Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बालसाहित्याचा अनोखा त्रिभाषिक आविष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
बालसाहित्य लिहिणे ही अवघड बाब. मात्र, चांदवड येथील शिक्षक कवी रावसाहेब जाधव यांचा ‘गरगर मोळ्या’ हा बालकवितासंग्रह मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये एकाच पुस्तकात प्रकाशित होणार आहे. पुण्याच्या अक्षर वाङमय प्रकाशनातर्फे होणारा हा त्रिभाषेतला अभिनव प्रयोग महाराष्ट्रातला पहिला प्रयोग ठरण्याची शक्यता आहे.

रावसाहेब जाधव यांच्या बालकविता इतक्या सकस व लक्षवेधी आहेत की त्या इतर भाषांमधून वाचकांसमोर याव्यात. तसेच ग्रामीण भागातील मुलांचे भावविश्व, तेथील ग्रामीण प्रतिमांसह सर्वदूर जावे यासाठी हा अनोखा प्रयोग करीत असल्याचे प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांनी सांगितले आहे. दरम्यान हा ग्रामीण भागातील कवीचा मोठा सन्मान असल्याचे मानले जात आहे.
चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील अजितदादा पवार विद्यालयात शिक्षक असणारे कवी रावसाहेब जाधव यांचा ‘गरगर मोळ्या’ हा बालकविता संग्रह केवळ मराठीच नव्हे तर हिंदी इंग्रजी अशा तिन्ही भाषेत प्रकाशित होत आहे. हा आगळा वेगळा प्रयोग आहे. पुण्याच्या अक्षर वाङमय प्रकाशनने बालसहित्यात ही वेगळी वाट चोखाळली आहे एकाच पुस्तकात एकच कविता तिन्ही भाषेतून येणार असल्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

जरासा वाकडा चिंचेचा आकडा
खाणाखुणा मज करतोय रे
झाडावर चढ मला म्हणतोय रे

ही चिंचेची कविता असो किंवा

उन्हात बोलवी काटेरी सावली
शेंगा वाळून गळतात
नाचाया मला लावतात

ही शेंगांवरची कविता हिंदी व इंग्रजीमधून सर्वांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण भाषा, तेथील मातीतील विविध प्रतीके यांचा चपखल वापर करून कवी जाधव यांनी डोंगर, राने, वने, झरे ग्रामीण परिसर यांची छानशी सफर गारमोळ्या
कविता संग्रहात घडवून आणली आहे. या कविता अनुवादित करून एकाच काव्यसंग्रहाद्वारे वाचकांसाठी सादर करण्याचा बाळासाहेब घोंगडे यांचा प्रयोग अनोखा आहे. ‘गीत चिन्हांचे गाऊ या’ यासारख्या कविता तर मुलांच्या मनावर अधिराज्य करतील अशाच आहेत सध्या मराठी कवितांचे अनुवाद करण्याचे काम सुरू असून येत्या काही महिन्यात तिन्ही भाषेतील हा काव्यसंग्रह सर्वांच्या भेटीला येणार असल्याचे प्रकाशकांनी सांगितले. मराठी भाषेत द्विभाषी कवितांचा प्रयोग झाला; मात्र त्रिभाषेत हा पहिलाच भन्नाट प्रयोग असल्याने उत्सुकता वाढल्याचे चांदवडी रुपय्या या साहित्यिक ग्रुपचे सागर जाधव, विष्णू थोरे, जनार्दन देवरे, रवींद्र देवरे, रुपाली खैरनार, बाळा पाडवी यांनी सांगितले.

मुलांच्या भावविश्वाचे काव्यातून रेखाटन
कवी जाधव यांनी आपल्या या नव्या निर्मितीचे स्वागत केले आहे. त्यांचा ढेकूळ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यास राज्य पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण जीवन, तेथील जगणे, शेती मातीतील आयुष्य हिंदी व इंग्रजी भाषेत शिकणाऱ्यांना कळेल, या अर्थाने या प्रयोगाला वेगळे मोल आहे. डॉ. एकनाथ पगार या पुस्तकाची प्रस्तावना लिहित असल्याचे कवी जाधव यांनी सांगितले. मुलांचे भावविश्व कवितेतून रेखाटल्याचे ते सांगतात.

अक्षर वाङमय ही आमची प्रकाशन संस्था नवे प्रयोग करण्यास उत्सुक आहे. कवी रावसाहेब जाधव यांच्या ‘गरगर मोळ्या’ कविता संग्रहात चांगल्या कविता आहेत. वेगळेपण दिसल्याने त्या मराठीसह हिंदी, इंग्रजीमध्ये पण आणत आहोत. एखाद्या चौथ्या भाषेत या कविता आणण्याचा प्रयत्न आहे.
- बाळासाहेब घोंगडे, प्रकाशक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज ग्राहकांसाठी तक्रार निवारण दिन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे मालेगाव, मनमाड, कळवण, सटाणासह नाशिक ग्रामीण मंडळातील विविध ठिकाणी ग्राहक तक्रार निवारण व संवाद दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा वीज ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

कळवण विभागातील सर्व उपविभागीय कार्यालयांसह मालेगाव मंडळातील पाटणे व रावळगाव शाखा कार्यालयात सोमवारी (दि. २४), सिन्नर एक आणी दोन उपविभागातील वीज ग्राहकांसाठी मंगळवारी (दि. २५) उपविभाग कार्यालय येथे ग्राहक तक्रार निवारण व सुसंवाद दिन होणार आहे. मनमाड विभागातील मनमाडसह नांदगाव व येवला शहर आणि ग्रामीण उपविभागातील सर्व शाखा कार्यालयांमध्ये १ ऑगस्ट रोजी तर विभागीय कार्यालयात २८ ऑगस्ट रोजी ग्राहक तक्रार निवारण व संवाद दिन होणार आहे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी उपविभाग तर पहिल्या सोमवारी सर्व शाखा कार्यालयांत ग्राहक संवाद दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हाला महापालिकेतून वगळा!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

महापालिका हद्दीतील पिंपळगाव खांब परिसरातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये येणारे दाढेगाव समस्यांचे आगार बनले असून, अगदी दारातील कचऱ्यापासून रस्त्यापर्यंत व पिण्याच्या पाण्यापासून सार्वजनिक शौयाचालयांपर्यंत असंख्य समस्यांना येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कामे करा अन्यथा आम्हाला महापालिका हद्दीतून वगळा, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

केवळ नावापुरतेच महापालिकेत असलेले दाढेगाव अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिले आहे. हे गाव आता फक्त मतदानापुरतेच हिशेबात धरले जात असून, कधी कोणताही लोकप्रतिनिधी गावाच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिरकत नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटणाऱ्या महापालिका प्रशासनाला व सार्वजनिक बांधकाम खात्याला गावाकडे पाहायलादेखील वेळ मिळत नसून, या गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेली विकासकामे होण्यासाठी अजून किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. आमच्या गावापेक्षा एखाद्या ग्रामपंचायतीचा विकास जास्त झाला आहे, त्यामुळे एकतर गावाची रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लावा अन्यथा आम्हाला महापालिकेतून वगळा, अशी मागणी गावातील त्रस्त नागरिक करीत आहेत.

--
पुलावर जीवघेणी वाहतूक

या गावामधून वाहणाऱ्या वालदेवी नदीवर काही वर्षांपूर्वी बांधलेला एक पूल आहे. मात्र, त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत या गावाचा संपर्क शहराशी तुटतो. परिणामी गावातून शहराकडे जाण्यासाठी पिंपळगाव खांबमार्गे सुमारे ५ किलोमीटरचा वळसा घालून पाथर्डी फाट्याकडे जावे लागते. मात्र, अनेक जण धोकादायक पद्धतीने वाहत्या पाण्याखाली बुडालेल्या पुलावरून मार्ग काढताना दिसून येतात. गावातील शाळकरी विद्यार्थी व अंबड, सातपूरसारख्या जाणारा कामगारवर्ग यांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या रखडलेल्या पुलाच्या निर्मितीकरिता खासदार हेमंत गोडसे यांनी महापालिकेला गतवर्षी २८ नोव्हेंबर रोजी पुलाची उंची वाढविण्याकामी पत्र दिले आहे. मात्र, प्रशासनाला त्याचा विसर पडला की काय, असा प्रश्न सवाल उपस्थित होत आहे. अनेक नगरसेवक व आमदारांनी या पुलाची उंची वाढविण्यासाठी अनेकदा शुभारंभाचा नारळदेखील फोडला आहे. मात्र, अजूनही या कामाचा प्रारंभ होत नसल्याने परिसातून संताप व्यक्त होत आहे.

मध्यरात्री पाणीपुरवठा

महापालिकेने गावातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, येथे मध्यरात्रीनंतर पाणीपुरवठा केला जात असल्याची स्थिती आहे. मध्यरात्री १२ ते ३ वाजेदरम्यान होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वांनाच जागरण करून पाणी भरावे लागत आहे. येथून अवघ्या १.५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाथर्डी गावात लागेल तितका वेळ पाणीपुरवठा केला जातो. केवळ या गावासाठी रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा होत आहे.

घंटागाडीसाठी फोन

महापालिकेची घंटागाडी येथील कचरा उचलण्यासाठी चक्क १५ ते २० दिवसांनी एकदाच येते. काही नागरिक आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी गाडी पाठवा, असे पालिकेच्या संबंधित ठेकेदाराला फोन करून सांगतात, तेव्हा कुठे गाडी येते आणि कचरा नेते. ठेकेदार म्हणतात दिवसाआड गाडी येते, नागरिक म्हणतात पंधरा-वीस दिवसांतून एकदा गाडीचे दर्शन होते. त्यातही कचरा संपूर्णपणे घेऊन जात नाही. यामुळे गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते.

---

सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

महापालिकेने साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या गावासाठी महिला व पुरुषांसाठी प्रतेयकी १० असे २० सीटचे सार्वजनिक शौचालय उभारून दिले आहे. त्यात सुरवातीला काही दिवस पाणीपुरवठा होत होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तेथे पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना घरून पाणी घेऊन शौचालयात जावे लागत आहे. २० शौचालयांपैकी केवळ ५ ते ६ शौचालय वापरात आहेत. बाकी सर्व शौचालयांचे दरवाजे, आतील भांडी फुटल्याने ती बंद आहेत.

घंटागाडीसाठी फोन

महापालिकेची घंटागाडी येथील कचरा उचलण्यासाठी चक्क १५ ते २० दिवसांनी एकदाच येते. काही नागरिक आमच्या गावातील कचरा उचलण्यासाठी गाडी पाठवा, असे पालिकेच्या संबंधित ठेकेदाराला फोन करून सांगतात, तेव्हा कुठे गाडी येते आणि कचरा नेते. ठेकेदार म्हणतात दिवसाआड गाडी येते, नागरिक म्हणतात पंधरा-वीस दिवसांतून एकदा गाडीचे दर्शन होते. त्यातही कचरा संपूर्णपणे घेऊन जात नाही. अशा समस्येमुळे गावात रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते.


नदीवरील बंधारा फुटला

गाव परिसरात अनेकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, येथील बंधारा गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या २ ऑगस्ट रोजी वाहून गेला. येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता जानेवारी महिन्यामध्ये स्वखर्चातून त्यात दगड, माती, ताडपत्री टाकून भराव टाकला होता. मात्र, तोही यावर्षी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना जमिनीसाठी लागणारे पाणी उपलब्ध होणे जिकिरीचे झाले आहे. याकामीदेखील खासदार गोडसे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला कार्यवाहीचे पत्र दिलेले आहे. मात्र, संबंधित विभाग पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.


गटारीचे पाणी नदीत

पालिकेने वालदेवी पात्रातून पंपिंग स्टेशनपर्यंत सिमेंटचे पाइप टाकून शहराच्या अंबड, सिडको भागातून येणारे गटारीचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, महापालिकेच्या सोयीसाठी येथील नदीपात्रातील चेंबरला छिद्र पाडून गटारीचे पाणी नदीपात्रात मिसळण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे गावात दुर्गंधीसह डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील मळे विभाग, शिव रस्ता, पीर बाबा मंदिररोड आदी भागात नागरिकांची शेती असून, या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. मागणी करूनही महापालिका उपाययोजना करीत नसल्याच्या तक्रारी आहेत.

--

आमच्या गावातील समस्या सुटण्याकामी आम्ही महापालिकेसह अनेक विभागांकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत. मात्र, आमच्या समस्या जाणून घ्यायला कोणाकडे वेळच नसल्याची परिस्थिती आहे.

-पंढरीनाथ भोर, नागरिक

--

पावसाळ्यात गावातील पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी व कामगारवर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. यंदाही तशीच स्थिती असून, महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्या समस्या सोडविण्याकामी पुढाकार घ्यावा.

-सागर भालके, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’ने आमचे सोने केले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’ मदतीसाठी माध्यम झाले आणि आमचे दिवसच पालटले. आम्ही दहावीला चांगले गुण मिळवले होते, त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून ‘मटा’ने आमची निवड हेल्पलाइनचे विद्यार्थी म्हणून केली. आज येथपर्यंतचा शैक्षणिक प्रवास केवळ ‘मटा’मुळेच झाला आहे, अशी प्रतिक्रिया प्राजक्ता पाटील हिने व्यक्त केली.

स्वप्नील पवारची छोटी बहीण म्हणते, की दादा पास झाल्यानंतर खूप माणसे घरी येऊन गेली; मीपण त्याच्यासारखीच मोठ्ठी होणार आहे.’ राहुल बोरसे म्हणतो, की मला माझ्या परिस्थितीची जाणीव आहे; पण मी काहीही करून आईबाबांना सुखाचे दिवस दाखवणार आहे. ‘मटा’ने मला मदत केली नसती तर मी येथपर्यंत येऊच शकलो नसतो. रोशनी भालेरावकडे ‘मटा’चे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीत. मटा हेल्पलाइन २०१२ चे हे विद्यार्थी. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती आज झटत आहेत.

गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर आणि आदित्य जाधव आज ‘मटा’ने तुम्हा दहा जणांना निवडले. नक्कीच ‘मटा’ तुमचे सोने करणार, तुम्हाला हवी ती मदत केल्यानंतर तुम्ही मात्र यश मिळवायचे आहे. उद्या तुम्हीही कुणाला तरी मदत करण्याच्या पात्रतेचे व्हायचे आहे, याची जाणीव तुम्ही ठेवा. या उपक्रमाची आठवण ठेवा, असे रोशनी आवर्जून सांगते. आम्हीही सर्व जाण ठेवून अभ्यास करीत आहोत. शैक्षणिक उद्दिष्ट गाठल्यानंतर आम्हीही इतरांना मदत करण्यासाठी सज्ज होणार आहोत, असेही रोशनी सांगते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा म्हणून वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत हा ‘मटा हेल्पलाइन’चा उपक्रम हाती घेतला. या मुलांची कहाणी ‘मटा’त प्रसिद्ध झाली आहेच, त्यांच्या नावाने क्रॉस्ड चेक काढून ड्रॉपबॉक्समध्ये जमा करावेत. चेकच्या मागे पाठवणाऱ्याचे नाव आणि फोन नंबर लिहावा. कृपया ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नावाने चेक देऊ नयेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा हेल्पलाइन हा उपक्रम नाशिककर दिवसेंदिवस पुढे नेत आहेतच; परंतु या मुलांना आणखी मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे समाजातील दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुलांच्या यशात तुमचाही वाटा असावा, ही जाणीव ठेवून त्यांना मदत करा. या मुलांच्या हितासाठी तुमचे योगदान नक्कीच कामी येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बंद करणार ४५०० किमीच्या फेऱ्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तोट्यात चाललेली शहर बस सेवा बंद करण्याचा निर्णय राजकीय दबावापोटी एसटीने मागे घेतला असला, तरी ही सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या निर्णयावर महामंडळ ठाम आहे. एसटीने आता शहरातील विविध मार्गांवरून धावणाऱ्या १५० बसपैकी १० बस बंद बस करुन ४ हजार ५०० किमीची कपात केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही कपात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. याअगोदर या बस दररोज ५० हजार किमी धावत होत्या. त्यात अगोदर १२ हजार व आता ४ हजार ५०० किमी कपात केली आहे. त्यामुळे सिटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. तोट्यात चाललेल्या मार्गांवरील या बस असून, यामुळे एसटीचा तोटा कमी झाला असला तरी प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

गेल्या सहा वर्षांत १२५ कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने याअगोदर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा तोटा भरून द्यावा, असे सांगत १ फेब्रुवारी रोजीच ही सेवा बंद करण्याचे नाशिक महापालिकेला कळविले होते. त्यानंतर अडीच महिने उलटूनही यावर काहीच निर्णय न झाल्यामुळे एसटीने पुन्हा हालचाली केल्या व १ मेपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजकीय दबाव वाढला, तर महापालिकेने हात झटकले. नंतर एसटीने एकाच वेळी सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला. पण, टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न एसटीने सुरू केला आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे.

एसटीने अगोदर मे महिन्यात १२ हजार किमीवर बस बंद केल्यानंतर तोट्यातही घट झाल्यामुळे त्यांनी आता ४ हजार ५०० किमीवरील धावणाऱ्या बस बंद केल्या आहेत. दरम्यान, सिटी बस सेवेसाठी महानगरपालिकेने कन्सल्टंटची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून, त्यांच्या अहवालानंतर बससेवा ताब्यात घ्यायची की नाही, याचा निर्णय होणार आहे.

खासगी वाहतूकदारांची चंगळ

एसटीने तोट्यात चाललेल्या मार्गावरील बसेस बंद केल्यामुळे त्याचा फटका सामान्य माणसाला बसणार आहे. त्यामुळे खासगी वहातूकदारांची चंगळ होणार असून, त्यात रिक्षाधारकांकडून जास्तीचे पैसे उकळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

तोट्यात चालणाऱ्या मार्गावरील बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यात ४५०० किमीची कपात करण्यात आली आहे. गेल्या वेळीही अशी फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली होती. त्यानंतर तोटा कमी झाला म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

- राजेंद्र जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टला पावणार ‘प्रभू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील रेल्वे स्टेशनवरील दोन नव्या लिफ्टच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त सापडला आहे. या लिफ्टचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दि. ३० जुलै रोजी उद्घाटन होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. येथील लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त ‘मटा’ने छायाचित्रासह नुकतेच प्रसिद्ध केले होते.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या दोन्ही टोकांना दोन लिफ्ट उभारण्यात आल्या आहेत. त्यांची क्षमता तेरा प्रवाशांची आहे. येथील लिफ्टचा प्रश्न तीन वर्षांपासून प्रलंबित होता. लिफ्टला मान्यता मिळाली. त्यांचे काम गेल्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होते. अखेर दोन्ही लिफ्टचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले. परंतु, मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी न दिल्यामुळे या लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर त्यांच्या उद्घाटनास ३० जुलैचा मुहूर्त सापडला असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दि. २९ व ३० जुलै रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात या लिफ्टचे उद्घाटन होईल.

--

प्रवाशांसाठी दिलासादायी

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून दररोज शंभरवर रेल्वेगाड्या धावतात. पंधरा ते वीस हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना अवघड जिने चढून दुसऱ्या व तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी धापा टाकत जावे लागते. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणारे दररोजचे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग यांच्यासाठी जिने चढणे अवघड असते. नाशिकरोड स्टेशनवर लिफ्ट बसवावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांनी केली होती. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक व चारवर फार कमी गाड्या थांबतात. मुंबईहून येणाऱ्या २१ डब्यांच्या बहुतांश प्रवासी गाड्या या फ्लॅटफॉर्म दोनवर, तर मुंबईला जाणाऱ्या गाड्या फ्लॅटफॉर्म तीनवर थांबतात. गाडी चुकू नये म्हणून काही प्रवासी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंगांना हे शक्य नसते. जिन्यावरून ये-जा करून त्यांना रक्तदाब, गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अशा प्रवाशांसाठी या लिफ्ट सुरू होणे दिलासादायक ठरणार आहे.

--

सरकत्या जिन्यांची गरज

नाशिकरोड स्टेशनवर सामान्य प्रवाशांसाठी सरकते जिने बसविण्याचे जाहीर होऊन एक वर्ष झाले आहे. तथापि, यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झालेली नाही. लिफ्टची क्षमता तेरा प्रवाशांची आहे. त्यामुळे तिचा लाभ सर्व गरजूंना होणे अवघड आहे. सरकते जिने बसविल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल. लिफ्टवरील ताणही कमी होईल. जास्त प्रवासी संख्या, जादा महसूल यामुळे नाशिक हे मध्य रेल्वेचे प्रथम दर्जाचे स्टेशन आहे. भुसावळ विभागात नाशिकरोडखेरीज मनमाड, जळगाव रेल्वे स्टेशनवरही लिफ्ट उभारण्याचे काम सुरू आहे.

--

मनमाड-इंदूर मार्गाला मुहूर्त

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गालादेखील मुहूर्त लागला आहे. दि. २९ जुलै रोजी दुपारी बारा वाजता रेल्वेमंत्री धुळ्यात रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. त्याचवेळी मनमाड-धुळे-इंदूर मार्गाचे भूमिपूजनही केले जाणार आहे. या मार्गासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुरावा केला होता. धुळ्याला भेट देणारे प्रभू हे गेल्या तीस वर्षांतील पहिले रेल्वेमंत्री आहेत. शिर्डी-मुंबई रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या जाणार असून, ३० जुलैला साईबाबांचे दर्शन घेऊन प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.

--

कांदा स्टोअरेजचे भूमिपूजन

लासलगाव येथे रेल्वे मंत्रालयाच्या कंटनेर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि लासलगाव खरेदी-विक्री संघातर्फे ओनियन कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. ३० जुलै रोजी त्याचे भूमिपूजन होईल. राज्यात प्रथमच असे कोल्ड स्टोअरेज उभे राहणार आहे. या कोल्ड स्टोअरजेची क्षमता दोन हजार टनांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यातील कांदा, डाळिंब, आंबा, द्राक्ष आदी उत्पादकांना त्याचा लाभ होणार आहे. येथे प्री-कूलिंग चेंबर, राइपनिंग आदी सुविधा असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीराव पाटील यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व पद्मभूषण शिवाजीराव गिरीधर पाटील (वय ९२) यांचे शनिवारी (दि. २२) पहाटे मुंबई येथील लीलावती रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांनी १२ वर्षे राज्याचे सहकारमंत्री म्हणून काम पाहिले. सन २०१३मध्ये त्यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील असलेल्या शिवाजीराव पाटील यांनी शनिवारी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातू असा परिवार आहे. शिवाजीराव पाटील यांच्या पार्थिवावर उद्या, सोमवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता दिवंगत स्मिता पाटील पब्लिक स्कूल, दहिवद ता. शिरपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील होत.


सहकार क्षेत्रात अनमोल योगदान

स्वातंत्र्यानंतर शिवाजीराव पाटील यांनी प्रज्ञा समाजवादी पक्षामधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात असतानाच त्यांनी शिरपूर तालुक्याचे दोनवेळा आमदारपद, पाटबंधारे विभागाचे राज्यमंत्री, सहकार मंत्री आणि त्यानंतर खासदार अशी विविध पदे सांभाळली. सहकार क्षेत्रात काम करताना धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही त्यांचे विविध संस्थांच्या उभारणीत अनमोल योगदान होते. शिवाजीराव पाटील यांचा जन्म ५ मार्च १९२५ रोजी अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याने त्यांच्यावरही त्याचा पगडा होताच. त्यांचे मोठे बंधू उत्तमराव पाटील व वहिनी लीलाताई पाटील यांच्यासोबत शिवाजीरावांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेत अनेकवेळा तुरुंगवासही भोगला. त्यांनी साने गुरुजी यांच्यासोबतही काही दिवस तुरूंगात काढले होते.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे खास सल्लागार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याचबरोबर त्यांनी जागतिक ऊस व बीट साखर उत्पादक महासंघ, राष्ट्रीय हेवी इंजिनीअरिंग, वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची १५ ऑगस्टपूर्वी स्थापन करू, अशी घोषणा राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगकेर यांनी केली.

राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राज्य विक्रेता संघटनेने दिलेल्या प्रस्तावातील सर्व योजनांचा सहभाग कल्याणकारी मंडळात करण्याचेही मान्य करण्यात आले.

राज्यात साडेतीन लाख वृत्तपत्र विक्रेते कार्यरत असून, अशा कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी युती शासनाने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगानेच गेली शंभर वर्षे मुंबई शहरासह इतर जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या आणि अथक कष्ट करून सर्वदूर वेळेत वृत्तपत्रे पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे हितसंवर्धन व्हावे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय झाला.

उद्योगमंत्री देसाई म्हणाले, की वृत्तपत्रे व वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून वृत्तपत्र विक्रेते काम करतात. मात्र, हे विक्रेते सतत दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांना न्याय द्यावाच लागेल, अशी बाजू बैठकीत मांडली. सुनील पाटणकर यांनी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे स्वरूप, विक्रेत्यांच्या मागण्या सविस्तर मांडल्या. बालाजी पवार यांनी वृत्तपत्र विक्रेते, कुटुंबीय यांच्यासाठी घरकुल, आरोग्य, शिक्षण आदी कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी मागणी केली. विकास सूर्यवंशी म्हणाले, की वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ असावे. कल्याणकारी मंडळाच्या लाभासाठी नावनोंदणी करताना वृत्तपत्र विक्रेता संघटनेची शिफारस आवश्यक असावी, अशी सूचना गोरख भिलारे यांनी मांडली.


आधार कार्डद्वारे करावी नोंदणी

१२२ प्रकारच्या असंघटित कामगारांकरिता एकत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. मात्र, त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी खास स्थान असेल. विक्रेत्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल. विक्रेता संघटनेने त्यासाठी तत्काळ आपल्या प्रत्येक शहर व जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची आधार कार्डद्वारे नोंदणी पूर्ण करावी. त्यामुळे कल्याणकारी मंडळाचा लाभ तत्काळ मिळण्यास मदत होईल, असेही कामगारमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदावरी, दारणेला पुन्हा पूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, शनिवारी सकाळपर्यंत गंगापूर तसेच दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूरसह दारणा, नांदूरमध्यमेश्वर, भावली, कडवा या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पूरसदृश स्थ‌िती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

इगतपुरी तालुक्यात शनिवारी (दि. २२ जुलै) पुर्वीच्या २४ तासांमध्ये रेकॉर्डब्रेक वृष्टी झाली. या पावसाने हंगामात ‌सर्वाधिक असलेला गुरुवारचा रेकॉर्डही ब्रेक केला. गुरुवारी दिवसभरात १४२ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, शुक्रवारी रात्रीनंतर झालेल्या धुव्वांधार पावसामुळे गुरुवारच्या पावसाचे रेकॉर्ड वाहून गेले. शनिवारी सकाळी आठपर्यंत एकट्या इगतपुरी तालुक्यात १५३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे दारणा धरणातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ७० मिमी, तर पेठमध्ये ७३ मिमी पाऊस झाला. धरणांमध्ये पाण्याची साठवणूक करणे शक्य नसल्याने सकाळपासून १३ हजार ९८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. ओव्हरफ्लो झालेल्या भावली धरणातूनही १६६३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने सायंकाळी तो १९०० क्युसेक करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सकाळी ३० हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारनंतर तो एक हजार क्युसेकने वाढविण्यात आला. सायंकाळी ३१ हजार ५१० क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. दुपारनंतर कडवा धरणातूनही ६ हजार ८३४ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. धरणांमधून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेले पाणी आणि नदीपात्रात मिसळणारे पावसाचे पाणी यांमुळे गोदावरी, दारणा आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पंचवटी परिसरातील गोदाकाठालगतची अनेक मंदिरे पाण्याखाली गेल्याचे पहावयास मिळाले.

गंगापूर धरणातून सकाळी १६६४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. परंतु पेठ, त्र्यंबकेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राह‌िल्याने सकाळी साडेअकराच्या सुमारास तो २४९६ क्युसेकने तर दुपारी सव्वातीननंतर तो तीन हजार ३२८ क्युसेक करण्यात आला.

सुरक्षिततेचे आवाहन

नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागात जोदार पाऊस असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना तसेच निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे अवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. विकेंड तसेच सुटी यामुळे लोक जंगल भागात पावसाचा तसेच धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जातात. पूर पाहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी संबंधित धोक्याच्या ठिकाणांपासून व पूर पाण्यापासून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा पावसालाच सांगायचे…

$
0
0

बळीराजाने नेहमीच त्याच्याशी आपुलकीचेच नाते सांगितले. पाऊस रूसला, हसला, हिरमुसला, बरसला अथवा कोपला तरीही त्याला तो आपलाच वाटला. आता बघा ना. एकीकडे तो ढगफुटीसारखा धो धो बरसतोय तर दुसरीकडे थेंब थेंब पाण्यासाठी लेकरांना तरसवतोय. त्यामुळे कुणाला किती थेंब वाटायचे हे पावसाला पुन्हा सांगायलाच हवे.

राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न गमतीने विचारला जातो. पूर्वी एखाद्याला झोडपून काढावे तसा पाऊस कोसळायचा. त्यामुळेच बहूदा तसे म्हटले जात असावे. परंतु आता पाऊस झोडपून काढत नाही. झोडपलेच तर ते अवेळी झोडपतो. म्हणूनच बळीराजाच्या नेत्रांमधून आसवांची धार लागते. आपल्या माणसांनी आपलाच घात करावा तसा अवकाळीच्या रूपात येणारा पाऊस शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये, बांधावर धुडगुस घालून पसार होतो. अत्यंत काळजीनं वाढविलेली पिकं डोळ्यांदेखत नष्ट होताना पाहून बळीराजाच्या जीवाची घालमेल होते. अन तेवढ्या काळासाठी तो त्याला ‘वैरी’ वाटू लागतो. परंतु मे महिन्यात उन्हाच्या तप्त झळा त्याच्या संयमाची आणि सोशिकतेची परीक्षा पाहू लागल्या, की पुन्हा त्याला पावसाची आठवण येऊ लागते. एखादी जिवलग व्यक्ती घरी येणार या विचाराने मन मोहरून निघावे तसे पाऊस येणार अन हिरवं स्वप्न फुलविणार, या आशेनं बळीराजा चातक चोचीने पावसाची वाट पाहू लागतो. त्याला पेरणीचे वेध लागतात. तरारून निघालेलं पिक त्याला पहायचं असतं. सुदैवाने यंदा जूनमध्येच पावसाला सुरूवात झाली. चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरणीला अनुकुलता लाभली. जिल्ह्यात यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला. नाशिक तालुक्यात तर पावसाने विक्रमच केला. ३० दिवसांत सर्वाधिक ३५४ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी दोन हजार ३२४ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा तीन हजार ५३८ मिमी पाऊस पडला आहे. अर्थात दिंडोरी, कळवण, देवळा, निफाड आणि येवला या तालुक्यांमध्ये मात्र तो सरासरीही गाठू शकला नाही. जुलैमध्ये या तालुक्यांमधील बॅकलॉग पाऊस भरून काढेल अशी अपेक्षा होती. परंतु ती देखील फोल ठरू पहाते आहे. नाशिक, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी हे तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून गोदावरी, दारणा यांसारख्या नद्यांद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात असून, मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी आतापर्यंत १० टीएमसीहून अधिक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडीमधील पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे. औरंगाबादला पाऊस पडला नाही तरी मराठवाड्यातील जनतेला फारसे दु:ख होत नाही. पण नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडला तर तेथील जनता खुष होते. नाशिकमध्ये जेवढा अधिक पाऊस पडेल आणि धरणं जेवढी अधिक वेगाने भरतील तेवढे अधिक पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडले जाते. गतवर्षी नाशिक जिल्हावासियांनी दोनवेळा पूर पाह‌िला. शहरात एकाच दिवसात ९० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. ६२ ते ६५ मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला तर ती अतिवृष्टी समजली जाते. गतवर्षी पावसाचा जोर अधिक असल्याने मराठवाड्याला ६० टीएमसीहून अधिक पाणी नाशिकने दिलं. यंदाही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जात आहे. एकीकडे अशी सुबत्ता दिसत असताना काही तालुके पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: आसुसले आहेत. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी काहीशी स्थ‌िती या तालुक्यांची झाली आहे. टंचाई आराखडा संपुष्ठात आल्यानंतर जुलैचे पहिले एक दोन आठवडे टँकरद्वारे पाणी पुरवठा बंद करण्यात आला. परंतु काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागल्याने तेथे पुन्हा टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. पावसाकडून ही संबंधित तालुक्यांची थट्टा नव्हे तर अन्य काय! निसर्गाची कृपा आणि अवकृपेचा अनुभव एकाचवेळी जिल्हावासी घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात आजही ४३ गावे तहानेने व्याकूळ आहेत. सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड आणि बागलाण या पाच तालुक्यांमधील काही गावांमध्ये ग्रामस्थांना विशेषत: महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्यासाठीच पाणी नाही तेथे शेतीसाठी पाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही २० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात जी परिस्थ‌िती आहे तीच नाशिक विभागातील अन्य जिल्ह्यांमध्येही. एकूण १५१ गावे आणि २२० वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. उत्तर महाराष्ट्रात अजूनही रहिवाशांची तहान भागविण्यासाठी दररोज ११३ टँकर्स धावत आहेत.

टँकरमुक्त गावांचे स्वप्न साकारण्यासाठीच राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित केली. ही योजना दीर्घकाळ चांगले परिणाम देणारी असली तरी गेल्या तीन वर्षांत पाणी टंचाईचे चित्र फारसे बदलू शकलेले नाही. जुलै अखेरीसही अनेक गावे तहानलेली असणे हे याचेच द्योतक आहे. अलीकडेच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थ‌ित आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेतील अनेक त्रूटी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मतदार संघातील समस्या सांगण्यासाठीचे हे व्यासपीठ नसल्याचे महाजन यांनी सांगितलेही. त्यानंतरही आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत झालेल्या कामांबद्दलची नाराजी व्यक्त केली. भौगोलिक परिस्थ‌ितीनुसार जलयुक्त शिवारच्या धोरणांमध्ये बदल करून त्यानुसार उपाययोजना करता यायला हव्यात, अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. जलयुक्त शिवारची धोरणे सरसकट सर्वच भौगोलिक परिस्थ‌ितीमध्ये लाभदायीच ठरतील असे नव्हे. स्थानिक प्रश्नांची, तेथील भौगोलिक परिस्थ‌ितीची स्थानिक लोकप्रत‌िन‌िधींनी काकणभर अधिक माहिती असते. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळी त्यांन‌ी मंत्री महोदयांकडे अपेक्षा व्यक्त केली असेल तरी जनहितासाठी त्यावर सकारात्मक विचार व्हायला काय हरकत आहे.

यंदा आतापर्यंतच्या पावसाचा अंदाज घेता जिल्ह्यातील एकूण पाऊस तसा चांगला, दामदार भासतोय. दारणा, गोदावरी, वाकी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दारणा आण‌ि गोदाकाठ पावसाच्या सरींनी हल्ली रोजच न्हाऊन निघत आहे. मात्र याखेरीजही जिल्ह्यातील गिरणा पट्टा मात्र अजूनही कोरडाच आहे.

गेल्या दीड महिन्यात तर पावसाने जिल्ह्यातील सटाणा, नांदगाव, मालेगाव, देवळा, येवला या तालुक्यांवर अन्याय केला आहेच. उर्वरित पावसाळ्यात जर ही ओढ भरून निघाली तर उत्तमच. मात्र जर पावसाने या भागाकडे पाठ फिरवलीच तर, प्रशासनाने तरी पावसासारखा दुजाभाव न करता, समतोल साधण्याचा प्रयत्न करावा, हीच माफक अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’त मराठी व्याकरणाचे धिंडवडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
शिक्षकांचा दर्जा उंचाविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) परिषदच ‘फेल’ ठरली आहे. या परीक्षेच्या शनिवारी पार पडलेल्या दोन्हीही सत्रांतील प्रश्नपत्रिकांमध्ये मराठी व्याकरणाच्या भरमसाठ चुका आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पहिल्या सत्रातील प्राथमिक विभागाच्या प्रश्नपत्रिकेत १५० प्रश्नांमध्ये तब्बल ११९ ढोबळ चुका विद्यार्थ्यांना सापडल्याने परिषदेच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शनिवारी शहरातील ६० केंद्रांवर सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पहिल्या सत्रात प्राथमिक तर दुपारच्या सत्रात माध्यमिक स्तरासाठी परीक्षा घेण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ‘असर’ या एनजीओच्या अहवालात राज्याच्या प्राथमिक शिक्षणातील भाषा आणि गणितांसारख्या विषयांच्या कमकुवतपणावर बोट ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या विषयाचा दर्जा उंचाविण्यासाठी टीईटीसारखी परीक्षा भावी गुरुजींचा कस लावेल, अशीही अपेक्षा केली गेली. मात्र, ती फाेल ठरली. परीक्षेची काठ‌िण्यपातळी योग्य असली तरीही छापील मराठीतील प्रश्नांमध्ये व्याकरणाच्या चुका निदर्शनास आल्या.
हास्यास्पद चुकांची शंभरी
प्राथमिक स्तरासाठी घेण्यात आलेल्या पहिल्या सत्रातील परीक्षेत इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास या ५ विषयांवर प्रत्येकी ३० प्रश्न विचारण्यात आले होते. प्रतिप्रश्न १ गुण असे स्वरूप होते. यानुसार १५० गुणांच्या या प्रश्नपत्रिकेतील चुकांचे दर्शन मराठी विभागापासून घडले. व्याकरणातील पूर्णविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्हे, वेलांटी-उकारांमधील ऱ्हस्व-दीर्घ लेखनाच्या अशा असंख्य चुका आढळल्या आहेत. ‘उताऱ्या’ ऐवजी ‘उतान्या’, मोहर ऐवजी ‘भाहोर’, ‘आंबा’ ऐवजी ‘आंखा’, ‘क्रियापदे’ ऐवजी ‘भियापदे’, ‘कैऱ्या’ ऐवजी ‘कैन्या’ अशा चुकांनी गंभीर चेहऱ्याने आलेल्या परीक्षार्थींना हसविले. बालकवींचेही नाव चुकीचे छापत त्यांच्या ठोंबरे नावातील अनुस्वारही खाऊन टाकण्यात आला आहे. एका प्रश्नाला दिलेला उत्तराचा एक पर्यायच छापून आला नाही.

१८ हजार परीक्षार्थींची उपस्थिती

शनिवारच्या परीक्षेच्या नियोजनात शहरात १९ हजार ५१६ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. एकूण ६० केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. पहिल्या सत्रात प्राथमिक स्तरासाठी पेपर क्रमांक १ सकाळी १०.३० ते १ या वेळेत पार पडला. ३३ केंद्रांवर पहिल्या सत्रात सुमारे ११ हजार परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली, तर दुपारी २ ते ४.३० या माध्यमिक विभागासाठी साडेसात हजार विद्यार्थ्यांनी २७ केंद्रांवर ही परीक्षा दिली. परीक्षा केंद्राचे शूटींग, परीक्षा हॉलमध्ये ओळखपत्र आणि हॉल तिकिटाशिवाय इतर वस्तू नेण्यास मनाई होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामसेतूवर वाट बिकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटी आणि नाशिक शहराचा बाजारपेठेचा भाग जोडण्यासाठी बांधण्यात आलेला सर्वांत कमी उंचीचा पूल म्हणून रामसेतूची ओळख आहे. या पुलावरून वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र, फक्त पादचाऱ्यांसाठीच असलेल्या या पुलावर सध्या किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांची गर्दी वाढली आहे. हा पूल त्यांच्यासाठी जणू हक्काची जागाच बनला आहे.

वाहनांसाठी हा पूल बंद करण्याकरिता दोन्ही बाजूंना उंचवटे बांधण्यात आलेले आहेत. असे असले, तरी येथून मोठी कसरत करीत दुचाकी वाहने नेण्याचा काही जण प्रयत्न करताना दिसतात. पूरस्थितीच्या वेळी सर्वांत अगोदर या पुलावरून पाणी वाहू लागते. अचानक पाणी वाढल्यास येथे धोका निर्माण होऊ शकतो. कापड बाजार, भांडी बाजार आणि सराफ बाजाराला जोडणारा हा पूल प्रामुख्याने पादचाऱ्यांच्या उपयोगासाठी आहे. पंचवटीतून या बाजारपेठेत किंवा या बाजारपेठेतून पंचवटीकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर होत असतो. वाहने जाण्यासाठी बाजारपेठेकडून दक्षिणेला उतार असलेल्या भागातून नदीपात्राच्या फरशीवरून पंचवटीकडे वाहने नेता येतात.

पुलावर वाहनांची वर्दळच नसल्यामुळे येथील रुंद पुलाच्या दोन्ही बाजूंचा उपयोग विविध वस्तू विक्रेत्यांनी करून घेतला आहे. त्यात हातगाड्या तर थेट पुलाच्या मध्यभागावरच थांबविल्या जातात. ग्राहक आणि विक्रेत्यांच्या गर्दीने हा पूल नेहमीच भरून गेलेला दिसतो. पुढे बाजारपेठेतही असाच प्रकार बघायला मिळतो. बाजारात दुकानासमोर थेट रस्त्यावरच काही दुकानांचा विक्रीचा माल ठेवण्यात येतो. जवळच दुकानदारांची वाहने पार्क केली जातात. परिणामी पादचाऱ्यांना या भागातून जाताना अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. पादचाऱ्यांना येथून सहज जाता येईल, याचा विचार करून दुकानांची मांडणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी गिफ्टचा मोह पडला महागात!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लग्नाचे आमिष दाखवून ओझर येथील एका महिलेची पावणे दोन लाखांची फसवणूक करण्यात आली. परदेशातून गिफ्ट आले आहे, ते सोडविण्यासाठी बँक खात्यात वेळोवेळी पैसे टाकायला सांगून या महिलेची फसवणूक झाली. याबाबत ओझर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेचे पतीशी मतभेद असल्याने ती ओझर येथे आई-वडिलांकडे राहते. तिने एका ऑनलाइन विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर आपली माहिती व फोटो अपलोड केले होते. यावरून लंडन येथील मिचेल ससोन क्रग नावाच्या माणसाने या महिलेला फोन करून नंतर व्हॉटस् अॅपवर संवाद साधत ओळख वाढवली. मीचेलने आपली पत्नी मयत झाली असून, सारा नावाची एक मुलगी आहे. लंडन येथे राहत असून एका स्थानिक कंपनीत नोकरी करतो. काही दिवसांनी आईसह मी तुला भेटायला ओझरला येतो, असे सांगितले. महिलेने तिचा पत्ता दिल्यावर त्याने तुला भेटवस्तू पाठवतो, असे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांनी दिल्ली येथून डेल्टा कुरिअर सर्व्हिसमधून श्वेता नावाच्या मुलीचा ओझर येथील या महिलेला फोन आला. तिने पार्सल सोडव‌िण्यासाठी ४२ हजार ५०० रुपये बँक खात्यावर भरा, असे सांगितले. त्यानुसार या महिलेने ते भरले. मात्र श्वेताने पार्सल सोडवयाला अजून एक लाख २५ हजार भरायला सांगितले. त्यानुसार या महिलेने पुन्हा ही रक्कमही भरली. त्यानंतर या श्वेताला या महिलेने फोन केला. तेव्हा आपले चलन चालणार नसून, ते विमानतळावरच बदलावे लागेल, असे तिने सांगून अजून ७० हजार ५०० रुपये मा‌गितले. तेव्हा ओझर येथील महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने ओझर पोलिसात धाव घेतली. ओझर पोलिसांचे एक पथक तपासासाठी दिल्ली येथे गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चॉकलेट मेकिंग’ची आज अनोखी संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेळोवेळी बहुविध उपक्रमांची पर्वणी देणाऱ्या मटा कल्चर क्लबतर्फे पॅरेंट्स डेनिमित्त आज, रविवारी (दि. २३) चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले अाहे. या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर्स आणि बंपर प्राइज जिंकण्याची संधीही सहभागींना मिळणार आहे.

चॉकलेट हा जसा लहान मुलांचा आवडीचा विषय असतो, तसा तो मोठ्यांचाही वीक पॉइंट ठरताना दिसतो. त्यामुळे सर्वांनाच आवडणारी चॉकलेट्स घरच्या घरी बनविता आली तर..? सर्वांची हीच आवड ओळखून मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत निर्माण उपवन, काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ पंचवटी, नाशिक या ठिकाणी करण्यात आले आहे. सीमा गवारे पाटील या चॉकलेट कसे बनवायचे, चॉकलेटचे फिलिंग कसे करायचे, तसेच चॉकलेट रॅपिंग, टेम्परिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, चॉकलेट ब्राऊनीज वर्कशॉपमध्ये बनवून दाखवणार आहेत. हे वर्कशॉप सर्वांसाठी मोफत आहे.

--

सेल्फी पाठविणाऱ्या भाग्यवंतांना व्हाउचर्स

पॅरेंट्स डेनिमित्त ज्यांनी सेल्फी पाठविले आहेत त्यांनी चॉकलेट मेकिंग वर्कशॉपला उपस्थित राहावे. भाग्यवान ५० जणांना हेल्थ चेकअप व्हाउचर्स चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमध्ये दिले जातील. या वर्कशॉपमध्ये रेफ्रिजरेटर, म्युझिक सिस्टिम यांसारखे बंपर प्राइज जिकंण्याचीही संधी मिळणार आहे.

---

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला भंडारदरा पिकनिकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावणाची मजा लुटायची असेल तर घराबाहेर पडायला हवे, पिकनिकला जायला हवे. पण पिकनिकला जायचे म्हणजे ग्रुप हवा. त्यात भंडारदरा व त्यासारखी आजुबाजूची काही ठिकाणे असतील तर ग्रुपशिवाय पर्याय नाही. हाच विचार करुन मटा कल्चर क्लबतर्फे खास तुमच्यासाठी पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. ३० जुलै रोजी ही एकदिवशीय सहल होणार असून, सहभागी होणाऱ्यांसाठी विशेष सवलतीही देण्यात येणार आहेत.

पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर भटकंतीशिवाय पर्याय नाही. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नवीन ओळख करत निसर्गाचे सौंदर्य अनुभवणे हा अनोखा अनुभव असतो. त्यामुळे अशा पिकनिकच्या आयोजनाचीही अनेकजण वाट बघत असतात. सध्या पावसामुळे निसर्गाने हिरवी शाल पांघरली असून, त्याचा अनुभव या एकदिवशीय पिकनिकमधून घेता येणार आहे. या सहलीत चहा, नाश्ता आणि दुपारचे जेवण कल्चर क्लबकडून असणार आहे. या पिकनिकसाठी लिमिटेड स‌ीट्स असल्याने नोंदणी करणे गरजेचे आहे. मटा कल्चर क्लब मेंबरसाठी ८५० तर इतरांसाठी ९५० रुपये नोंदणी फी आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चौधरी यात्रा कंपनीतर्फे देशांतर्गत यात्रेसाठी ५ टक्के डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. जर तुमचा पाच जणांचा ग्रुप असेल आणि तुम्हाला देशांतर्गत टूर करायची असेल तर प्रत्येक सीटमागे तुम्हाला ५ टक्के (कमाल ७५० रुपये प्रतिस‌ीट) डिस्काउंट मिळेल आणि जर तुमचा १० जणांचा ग्रुप असेल तर प्रत्येक सीट मागे ७ टक्के (कमाल १००० रुपये प्रतिसीट) डिस्काउंट मिळेल. ही ऑफर सहलीत सहभागी होणाऱ्या मटा कल्चर क्लब मेंबरसाठीच आहे. तसेच विदेश यात्रांसाठी आकर्षक सवलतीही चौधरी यात्रा कंपनीने उपलब्ध करुन दिल्या आहेत.

नोंदणीसाठी संपर्क

महाराष्ट्र टाइम्सच्या अल्फा स्क्वेअर, दुसरा मजला, डिसुजा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक -४२२००५ या पत्त्यावर किंवा ०२५३-२६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुड्ड्या खूनप्रकरणी एका संशयितास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याच्या हत्येप्रकरणी हल्लेखोरांच्या टोळीतील एका संशयिताला शनिवारी पुण्यातील मावळ तालुक्यातील कामशेत परिसरातून पोलिसांनी अटक केली. सागर साहेबराव पवार उर्फ किट्टी (२२, रा. धुळे) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

धुळे शहरातील सहा पोलिस ठाण्यासह अमळनेर, मालेगाव, कोपरगाव, शिर्डी येथे चोरी, खंडणी, दरोडा, खुनाचे एकूण ३५ गुन्हे दाखल असलेल्या गुड्ड्याची मंगळवारी (दि. १८) जुना आग्रा रोडवरील चहाच्या दुकानासमोर टोळक्याने हत्या केली होती. प्राथमिक अंदाजानुसार या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सुमारे ११ असून, ती २५ पर्यंत वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. उर्वरित आरोपी लवकरच पकडले जातील, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिली. गुड्ड्याच्या हत्येनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध शहरामध्ये पथक रवाना केले होते. त्यामधील एका पथकाने पुणे येथून सागर पवार याला पकडले. त्याच्याकडून गुड्ड्याच्या खूनाबाबत अन्य माहिती आणि सहभागी आरोपींची माहिती घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत, असेही पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सागर पवारला पोलिस हवालदार कुणाल पानपाटील, रवींद्र राठोड, दीपक पाटील, रमेश माळी यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

गुड्ड्याचा साथीदार अटकेत

गुड्ड्यांच्या हत्येनंतर शहरात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणी बसेसवर दगडफेक करून काही जणांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच गुड्ड्याचा साथीदार राजाचोर यालाही ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमणगंगा-एकदरे लिंक नदीजोडला मान्यता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या भविष्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-एकदरे लिंक या नदीजोड प्रकल्पास राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. या लिंकचा सविस्तर प्रकल्प अहवाल तत्काळ बनविण्याचे आदेश राज्य शासनाने राष्ट्रीय जलविकास अभिकरणास दिले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिकसाठी ५००० दशलक्ष घनफूट इतके पाणी अतिरक्त पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजिनीअर राजेंद्र जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

गंगापूर धरण समूहाचे पाणी भविष्याची वाढती गरज लक्षात घेता पिण्यास, सिंचनास तसेच उद्योगास पाणी पुरत नव्हते. त्यावर उपाय म्हणून दमणगंगा-एकदरे लिंक या नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनास सुचवला होता. गेल्या दीड वर्षापासून या योजनेचा पाठपुरावा केल्यामुळे त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिकचा समावेश दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात (डीएमआयसी) झालेला आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध होणे आवश्यक होते. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणामुळे गंगापूर धरणसमूहात सिंचनाची तूट निर्माण झाली होती. नाशिकसाठी पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली-मुंबई औद्योगिक वसाहत टप्पा क्र. १ साठी औरंगाबाद येथील शेंद्रा-बिडकीन येथे प्रस्तावित करण्यात आली. त्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी उपलब्धता दाखवण्यात आली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नाशिकवर अन्याय झाला. तो आता या योजनेतून दूर होणार आहे. त्यामुळे ‘मेक इन नाशिक’ साठी पाणी उपलब्ध झाले आहे. डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश निश्चित झाला आहे. आता नाशिकला पिण्यासह उद्योगांना व सिंचनासही दमणगंगा-एकदरे लिंक प्रकल्पातून पाणी उपलब्ध होणार आहे. २९ जानेवारी २०१६ रोजी या योजनेचा कोकण खोरे महामंडळाच्या बृहद आराखड्यात समावेश करण्यात आलेला आहे. गंगापूर कालव्यांच्या १२००० हेक्टरच्या सिंचनात निर्माण झालेली तूट या प्रकल्पातून भरून निघणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

दमणगंगा नदीवर एकदरे या पेठ तालुक्यातील गावाजवळ ५००० दशलक्ष घनफूट इतक्या क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. सदरचे पाणी ८ किमी लांबीच्या पाइपलाइनद्वारे २१० मीटर उपसा करून उमरद गावाजवळील ख‌िरा डोंगरावर आणण्यात येईल. तेथून पुढे ५.५ किमी लांबीच्या बोगद्याद्वारे गंगापूर धरणात टाकण्यात येणार आहे. अशा प्रकारे नाशिकच्या विकासासाठी ५००० दशलक्ष घनफूट इतके अतिरिक्त पाणी पिण्यास, उद्योगास व सिंचनास उपलब्ध होणार आहे.


नदीजोड प्रकल्पासाठी प्रयत्न

जलसंपदा विभागामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी एनडब्ल्यूडीएला १० जुलै रोजी पत्र पाठवले आहे. प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी १८.२१ कोटी इतका खर्च येणार आहे. ही योजना राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पांतर्गत राबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.


प्रस्तावित पाणी वापर व खर्च

नाशिकला पिण्यासाठी - २५०० दलघफू

उद्योगांसाठी - १००० दलघफू

सिंचनासाठी (गंगापूर कालवा) - १५०० दलघफू

अंदाजित खर्च- ८५९ कोटी

लाभ-व्यय गुणोत्तर - १.४४

आर्थिक परतावा दर - १६.७८ टक्के

प्रकल्प अहवालाचा खर्च- १८.२१ कोटी रु.

सिन्नर, शिर्डीचाही पाणीप्रश्न मिटणार

सिन्नरच्या दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या गारगाई-अप्पर-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक या नदी-जोड प्रकल्पासही राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तत्काळ बनविण्याचे निर्देश राज्य सरकारने राष्ट्रीय जलविकास अभिकरणास दिले आहेत. या नदी-जोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करण्यासाठी २३.९३ कोटी इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यासाठी ७००० दशलक्ष घनफूट इतके पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे आण‌ि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकल्पांतर्गत गारगाई-वाघ-वाल ह्या नद्यांवर पाच धरणे बांधून ७००० दशलक्ष घनफूट पाणी लिफ्ट करून वैतरणा धरणात व पुढे थेट पाइपलाइनने हे पाणी कडवा धरणात टाकण्यात येईल. कडवा धरणातून पुन्हा लिफ्ट करून ते सोनांबे येथे देवनदीच्या उगमात येईल. सोनांबे येथील धरणातून २१०० दशलक्ष घनफूट पाणी देवनदीच्या उगमात सोडून पावसाळी कालव्याने सर्व पाझरतलाव भरण्यात येतील. सिन्नर शहर-तालुका व शिर्डीस पिण्यासाठी थेट पाइपलाइनने ८०० दशलक्ष घनफूट पाणी पुरवण्यात येईल. २६०० दशलक्ष घनफूट पाणी सिन्नर-माळेगाव उद्योग वसाहत व प्रस्तावित दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यास पुरवण्यात येईल. उर्वरित १५०० दशलक्ष घनफूट टीएमसी पाणी उच्चस्तरीय पाइपलाइनने डुबेरे-रामोशीवाडी-दापूर-दोडी-नांदूर शिंगोटे या गावांतून भोजपूर कालव्यास जोडण्यात येईल. भोजपूर कालवा थेट पाइपलाइनच्या माध्यमातून दोडी, नांदूरशिंगोटे, निमोण, तळेगाव, रांजणगाव, मिरपूर, निर्मळ पिंप्री, कोऱ्हाळे, काकडी, शिर्डीपर्यंत वाढविण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात पशुसंवर्धन योजना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शेतकऱ्यांपर्यंत पशुसंवर्धन योजना पोहोचव‌िकरिता जालना जिल्ह्यासाठी पथदर्शी उपक्रम राबवण्याचे शासनाने यापूर्वीच ठरविले आहे. तसाच उपक्रम राबविणारा मालेगाव हा राज्यातला दुसरा तालुका ठरेल. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून देखील जनावरे व मेंढ्या खरेदीसाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांच्या उपस्थितीत मालेगाव तालुका पशुसंवर्धन विभागाच्या कामकाज आढावा बैठक प्रसंगी खोतकर बोलत होते. यावेळी महापलिका आयुक्त संगिता धायगुडे, पशुसंवर्धन उपायुक्त एस. पी. विसावे उपस्थित होते. खोतकर म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी लाभार्थ्यांना गायी व म्हैशी ही दुभती जनावरे घेण्यासाठी मोठे अनुदान दिले जात आहे. गायीसाठी ५५ हजार रुपये व म्हशीसाठी ६५ हजार रुपये असा दर केला जाणार आहे. शेतकरी सहभागासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचना खोतकर यांनी दिल्या.


शीतकरण प्रकल्प लवकरच सुरू होणार

तालुक्यातील पशुधन असलेले विराणे, साकोरी या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करण्यात येतील. जिल्हा दूध संघाचा मालेगाव येथील बंद शीतकरण प्रकल्प सुरू करण्यात येईल. यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात यावा असे निर्देश राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले. खोतकर यांनी दरेगाव परिसरातील मांस प्रक्रिया उद्योग आणि कत्तलखान्यांना भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरी फेरी ः एक अनुभूती

$
0
0

केशव ढोन्नर

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्त‌िनाथ महाराजांना याच प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे.

‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे...’ बालकवींच्या या कवीतेतील श्रावण त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेत अगदी सहज सापडतो. त्र्यंबकेश्वर, श्रावण महिना आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हे एक अतूट समीकरण आहे. श्रावण महिना हा व्रतवैकल्य, आराधना आणि उपसनाकरिता पर्वकाल समजला जातो. साहज‌िकच आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री साधकांची पावले वळल्यास नवल ते काय! हिरव्या पाचुंची शाल अंगावर घेतलेल्या ब्रह्मगिरी आणि पर्वतराईतून शुभ्रधवल खळाळणारे धबधबे मनोहरी दिसतात. या भक्ती आणि पर्यटनाचा योग साधण्यासाठी श्रावण महिन्यात खरोखरच आयडीयल म्हणावे असे वातावरण येथे अनुभवण्यास मिळते. महिन्याभरात येथे १५ ते २० लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. अर्थात दर्शना बरोबरच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणारे भाविक काही कमी नाहीत. श्रावण सोमावारी यास विशेष पसंती मिळते.

पूर्वी दळणवळणाची साधने मर्यादित होती. तेव्हा उपासना करणारे भाविक त्र्यंबकेश्वर येथे महिना सव्वा महिना मुक्कामी असायचे. लॉज‌िंग संस्कृती इतकी विकसीत झालेली नव्हती. तेव्हा येथे धर्मशाळा हा भाविकांचा एकमेव निवाऱ्याचा आधार होता. सकाळ-सायंकाळ मंदिरात हजेरी लावणे, पोथ्या-पुराणांची पारायणे करणे आणि प्रदक्षिणा करणे याकरिता भाविक येथे निवासी असायचे. शहरातील सर्वच मंदिर, मठ आणि आश्रमांमध्ये भल्या पहाटेपासून पुजाअर्चा सुरू झालेल्या आहेत. रात्री उश‌िरापर्यंत पोथी पुराणांचे वाचन सुरू असते. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा एक शिव उपासना करण्याचा भाग आहे.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्त‌िनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे. पुण्यप्राप्तीसाठी तर कधी पापक्षालणासाठी प्रदक्षिणा झाल्या आहेत. इतिहासात शिक्षा म्हणून प्रदक्षिणा करण्यास सांग‌ितले आहे. तथापि प्रदक्षिणा त‌िसऱ्या सोमवारीच करावी हा नवा पायंडा सुमारे १५ ते २० वर्षांपासून रूढ झाला आहे. यामध्ये विविध प्रकारचे समज-गैरसमज आहेत. जसे सलग पाच वर्ष तिसऱ्या सोमवारची प्रदक्षिणा केली तर लाभ होतो, असा प्रचार झाला आहे. वास्तव‌िक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी सारखाच लाभ देणारी आहे. त्यात श्रावणात केली तर अधिक चांगले आहे. केवळ त‌िसऱ्या श्रावण सोमवारचा आग्रह धरल्याने ठराव‌िक वेळेत काही लाख भाविक या सुमारे वीस किलोमीटच्या मार्गावर चालतात. एवढा मोठा समुदार एकाच वेळेत चालत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये नाशिक त्र्यंबक वाहतुकीपासून ते स्वच्छतापर्यंत सर्वच बाबतीत ताण निर्माण होतो. तशात रात्री अपरात्री ही प्रदिक्षणा होत असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

प्रदक्षिणा मार्गावरील तीर्थ

प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ लागतात. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागातीर्थ, रामतीर्थ, वैतरणा-बाणगंगा निर्मल तीर्थ, बानगंगा-धवलगंगा पद्मतीर्थ, नरसींह तीर्थ, बिल्वतीर्थ आदी तीर्थ आणि नद्या तसेच मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात. काही तीर्थ आज दृष्टीत येत नाहीत. तसेच प्रदक्षिणेचा मार्गही बदलल्यामुळे काही तीर्थ आणि मंदिरे भाविकांच्या वाटेत लागतच नाहीत. प्रदक्षिणे दरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिवस्वरूप ब्रह्मगिरीस आपण पुर्वाभूमुख होऊन साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे. सकाळच्या वेळेस प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर येथे हा अर्धा प्रवास संपतो. येथून होणारे ब्रह्मगिरीचे विलोभनीय दर्शन अवघा शिणभाग घालवते. सुर्योदयाच्या वेळी स्वर्गीय दृष्याची अनुभती प्राप्त होते. येथुन पुढे परतीचा प्रवास सुरू होतो. प्रदक्षिणा मार्ग सिमेंट काँक्रीटचा झाला आहे. पूर्वी आरण्यातून वाट सापडेल तशी होणारी प्रदक्षिणा आता केवळ रस्त्याने चालणे अशी झाली आहे. डोंगर माथ्यावरून वनस्पतींमधून खळाळात आलेले झरे पायाला सुखावह असायचे. चिखलातून चालतांना विविध वनस्पतींचा स्पर्श पायांना व्हायचा आणि सलग चारपाच तास चालणे ही एक योगसाधना पूर्ण व्हायची. ती आता त‌ितक्याच प्रमाणात आणि प्रभावाने होणार नसेल, तरी देखील श्रावणात पाऊस असताना प्रदक्षिणा करणे हा अनुभव खरोखरच अगदी वेगळा आहे. आणि तो आनंदी अनुभव पुन्हा पुन्हा घ्यवासा वाटतो. अर्थात या फेरीत स्वतः काही नियम पाळणे निश्च‌ितच गरजेचे आहे. जसे सोबतचे पास्टिक कुठेही न टाकता, एकाच ठिकाणी जमा करावे. चालत असताना नशेचे पदार्थ घेऊ नये. विक्रेत्यांनीही प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा. एकूणच पूर्वजांनी दिलेला हा अनमोल ठेवा आपण अनुभवतांना पुढच्या पिढीसाठी मागे ठेवावा.

तिसऱ्या सोमवारलाच महत्त्व?

श्रावणी सोमवारला प्रदक्षिणा करणे विशेष फलदायी मानले जाते. पहिले दोन श्रावण सोमवार पूर्वी ञ्यंबक येथे असणारी विशेष गर्दी असायची. पौणिर्मेपर्यंत लिंगार्चन पोथी पुराण पारायण आदी धार्मिक विधींची रेलचेलमुळे विविध व्यवसाय‌िकांना उसंत मिळायची नाही. यातूनच श्रावण उतरणीला लागल्यानंतर तिसऱ्या सोमावरी फेरीला प्राधान्य दिले जायचे. तशात औरंगाबाद-नाशिक आदी भागातून याच सोमवारी फेरीसाठी भाविक यायचे. म्हणून तिसऱ्या सोमवारचे महत्त्व वाढले. १९९६ नंतर तिसरा सोमवार अक्षरश: लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला. आता तर तो शासन पातळीवर नियोजन करावे, असा महत्त्वपूर्ण उत्सव झाला आहे.


महात्म्य आणि प्रथा

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत)सह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या तीनही प्रदक्षिणेत ब्रम्हग‌िरी पर्वतास प्रदक्षिणा घालणे आहे. सुमारे वीस किलोमीटरचा हा मार्ग आता पक्का रस्ता झाला आहे. या मार्गावर कित्येक तीर्थ आहेत. त्यापैकी बहुतेक काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. प्रदक्षिणेचा मार्ग देखील सोयीचा ठरेल असा बदलला आहे. त्यात काही तीर्थ राहुन जातात. ही प्रदक्षिणा करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रदक्षिणेला सुरुवात करतांना पंचपंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास आधी उठून कुशावर्तावर स्नान करून श्री ञ्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गाक्रमण करावे. म्हणजे साधारणत: पहाटे पाचवाजता ही फेरी सुरू करावी. म्हणजे सूर्योदय होतांना प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडीमार्गे सृष्टीसौंदर्याचा अस्वाद घेत शिवाचे नामस्मरण करत फेरी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश चांगले गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कुविख्यात चांगले टोळीचा म्होरक्या गणेश चांगले (वय २८, रा. हनुमानवाडी, पंचवटी) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. तपासात त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गणेश चांगले पंचवटीतील गंगाघाट परिसरात येणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. शंकर कोल्हे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या महिला सहायक निरीक्षक सारीका अहिरराव आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने तेथे सापळा रचला. गणेश गोदाघाट परिसरात आला असता त्याला शिताफीने अटक करण्यात आली. गणेश चांगले याच्यावर विविध पोलिस ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत. गेल्या एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार होता. वर्षभरापूर्वी सरकारवाडा पोलिसांनी गंगापूररोड भागात चांगलेच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी चांगले पोलिसांच्या हातावर तुरी देवून फरार झाला. त्याच्या साथीदारांच्या वाहन तपासणीत धारदार शस्त्रांसह गावठी पिस्तूल मिळून आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्रे प्रतिबंधात्मक (आर्म अ‍ॅक्ट) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर अंबड हद्दीत दरोड्याच्या तयारीत त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यावेळीही तो पोलिसांच्या हाती लागू शकला नव्हता. तेव्हापासून अंबड आणि सरकारवाडा पोलिस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चांगले याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, आर्म अॅक्ट, हाणामारी, जीवघेणा हल्ला यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>