Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नवजातांची घुसमट!

$
0
0

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका इन्क्युबेटरमध्ये चार अर्भके

नाशिक : बसमध्ये गर्दी, रेल्वेमध्ये गर्दी, इतकेच काय सरकारी हॉस्प‌िटल्समध्येही गर्दी. आता तर नवजात अर्भकांनाही जन्मत:च गर्दीला सामोरे जावे लागते आहे. ज्या काचेच्या पेटीत (इन्क्युबेटर) एकच बाळ ठेवायला हवे, तेथे चक्क चार बाळं ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये घडत आहे. नवजात अर्भकांना एकमेकांपासून संसर्गाचा धोका असतानाही प्रशासकीय यंत्रणेतील लालफितीच्या आणि टोलवाटोलवीच्या कारभारामुळे अर्भकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात अर्भक मृत्यूच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गोरखपूरच्या राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये २९० बालकांचा मृत्यू झाला. यापैकी २१३ बालके एकट्या एनआयसीयू विभागात दगावली. उत्तर प्रदेशातील फरुखाबाद येथे राम मनोहर लोहिया हॉस्प‌िटलमध्ये परवाच ४९ बालके ऑक्सिजनअभावी दगावली. राजस्थान, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातही एकाचवेळी काही बालके दगावल्याच्या घटना अलीकडेच घडल्या आहेत. त्यामुळेच अर्भकांच्या जगण्याच्या हक्काचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रशासकीय यंत्रणेचा अक्षम्य गलथाणपणाच अशा घटनांसाठी कारणीभूत ठरत असल्याची माहिती अशा काही घटनांच्या तपासातून पुढे आली आहे. नाशिकच्या सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये नवजात अतिदक्षता विभागाची (एनआयसीयू) सुविधा उपलब्ध आहे. अत्यवस्थ नवजात अर्भकांवर उपचार करता यावेत यासाठी वैद्यकीय उपकरणांनी हा विभाग सज्ज ठेवण्यात येतो. जन्मत:च कावीळ असलेली, श्वसनक्र‌ियेस त्रास होत असलेली तसेच वजन कमी असलेल्या कुपोषित बालकांना काचेच्या पेटीमध्ये ठेवणे अपरिहार्य ठरते. येथील एनआयसीयूमध्ये १८ इन्क्युबेटर असून, एका इन्क्युबेटरमध्ये एकच बाळ ठेवणे बंधनकारक असते. परंतु, अत्यवस्थ नवजात अर्भकांची संख्या अधिक असल्याने एकेका इन्क्युबेटरमध्ये तीन ते चार बालकांना ठेवले जात असल्याचे सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये पहावयास मिळते आहे. नवजात अर्भकांची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे एकाच पेटीत अनेक बाळांना ठेवले जात असल्याने त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोकाही बळावला आहे.

हॉस्प‌टिलमध्ये दररोज साधारणत: ३० बालके जन्माला येतात. गेल्या महिनाभरात अत्यवस्थ ३५० बालकांना उपचारासाठी एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले. सद्यस्थ‌तिीत इन्क्युबेटरमध्ये ५४ बालके उपचार घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या बालकांना उपचार देणे सिव्हिल हॉस्प‌टिलमधील यंत्रणेपुढे आव्हान ठरते आहे. नवजात अर्भकांना उपचार देता यावेत यासाठी येथे आणखी १८ इन्क्युबेटरची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माता-बालकांची ताटातूट

‘एनआयसीयू’मध्ये अत्यंत मर्यादित जागा असल्याने तेथे बालकांच्या मातांना थांबू दिले जात नाही. काही माता तळमजल्यावरील प्रायव्हेट खोल्यांजवळील ट्रॉमा सेंटरमध्ये थांबतात, तर काहींना गर्दी नसलेल्या अन्य वॉर्डमध्ये थांबावे लागते. बाळाला दूध पाजण्यासाठी ‘एनआयसीयू’मध्ये सोडले जात नाही. त्यामुळे त्या वाटीमध्ये दूध घेऊन प्रतीक्षा करीत राहतात. अर्धा-एक तास त्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने बालकांचे अधिकच हाल होतात. बाळांना भेटताही येत नसल्याने या मातांचाही‌ जीव तुटत राहतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुढच्या वर्षी लवकर या!

$
0
0

टीम मटा : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात तब्बल बारा दिवस घरांघरांत चैतन्य आणलेल्या लाडक्या बाप्पाला अबालवृद्धांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. मोठ्यांसह लहानग्यांचा उत्साहही दांडगा होता. गंगापूर, सोमेश्वरपासून ते अगदी दसक-पंचकच्या घाटापर्यंत विविध ठिकाणी विसर्जनाची महापालिकेतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती. यंदा भाविकांनी मूर्ती व निर्माल्यदान करीत प्रदूषणमुक्तीकडे आणखी एक पाऊल टाकले. महाप‌ालिका, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्थांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे यावेळचा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला.

बाप्पा निघाले गावाला म्हणत उत्साहाने भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीनिमित्त सकाळपासून गणेशभक्त बाप्पाच्या निरोपासाठी सज्ज झाले होते. बाप्पांना निरोप देताना निसर्गही साथ देत पर्जन्यवृष्टी करत होता. शहरातील अनेक मंडळांची मिरवणुकीसाठीची लगबग दिसून येत होती. सोबतच गणेशमूर्ती दान करा, असा संदेश देत अनेक स्वयंसेवी संघटना विसर्जन घाटावर पहाटेपासूनच गणेशभक्तांना विनंती करत होते.

इकोफ्रेंडली विसर्जन
गणेशाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. अनेकांनी याच तलावात मूर्ती विसर्जित करून दान केली. तर अनेकांनी आपली मूर्ती घरीच विसर्जन करत पर्यावरण संवर्धनासाठी पाऊल उचलले. यात काही मंडळांनीदेखील आपली मूर्ती दान केली. बाप्पाला निरोप देताना प्रत्येकजण हळवा झालेला होता. घरगुती गणपती विसर्जित करतेवेळी देखील गणेशभक्तांनी वाजत गाजत निरोप दिला. गाडीत गाणे लावत अनेकांनी तिथेच ठेका धरला होता. काही कुटुंबीय फिरत्या ढोलताश्यावाल्यांकडून ढोल वाजवून घेत अनंत चतुर्दशीची धम्माल करत होते. तर काहींनी छोटे स्पीकर सोबत आणत आनंदोत्सव साजरा केला. सोबत संध्याकाळी गणेशमुर्ती विसर्जनानंतर नाशिकच्या महत्वाच्या मिरावणुकीसोबतच कॉलेज रोड, सातपूर, नाशिकरोड येथे तरुणाई आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस मित्रांचे सहकार्य
नाशिकमधील आसाराम बापू ब्रिज, सोमेश्वर, बालाजी मंदिर येथे एचपीटी आरवायके कॉलेजच्या स्वयंसेवकांनी पोलिसमित्राची भूमिका चोख बजावली. सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत हे विद्यार्थी ट्रॅफिक, मॉब कंट्रोलिंग करत पोलिसांना सहकार्य करत होते.

सेल्फी विथ गणेश

गंगापूररोड ः सोमेश्वर धबधब्यावर शिव समर्थ मित्र मंडळाच्या वतीने गणेशाचे रुप धारण करून भक्ताने गणेशमुर्ती दान करण्याचे आवाहन केले. यावेळी पाहणी करण्यासाठी आलेले पोलिस उपायुक्त कांगणे मँडम व सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश नखाते यांनी गणेशासमोबत आपला सेल्फी काढला. यानंतर अनेकांनी ‘सेल्फी विथ गणेश’ असे म्हणत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.

मूर्ती दान करणाऱ्यांचा ‘काबरा’कडून सत्कार
सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात काबरा एम्पोरिअमच्या वतीने गणेश मूर्ती दान केलेल्या गणेश भक्तांचे स्वागत करत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच गणपती मूर्ती दान करणाऱ्यांचा यथोच‌ित सत्कारही काबरा एम्पोरिअमच्या करण्यात आला. काबरा एम्पोरिअमचे ५० हून अधिक सेवक गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन भाविकांना करत होते.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची चोख कामगिरी
सातपूर ः लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची गोदावरी व नंद‌िनी नदी किनारी मोठी गर्दी उसळली होती. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील चोख कामग‌िरी बजावली. आरोग्य, बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा, विविध कर व भुयारी पाइपलाइन विभागाचे सर्वच अधिकारी व कर्मचारी गणपती विर्सजनस्थळी पहाटे सहा वाजेपासून तर शेवटचा गणपती विसर्जित होईपर्यंत नेमलेल्या कामाच्या ठिकाणी हजर होते.

सिडकोत डीजेमुक्त मिरवणूक
सिडको ः सिडकोत यंदा सुमारे सव्वाशे सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वार्षी लवकर या’ या जयघोषात परिसरातील भाविकांनी गणरायाला निरोप दिला. यंदा सार्वजनिक मिरवणुकीत डीजे वाजविण्यास बंदी असल्याने परिसरातील एकाही मंडळाने डीजे लावला नसल्याचे दिसून आले.
यंदा भाविकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेसह विविध सामाजिक संस्थांनी केले होते. सिडकोतून १९ हजार १३६ गणेश मूर्त्यांचे संकलन करण्यात आले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अखेरच्या गणेश चित्ररथाचे विसर्जन करण्यात आले.
सिडको विभागातून एक मुख्य मिरवणूक निघत असली तरी विविध मंडळे आपापल्या परिसरातून मिरवणूक काढत असतात. मुख्य मिरवणुकीत यंदा केवळ १५ मंडळांनी मिरवणूक काढून गणेशला निरोप दिला. सिडकोतील गणेश विसर्जनाचे मुख्य ठिकाण असलेल्या आयटीआय पुलाबरोबरच पवननगर पाण्याच्या टाकीजवळ व राजे संभाजी स्टेड‌ियम, गोविंदनगर, पिंपळगाव खांब, डेकेअर शाळा येथे कृत्रिम तलांवाची उभारणी करण्यात आली होती. पवननगर येथे नगरसेविका रत्नमाला राणे यांनी उपस्थित राहून भाविकांना मूर्ती दानाचे महत्त्व सांगितले. याठिकाणी सुामरे ४१०० मूर्त्यांचे संकलन करण्यात आले. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अंबड पोल‌िस ठाण्याचे वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोल‌िस निरीक्षक, ११ पोल‌िस उपनिरीक्षक, १२० पोल‌िस कर्मचारी व ५१ होमगार्ड यांनी परिसरात बंदोबस्त ठेवला होता. पारंपरिक वाद्यांमुळे मिरवणुकीला शोभा आली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सिडकोतील शेवटच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पवननगर, सावतानगर व त्रिमूर्ती चौक येथे मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचा सत्कार करण्यात येत होता. आयटीआय पूल येथे नगरसेवक दिलीप दातीर, अलका अहिरे यांचेसह सिडको व सातपूर विभागातील महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी मंडळांचे स्वागत केले. विसर्जनाप्रसंगी मूर्ती संकलनाचे आवाहन गोदा संवर्धन मोहीम, एकनिष्ठ युवा फाउंडेशन, जयबजरंग युवक प्रतिष्‍ठान, दैवत फाउंडेशन, सुजाण नागरिक मंच, केएसके डब्लू महाविद्यालय, बाळ संस्कृती मित्रमंडळ यांसह परिसरातील अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याचे दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉइज होस्टेलमध्ये चार मोबाइलची चोरी

$
0
0

नाशिक : पंचवटीतील औदुंबरनगर परिसरात एका बॉइज होस्टेलमध्ये झोपलेल्या तरुणाजवळील चार मोबाइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सुशांत चांगदेव होडकर (२०) या तरुणाने पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हॉस्टेलमध्ये सर्व विद्यार्थी मंगळवारी (दि. ५) सकाळी साडेसातच्या सुमारास झोपले होते. चोरट्याने तेथून २६ हजार रुपयांचे चार मोबाइल चोरून नेले.

भाजी मार्केटमध्ये मोबाइल चोरीस
नाशिक : पवननगर भाजी मार्केट परिसरातून चोरट्याने एका तरुणाजवळील मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी अरविंद दिलीप खैरनार (२५, रा. सिहंस्थनगर) याने अंबड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. अरविंद खैरनार यांचा सॅमसंग मोबाइल शनिवारी (दि.२) सायंकाळी सातच्या सुमारास भाजी मार्केट परिसरातून चोरीस गेला.

तरुणावर गुन्हा
नाशिक : मोबाइलमध्ये अश्‍लिल चित्रफीत बघणाऱ्या तरुणावर म्हसरुळ पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. प्रज्ज्वल एस. झोटिंग (२६, रा. एकतानगर, बोरगड) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. ३) सायंकाळी सातच्या सुमारास दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपच्या मागील अपार्टमेंटच्या मोकळ्या जागेत संशयित प्रज्ज्वल त्याच्याकडील मोबाइलमध्ये अश्‍लिल चित्रफित बघताना आढळला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्ट ऑफिसमध्ये महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
आर्थिक व्यवहारातील वादातून पिता-पुत्रांनी पोस्ट ऑफिसमधील एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केला. तिच्यासह पतीस बेदम मारहाण केली. द्वारका परिसरातील कार्यालयात हा प्रकार घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. रामचंद्र माधव तेजाळे (६६) आणि शुभम रामचंद्र तेजाळे (२१, दोघे रा. गणेशनगर, काठेगल्ली) या दोघांविरोधात विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

दहशत पसरविणाऱ्यावर गुन्हा
नाशिक : हातात कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. धीरज नागेश गवारे (२४, रा. पेठरोड) असे त्याचे नाव आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो भद्रकालीतील महात्मा फुले कलादालनसमोर कोयता घेऊन फिरत लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.

महिलेचा खून
नाशिक : महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना औरंगाबाद रोडवरील रामांजनैय मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये संशयित अमर उदय साऊद (२२, रा. नेपाळ) या संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तो संबंधित महिलेचा पती आहे. रविवारी (दि. ३) दुपारी दोनच्या सुमारास अमरने त्याची पत्नी लक्ष्मी साऊद (१९) हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप महासिंग जगत बोहरा (२९, रा. पंजाब) यांनी केला आहे. अमर लक्ष्मीच्या चारित्र्याचा संशय घेत असे. त्यातूनच त्याने लक्ष्मीचा गळा आवळून खून केल्याचा महासिंग बोहरा यांचा आरोप आहे.

जुगार अड्डयावर छापा
नाशिक : पवननगर बसस्टॉप जवळील इमारतीच्या टेरेसवर जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. अंबड पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सोमवारी (दि. ४) रात्री बाराच्या सुमारास एका इमारतीच्या छतावर छापा टाकला. त्यात सोपान बाबुराव पाटील (४३, रा. पवननगर) हा इतर सात साथीदारांसोबत जुगार खेळताना आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा हजार ६२० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंदे एमआयडीसीत आग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील गोंदे एमआयडीसीतील एआरएस बायोफील या इथेनॉल उत्पादन असलेल्या कारखान्यातील दोन टाक्यांना बुधवारी दुपारी आग लागली. यामुळे परिसरात घबराहट पसरली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या कारखान्यालगत दुसरा कारखाना नसल्याने व हा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टाक्या व त्यातील कच्चा व पक्का मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गोंदे येथील औद्योगिक वसाहतीत अस्वली स्टेशन रोडवर असलेल्या एआरएस बायोफिल या कारखान्याच्या आवारात दोन मोठ्या आकाराच्या व दोन लहान आकाराच्या स्टोरेज टाक्या आहेत. बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास या कारख्यान्याच्या आवारातील एका स्टोरेज टाकीचा अचानक स्फोट झाला. या कंपनीचे उत्पादन जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कंपनीत कामगार वर्गही नव्हता. दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका टाकीचा स्फोट झाला.

या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने त्यालगत असलेल्या दुसऱ्या टाकीनेही पेट घेतला. लहान टाक्यांनाही आग लागली होती. परंतु ही आग तत्काळ विझविण्यात आली. त्यामुळे चांगलीच धावपळ उडाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत आगीचे लोळ सुरू होते.

कंपनी तीन महिन्यांपासून बंद

या कंपनीत कच्च्या मालापासून इथेनॉल बनविले जाते. ही कंपनी गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. या आगीचे वृत्त कळताच पोलिस यंत्रणेने धाव घेतली. नाशिक महानगर पालिका, महिंद्रा कंपनी यांच्या अग्निशमन दलाने तत्काळ घाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार व कोणालाही इजा होणार नाही याची दाखल घेतली जात आहे.

कच्च्या मालाचे नुकसान

नाशिक ग्रामीण पोलिसचे उपअधीक्षक अतुल झेंडे, नाशिक मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी महाजन, वाडीवऱ्हे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख आदींनी घटनास्थळी परिस्थितिवर नियंत्रण ठेवले. आगीचे कारण व झालेले नुकसान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र या टाक्यांमध्ये कच्चा व पक्का मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रा योजनेद्वारे ८८ कोटींचे कर्जवाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांना सहज कर्जपुरवठा व्हावा या उद्देशाने प्रारंभ झालेल्या मुद्रा योजनेत जिल्ह्यातील १८ हजार ८५८ बेरोजगारांना ८८ कोटी ५६ लाख रुपये कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
मुद्रामधून कर्ज देण्यासाठी शिशु, किशोर व तरुण असे तीन विभाग केले असू त्यात कर्ज देण्याची मर्यादा निश्चित केली आहे. ५० हजाराची मर्यादा असलेल्या शिशु योजनेतून १७ हजार ४९२ जणांना ४० कोटी ६५ लाख कर्ज देण्यात आले आहे. तर ५० हजार ते ५ लाख पर्यंत कर्ज मिळणाऱ्या किशोर योजनेतून १०६६ बेरोजगारांना २५ कोटी १२ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच पाच लाख ते १० लाख रुपये कर्ज मर्यादा असणाऱ्या तरुण योजनेतून ३०० बेरोजगारांना २४ कोटी ६८ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे.

योजना प्रभावीपणे राबावी यासाठी जिल्ह्यात सर्वत्र प्रयत्न केले जात आहे. नाशिक जिल्हा हा मुद्राचे कर्जवाटप करण्यात नवव्या क्रमांकावर असून अधिकाधिक कर्ज या योजनेतून वाटप करण्याचा बँकांचा प्रयत्न आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात हे तीन महिन्याचे आकडे समोर आले असून त्यात १८ हजार तरुणांना त्याचा लाभ झाला आहे. केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’बरोबरच मुद्रा योजना लागू केली आहे. व्यवसाय आणि उद्योगांमध्ये प्रामुख्याने सुरळीत कर्जपुरवठा हा मोठा अडसर आहे. ही बाब ओळखूनच मुद्रा योजना आणण्यात आली आहे. केंद्र सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेकडे बिगर बँकिंग वित्तसंस्था म्हणून सिडबीची उपकंपनी म्हणून मुद्रा बँकची नोंदणी केली आहे. या नोंदणीबरोबरच मुद्राला २० हजार कोटींचे भागभांडवलही दिले आहे. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅण्ड रिफायनान्स एजन्सी असलेली ही मुद्रा बँक रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आहे. या योजनेत राष्ट्रीयकृत बँकेला हे कव्हर देण्यात आल्यामुळे ५० टक्के कर्जाची जबाबदारी मुद्रावर आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना या योजनेतून फायदा झाला असून दरवर्षी कर्ज घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

मुद्रामधून राष्ट्रीयकृत बँका कर्ज देतात. या आर्थिक वर्षात तीन महिन्यात जिल्ह्यातील १८ हजार ८५८ बेरोजगारांना ८८ कोटी ५६ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. राज्यात जिल्हा नवव्या क्रमांकावर आहे.
- प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष,
भाजप उद्योग आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कैलास’च्या सभासदांनी सभेकडे फिरवली पाठ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरच्या कैलास नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व साधारण सभेस अवघे चार सभासद उपस्थित होते. मागील सभेच्या इतिवृत्तासह महत्त्वाच्या ९ ठरावांना बहुमताने मंजुरी मिळाली.

त्र्यंबकमधील पहिली नागरी पतसंस्था आणि तब्बल साडे तीन हजार सभासद असलेल्या या संस्थेच्या पूर्वीच्या वार्षिक सभा वादळी झाली असल्याने सालाबादाप्रमाणे यावर्षी उत्सुकता होती. मात्र सभासदांनी यंदा सभेकडे पाठ फिरवली.

संस्थेचे चेअरमन राहुल फडके यांनी सांगितले, संस्थेस ३८ लाखांचा नफा झाला असून, १३ कोटी १३ लाख १० हजार रुपयांच्या ठेवी आणि ५ कोटी १५ लाख ९२ हजारांचे कर्जवाटप आहे. या सभेस संस्थेचे २१ संचालक, ८ स्वीकृत संचालक व्यासपिठावर उपस्थित होते. मात्र या व्यासपीठासमोर अवघे चार सभासद हजर होते. उपस्थित सभासदांपैकी वसंतराव भोसले आणि अनिल काळे यांनी काही थकीत कर्जांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांना फडके आणि सचिव वसंतराव घुले यांनी उत्तरे दिली. व्यवस्थापक शैलेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या काही बदललेल्या नियमांची माहिती याप्रसंगी देण्यात आली. कैलास नागरी पतसंस्थेचे ३८ अल्पबचत प्रतिनिधी आहेत. या प्रतिनिधींची आणि कर्मचाऱ्यांची संपूर्ण उपस्थिती होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षीक निवडणुकीने ही संस्था चर्चेत आली होती.

पाच वर्षात एकदाही सभेस हजार नसलेल्या सभासदांचे सभासदत्त्व रद्द करण्याची तरतूद आहे. तसेच प्रत्येक सभासदाने किमान पाच हजार रुपये मुदत ठेव ठेवली पाहिजे किंवा पाच हजार रुपये कर्ज घेतले पाहिजे, असा नियम सांगतो. त्याची अमलबजावणी होईल का? असा सवाल काही सभासदांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच सभेचा अजेंडाच मिळत नसल्याचे अनेकांची तक्रार आहे. यापूर्वी

सभेस उपस्थित राहून सूचना मांडल्या. मात्र पुढील वर्षी इतिवृत्तात त्यांचा समावेश नसल्याचे आढळल्याने हा फार्स कशासाठी म्हणून सभासद सभेला येत नाहीत, असे काही सभासदांनी सांगितले. सहकार खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीसह सासू, सासरा अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
नगरसूल गावानजीकच्या माळवाडी येथील (ता. येवला) विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासल व सासऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी फिर्याद दिली होती.
संतोष कारभारी कमोदकर (पती), मंगलाबाई कारभारी कमोदकर (सासू) आणि कारभारी कमोदकर (सासरा) अशी तिघा संश‌यितांची नावे आहेत. रेणुका संतोष कमोदकर (२७) या विवाहितेने भक्ती (६) आणि कावेरी (३) या चिमुकल्या लेकींसह सोमवारी (दि. ४) शेतातील विहिरीत उडी घेतली होती. यात रेणुकासह भक्ती या दोघींचा मृत्यू झाला होता. तर, तात्काळ बाहेर काढण्यात यश आल्याने कावेरीचे प्राण वाचले होते. रेणुकाच्या मड्डेवाडगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील माहेरच्या नातेवाइकांनी माळवाडीकडे धाव घेतली. याच दिवशी रात्री रेणुका कमोदकर हिच्या नातेवाइकांनी येवला तालुका पोलिस स्टेशन गाठताना फिर्याद नोंदवली. तिचे वडील सुभाष गणपत घोडके (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तात्काळ मध्यरात्रीच्या सुमारासच रेणुकाचा पतीसह सासू आणि सासरा या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. रेणुका हिचा विवाह संतोष कमोदकर याच्याशी २००९ मध्ये विवाह झाला होता. स्वयंपाक येत नाही या कारणास्तव सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने छळ केला जात होता. रेणुकास दुसरी मुलगी झाल्यानंतर दोन मुली झाल्या म्हणून तिचा शिवीगाळ, मारहाण अधिकच होत गेली. या सर्व शारीरिक व मानसिक छळाला कंटाळूनच रेणुका हिने मुलीसह आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लंकेश हत्येचा पुरोगामी संघटनांतर्फे निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या कर्नाटकातील बेंगळुरू येथे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील पुरोगामी व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक निदर्शने करण्यात आली. या हत्येनंतर बेंगळुरू पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

गौरी लंकेश यांची मंगळवारी (दि. ५) रात्री त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. नाशिकमध्येही पुरोगामी व परिवर्तनवादी संघटनेने एकत्र येऊन हे आंदोलन केले आहे. यापूर्वी देशात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाल्या. पण, त्याच्या खूनाचे आरोपी अद्याप सापडलेले नाही. गौरी लंकेश सुध्दा प्रबोधनाची पत्रकारिता करीत होत्या. अंधश्रद्धेविरोधात लेखन करणाऱ्या, आवाज उठविणाऱ्या त्या होत्या. देशात पत्रकार समाज सुधारकांचे खूनाचे सत्र सुरू असताना केंद्र आणि राज्य सरकारे याकडे गांभीर्याने बघत नाहीत असा आरोपही या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. लंकेश यांच्यावरली हल्ला हा लोकशाहीच्या आधारस्तंभावरती आघात असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात शांताराम चव्हाण, राकेश पवार, पद्माकर इंगळे, राजू देसले, रमेश ठाकूर, विशाल रणमाळे, महेंद्र दातरंगे, व्ही. डी. धनवटे, नितीन माटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हल्लेखोरांच्या अटकेची मागणी
मालेगाव : पत्रकार गौरी लंकेश यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून धर्मांधता आणि जातिवादाच्या विरोधात सातत्याने आग्रही भूमिका मांडली. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, राष्ट्र सेवादल ,सम्राट मंडळ तसेच विविध सामाजिक संघटनांनी केली. यबाबत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालायात प्रांत अजय मोरे, नायब तहसीलदार आर. के. सायनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रवीराज सोनार, देवा पाटील, राहुल देवरे, मुजफ्फर शेख, अतुल लोढा, रफिक सिद्धीक, नावेद अजहर, नीलिमा पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशीच कृपा राहू दे…

$
0
0

टीम मटा

गेल्या अकरा दिवसांपासून घराघरात विराजमान झालेल्या बाप्पाला मंगळवारी भक्तीभावाने निरोप देण्यात आला. गत‌ वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाची नाशिक जिल्ह्यावर कृपादृष्टी असल्याने बाप्पाला निरोप देतांना भक्तांनी सदैव अशीच कृपा राहू दे…असे साकडे घालत निरोप दिला.

मालेगावात उत्साह

मालेगाव ः शहर व तालुक्यात गणेशविसर्जन उत्साहात पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. सोमवारी मध्यरात्रीपासूनच सुरू झालेले विसर्जन मंगळवारीमध्यरात्रीपर्यंत सुरू होते.

येथील महापालिका, महसूल, मनपा प्रशासनाकडून यंदा गणेश विसर्जनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली. शहरातील महादेव घाटावरील गणेशकुंड , कॅम्प गणेशकुंड यासह रोकडोबा, टेहरे चौफुली, गिरणा पूल येथे बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी मध्यरात्रीच मालेगाव फ्रेंड सर्कल या सार्वजनिक गणेशमंडळाचे प्रथम विसर्जन झाले. कॅम्प, संगमेश्वर, कलेक्टरपट्टा, पाचकंदील आदी भागातून ढोलताशांच्या गजरात मिरवणुकांना सुरुवात झाली. संपूर्ण शहरात एक हजाराहून अधिक पोल‌सि तैनात होते. मिरवणूक मार्गवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती. येथील मसगा कॉलेज, पंचायत समिती व प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील ‘देव द्या, देवपण घ्या’ हा मूर्तीदानाचा उप्रकम राबविण्यात आला. तब्बल पाच हजार मूर्तीचे दोन करण्यात आले. अजिंठा मंडळ प्राथमिक विद्यालयाच्या ढोल पथकाने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

मिरवणुकांचा थाट

येवला ः जुन्या-नव्या लोकप्रिय गीतांसह रिमिक्स गाण्यांचा बँजोवरील खणखणाटावर ताल धरत समस्त येवलेकरांनी बाप्पाच्या मिरवणुकीत उत्साहात सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, मध्येच कडाडणारी येवल्याची प्रसिद्ध हलकडी, डोळे दिपवणाऱ्या पारंपरिक मैदानी कसरती, झांज, लेझीमचे प्रदर्शन अशा उत्साहपूर्ण वातावरणात श्रीं ना निरोप देण्यात आला.

प्रथम मानाच्या कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या ‘श्रीं’चे ऐतिहासिक आझाद चौकात आगमन झाले. प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, पोलकस उपअधीक्षक एम. डी. सुरवसे, पोलकस निरीक्षक संजय पाटील आदी उपस्थितीत होते. संत रोहिदास मंडळ, लक्ष्मीनारायण मंडळ, काट्या मारुती तालीम, तीन देऊळ गणेश मंडळ, जाईचा मारुती तालीम, पाटील फ्रेंड्स सर्कल, क्रांती ग्रुप, लबक फ्रेंड्स सर्कल आदी एकूण १५ गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. काट्या मारुती तालीम, पाटील फ्रेंड्स सर्कल

आदी मंडळांनी पारंपरिक कसरती दाखवल्या.

जाईचा मारुती तालीम व परदेशपुरा तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आखाडी सोंगे येवलेकरांची दाद मिळवून गेली. कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाने मिरवणुकीदरम्यान उपस्थित मान्यवरांना एक रोपटे भेट देत वृक्षारोपणाचा

संदेश दिला.

त्र्यंबकला पालखी मिरवणूक

त्र्यंबकेश्वर ः पारंपारीक वाद्य, भक्तांच्या खांद्यावर बाप्पाची पालखी, बैलगाड्यावर ऐटीत निघालेली विघ्नहर्त्यांची स्वारी अशा भक्तीमय वातावरणा त्र्यंबकेश्वरमध्ये बाप्पाला निरोप देण्यात आला. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर झाल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दणदणाट झाला.

गतवर्षी मुकुंद तलावातील दुर्घटनेपासून बोध घते यंदा शहरातील सर्व तलाव जलाशय येथे नगर पालिकेने सुरक्षा रक्षक नेमले होते. शहरातील फक्त गौतम तलाव येथेच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गौतम तलाव येथे नागरिकांनी मूर्ती दान करावी म्हणून संकलन केंद्र उभारले होते. मुख्याधिकारी डॉ चेतना केरूरे यांनी नाशिक येथून कुटुंबीयांसमवेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणली होती. येथे आरती करून मूर्ती दान करण्यात आली. त्यानंतर डॉ. केरूरे आणि नगरपालिका कर्मचारी स्वतः येथे उभे राहून नागरिकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. बाटल्यांच्या होडीतून तलावात गणपती बाप्पाला फिरवून आणत मूर्ती संकलन केंद्रांवर दान करण्यात आल्या. श्री लक्ष्मीणारायण चौक मंडळाने यावर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली होती. सृष्टी गणेश उपक्रमांतर्गत लाल मातीपासून तयार केलेल्या या पर्यावरणपूरक मूर्तीत झाडांचे बीज ठेवण्यात आले आहे. ही मूर्ती झाडाच्या कुंडीत विसर्जित करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा तृप्ती धारणे, पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, माजी उपनगराध्यक्ष गिरीश जोशी, उमेश शिखरे, नगरसेवक धनंजय तुंगार उपस्थित होते. शुयमा ब्राह्मणसंस्थेचा श्रीगणेशाची बैलगाडीवरून तर नवशक्ती गणपतीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

आरम नदीपात्रात विसर्जन

सटाणा ः शहरातील मालेगाव रोडवरील राजाला ठेंगोडा येथील नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. शहरातील बहुतांश मंडळानी आपल्या सोयीनुसार गणेश विसर्जन केले. दुपारी निघालेल्या मिरवणुकीत मोजक्यात मंडळानी सहभाग घेतला. त्यामुळे पोलिस प्रशासनावरचा ताण बरासचा हलका झाला.

शहरातील घरगुती मंडळांनी आरम नदीपात्रात विसर्जन केले. डॉ. सौ. विद्या सोनवणे अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे यांच्या इनरव्हील क्लब वतीने ‘देव द्या देवपण घ्या’ ही संकल्पना शहरात राबवून सुमारे ३०० हून अधिक गणेश मूर्तीचे जिजामाता उद्यानाजवळ संकलन करण्यात आले. राज्यमहामार्गावर नगराध्यक्ष सुनील मोरे मित्र मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

देवळ्यात गुलालाला फाटा

कळवण ः देवळा येथील वाजगाव रस्त्यावरील जय हिंद गणेश मित्रमंडळाच्या वतीने अत्यंत भावपूर्ण वातावरणात प्रदूषणमुक्त व पर्यावरण मुक्त मिरवणूक काढून गणेशाला निरोप देण्यात आला. उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर, सामाजिक कार्यकर्ते दीपक आहेर, सुनील आहेर, अनिल आहेर आदी उपस्थित होते. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाद्य न वाजविता तसेच गुलालाची उधळण न करता गणेशाला निरोप देण्यात आला. नगराध्यक्षा वृषाली आहेर यांच्या हस्ते गणेशाचे पूजन करण्यात आले.

निफाडला मूर्तीदान

निफाड ः येथील विणता, कादवा नदी दूथडी भरून वाहत असतानाही निफाड नगरपंचायतीने पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक भक्तांनी मूर्ती दान करण्यावर भर दिला. विणता नदीवरील वसंत बंधारा, श्री संगमेश्वेर मंदिर, कादवा नदीवरील बंधारा, निफाड फिल्टर प्लॅन या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनीही मूर्ती दान केली. विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या सुमारे अडीच हजार गणेश मूर्तींचे जमा करण्यात आल्या.

घोटीत रोपटे भेट

घोटी ः शहरासह इगतपुरी तालुक्यात गणेश विसर्जन सोहळ्यात अभूतपूर्व उत्साह दिसून आला. शिवमल्हार मंडळाने मूर्तीदानाने आवाहन केले. शहरात डीजे मुक्त वातावरणात विसर्जन झाल्याने भाविकांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मूर्ती दान करणाऱ्या परिवारास शिवमल्हारतर्फे आंब्याचे रोपटे भेट देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिकविमा’ कोमात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानातून सावरण्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान पिकविमा योजनेकडे यंदाच्या खरीप हंगामात नाशिक विभागातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. निम्म्याहून अधिक खरीप हंगाम उलटून गेल्यानंतरही विभागातील केवळ १२ टक्के शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे.

विभागातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पिक विमा योजनेच्या सहभागाला रेड सिग्नल दाखविला आहे. खास करून नाशिक, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजनेला यंदा प्रतिसाद दिलेला नाही. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ८९ हजार ३३६, धुळे जिल्ह्यातील ७२ हजार ८८७, नंदुरबार जिल्ह्यातील ३९ हजार २६९, जळगाव जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार ७ तर नगर जिल्ह्यामधून ३ लाख ७९ हजार ३०१ अशा एकूण ३ लाख ९६ हजार २७९ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी नाशिकमधील १ हजार ६४१, धुळ्यातील ९ हजार ३५३, नंदुरबारमधील २ हजार ८८०, जळगावमधील २२३ आणि नगरमधील ६५ हजार ८१५ अशा एकूण ७९ हजार ९१२ इतक्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे ४४ कोटी रुपयांची आर्थिक भरपाई मिळाली. असे असूनही शेतकऱ्यांनी यंदा मात्र या योजनेकडे पाठ फिरविली आहे. खरीपात विभागातील ३० लाख ९८ हजार ९८७ पैकी अवघ्या ३ लाख ७० हजार ५५१ इतक्याच शेतकऱ्यांनी या योजनेत आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे.

पिककर्जाअभावी अल्प प्रतिसाद
विभागातील पाच पैकी नगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यांचा अपवाद वगळता जिल्हा बँकांकडून उर्वरित नाशिक, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पिककर्ज मिळालेले नाही. परिणामी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पिकविमा योजनेला मोठा फटका बसला आहे. लाखो शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहिल्याने ते आपोआप पिकविमा योजनेतून बाहेर फेकले गेले आहेत. नगर व जळगाव या दोन्ही जिल्ह्यांतही पिकविमा योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता विभागातील खरीप शेत पिकांचे विमा संरक्षणाचे कवच फुटले आहे.


‘कृषी’कडून शेतकरी वाऱ्यावर
पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. विभागातील बहुतांश तालुक्यांतील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोठे दिव्य पार करावे लागले. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. पिकविमा योजनेत सहभागी झालेल्या व नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या कित्येक शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. उंबरठा उत्पन्नाची अटही या योजनेसाठी मारक ठरल्याने शेतकरी नाराज आहेत.

खरीप हंगामातील सहभागी शेतकरी
जिल्हा......खातेदार संख्या......सहभागी संख्या
नाशिक......७,९७,६९७......५,१५४
धुळे......४,१५,५०२......४०,०३४
नंदुरबार ......१,४८,०००......६,९१९
जळगाव......५,५३,४०८......९७,७७९
नगर......११,८४,३८०......२,२०,६६५
एकूण......३०,९८,९८७......३,७०,५५१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेने लष्करी जवान ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
लामरोडवर तेजुकाया कॉलेजसमोर कारखाली आल्याने दुचाकीस्वार लष्करी जवानाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेली पत्नी आणि दोन मुली यांना गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. योगेश कचरू गवळी (३३) असे ठार झालेल्या जवानाचे नाव आहे. त्यांच्यावर लष्करी इतमामात बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिंगवे बहुला येथील लष्करी विभागाच्या टी. ए. बटालियनमध्ये लान्सनायक पदावर असलेले गवळी हे दिल्ली आर्मी हेडक्वॉर्टरमध्ये कामास आहे. गणपतीनिमित्त ते सुटीवर आले होते. योगेश मंगळवारी (दि. ५) गणेशविसर्जन करून पत्नीसह नाशिकला परत येत असताना रात्री ११ च्या सुमारास तेजुकाया कॉलेजसमोर अपघात झाला. मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने (एमएच ०४ जीसी १२५) पुढे असलेल्या दुचाकीस्वार गवळी यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील गवळी यांच्या पत्नीव दोन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या. गवळे हे गतिरोधकावरून उडालेल्या काराखाली आला. त्यांचे शरीर अडकले. अपघातस्थळी धावून आलेल्या साहेबराव चौधरी, प्रमोद मोजाड, नीलेश साळवे, ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी कार उलटी करून गवळी यांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. स्थानिक पत्रकार अशोक गवळी यांचे ते लहान बंधू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. नीलेश साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक विनोद प्रकाश भोईर (रा. कल्याण) याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षिका जी. डी. सरोदे या अधिक तपास करीत आहेत.

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
गवळी यांच्या निधनाचे वृत्त समजताच लष्करी विभागातील टी. ए. बटालियनच्या अधिकाऱ्यांनी गवळी यांचे पार्थिव धोंडीरोड मार्गावरील लष्करी शवगृहात ठेवले. सकाळी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून गवळी यांचे पार्थिव शिंगवे बहुला येथे नेण्यात आले. गावात सकाळपासूनच शोकाकूल वातावरण होते. दुपारी पार्थिव येताच गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. लष्कराच्या वतीने कर्नल सहस्रबुद्धे, कर्नल डबास, सुभेदार हवासिंग, कॅप्टन विशाल आदींनी पुष्पचक्र वाहिले. बिहार व टी. एबटालियनच्या बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड व देवळालीकरांच्या वतीने नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे आदींनी श्रद्धांजली वाहिली. शिंगवे बाहुला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आऊटसोर्सिंगवरच भर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नोकरभरतीसाठी सरकारकडे पाठपुरावा करूनही यश मिळत नसल्याने प्रशासनाने अखेर पालिकेतील विविध पदे आता आऊटसोर्गिंद्वारे भरण्याची प्रक्रीया सुरू केली आहे.

महापालिका हद्दीत असलेल्या ४८० उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीवर लक्ष ठेवणाऱ्या उद्यान निरीक्षकांची तब्बल चार पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता ही उद्यान निरीक्षकांचीही पदे आउटसोर्गिंगने भरण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्तावही महासभेवर ठेवला आहे. त्यामुळे आता पालिकेतील उद्यान निरीक्षक ही पदेही आऊटसोर्गिंने भरली जाणार असल्याने पालिकेचा कारभार आता आऊटसोर्गिंच्या भरवशावरच चालणार आहे.

एकीकडे पालिकेतील निवृत्तांची संख्या वाढत असतांना, दुसरीकडे नोकर भरती होत नसल्याने सर्वच विभागांमध्ये आता अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या घटत आहे. महापालिकेचा ब वर्गात समावेश होवूनही क वर्गाच्या आकृतीबंधावरच कामकाज सुरू आहे. त्यातही निवृत्तांचाही आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी नोकरभरतीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. परंतु आस्थापना खर्च ३५ टक्के पेक्षा जास्त असल्याने नोकरभरतीला हिरवा कंदील मिळत नाही. तर दुसरीकडे प्रशासनाचा गाडा हाकणे प्रशासनाला अवघड होत चालले आहे. त्यांनी आता सफाई कर्मचाऱ्यांसोबतच उद्यान निरीक्षक ही पदे

आऊट सोर्सिंगने भरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिका हद्दीत असलेल्या ४८० उद्यानांच्या देखभाल व दुरूस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उद्यान विभागाकडे नाही. सहा उद्यान निरीक्षकांची पदे मंजूर असतांना सध्या केवळ दोनच उद्यान निरीक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता चार पदे आऊट सोर्गिंगने भरण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. मंजुरीसाठी येत्या महासभेवर हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना एक वर्षासाठी नियुक्ती दिली जाणार असून, २१ हजार रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे. त्यासाठी वर्षाला दहा लाखाचा खर्च येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.

नोकरभरती बासनात

महापालिकेला नोकरभरती करण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. ही परवानगी मिळाल्यास जवळपास पाच ते सात हजार पदे भरली जाणार आहेत. परंतु आस्थापना खर्च जास्त असल्याचे सांगत, राज्य सरकारने पालिकेला केवळ तांत्रिक पदे भरण्यासच परवानगी दिली आहे. तसेच आवश्यक पदे हे आऊट सोर्सिंगने भरण्याचा सल्ला सल्ला दिला आहे. त्यामुळे नोकरभरतीही आता गुंडाळली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लू फोफावतोय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून स्वाइन फ्लू आणि डेंग्यूबाबत विविध प्रकारची जागृती, उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्या फोल ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या सहा दिवसांत महापालिका हद्दीत स्वाइन फ्लूने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे गेल्या ३५ दिवसांत स्वाइन फ्लूने गेल्या महिन्यांत नऊ जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सुस्तावल्याचे चित्र आहे. दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरात डेंग्यूचे ३५ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत.

स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात स्वाइनवे पाच रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ महापालिका बाहेरील रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात एकूण ६६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यात विविध ठिकाणी ७ जणांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या सर्वच प्रमुख रुग्णालयात स्वाइन फ्लू कक्ष उभारण्यात आलेला आहे. याशिवाय या रुग्णांच्या सर्व्हेक्षणाबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आलेल्या असल्या तरी वातावरणातील बदल, पाऊस यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत.

डेंग्यूचे ३५ संशय‌ति

दरम्यान स्वाइन फ्लू प्रमाणेच डेंग्यूच्या रूग्णांतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच एकूण ३५ संशयितांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासक हटविण्यासाठी नामकोच्या सभेत ठराव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चन्ट बँकेचा एनपीए १४२ कोटींवर गेल्यानंतर बँकेचे माजी संचालक प्रशासक हटविण्यासाठी सरसावले आहेत. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ही मंडळी सभासदांच्या साथीने निवडणूक घेण्याचा ठराव मांडणार आहेत. साडेतीन वर्षांनंतर माजी संचालकांनी प्रशासक राजवटीविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. सातपूरच्या मुख्य शाखेत प्रशासकाला याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.

माजी संचालकांनी पत्रकार परिषद घेवून साडेतीन वर्षांत प्रशासक कारर्किदीत झालेल्या नुकसानीचा पाढा वाचला. २० हून अधिक शाखा तोट्यात आल्याचे सांगत त्यांनी ग्राहक कमी झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक, त्यांच्यावर असलेली दहशत, दबाव यामुळे मृत झालेले कर्मचारी, काम सोडून गेलेले कर्मचारी याकडेही लक्ष वेधण्यात आले. वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी, अॅड. आनंद बागमार, प्रफुल्ल संचेती, सुभाष नहार, शोभा छाजेड, रंजनी जातेगावकर उपस्थित होते.

मंडळ का बरखास्त केले?

बँकेवर ६ जानेवारी २०१४ रोजी प्रशासकाची निवड झाली. त्यानंतर साडेतीन वर्षांत रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ का बरखास्त केले याचे उत्तर मिळाले नसल्याचे माजी संचालकांचे म्हणणे आहे. बँकेला आजही अ दर्जा मिळतो आहे. बँक सुरळीत आहे. त्यामुळे बरखास्त करण्याचे कारण कळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

विलीनीकरणाचा घाट

बँकेचा एनपीए वाढत नेवून बँक दुसऱ्या बँकेत विलीनीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी प्रशासकाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. ९०० कोटी कर्ज बँकेने वितरीत केले असले तरी बँकेचा स्वनिधी एक हजार कोटींचा आहे. त्यामुळे ठेवींना कोणताही धोका नाही, असा दावाही करण्यात आला.

एनपीए १४२ कोटींवर

संचालक मंडळाच्या काळात ३० कोटी एनपीए(अनुत्पादक कर्जे) होता. आता तो १४२ कोटींवर आला आहे. आज बँकेने ९०८ कोटींचे कर्ज वाटले आहे. १०५१ कोटींची गुंतवणूक व १,६०८ कोटींच्या ठेवी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओझरची कार्गो सेवा संकटात

$
0
0

नाशिक ः जिवंत प्राण्यांच्या परदेशातील निर्यातीचा विक्रम घडल्यानंतरही ओझर येथील कार्गो सेवा संकटात सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे केवळ निम्म्या प्रमाणातच शेळ्यांची निर्यात झाली आहे. ही स्थिती अशीच राहिली तर हा निर्यात उद्योग हैदराबाद आणि अमृतसरला जाण्याची भीती आहे.

एचएएलच्या हद्दीत असलेल्या ओझर विमानतळावरुन गेल्या वर्षी प्रथमच शेळ्यांची निर्यात सुरू झाली. जिवंत प्राण्यांची अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच परदेशी निर्यात होती. युक्रेनच्या कार्गो विमानाद्वारे गेल्या वर्षी ८ फेऱ्यांद्वारे १३ ते १४ हजार शेळ्या दुबईला निर्यात झाल्या. हा अनुभव गाठीशी असल्याने यंदा तब्बल १ लाख शेळ्यांच्या निर्यातीचे उद्द‌ष्टि ठेवण्यात आले.

मात्र, ओझर येथील कार्गो सेवेच्या ठिकाणी असलेल्या अनेक तांत्रिक अडचणींमुळे केवळ ४५ हजार शेळ्यांचीच निर्यात होऊ शकली आहे. ओझर येथील या तांत्रिक अडचणी आणि मर्यादा लक्षात घेऊनच याचवर्षी हैदराबाद आणि अमृतसर या दोन विमानतळांवरुनही कार्गोसेवेद्वारे शेळ्यांची निर्यात सुरू झाली आहे. हैदराबाद येथून २० हजार तर अमृतसर येथून तीन हजार शेळ्यांची निर्यात झाली आहे. म्हणजेच, हैदराबाद आणि अमृतसर हे ओझरच्या स्पर्धेत उतरले आहेत. पुढच्या वर्षी पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणांहून शेळ्यांची दुबईला निर्यात होण्याची शक्यता आहे.


या आहेत मर्यादा...

ओझर विमानतळाच्या ठिकाणी हायलोडर उपलब्ध नाही. याद्वारे एकाचवेळी महाकाय अशा कार्गो विमानात (आयएल ७६) अधिकाधिक शेळ्या भरणे शक्य होते. हे हायलोडर नसल्याने लहान कार्गो विमानाद्वारे (आयएल ७०) शेळ्यांची निर्यात करण्यात आली. म्हणजेच कार्गो विमानसेवेसाठी मोठ्या प्रमाणात स्लॉट उपलब्ध असतानाही लाखभर शेळ्यांची निर्यात होऊ शकली नाही. तर, नाशवंत पदार्थांच्या आयातीसाठी क्वारंटाइनची उपलब्धता ओझरला नाही. ती झाल्यास ओझरहून वर्षभर शेळ्यांची निर्यात शक्य आहे.

क्वारंटाइन आणि हायलोडरच्या उपलब्धतेसाठी आम्ही आग्रही आहोत. त्यासंबंधी योग्य तो पाठपुरावा सुरू आहे. पुढील सिझनपर्यंत ते होईल, अशी आशा आहे.- सुधाकर सेन, सीईओ, हॅल्कॉन

ओझरहून वर्षभर शेळ्या निर्यात करण्याची माझी इच्छा आहे. तशी सुविधा उपलब्ध झाली तर नक्कीच आपल्या देशालाही त्याचा फायदा होईल.

-हेमंत सानप, संचालक, सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रा लि.

ओझरहून होणारी निर्यात ही किफायतशीर आहे. हैदराबादचे अंतर दुबईहून अधिक आहे. त्यामुळे त्याचा खर्च वाढतो. वर्षभर निर्यात झाली तर त्यासाठी सर्व सेवा देऊ.

-साजिद खान, अमिगो लॉजिस्टिक प्रा. लि.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर नदीपात्रातील पाण्यात मित्रांसमवेत सेल्फी काढण्याच्या मोहात पाण्यात बुडालेल्या चौघापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि. ५) दुपारी दोन वाजता चेहेडी पंपिंग स्टेशन येथे दारणा नदीच्या पात्रात घडली. किशोर कैलास सोनार (२४, रा. बनकर मळा, चेहेडी शीव नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
चेहेडी पंपिंग स्टेशन येथे दारणा नदीच्या पात्रात गणपती विसर्जनासाठी मंगळवारी दुपारी गर्दी झाली. महापालिकेच्या साठवण बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमध्ये गणपती विसर्जन करून झाल्यावर किशोर सोनार हा तरुण आपल्या गणेश सोमनाथ खालकर (रा. खालकर मळा, चेहेडी शीव, नाशिकरोड), सुनील जाधव आणि दत्तू (आडनाव समजू शकले नाही, रा. अहमदनगर) या आपल्या मित्रांसह दारणा नदीपात्रातील पाण्यात मोबाइलमध्ये सेल्फी काढण्यासाठी उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही तरुण बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी काठावर बसलेल्या गणेश किसन शिवदे या युवकाने तात्काळ पाण्यात उडी घेतली. पाण्याबाहेर काढल्याने गणेश खालकर, सुनील जाधव व दत्तू या तिघांचा जीव वाचला. परंतु, किशोर सोनार मात्र पाण्यात बुडाला. किशोर बिटको कॉलेजमध्ये बारावी कॉमर्स शाखेत शिक्षण घेत होता.

कुचकामी अग्निशामक दल
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या नाशिकरोड अग्निशामक दलाच्या बचाव पथकाने घटनास्थळी येऊन शोधकार्य केले. परंतु आवश्यक साधनांची कमतरता असल्याने अगनिशामक दलाचे शोधकार्य केवळ फार्स ठरला. अग्निशमाक दलाच्या जवानांकडे लाइफ जॅकेट नसल्याने या जवानांनी कोनीही पाण्यात उतरण्याचे धाडस केले नाही. तब्बल दोन तासभर शोध घेऊनही अग्निशमक दलाला पाण्यात बुडालेल्या किशोरला शोधता आले नाही. यापूर्वीही याठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही अगनिशामक दलाच्या जवानांना शोधकार्यात अपयश आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय उत्तम जीवन रक्षक पुरस्कार विजेते गोविंद तुपे (रा. बेलू, ता. सिन्नर) यांनी घटनास्थळी येऊन अवघ्या अर्ध्या तासात पाण्यात बुडालेल्या किशोरचा मृतदेह शोधला. किशोरवर मंगळवारी रात्री त्याच्या देवळालीगावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वडिलांचे ऐकले असते तर...
दुर्घटना घडली त्याप्रसंगी किशोरचे आई-वडील घटनास्थळीच उपस्थित होते. वडील कैलास सोनार यांनी सेल्फी काढणाऱ्या किशोर व त्याच्या मित्रांना पाण्यात जाण्यास मनाई केली होती. मात्र वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करीत किशोर व त्याचे इतर मित्र पाण्यात उतरले. मुलाचा मृत्यू त्याच्या आई-वडिलांना डोळ्यासमोर बघावा लागला. या दुर्घटनेनंतर किशोरच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला. नगरसेवक पंडित आवारे, नितीन खर्जुल, गोरख खर्जुल, माजी नगरसेवक बाळासाहेब बनकर, स्वप्निल बनकर आदींनी शोधकार्यास मदत केली.

चार मंडळांवर गुन्हे
गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाद्य डीजे वाजवणाऱ्या पंचवटीतील चार सार्वजनिक गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात भडक दरवाजा मित्रमंडळ, धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळ, श्रीरामभक्त हनुमान मित्रमंडळ आणि जय माता दी गणेश मित्रमंडळ यांचा समावेश आहे.

तालुक्यात तिघे बुडाले
गणेश विसर्जनादरम्यान नाशिक तालुक्यातील इतर तीन घटनांमध्ये तिघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. मुंगसरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गणेश विसर्जनासाठी गेलेला गणेश राजाराम मराठे (१८, रा. मुंगसरा, ता. जि. नाशिक) याचा डोहात बुडून मृत्यू झाला. दुसरी घटना पंचवटीत घडली. टाळकुटेश्वर मंदिराजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोदापात्रात गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी गेलेला नारायण राजेंद्र सूर्यवंशी (१७, रा. संभाजी चौक, जुने नाशिक) हा युवक बुडाला. तिसरी घटना गंगापूर धरण परिसरात घडली. योगेश राम चौधरी (१९, रा. वृंदावन गार्डन, गणेश चौक, श्रमिकनगर, सातपूर) या युवकाचा गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षयरुग्णांसाठी अॅपसेवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका हद्दीत असलेल्या क्षयरोगीसाठी महापालिका व टीसीएसने विकसित केलेल्या टीमेड मशिन (T-Mead Machine) लॉन्च करण्यात आले आहे. पंचवटी येथील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आयुक्त अभिषेक कृष्णा व आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते या मशिन व अॅपचे उद्‍घाटन करण्यात आले आहे. या मशिन व अॅपमुळे क्षयरोगी रुग्णांच्या औषधांचे नियमन करणे सोपे होणार आहे.
महापालिका व टीसीएस, डिस्क यांनी संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या T-Mead Machine चे उद्‍घाटन झाले. या मशिनद्वारे क्षयरोगी दररोज औषध घेत आहे किंवा नाही याचे मॉनिटरिंग करणे सोपे झाले आहे. क्षयरुग्णांना या मशिनमध्ये १४ दिवसांची औषधे लोड करून देण्यात येणार आहे. क्षयरुग्णाला दररोज ही औषधी घेण्यासाठी ठरलेल्या वेळेत गजर वाजणार आहे. सदर गजरानंतर रुग्णाने औषधी घ्यायची आहे. ही औषधी घेतल्यानंतर प्रशासनास रुग्णाने औषधी घेतल्याचे सिग्नल मिळणार आहे. कोणत्या कारणास्तव रुग्णाने औषधी घेतली नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांना एसएमएसद्वारे कळेल की रुग्णाने औषधी घेतली नाहीत आणि आरोग्य कर्मचारी त्याच्या घरी जाऊन रुग्णास औषधे घेण्यास प्रवृत्त करेल. सदर मशिन सध्या ३० रुग्णांना देण्यात आली आहे. जानेवारी २०१८ मध्ये १०० रुग्णांना अजून देण्यात येतील. सदर कार्यक्रमाला नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा, आरोग्य वैद्यकीय समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय समितीचे उपसभापती शेवरे, पंचवटी प्रभाग समितीचे सभापती प्रियंका माने, नगरसेवक जगदीश पाटील, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचे डेपोटी एसटीओ शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे उपस्थित होते.

पोषण आहार योजना
एमडीआर क्षयरुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी नावाची पोषक आहार देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना नाशिक महापालिका व इंडोलाइन इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे. अति गंभीर क्षय रुग्णांना दोन वर्षांसाठी जवळजवळ १३ प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हे रुग्ण अतिक्षय गरीब व दुर्बल असतात. योग्य तो आहार घेण्यासाठी व रुग्णांकडे पैसा देखील नसतो, म्हणून अशा रुग्णांना हायप्रोटिन डायट दिल्यास त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते उपचाराला योग्य तो प्रतिसाद देतात. याच उद्देशाने सदर रुग्णांसाठी दर महिन्याला पाच किलो आटा, एक किलो मूग दाळ, एक किलो चना दाळ, एक किलो मटकी, एक लिटर शेंगदाणा तेल आदी धान्य इंडोलाइन इंडस्ट्रिजतर्फे देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेड दर्शन’ला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे पेड दर्शनाला धर्मदाय आयुक्तांनी ह‌रिवा कंदील दिला आहे. यासाठी भक्तांना २०० रुपये मोजावे लागणार आहेत. या पैशांतून भाविकांसाठी काही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी, मागणी आता जोर धरत आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात १५ ऑगस्ट २०१३पासून २०० रुपये शुल्क आकारून स्वतंत्र दरवाजाने दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. याविरोधात मंदिर विश्वस्त लल‌तिा शिंदे यांनी अर्ज केला होता. अशा प्रकारे २०० रुपये घेऊन दर्शन देणे हे भाविकांमध्ये भेदभाव निर्माण करणारे आहे. तसेच रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांवर अन्याय करणारे आहे. याबाबत शिंदे यांनी पुरातत्त्व खात्याकडे पत्रव्यवहार करून त्यांचा देखील यास विरोध असल्याचे म्हटले होते. हाय कोर्टाने याबाबत धर्मदाय आयुक्त यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अशा प्रकारे २०० रुपये देणगी दर्शन हे कोणावरही अन्यायकारक नसून, ते ऐच्छ‌कि असल्याने बंद करता येणार नाही, असा अहवाल दिला आहे.

याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधिश आहेत आणि अध्यक्षांच्या अनुमतीने व विश्वस्त मंडळाच्या सभेत हा निर्णय झालेला आहे. याबाबत तक्कालीन जिल्हाधिकारी यांच्या सूचना होत्या. रांगेत उभे राहायला नको म्हणून काही भाविक पैसे देऊन दर्शन घेतात आणि यातून गैरप्रकार घडतात. म्हणून ट्रस्टने अधिकृत देणगी घेऊन दर्शन देण्याची सुविधा करावी, असे निरीक्षण नोंदविण्यात आले होते.

श्रावण पावला!

दरम्यान या देणगी दर्शन अथवा सशुल्क दर्शन माध्यमातून देवस्थान ट्रस्टचे उत्पन्न वाढले आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांचा ओढा असतो. लाखो भाविक येथे येऊन दर्शन घेतात. नुकत्याच संपलेल्या श्रावण महिन्यात ८० लाखांच्या दरम्यान रोकड जमा झाली आहे.

सुविधा मिळायला हव्यात...

देवस्थान ट्रस्टने शुल्क दर्शन सुविधा दिल्याने नियोजीत वेळेत दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. याबाबत भाविकांचे काही म्हणणे नाही. मात्र या देणगीतून भाविकांच्या सेवासुविधांची कामे झाली पाहिजेत, अशी आपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड विभागात १४,३६३ गणेश मूर्तींचे संकलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’या गगनभेदी घोषणा देत ढोलताशांच्या ठेक्यावर नाचत गात नाशिकरोडमध्ये लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला. दुपारी येथील बिटको चौकातून सुरुवात झालेली मुख्य गणपती विसर्जन मिरवणूक मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चेहेडी पंपिंग स्टेशन येथे एका युवकाचा गणेश विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने नाशिकरोडच्या गणेश विसर्जन कार्यक्रमाला गालबोट लागले. नाशिकरोड विभागात एकूण १४,३६३ गणेश मूर्तींचे संकलन झाले.

नाशिकरोडमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मंगळवारी सकाळपासून नागरिकांनी आपल्या घरातील लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिकेने गणेश विसर्जनासाठी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर गर्दी केली होती. दुपारनंतर दारणा, वालदेवी व गोदावरी नदीपात्रातील नैसर्गिक गणेश विसर्जनस्थळी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. पालिकेच्यावतीने सर्व गणेश विसर्जनस्थळी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. तसेच मूर्ती पाण्यात विसर्जन करण्याऐवजी दान करण्याचे आवाहनही पालिकेच्यावतीने केले जात होते. कै. बिंदू रामराव देशमुख महिला कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी दसक घाटावर सुमारे १,१२७ गणेशमुर्तींचे संकलन केले.

पोलिसांशी हुज्जत

चेहेडी येथे दारणा पात्रात पाण्याची खोली यंदा जास्त असल्याने पोलिसांनी चेहेडी घाटाला बॅरिकेडिंग केले होते. त्यामुळे गणेशभक्तांना पाण्यात गणेश मूर्ती विसर्जित करण्यास पोलिसांनी मनाई केली. परंतु, गणेश भक्त गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे दिवसभर गणेशभक्तांची बंदोबस्तावरील पोलिसांशी हुज्जतीचे प्रकार घडले. चेहेडी, देवळालीगाव, वडनेर व विहितगाव येथे चोख पोलिस बंदोबस्त होता. पालिकेचे आरोग्य व स्वच्छता कर्मचारी, जीवरक्षक व अग्निशामक दलाचे जवानही हजर होते.

नाशिकरोड विभागातील गणेशमूर्ती संकलन

ठिकाण ................................... मूर्ती संख्या

चेहेडी दारणा घाट ................................... २,४४२

दसक गोदा घाट ................................... २,८३८

देवळालीगाव वालदेवी घाट ................................... १,८३२

विहितगाव वालदेवी घाट ................................... ७६०

वडनेर वालदेवी घाट ................................... २,७१२

१२५ शाळा कृत्रिम तलाव ................................... १,१०७

जेतवननगर ................................... ४६१

नारायणबापुनगर ................................... ९७८

चेहेडी ट्रक टर्मिनस ................................... ८६९

शिखरेवाडी मैदान ................................... ३६४

एकूण ................................... १४,३६३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images