बालसाहित्य लिहिणे ही अवघड बाब. मात्र, चांदवड येथील शिक्षक कवी रावसाहेब जाधव यांचा ‘गरगर मोळ्या’ हा बालकवितासंग्रह मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये एकाच पुस्तकात प्रकाशित होणार आहे. पुण्याच्या अक्षर वाङमय प्रकाशनातर्फे होणारा हा त्रिभाषेतला अभिनव प्रयोग महाराष्ट्रातला पहिला प्रयोग ठरण्याची शक्यता आहे.
रावसाहेब जाधव यांच्या बालकविता इतक्या सकस व लक्षवेधी आहेत की त्या इतर भाषांमधून वाचकांसमोर याव्यात. तसेच ग्रामीण भागातील मुलांचे भावविश्व, तेथील ग्रामीण प्रतिमांसह सर्वदूर जावे यासाठी हा अनोखा प्रयोग करीत असल्याचे प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांनी सांगितले आहे. दरम्यान हा ग्रामीण भागातील कवीचा मोठा सन्मान असल्याचे मानले जात आहे.
चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील अजितदादा पवार विद्यालयात शिक्षक असणारे कवी रावसाहेब जाधव यांचा ‘गरगर मोळ्या’ हा बालकविता संग्रह केवळ मराठीच नव्हे तर हिंदी इंग्रजी अशा तिन्ही भाषेत प्रकाशित होत आहे. हा आगळा वेगळा प्रयोग आहे. पुण्याच्या अक्षर वाङमय प्रकाशनने बालसहित्यात ही वेगळी वाट चोखाळली आहे एकाच पुस्तकात एकच कविता तिन्ही भाषेतून येणार असल्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
जरासा वाकडा चिंचेचा आकडा
खाणाखुणा मज करतोय रे
झाडावर चढ मला म्हणतोय रे
ही चिंचेची कविता असो किंवा
उन्हात बोलवी काटेरी सावली
शेंगा वाळून गळतात
नाचाया मला लावतात
ही शेंगांवरची कविता हिंदी व इंग्रजीमधून सर्वांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण भाषा, तेथील मातीतील विविध प्रतीके यांचा चपखल वापर करून कवी जाधव यांनी डोंगर, राने, वने, झरे ग्रामीण परिसर यांची छानशी सफर गारमोळ्या
कविता संग्रहात घडवून आणली आहे. या कविता अनुवादित करून एकाच काव्यसंग्रहाद्वारे वाचकांसाठी सादर करण्याचा बाळासाहेब घोंगडे यांचा प्रयोग अनोखा आहे. ‘गीत चिन्हांचे गाऊ या’ यासारख्या कविता तर मुलांच्या मनावर अधिराज्य करतील अशाच आहेत सध्या मराठी कवितांचे अनुवाद करण्याचे काम सुरू असून येत्या काही महिन्यात तिन्ही भाषेतील हा काव्यसंग्रह सर्वांच्या भेटीला येणार असल्याचे प्रकाशकांनी सांगितले. मराठी भाषेत द्विभाषी कवितांचा प्रयोग झाला; मात्र त्रिभाषेत हा पहिलाच भन्नाट प्रयोग असल्याने उत्सुकता वाढल्याचे चांदवडी रुपय्या या साहित्यिक ग्रुपचे सागर जाधव, विष्णू थोरे, जनार्दन देवरे, रवींद्र देवरे, रुपाली खैरनार, बाळा पाडवी यांनी सांगितले.
मुलांच्या भावविश्वाचे काव्यातून रेखाटन
कवी जाधव यांनी आपल्या या नव्या निर्मितीचे स्वागत केले आहे. त्यांचा ढेकूळ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यास राज्य पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण जीवन, तेथील जगणे, शेती मातीतील आयुष्य हिंदी व इंग्रजी भाषेत शिकणाऱ्यांना कळेल, या अर्थाने या प्रयोगाला वेगळे मोल आहे. डॉ. एकनाथ पगार या पुस्तकाची प्रस्तावना लिहित असल्याचे कवी जाधव यांनी सांगितले. मुलांचे भावविश्व कवितेतून रेखाटल्याचे ते सांगतात.
अक्षर वाङमय ही आमची प्रकाशन संस्था नवे प्रयोग करण्यास उत्सुक आहे. कवी रावसाहेब जाधव यांच्या ‘गरगर मोळ्या’ कविता संग्रहात चांगल्या कविता आहेत. वेगळेपण दिसल्याने त्या मराठीसह हिंदी, इंग्रजीमध्ये पण आणत आहोत. एखाद्या चौथ्या भाषेत या कविता आणण्याचा प्रयत्न आहे.
- बाळासाहेब घोंगडे, प्रकाशक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट