील महसूल विभाग अर्थकारणातून याप्रश्नी डोळेझाक करताना दिसत आहे.


कागदोपत्री शेतीची नोंद

अनेक गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्यात आलेल्या शेतजमिनी वर्षानुवर्षे रानमाळासारख्या पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारच्या कूळ कायदा अधिनियम १९६३ नुसार तीन वर्षांहून अधिक काळ पडून असलेली शेतजमीन महसूल विभागाकडून नोटीस देत ताब्यात घेण्यात येते. परंतु, नाशिक शहर व जिल्ह्यात हजारो एकर शेतजमीन गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. गुंतवणूकदारांकडून केवळ पीकपेरा लावत शेती असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात येते. त्यामुळे पडून असलेल्या शेतजमिनींना बकाल रूप आल्याचे चित्र आहे.

---

कूळ कायदा अधिनियम १९६३ नुसार तीन वर्षांहून अधिक काळ पडून असलेली शेतजमीन महसूल विभागाला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. परंतु, महसूल विभागाकडूनच अशा जमिनींवर पीकपेरा लावत हात झटकण्याचे काम केले जाते.

- बाळासाहेब बंदावणे, शेतकरी

---

शहराला लागून असलेल्या २३ खेड्यांचा समावेश महापालिकेत करण्यात आला आहे. खासगी विकसकांनी शेतकऱ्यांकडून शेतजमिनी खरेदी केल्या. परंतु, वर्षानुवर्षे त्या पडून अाहेत. त्याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

- संदीप पवार, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images