उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांच्या आनंदांनतर विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे तसेच त्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे, यासाठी यंदाही शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. शाळेच्या परिसरात रांगोळ्या काढून, वर्ग पताकांनी सजवून तसेच विद्यार्थ्यांना फूल देऊन, त्यांना गोड खाऊ वाटून हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास बनवला जाणार आहे.
शाळेचे नवे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी उत्सुकतेबरोबरच पुढील वर्गाच्या अभ्यासाची चिंताही घेऊन येते. नवे विषय, नवे शिक्षक, नवी पाठ्यपुस्तके यात रमण्यात विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागतो. तर काही विद्यार्थ्यांना याचे दडपण येते. उन्हाळ्याच्या सुटीत केलेल्या मौजमजेमुळे अनेकांना तर शाळेत जाणेच नकोसे होऊन जाते. अशा विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शाळा प्रवेशोत्सव ही संकल्पना शाळेच्या पहिल्या दिवशी राबवली जाते. १५ जूनला शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांकडे तीन दिवसांचा कालावधी प्रवेशोत्सवाच्या तयारीसाठी आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनी नियोजनही केले आहे. यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी देशभक्तीपर गीते, प्रभातफेरी, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची नावे लाऊड स्पीकरवर घोषित करण्यात येणार आहे. शाळेत बालकांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच वर्षभर शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती, एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही, याविषयी प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठई वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही काही शाळा करणार आहेत.
शाळा सजावटीवर भर
शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थी शाळेत येताच त्याला प्रसन्न वाटावे यासाठी शाळा सजावटीवर भर देण्यात येणार आहे. यासाठी शाळा परिसर स्वच्छ करुन, सडा टाकून, रांगोळी, फुलापानांची तोरणे, पताका बांधून वर्ग खोल्या सुशोभित करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट