म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करावी, यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्याबरोबर दिल्लीत उद्योजकांची बैठक होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता दिल्लीच्या उद्योग भवनात होणाऱ्या या बैठकीस देशातील १० कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंसह निमा व आयमा संघटनांचे पदाधिकारीही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
मुंबई येथे झालेल्या ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गिते यांनी ‘तुम्ही सांगाल तो उद्योग स्थापन करू’ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच देशातील मोठ्या उद्योगांना त्यांनी आमंत्रित करून नाशिकच्या उद्योजकांना दिलासा दिला आहे. या उद्योगांनी नाशिकमध्ये तयारी दाखवली तर त्यातून नाशिकला मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. खासदार गोडसे यांनी या बैठकीसाठी पाठपुरावा केला होता.
गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांनी पाठ फिरवल्यामुळे उद्योग क्षेत्र चिंतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू व्हावेत व १० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक व्हावी, असे टार्गेट ठरवत ‘मेक इन नाशिक’च्या कार्यक्रमाचे निमाने आयोजन केले होते. पुणे-मुंबईपासून नाशिक जवळ असून, या सुवर्ण त्रिकोणामध्ये नाशिक मागे राहिले आहे. त्यामुळे मुंबईच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा नाशिकचे ब्रँडिंग देशभर करू, असे सांगून दिलासा दिला होता. पण त्या ब्रँडिंगचे परिणाम अजून दिसलेले नाहीत. पण गिते यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता मोठ्या उद्योजकांची बैठक होणार आहे.
या कंपन्या होणार सहभागी
या बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत अर्थ मुव्हर्स लि., भारत डायनामिक्स लि., भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लि., गोवा शिपयार्ड लि., हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि., हिंदुस्तान शिपयार्ड लि., माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. आणि मिश्र धातू निगम लि. या १० कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक सहभागी होणार आहेत.
भविष्याचा वेध घेऊन विकास
मेमध्ये मुंबईत झालेल्या मेक इन नाशिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गिते यांनी नाशिक शहर हे भविष्याचा वेध घेऊन विकास करणारे शहर आहे. त्यासाठी या शहराला दिशा देणे गरजेचे आहे. मोदी सरकारने देशातील तरुणांना रोजगार तसेच विकासाची फळे चाखण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमास प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत अनेक प्रकल्प देशपातळीवर उभारले जात आहेत. त्यामुळेच नाशकात मोठे प्रकल्प उभारण्याचीही जबाबदारी माझ्यावर आली आहे. नाशिकच्या उद्योजकांनी विकासाची निश्चित अशी भूमिका समोर ठेवून आपले उद्दिष्ट गाठणे आवश्यक आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट