Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चौथ्या दिवशीही उद्रेक कायम

$
0
0

सटाणा, बागलाण, देवळा, येवल्याला आंदोलन; उमराणेत निषेध सभा

टीम मटा

राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपाचा रविवारी चौथा दिवस होता. पुणतांब्यानंतर आता नाशिककडे मोर्चाचे केंद्र वळाल्याचे चित्र जिल्ह्यातील आंदोलनातून दिसून आले. बागलाण तालुक्यातील ताहराबादेत सर्वपक्षीयांकडून रास्ता रोको करण्यात आला. तर सटाण्यात आठवडे बाजारही बंद ठेवत या संपात सहभाग नोंदविला. कळवण, देवळा येथील आठवडे बाजार शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी शंभर टक्के बंद ठेवण्यात आला. यावेळी पाचकंदील येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. त्र्यंबकलाही भाजीपाला, दुध नसल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. येवल्यातही संपाची तीव्रता कायम असून, सायगावमध्ये राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. तर गवंडगावात शेतकरी आक्रोश सभा घेऊन रास्ता रोको करण्यात आला. तसेच अंदरसूलला शिवसेनेने आंदोलन करीत आपला पाठिंबा दर्शविला.


त्र्यंबकला दुधाचा तुटवडा

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरलाही शेतकरी संपाची परिणामकारकता जाणवण्यास सुरुवात झाली असून, भाजी बाजारात भाज्यांचे भाव वाढले आहे. त्याचबरोबर ताजा भाजीपाला येत नसल्याने आहे त्यात कांदा, बटाटा साठवणीच्या भाजीवरच समाधान मानावे लागत आहे. दुध आवक जवळपास थांबल्याने हॉटेलमध्ये चहा मिळत नाही. त्यामुळे भाविकांना चहापानावर पाणी सोडावे लागले आहे. कुशावर्त चौकात दुपारी लस्सी दुध आणि सायंकाळी गरम दुध यांची तडाखेबंद विक्री होत असलेले दुकान बंद ठेवण्यात आले आहे. दुध नसल्याने दूध पावडरची मागणी वाढली असून, त्यावरच नागरिकांनी आपली तहान भागविली आहे

गाडी अडवल्याने गुन्हा दाखल

शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिककडून त्र्यंबककडे चाललेले वाहन टेम्पो (क्रमांक एमएच १७ एजी ६०१) याला पेगलवाडी फाटा मारूती मंदिर येथील सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी अडवून वाहनातील दुध, दही, ताक या मालाच्या पिशव्या असलेले कॅरेट रस्त्यावर फेकले. तसेच चालक संजय नारायण वदक यास धमकी दिली. याबाबत संजय वदक याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्यानुसार त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय कॉलेजला समस्यांचे ग्रहण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय कॉलेजमधील रक्तपेढीत प्लेटलेट्‌ससह इतर रक्त घटक उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी सोय करावी. तसेच सी. टी. स्कॅन व सी-आर्म मशीनची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी शिवआरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. माधुरी बोरसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. सतीश गुप्ता यांना निवेदन दिले.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत प्लेटलेट उपलब्ध करण्याची सोय नाही. डेंग्यू, मलेरिया व इतर अनेक आजारांमध्ये प्लेटलेटची गरज भासते. मात्र, ते उपलब्ध नसल्याने उपचार करण्यात अडथळे निर्माण होतात. प्लेटलेटअभावी गरीब रुग्ण खासगी दवाखान्यात आर्थिक परिस्थिती नसतानाही उपचार घेतात. सिंगल डोनर प्लेटलेटची एक पिशवी खासगी रक्तपेढीत किमान ८ हजार रुपयांना मिळते. त्यामुळे महाविद्यालयात प्लेटलेट व इतर रक्त घटकांची सोय उपलब्ध करण्याची गरज आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील रुग्ण येतात. बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या हजारात आहे. परंतु, आजपर्यंत महाविद्यालयात रुग्णांसाठी कायमस्वरूपी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. ती तातडीने करण्यात यावी. सी. टी. स्कॅन मशीन सुस्थितीत नाही. अस्थिरोग विभागातील ऑपरेशन थिएटर मधील सी-आर्म मशीनदेखील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. तरी या मशीनची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी प्लेटलेट्स व इतर रक्त घटक उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी समन्वय साधून मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतूल सोनावणे, माजी आमदार शरद पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला भरदिवसा घरफोडी

$
0
0

भरदुपारी चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी (२ जून) नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली.

गंगाराम ईश्वरदास पटेल (रा. गंधर्वनगरी) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी आठ ते रात्री पावणेबारापर्यंत पटेल कामानिमित्ताने बाहेर गेले होते. या दरम्यान त्यांच्या फ्लॅटला कुलूप होते. चोरट्यांनी लोखंडी कपाटातील दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीजे चालकावर गुन्हा

शिवाजीनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधितांकडून २५ हजार रुपयांचे साहित्य गंगापूर पोलिसांनी जप्त केले. शिवाजीनगरच्या सप्तशृंगी मंदिराजवळ सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी डीजे वाजवण्याचे काम सुरू होते. ताहाराबाद (ता. सटाणा) येथील संशयित एकनाथ भागाजी धिवरे (वय ३१) याचा स्टार म्युझिकल डीजे व बँजो पार्टीला यासाठी पाचारण करण्यात आले होते. ध्वनिमर्यादेचेही उल्लंघन झाल्याने गंगापूर पोलिसांनी कारवाई करीत संशयित धिवरे याला अटक केली. त्याच्याकडून एनएक्स ऑडिओ कंपनीचे ऑडिओ मिक्सर जप्त करण्यात आले. संशयित धिवरे याला जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.

क्रेडिट कार्डद्वारे चोरी

संभाजी स्टेडियममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या हरवलेल्या पाकिटातील क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून दिल्ली येथील संशयिताने तब्बल ८५ हजार रुपये परस्पर लंपा, केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोपानदेव काशिनाथ सोनार (रा. उपेंद्रनगर, सिडको) यांनी अंबड पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. २० एप्रिल रोजी सोनार सिडकोतील संभाजी स्टेडियममध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्या खिशातील पाकीट पडले. त्याच दिवशी सायंकाळी सोनार यांच्या मोबाइलवर संशयित आशिष कक्कर (रा. विकास विहार, दिल्ली) याने फोन करून संपर्क साधला. त्याने कार्डाबाबत सोनार यांच्याकडून सर्व माहिती घेत ८५ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर सोनार यांनी अंबड पोलिस स्टेशन गाठले.

सातपूरमध्ये अवैध दारू दुकानावर कारवाई

नव्यानेच नियुक्त झालेले पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सातपूर एमआयडीसीतील एका अवैध दारू दुकानाचे शेड जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना चपराक बसली असून, या कारवाईनंतर सातपूर भागातील सर्वच अवैध धंदे बंद ठेवण्यात आले होते. मात्र, एकाच ठिकाणी कारवाई का, असा प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे.

सातपूरच्या अशोकनगर भागात महिंद्रा मटेरिय गेटसमोर असलेल्या गुन्हेगारी व्यक्तीचे अवैध देशी दारूचे दुकान आजही सर्रासपणे सुरू आहे. मात्र, गुन्हे शाखेने एका क्लबवर यापूर्वी कारवाई केली होती. मात्र, अवैध देशी दारूच्या दुकानावरील कारवाई टाळली होती. आता पुन्हा अवैध मद्य विक्रीच्या दुकानावर कारवाई केली असताना महिंद्रा मटेरिय गेटसमोरील दुकानावर कारवाई केलेली नाही. पोलिसांनी सरसकट सर्वच अवैद्य धंदे बंद करावेत, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीतून ‘फुल’विले नंदनवन

$
0
0

fanindra.mandlik @timesgroup.com Tweet : @FanindraMT

शेतीची आवड असल्याने निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून प्रतिभा भट यांनी सिन्नर-घोटी हायवेवरील शेणित गावात शेती घेतली. बँकेच्या अर्थसाहाय्याने त्या ठिकाणी फुलांची शेती करून आज त्या जागेचे नंदनवन केले आहे. शेती करून पैसा मिळत नाही, ही बाब खोडून आसपासच्या शेतकऱ्यांसमोर त्यांनी आदर्श उभा केला आहे. आज वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांची मेहनत पाहून अनेक शेतकरी प्रेरणा घेताना दिसत आहेत.

प्रतिभा भट यांचा जन्म पुणे येथे झाले. शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न होऊन त्या नाशिकला आल्या. आपल्या हातून ज्ञानदानाचे कार्य घडावे, अशी त्यांची इच्छा असल्याने मविप्रच्या बी. एड. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बी. एड. झाल्यानंतर त्या पंचवटी कॉलेजमध्ये प्राध्यपक म्हणून रुजू झाल्या. येथे विद्यादानाचे काम करीत असताना त्यांनी एम. फीलची डिग्रीही मिळवली. याच काळात बॉटनी हा विषय शिकवत असतानाच आपलीही शेती असावी, असे त्यांना सारखे वाटायचे. परंतु, नोकरीच्या व्यापात ते शक्य नव्हते. म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. रिटायरमेंटचे काही पैसे व स्टेट बँकेचे कर्ज घेऊन त्यांनी शेणित येथे शेतजमीन घेतली. शेती करण्याची इच्छा असली, तरीही शास्त्रशुद्ध शिक्षण नसल्याने पुणे येथे जाऊन त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेणित येथे पॉलिहाउस उभारून गुलाबाच्या २५ हजार रोपांची लागवड केली. शेती हा पुरुषांचा व्यवसाय असूनही रोज सुमारे तीन हजार गुलाब फुलांचे उत्पादन त्या घेत आहेत. सर्वसाधारण माणसाला शेती घेण्यासाठी माणूस वडिलोपार्जित शेतकरी असल्याचा दाखला अावश्यक असतो. त्याबाबतचे पुरावे गोळा करण्यासाठी खूप मोठी लढाई प्रतिभाताईंना करावी लागली. कर्ज मिळण्यासाठी, तसेच सरकारी कामांसाठी खूप चकरा माराव्या लागल्या. शेणित गाव इगतपुरी तालुक्यात येत असल्याने प्रत्येक कामासाठी इगतपुरीला जावे लागायचे. शेणितच्या शेतजमिनीवर पाण्याची व्यवस्था नसल्याने शेतात बोअरवेल करावे लागले. या ठिकाणी विजेची समस्या ‘आ’ वासून उभी होती. आजही ती तशीच आहे. अशा दिव्यातून त्यांना रोज उत्पादन घ्यावे लागते. शेतावर काम करताना मजुरांकडून काम करवून घेणे अवघड असते. परंतु, त्यांच्या अडीअडचणी सोडवून आपलेसे करून घेतले आहे. केवळ आपल्याकडे काम करत असलेल्या मजुरांच्याच अडचणी त्यांनी सोडविल्या नाहीत, तर गावच्या शाळेला लागणारी पाण्याची टाकीदेखील बांधून दिली आहे. प्राध्यापक म्हणून रिटायर्ड झाल्यानंतरदेखील शेणित परिसरात असलेल्या महाविद्यालयीन मुलांना त्या मोफत मार्गदर्शन करीत असतात. आतापर्यंत शेणित परिसरातील अनेक मुले त्यांनी पदवीधर केली आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांकडे वडिलोपार्जित शेती आहे. परंतु, शिक्षणाचा आभाव असल्याने ते गुंतवणूक आणि उत्पादन यांचा मेळ साधू शकले नाहीत. त्यांच्या हातून शिकून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शेतीचे योग्य व्यवस्थापन करून चांगली पिके घेतली आहेत. त्यांच्या या व्यवसायामुळे आठ ते दहा कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. नाशिकमधील अनेक शाळांचे विद्यार्थी त्यांनी केलेली फुलशेती पाहण्यासाठी शेणित येथे जात असतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा व बाग फुलवा’ हा संदेश दूरशिक्षणाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बंगल्याभोवताल्याच्या जागेचा आराखडा या विषयावर संशोधन केले असून, १२० बागांचे सर्वेक्षण केले आहे. मरणोत्तर देहदान या विषयावर अभ्यास करून त्याबाबत जागृतीचा प्रयत्न प्रतिभाताईंनी सुरू ठेवला आहे. त्याचप्रमाणे नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याच्या उत्तम व्यवस्थापनासाठी तेथील वनस्पती, पक्षी, प्राणी, पाण्यातील घटक त्यात ऋतुमानानुसार होणारे बदल यांचा व रहिवाशांचा अभ्यास सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील जैवविविधतेची नोंद असणे गरजेचे झाल्याने पाच वर्षांपासून सह्याद्रीच्या भागातील जैवविविधतेची नोंद घेण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. सरकारने नाही, परंतु सामान्य नागरिकांनी व अनेक संस्थांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली आहे.


नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असाच बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजेसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.•आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक. •समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईभक्तांवर काळाचा घाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

मनमाड-नगर राज्य महामार्गावर अंचलगाव (ता. येवला) शिवारात भरधाव वेगाने धावणारा मालवाहू कंटेनर, टेम्पो अन् प्रवाशी वाहतूक करणाऱ्या काळ्यापिवळ्या टाटा मॅजिक यांच्यात रविवारी सकाळी झालेल्या तिहेरी भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाले, तर सहाजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये येवला शहरातील टाटा मॅजिकच्या वाहनचालकासह शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या आंध्र प्रदेशातील पाच साईभक्तांचा समावेश आहे.

रविवारी सकाळी मनमाड-नगर राज्य महामार्गावर कोपरगावकडून येवल्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा मालवाहू कंटेनरने (युके-०४, सीए ९४९१) अंचलगाव शिवारातील वळणावर समोरून येणाऱ्या मालवाहू टाटा टेम्पोला (एम.एच. १७, बीडी ३४०४) प्रथम जोरदार धडक दिली. या धडकेत मालवाहू टेम्पो रस्त्याच्या बाजूला फेकला जातो न जातो तोच कंटेनरने टेम्पोच्या मागून येत असलेल्या टाटा मॅजिकला (एम.एच १५, ई ४८०३) धडक दिली. या दुर्घटनेत टाटा मॅजिकचालक शिवाजी लक्ष्मण मांजरे (वय ३०, रा. बुंदेलपुरा, येवला) यांच्यासह टाटा मॅजिकमधील शिर्डीला जाणारे आंध्र प्रदेशातील पाच साईभक्त जागीच ठार झाले. तर कल्लीकेय्या वन्नकयामा (रा. आंध्र प्रदेश) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मालवाहू कंटेनर त्यांच्यासाठी बनला काळ

दक्षिण भारतातील असंख्य साईभक्त हे दररोजच दक्षिण रेल्वेचे नाशिक जिल्ह्यातील प्रवेशद्वार असलेल्या येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वे स्थानकावर उतरताना तेथून पुढे प्रवाशी खासगी वाहनांनी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे प्रयाण करत असतात. नगरसूल-येवला-कोपरगाव या मार्गे पुढे शिर्डी असे दररोजच साईभक्तांचे मार्गक्रमण होत असते. याच शिर्डीकडे जाणाऱ्या असंख्य भाविकांपैकी हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथील काही साईभक्त रविवारी येवल्यातील एका टाटा मॅजिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या काळ्यापिवळ्या रंगाच्या गाडीतून शिर्डीकडे निघाले होते. मात्र समोरून भरधाव वेगाने येणारा एक मालवाहू कंटेनर त्यांच्यासाठी काळ बनला. अपघातात टाटा मॅजिकच्या येवल्यातील चालकासह आंध्रातील तिघा साईभक्तांना प्राण गमवावे लागले. इतर ९ साईभक्त गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुळधर, हवालदार अभिमन्यू आहेर आदींनी तत्काळ दुर्घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने टाटा मॅजिकमधून जखमींना बाहेर काढत रुग्णवाहिकांमधून येवला ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुगणालयातील प्राथमिक उपचारानंतर नऊ गंभीर जखमींना अधिक उपचारार्थ तत्काळ शिर्डी येथे हलविण्यात आले होते. अपघातात जागीच ठार झालेल्या आंध्र प्रदेशातील दोघांची नावे मात्र अदयाप समजू शकलेली नाहीत. त्यांचे नातेवाईक अथवा संबंधित येवल्यात आल्यानंतरच त्यांची ओळख पटणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आंध्रातील या दोघा मृतांमध्ये एक स्त्री व एक पुरूष आहेत. अपघातात टाटा मॅजिकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. तर,मालवाहू कंटेनरचा पुढील काही भाग क्षतिग्रस्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाविष्कार साकारण्याची नाशिककरांना संधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘मटा’तर्फे ८ जून ते १३ जून या कालावधीत विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या गुरुवारी (दि. ८ जून) रोजी साजऱ्या होणाऱ्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे. ‘निष्पक्ष वृत्तपत्र’ अशी वाचकांच्या पसंतीची पावती मिळविणारा ‘मटा’ नाशिकमध्ये ८ जून रोजी सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त वाचकांसाठी नाट्यप्रयोग, मटा आर्ट फेस्ट, बच्चेकंपनीसाठी चित्रकला स्पर्धा, झुम्बा वर्कशॉप आदी

सांस्कृतिक आणि अन्य भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे मनोरंजनासह कलाविष्कार सादर करण्याची संधी नाशिककरांना लाभणार आहे.

--

बहारदार नाट्यप्रयोग ९ जून

शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘दोन स्पेशल’ हे बहारदार नाटक होणार आहे. ह. मो. मराठे यांच्या न्यूज स्टोरी कथेवर आधारित अथर्व थिएटर्सचे हे नाटक असून, लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, निर्माता संतोष भरत काणेकर, जितेंद्र जोशी आहेत. या नाटकात गिरिजा ओक-गोडबोले, रोहित हळदीकर, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रात्री ९ वाजता हे नाटक होणार असून, कल्चर क्लब मेंबरसाठी ३०० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे. जे कल्चर क्लबचे नवीन मेंबर होतील त्यांच्यासाठी एक कपल पास मोफत देण्यात येईल. ज्यांना नाटक बघावयाचे आहे, परंतु मेंबर नाही, अशा वाचकांसाठी तिकीट बुकिंगची स्वतंत्र व्यवस्था कालिदास कलामंदिर येथे राहील.

स्थळ : महाकवी कालिदास कलामंदिर

दिनांक : ९ जून

वेळ : रात्री ९ वाजता

-------------------------

मटा आर्ट फेस्टची रंगत १० व ११ जून

मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. मटा वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना एकत्रित करून एक मोठा आर्ट फेस्ट नाशिकमध्ये होणार आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदितांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, हा या मटा आर्ट फेस्टचा उद्देश आहे.

दिनांक : १० व ११ जून

स्थळ : मविप्र अार्किटेक्ट कॉलेज, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ

वेळ : सकाळी ९ पासून

--------------------------

बच्चेकंपनीसाठी चित्रकला स्पर्धा १२ जून

शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पहिला गट ५ वी ते ७ वी व दुसरा गट ८ वी ते १० वी असे विभाग करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी स्मार्ट सिटी हा विषय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कागद ‘मटा’तर्फे पुरविण्यात येणार असून, इतर साहित्य (पेन्सिल, खोडरबर, रंग) विद्यार्थ्यांनी घरून आणावयाचे आहे.

दिनांक : १२ जून

स्थळ : मते लॉन्स, सावरकरनगर

वेळ : सकाळी ९ ते ११

-----------------------------

झुम्बा वर्कशॉपद्वारे थिरकण्याची संधी १३ जून

अखिल भारतीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या हॉलमध्ये झुम्बा वर्कशॉप होणार आहे. या वर्कशॉपमध्ये प्रतीक हिंगमिरे मार्गदर्शन करणार असून, वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन ठेवण्यात आले आहे. रजिस्ट्रेशनसाठी कमलेश घरटे (मोबाइल- ७०४०७६२२५४) यांच्याशी संपर्क साधावा.

दिनांक : १३ जून

स्थळ : अखिल भारतीय मध्यवर्ती ब्राह्मण संस्था हॉल, पाण्याच्या टाकीजवळ, त्र्यंबकरोड

वेळ : सायंकाळी ५ ते ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांचे आता मायक्रो प्लॅनिंग

$
0
0

नाशिक: वाहतूक विभागाच्या सूक्ष्म नियोजनासाठी लवकरच विभागनिहाय चार स्वंतत्र कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल ९३ पोलिस कर्मचारी नव्याने नियुक्त करण्यात आले असून, वाहतूक शाखेकडे आता २९७ कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. याच महिन्यात सदर चार कार्यालये सुरू होणार आहेत.

वाहतूक शाखेचे मुख्य कार्यालय शरणपूररोडवरील जुन्या पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत सुरू आहे. मात्र, यामुळे सबंध शहराच्या वाहतुकीचे नियोजन करताना दमछाक होते. तसेच कर्मचारी नक्की काय काम करतात, हे स्पष्ट होत नाही. या पार्श्वभूमीवर डिव्ह‌जिननुसार चार स्वंतत्र कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर पोलिस दलाचे चार सहायक पोलिस आयुक्त चार डिव्ह‌जिनमध्ये येणाऱ्या तीन ते चार पोलिस स्टेशनचे काम पाहतात. पोलिस स्टेशनच्या याच विभागणीनुसार वाहतूक शाखेचा विस्तार केला जात आहे. नुकत्याच शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात ९३ कर्मचारी फक्त वाहतूक पोलिस दलासाठी देण्यात आले. यापूर्वी शहर वाहतूक शाखेकडे २०४ कर्मचारी होते. आता हा आकडा २९७ पर्यंत पोहचला आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, विभागानुसार स्वंतत्र कार्यालय सुरू करण्यासाठी मोठ्या संख्याबळाची आवश्यकता होती. त्यानुसार मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. साधारणतः स्वामी नारायण पोलिस चौकी, मुंबई नाका येथील महापालिका गोडाऊनची मोकळी जागा, नाशिकरोड पोलिस स्टेशनजवळील मोकळी जागा, तसेच पाथर्डी फाटा परिसरातही नवीन कार्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. शहर वाहतूक शाखेत १० पोलिस निरीक्षक तैनात असून, एका ठिकाणी दोन असे आठ पोलिस निरीक्षकांना जबाबदारी देण्यात येऊ शकते. उर्वरीत अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय कामे सोपवण्यात येऊ शकतात. डिव्ह‌जिननिहाय वाहतूक विभाग सुरू झाल्याचा फायदा पोलिसांसह नागरिकांनादेखील होऊ शकतो. याशिवाय, वाहतूक नियंत्रणाचे काम यामुळे सोपे होणार असल्याचे संबंध‌ति सूत्राने स्पष्ट केले. मागील वर्षी शहर पोलिस दलात चार डिव्ह‌जिन कार्यालये सुरू झालीत. त्यापूर्वी दोनच डिव्ह‌जिन कार्यालये सुरू होते. चार डिव्ह‌जिनमुळे कामाचा ताण विभागला गेला. मुंबई नाका, गंगापूर, सरकारवाडा आणि भद्रकाली हा अपवाद वगळता इतर तीन डिव्ह‌जिन कार्यालयांतर्गत प्रत्येकी तीन पोलिस स्टेशनचा समावेश आहे. डिव्ह‌जिन कार्यालयांची संख्या वाढल्याने प्रशासकीय कामांची गती वाढली. वाहतूक शाखेची कार्यालये याच धर्तीवर सुरू होणार असल्याने, प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामांचा लेखाजोखा स्पष्ट होईल.

वाहतूक शाखेचे काम सध्या मध्यवर्ती पध्दतीने सुरू आहे. यात कोण काय करतो, हे लवकर दिसून येत नाही. विभागानुसार कामे झाल्यास जबाबदारी निश्चित होईल. तसेच कर्मचाऱ्यांना कामासाठी लहान एरिया उपलब्ध असेल. लवकरच ही चारही कार्यालये सुरू होणार आहेत. - डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्यांनी घेतला मोकळा श्वास

$
0
0

टीम मटा

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी शहरातून वाहणाऱ्या गोदावरी, नंदिनी, वाघाडी आणि वालदेवी या नद्यांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातर्फे विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

होळकर पूल, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर पूल, लक्ष्मीनारायण घाट, तपोवन, टाकळी पूल व घाट, दसक, नांदूर, मानूर परिसर येथे गोदापात्राची, आयटीआय पूल, उंटवाडी, तिडके कॉलनी, मुंबई नाका भागात नंदिनी नदीपात्राची, लक्ष्मण झुला परिसरात वाघाडी, तर रोकडोबावाडी, विहितगाव भागात वालदेवी नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली.

---
तब्बल १६० टन कचरा संकलन

आडगाव ः पंचवटी परिसरातील तपोवन, लक्ष्मीनारायण घाट, होळकर पूल, टाळकुटेश्वर पूल आदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तपोवनातील कपिला संगम येथे महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक दिनकर पाटील, अरुण पवार, जगदीश पाटील यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

या मोहिमेंतर्गत हजारो स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी, तसेच १६ जेसीबी, १४ डंपर आणि २० ट्रॅक्टर्सच्या साहाय्याने १६० टन कचरा संकलित करण्यात आला. गोदावरी नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाडी नदीच्या हत्तीपूल परिसरात साफसफाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून वाघाडीला अस्वच्छतेचा विळखा पडला होता. या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे विविध विभागांचे कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते. परिसरात स्वच्छता झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या स्वच्छता मोहिमेमध्ये अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मात्र, अनेक नगरसेवकांनीही या मोहिमेकडे पाठ फिरविली.

--

‘वालदेवी’झाली निर्मळ

सिन्नर फाटा ः रोकडोबावाडी, विहितगाव भागात रविवारी सकाळी सात वाजता वालदेवी नदीपात्रात स्वच्छता राबविण्यात आले. या मोहिमेत सुमारे तीन टन कचऱ्याचे संकलन झाले.

या अभियानाप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधी, नागरिक, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातील गाळ उपसण्यात आला. उघड्या नाल्यातील गाळ साफ करण्यात आला. दशक्रिया विधी शेडजवळील हौदाचीही स्वच्छता करण्यात आली. मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत फवारणी करण्यात आली.

या उपक्रमात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरोज आहिरे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, कोमल मेहरोलिया, पंडित आवारे आदी लोकप्रतिनिधींसह विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता अधिकारी संजय दराडे आदी सहभागी झाले. याशिवाय शिवकल्याणी महिला मंडळ, जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित महिला जलपंचायत, लायन्स क्लब ऑफ देवळाली आदींसह स्थानिक नागरिक सहभागी झाले.
--

स्वच्छतेची शपथ

नाशिकरोड ः स्वच्छ भारत अभियान आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे रविवारी सकाळी जेलरोड येथील गोदावरी नदीची स्वच्छता करण्यात आली. सुमारे पाच टन कचरा घंटागाडीद्वारे उचलण्यात आला.

दसक येथे सकाळी कर्मचारी व अधिकाऱ्यांना नदी स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. नदीपात्रातील प्लास्टिक, कचरा, कपडे, निर्माल्य आदी गोळा करण्यात आले. मलेरिया विभागामार्फत फवारणी करण्यात आली. बांधकाम विभागामार्फत जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातील गवत व गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला.

प्रभाग सभापती सुमन सातभाई, नगरसेवक विशाल संगमनेरे, शरद मोरे, अंबादास पगारे, दिनकर आढ़ाव, रंजना बोराडे, मीरा हांडगे, सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, रमेश धोंगडे, कोमल मेहरोलिया, सरोज अहिरे, पंडित आवारे, जयश्री खर्जुल, महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संयुक्त ग्रुप, शिवकल्याणी महिला मंडळ, जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित महिला जलपंचायत, लायन्स क्लब ऑफ देवळाली आदी या उपक्रमात सहभागी झाले. महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे ११२ कर्मचारी, चार स्वच्छता निरीक्षक, बारा मुकादम असे १६८ महापालिका कर्मचारी, तसेच २०० स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला.

--

सातपूर, सिडकोमध्ये नंदिनीपात्राची स्वच्छता

सातपूर ः सातपूर, तसेच सिडको परिसरात नंदिनी नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिकेसह विविध संस्था व नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन करण्यात आले.

सातपूर परिसरात सभापती माधुरी बोलकर यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका डॉ. वर्षां भालेराव, हेमलता कांडेकर व महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेत केवळ आरोग्य व मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांनीच साफसफाई केली. विद्युत, बांधकाम, ड्रेनेज व विविध कर विभागांतील अधिकारी व कर्मचारी केवळ नावालाच स्वच्छता मोहिमेवेळी उपस्थित असल्याचे दिसून आले. स्वच्छता मोहीम केवळ फोटो काढण्यासाठीच राबविण्यात आली का, असा सवाल उपस्थित करून कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा मागणी नागरिकांनी केली आहे.
--
(संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार, नवनाथ वाघचौरे, नामदेव पवार, अभिजित राऊत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या कलाकारांना ‘आर्ट फेस्ट’चे व्यासपीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स गेली सहा वर्ष वाचकांची अभिरुची सांभाळत बातम्या देत असून, सांस्कृतिक भूक भागविण्याचेही काम करीत आहे. ‘मटा’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त १० व ११ जून रोजी सकाळी ९ वाजेपासून मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आर्किटेक्ट कॉलेजमध्ये ‘आर्ट फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकमधील परफॉर्मिंग आर्ट सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी हा या ‘आर्ट फेस्ट’चा उद्देश आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. ‘मटा’ वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना एकत्रित करून एक मोठा आर्ट फेस्ट नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टमध्ये संगीत, वादन, नृत्य, चित्र, शिल्प या कलांचा संगम नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे. यात नाशिकच्या नामवंत तबलावादकांचे वादन होणार असून तबल्यातील कायदे, पलटे, चक्रदार, परण, तिहाई असे विविध प्रकारांचा आस्वाद घेता येणार आहे. यात सोलो व सहवादन या दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे. नाशिकला गुरू हैदर शेखांपासून कथक नृत्याची परंपरा असून नाशकातील नृत्यांगणा गत, तोडे, तराना इत्यादी प्रकार सादर करणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्चात्य संगीताचेही सादरीकरण करण्यात येणार असून, त्यात विविध वाद्यांचा गजर अनुभवायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे वा. गो. कुलकर्णी, शिवाजी तुपे अशा समृध्द चित्रकारांची परंपरा लाभलेल्या नाशिक शहरात अनेक चित्रकार उदयाला आले आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पहाण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या ‘आर्ट फेस्ट’ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हौशी कलाकारांनी संपर्क साधावा

या उपक्रमात ज्या कलाकारांना कला सादर करायची इच्छा आहे, अशांनी कमलेश घरटे, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. योग्य कलाकृतीस प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायगावला सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यात शेतकरी संपाच्या रविवारच्या चौथ्या दिवशीही गावोगावचा शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. तालुक्यात ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या प्रचंड पोलिस फौजफाट्यामुळे कुठलाही हिंसक प्रकार समोर आला नसला तरी, गाव बंद, आठवडे बाजार बंद यासह विविध आंदोलनातून शेतकरी रविवारीही शेतकरी पुढे सरसावल्याने शेतकरी संपाची तीव्रता कायम आहे.

तालुक्यातील सायगावमध्ये हजारोच्या संख्येने रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करीत प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. तालुक्यातील गवंडगावात परिसरातील अनेक गावचे शेतकरी जमा होताना शेतकऱ्यांकडून आक्रोश सभा घेण्यात आली, तर अंदरसूलमध्ये रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर दूध ओततानाच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

बाजर समिती ओस

भाजीपाला, दुध तसेच इतर कुठलाही शेतमाल घेऊन शेतकरी येवला शहराकडे न आल्याने भाजीमंडई, बाजार समितीतील भाजीपाला लिलावाचे ठिकाण अगदी ओस पडले होते. परिणामी भाजीपाल्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शहरातील नागरिकांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. शहरातील विंचूर चौफुलीवर मोठा पोलिस फौजफाटा असतानाही सकाळी अकराच्या सुमारास अचानक येथे आलेल्या काही शेतकऱ्यांनी आपल्याकडील दूध राज्य महामार्गावर टाकत शेतकरी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


देवळा बंदला प्रतिसाद

कळवण : शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी (दि. ४) देवळा येथील आठवडे बाजार बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी देवळा पाचकंदील येथे निषेध सभेचेही आयोजन करण्यात आले होते. देवळा गावाच्या इतिहासात पहिल्यांदा आठवडे बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचे कौतुक होत आहे.

निषेध सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करीत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी लाला हरी जगदाळे, जितेंद्र आहेर, पंकज अहिरराव, सुनील आहेर, राजेंद्र शिरसाठ, नीलिमा आहेर, अभिमन निकम, जगदीश पवार आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी माळवाडी येथील शेतकरी दिलीप रघुनाथ शेवाळे व सरस्वतीवाडी येथील धनाजी काळू आहेर यांच्या वतीने मोफत टमाटे व काकडीचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे आगार विभागात उत्पन्नात प्रथम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिन नुकताच विविध कार्यक्रमांसह प्रवाशांचे व कर्मचाऱ्यांचे सत्कार करून साजरा करण्यात आला. यावेळी धुळे विभागाने मे महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत चार कोटी रुपये उत्पन्न जास्त मिळवून विभागाचा उत्पन्नाबाबतीत प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. तर सध्या प्रतिदिन एक कोटींपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचेही ते म्हणाले. यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही विभाग आघाडीवर आहे. या वेळी आगार प्रमुख बी. एस. जगनोर, यंत्रअभियंता के. टी. सोमवंशी, लेखाधिकारी सुभाष दाभाडे उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचा ६९ वा वर्धापनादिनानिमित्त धुळे विभागातर्फे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारातील प्रवाशांचे व कर्मचाऱ्यांचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी प्रवाशांच्या अडचणीसह एसटी महामंडळाकडून प्रवाशांना काय अपेक्षा आहेत याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.

दरम्यान, धुळे विभाग राज्यातील सर्व विभागांपेक्षा उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नांदेड विभाग असल्याचे सांगण्यात आले. देवरे यांनी सांगितले की, धुळे विभागाने उत्पन्नात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, त्यात एप्रिल महिन्यात दोन कोटी ५१ लाख, मे महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत चार कोटी ३१ लाख रुपये उत्पन्न अधिक मिळविले आहे. गेल्यावर्षी विभागाला मे महिन्यात २३ कोटी ८५ लाख उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ९७ लाख १७ हजार किलोमीटर प्रवासानंतर २८ कोटी १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र धुळे विभागाचा दर महिन्याला १० एसटीला १० कोटीचे डिझेल, ८ कोटी रुपये प्रवासी कर, एक कोटी रुपये टोलसाठी खर्च होतो. कर्मचारी वेतनावर चार कोटी रुपये खर्च केला जातो.

४० शिवशाही बसेस येणार

लवकरच धुळे विभागात ४० शिवशाही बसेस दाखल होणार असून प्रवाशांना अजून चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सध्या धुळे विभागात ८९१ बसेस असून चार हजार ३८२ अधिकारी व कर्मचारी आहेत. तर एक हजार २२० पदे रिक्त असून, तेदेखील लवकरच भरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्जन्यराजाला भाविकांचे साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघ यांच्या वतीने गंगादशहरा उत्सवानिमित्त रामकुंडावर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गंगापूजनानाचा मंगलमय सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. भाविकांनी सामुदायिक पर्जन्यसूक्ताचे सामुदायिक वाचन करून पर्जन्यराजाला साकडे घातले.

या सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, नगरसेविका वत्सला खैरे, हर्षा बडगुजर, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते.

स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी गंगापूजनाची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवलेली आहे. रविवारी दुपारी गंगापूररोड येथील उदयनगर स्वामी समर्थ केंद्रातून गंगा कलशाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंगलकलश घेऊन मुली आणि महिला त्यात सहभागी झाल्या. भगवे ध्वज, बॅण्ड पथकांनी वाजविलेली भक्तिगीते, सेवेकऱ्यांनी केलेला स्वामी समर्थांच्या नामाचा गजर यांनी मिरवणुकीच्या मार्गातील वातावरण भक्तिमय झाले होते. मिरवणूक रामकुंडावर आल्यानंतर गंगागोदावरीचे पूजन करण्यात आले. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गोदावरी मातेला महावस्र अर्पण करण्यात आले. सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केले.

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे म्हणाले, की आज आपण गंगागोदावरी मातेच्या साक्षीने पर्जन्यराज्यास साकडे घातले आहे. राज्यात, तसेच देशात भरपूर पाऊस होऊन सर्व नदी, नाले भरून वाहावेत, विहिरी, तलाव भरावेत. शेतकऱ्यांसह सर्वांना आनंद, समाधानाचे दिवस यावेत, मानवासह सर्व जीवनसृष्टीला नवचैतन्य लाभावे, यासाठी हा सोहळा घेण्यात आला. सेवेकरी हजारो केंद्रांच्या माध्यमातून अनेक महिन्यांपासून विशेष सेवा करून पर्जन्यराजास विनंती करीत आहेत. तो आपल्या सर्वांच्या हाकेला निश्चित धावून येईल. पर्जन्यराजाने कृपा केली, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल. बळीराजापुढील विविध समस्यांचा निपटारा होण्यासाठीही सर्वांनी गंगागोदावरी मातेस विनंती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


कुशावर्त, रामकुंडासह गंगाजल स्वच्छ करणार

गुरुमाऊलींनी कुशावर्त, रामकुंडासह गंगाजल स्वच्छता अभियान हाती घेणार असल्याचे यावेळी जाहीर केले. आपल्या नद्या या मानवजातीसह सर्व जीवसृष्टीला वरदान ठरल्या आहेत. मात्र, आज मानवाने केलेले प्रचंड प्रदूषण नद्यांच्या जिवावरच उठले आहे. सेवामार्गाच्या माध्यमातून नद्यांमधील पवित्र जल स्वच्छ करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राखेपासून बनविलेल्या एका पदार्थापासून हे शक्य आहे, असे सांगून गुरुमाऊलींनी हा प्रयोगच सेवेकऱ्यांच्या मदतीने करून दाखविला. रुद्रा झिओकेम या नावाने भारतीय शास्त्रज्ञांनी बनविलेले उत्पादन वापरून नदी, नाले यातील दूषित पाणी, सांडपाणी स्वच्छ करता येते. याचा वापर मोठ्या प्रमाणात करून नद्यासुद्धा स्वच्छ करता येतील, असा दावा गुरुमाऊलींनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताहाराबाद येथे रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी किसान क्रांती मोर्चाने दिलेल्या हाकेला पाठिंबा देण्यासाठी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील रविवारी (दि. ४) भरणारा आठवडे बाजार व संपूर्ण व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. तर परिसरातील आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी तसेच विविध पक्षांकडून आपल्या मागण्यांसंदर्भात व सरकारच्या निषेधार्थ ताहाराबाद येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर सटाणा शहरातील दररोजचा बाजारदेखील चौथ्या दिवशी बंदमध्ये सहभागी झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

शेतकरी बांधवानी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपास पाठिंबा देण्यासाठी येथील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. तसेच ताहाराबाद येथील रविवारी भरणारा आठवडे बाजाराही बंद ठेवण्यात आला. यांसह येथील व्यापारी संघटना, भारतीय जैन संघटना तसेच अन्य संघटनांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवत शंभर टक्के बंद यशस्वी केला. रविवारी (दि. ४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास विविध पक्षांच्या वतीने सरकारच्या निषेधार्थ तसेच अटक केलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना सोडून त्यांच्यावरील गुन्हे परत घ्यावे याकरीता सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे गुजरात राज्याशी जोडणाऱ्या रस्त्यावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश गुरव यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात डॉ. प्रशांत सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन, शेतकरी किसानचे अ‍ॅड. पंडितराव भदाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी आमदार संजय चव्हाण, युवक काँग्रेसचे सचिन कोठावदे, किशोर कदम, दीपक कांकरीया, संजय जापेळे, सरंपच संदीप साळवे, पिंपळकोठे सरपंच मोहन भामरे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्याला मान्सूनपूर्वचा तडाखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून वादळ, वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने धुळे व साक्री तालुक्यात आतापर्यंत वीज पडून तीन जण ठार झाले. तर नंदुरबार जिल्ह्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. शहादा रस्त्यावरील दुकानांसह हॉटेल व्यावसायिकांचे केळीच्या शेताचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

धुळे तालुक्यातील बल्हाणे गावातील पूंजाराम शंकर भिल (१५) या बालकाच्या अंगावर विज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. तर पिंपळनेरजवळील वळखुंट शिवारात कांद्याची चाळ पाहण्यासाठी गेलेला विजय लक्ष्मण देवरे (१९) याच्या अंगावर अचानक विज कोसळल्याने भाजून मृत्यू झाला. तर तिसरी घटना साक्री तालुक्यातील विटावे येथील जंगा लाल्या ठाकरे (६०) हे बकऱ्या चारून घरी येत असताना शनिवारी रात्री अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

नंदुरबार जिल्ह्यातील सैताळे गावातील जामसिंग गुमसिंग भिल (६०) या वृद्धाच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी झाली. तसेच शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील रनाळे येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील एक संपूर्ण हॉटेल वादळामुळे उद्ध्वस्त झाले असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर विजेचे खांब पडल्याने अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या नुकसानीचे रविवारी सकाळी पंचनामे केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिंद्रा कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत दोघा भामट्यांनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील बेरोजगार तरुणास तब्बल ८६ हजार रुपयांला गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय बन्सल आणि नवीन शुल्क अशी बेरोजगार तरुणाची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. पिंपळनेर येथील गांधी चौकात राहणाऱ्या मयूर राजेंद्र कोठावदे (हल्ली रा. बुधवार पेठ, जुने नाशिक) या तरुणाने या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोठावदे यांनी महेंद्रा कंपनीत सुपरवायझर पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर संशयितांनी ३१३६०७६८०२ व ८४५९४७५०२५ या क्रमांकावरून मयूरशी संपर्क साधला. ३ जून रोजी कोठावदे यांच्याशी बोलणे करीत संशयितांनी नोकरी देत असल्याचा विश्वास दिला. तसेच यासाठी प्रथम रजिस्टेशन फी, आयडी कन्फ्रेशन आदींच्या नावाखाली दिल्लीच्या एसबीआय बँकेच्या शाखेच्या ३५७३५८५३८९६ या क्रमांकावर ५४ हजार १०० रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर ऑफर लेटरसाठी ६०६४००२१०००३०६२ यावर ३२ हजार मयूरने भरले. दोन्ही मिळून तब्बल ८६ हजार ४०० रुपये जमा झाल्यानंतरही पुढे काही होत नसल्याचे पासून मयूरने अधिक चौकशी केली. त्यात, फसवणूक झाल्याचे समोर आल्याने मयूरने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस नाईक जाधव तपास करीत आहेत. दरम्यान, विविध नामांकित कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवत बेरोजगारांची नेहमीच फसवणूक होते. विशेषतः इंटरनेट अथवा फोनकॉल्सद्वारे भामटे आपला उद्योग चालवतात.

व्यापाऱ्याची फसवणूक

साडी खरेदीच्या व्यवहरात भद्रकालीतील साडी व्यापाऱ्याची एका परप्रांतियाने तब्बल दोन लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. साड्यांचे शोरूमसाठी चौघा परप्रांतियांनी साड्या खरेदी करून ही फसवणूक केली. खरेदीच्या मोबदल्यात दिलेला धनादेश न वटता परत आल्याने फसवणूक झाल्याचे पुढे आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमिल गिरीधारीलाल मित्तल, रतन मित्तल, राजेश मित्तल व राजकुमार रामबच्चन प्रसाद अशी या फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत. भद्रकालीतील कस्तुरी साडी सेंटरचे मालक जीवनसिंह, करमसिंह चौहान (रा. द्वारका) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ३ जानेवारी २०१६ ते ३० जानेवारी २०१७ दरम्यान संशयितांनी फिर्यादीकडून साड्यांची खरेदी केली. बिहार राज्यातील सासाराम रहताब येथील लतिफ मार्केट येथे साड्यांचे शोरूम टाकण्याचा बहाणा करून प्रथम रोखीत व नंतर उधारीत खरेदी करण्यात आली. संशयितांनी खरेदी केलेल्या साड्यांच्या मोबदल्यात दोन लाख ८५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, खात्यात पैसे नसल्याने तो वटलाच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने चौहान यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.

मोबाइलची चोरी

वडाळारोड परिसरातील रहिवासी जाकिर रंगरेज यांचा मोबाइल शुक्रवारी (दि. २) सकाळी दूधबाजारातून चोरी करण्यात आला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बेंडकुळे करीत आहेत.

जप्त वाहनांच्या बॅटऱ्यांची चोरी

थकबाकीमुळे जप्त असलेल्या ऑटोरिक्षांच्या बॅटऱ्या एका फायनान्स कंपनीच्या गोडावूनमधून चोरट्यांनी चोरी केल्या. ही घटना वडाळारोड भागात घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आशिष अनिलकुमार नहार (रा. गंजमाळ) यांच्या तक्रारीनुसार, नहार यांचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे वडाळारोडवरील संजेरीनगर भागात गोडावून आहे. फायनान्स हप्ते न भरल्याने कंपनीने एमएच १५ एके ६६५५, एमएच १५ एके ६४१३, एमएच ईएच १९०९ व एमएच १५ ईएच १९९७ या रिक्षा जप्त करून सदर गोडावूनमध्ये उभ्या केल्या. चोरट्यांनी गोडावूनच्या तार कंपाउंडमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करीत गोडावूनमध्ये लावलेल्या वाहनांमधून सुमारे १३ हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या. घटनेचा अधिक तपास हवालदार गवळी करीत आहेत.

शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग

शिंदेगाव परिसरातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या युवकाविरोधात नाशिकरोड पोलिसांनी विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शिंदेगाव परिसरातील ११ वर्षीय शाळकरी मुलीची संशयित सचिन शिंदे (१९) हा तरुण ऑक्टोबर २०१६ पासून छेड काढीत होता. तसेच मुलीचा शाळेपर्यंत पाठलाग करून विनयभंग केला. पीडित मुलीला पळवून नेण्याची धमकी संशयिताने दिली. या प्रकरणी मुलीच्या आईने नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूरला व्यावसायिकांचा संपाला पाठिंबा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदचा नारा दिलेला असताना सातपूर भागातही व्यावसायिकांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संप कायम ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. सातपूर पंचक्रोशितील शेतकऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी व्यावसायिकांनीही पुढाकार घेतला होता. सातपूर भागात शेतकऱ्यांच्या संपात व्यावसायिक सहभागी झाल्याने शुकशुकाट पसरला होता.

शेतकऱ्यांचा माल पडून

शेतकरी संपामुळे अनेकांचा शेतीमाल पडून आहे. विशेष म्हणजे फळभागांचे मोठे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गंगापूर गावातील अनेक शेतकऱ्यांचे पेरू बागेतच गळून पडल्याचे पहायला मिळाले. तसेच तोडणीस आलेले पेरू शेतकऱ्यांना उघड्यावर फेकून द्यावे लागले.

इंदिरानगर, सिडकोत जनजीवन सुरळीत

सिडको ः शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा सिडको आणि इंदिरानगर परिसरातील जनजीवनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. सिडको व इंदिरानगरमधील भाजीबाजार सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बाजारात भाजीपाल्यांचा तुटवडा निर्माण होईल, असे वाटले होते. त्यामुळे मागील आठवड्यात सिडको व इंदिरानगर येथील भाजीबाजारांमध्ये गर्दी दिसून येत होती. अनेकांनी आठ दिवसांचा साठासुद्धा करून ठेवल्याचे दिसून आले. मात्र, या संपाचा कोणताही परिणाम सिडको व इंदिरानगर भागात झाला नसल्याचे दिसून आले. सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले. सिडकोत असलेल्या भाजीबाजारांमध्येही व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसत होते. काही भागात दुधाचा पुरवठा करण्यात आला नसला तरी अन्य व्यवहार सुरळीत सुरू होते. सिडको व इंदिरानगर भागात बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अंबड व इंदिरानगर पोलिसांनी खास पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

ब्लॅक टी पिण्याची वेळ

सिन्नर फाटा : शेतकरी संपाने दुधाच्या उपलब्धतेत मोठी घट झाल्याने शहरवासीयांना ब्लॅक टी पिण्याची वेळ आली आहे. नाशिकरोड येथील आयएसपी व सीएनपी प्रेसमधील कँटीनमध्येही दुधाची टंचाई निर्माण झाल्याने दूध पावडर मागवित वेळ भागून नेण्यात आली. शिंदे येथील साईकृपा व राहुल दूध संकलन केंद्रांवर सुमारे ३५० शेतकरी दररोज १८०० ते २००० हजार लिटर दूध जमा करतात. पळसे येथील तिनही दूध संकलन केंद्रांवर सुमारे ४०० शेतकऱ्यांनी दुध विक्रीस आणले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रल जेलमध्ये २० जणांची रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आंदोलनात सरकारविरोधी घोषणा देत पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसानी सुमारे २० संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्वांची नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

बाळासाहेब उखाडे, विलास जाधव, अभिषेक महाले, सुधाकर मोराडे, कैलास शिंदे, निखिल मोराडे, हर्षल पवार, अमोल जाधव, संतोष भवर, गोकुळ मोहाड, राजेश मोराडे, गौरव शिरसाठ, सागर जादव, सुभाष जाधव, समीर मोराडे, रवींद्र मोराडे, बाळासाहेब शिरसाठ, योगेश जाधव, सचिन जाधव आणि सुनील गुंजाळ अशी संशयितांची नावे आहेत. म्हसरूळ गावातील भाजीबाजार परिसरात रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. ५० ते ६० जणांच्या टोळक्याने ट्रॅक्टरमधील कांद्याच्या गोणी आणि दूध रस्त्यावर ओतून रास्तारोको केला होता. यावेळी सरकारविरोधात घोषणा देत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. या आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना धक्काबुक्की झाली होती. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ २० जणांना ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेक्टर ऑफिससमोर किसान सभेतर्फे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा किसान सभेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (कलेक्टर ऑफिस) प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, त्यांचा सातबारा कोरा करा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये नमूद केल्यानुसार, शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करून त्यांचा सात-बारा कोरा करावा, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक नफा धरून हमी भाव द्यावा, वयाची ५५ वर्ष पूर्ण करणारा शेतकरी, मजूर यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन द्यावी, वनाधिकार कायदयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अन्न सुरक्षा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, चुकीच्या पध्दतीने अपात्र केलेल्या सर्व वनदाव्याची फेर चौकशी करून दोन पुरावे सादर केलेले सर्व दावे पात्र करावेत महाराष्ट्र-गुजरातचा २०१० मध्ये झालेला सामंजस्य करार रद्द करावा आणि राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांना द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

पोलिस बंदोबस्तात २२६ वाहने रवाना

रविवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सकाळी सातपर्यंत शेतमालाची सुमारे २२६ लहान-मोठी वाहने पोलिस बंदोबस्तात जिल्ह्याच्या हद्दीतून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. याध्ये ७७ दुधाचे टँकर, ६ ट्रक आंबे, १० ट्रक कांदा, ४२ ट्रक भाजीपाला, इतर शेतमालाचे ८८ ट्रक तर टोमॅटो तीन ट्रक रवाना करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध पुरवठा होणार ठप्प

$
0
0

दरही वाढले; मिठाईची दुकाने, हॉटेल्स, चहा व्यावसायिकांना फटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगर जिल्ह्यात सोनई येथे वाहनांच्या ताडफोडीचे प्रकार घडल्यामुळे दूध टँकरचालक धास्तावले आहेत. त्यामुळे दुधाचे टँकर रस्त्यावर उतरण्यास तयार नसून, पुढील एक दोन दिवस नाशिककरांना दुधाच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. संपाची परिस्थ‌िती हाताबाहेर गेली तर नाशिककरांना दुधापासून वंचित राहावे लागू शकते.

शेतकऱ्यांचा संप मिटण्याऐवजी तो अधिक चिघळण्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. आणखी चार दिवस संप सुरूच ठेवण्याचा निर्णय रविवारी नाशिकमध्ये घेण्यात आला. नाशिक शहराला दररोज एक लाख ४० हजार लिटर दुधाचा पुरवठा नगर जिल्ह्यातून होतो. परंतु, राहुरी जवळील सोनई येथे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास संतप्त जमावाने एका दुधाच्या टँकरचे मोठे नुकसान केले. या घटनेची दूध वाहतूकदारींनी धास्ती घेतली आहे. परिणामी सोमवारी दिवसभरात एकही दुधाचा टँकर नाशिकमध्ये येऊ शकला नाही.

दुधाची वाहतूक व्हावी, यासाठी पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी नगर पोलिसांकडे केली. परंतु, नगर पोलिसांकडून संरक्षण प्राप्त होऊ शकले नाही. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने नगर जिल्ह्यापासून संरक्षण पुरवावे अशी मागणी सोमवारी करण्यात आली. कोपरगाव सहकारी दूध उत्पादक संघाची १२ वाहने नगर जिल्ह्यात अडकली असून, त्यापैकी आठ वाहने नाशिक शहरात वितरणासाठी येणार आहेत. दुधाचा पुरवठा ठप्प झाला तर त्याचा परिणाम शहरवासीयांना सहन करावा लागू शकतो. मिठाईची दुकाने, हॉटेल्स, चहा व्यावसायिक यांना त्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

दुधाची आवक घटली

संप काळात नाशिकमध्ये येणाऱ्या दुधाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. ३१ मे ते ४ जून या कालावधीत सहकारी डेऱ्यांमध्ये येणाऱ्या दुधाच्या प्रमाणात २१.२५ टक्के घट झाली आहे. विभागात हीच घट ३८ टक्के एवढी झाली आहे. खासगी दुधाच्या आवकेमध्ये ९०.४६ टक्के घट झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शहरातील गोठेमालकांकडून नियमितपणे ग्राहकांना दुधाचा पुरवठा होतो आहे. ग्रामीण भागातून शहरात दूध घेऊन येणाऱ्यांना मात्र दूध वितरीत करताना काळजी घ्यावी लागते आहे. बाजारात सोमवारी दुधाचा भाव ६० रुपये ते ८० रुपये लिटर पर्यत पोहचला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचाहत्तर हजार कुटुंबे बेघर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेवर घरकुलांसाठी अर्जांचा पाऊस पडला असून, झोपडपट्टी सर्वेक्षण आणि डिमांड सर्वेक्षणात तब्बल ७५ हजार कुटुंबांना घरकुल हवे आहे. झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणात शहरातील १४३ झोपडपट्ट्यांमध्ये ४४ हजार ८८४ कुटुंबे असून, आर्थिक दुर्बल घटकांमध्ये २९ हजार ९८१ कुटुंबांनी घरकुलाची डिमांड नोंदवली आहे. त्यामुळे यंत्रणेसमोर एवढ्या कुटुंबांना घरकुल देण्याचे खडतर आव्हान उभे ठाकले आहे. सध्या अर्जांची छाननी केली जात असून, अपात्रांना पुन्हा संधी दिली जाणार आहे, तर पात्र लोकांची यादी जुलैअखेरपर्यंत तयार करून ती ‘म्हाडा’ला सादर केली जाणार आहे.

केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे नियोजन केले असून, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नाशिक महापालिकेने विविध घटकांचे सर्वेक्षण केले आहे. घरकुलांसाठी चार घटक निश्चित करण्यात आले असून, पहिल्या घटकात झोपडपट्टीतील नागरिक, तर तीन घटकांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे देता येणार आहेत. महापालिकेने डिमांड सर्वेक्षण केले असून, त्यात २९ हजार ९८१ नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यात नाशिक पूर्व विभाग, पंचवटी, सिडको या विभागांत सर्वाधिक अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी केली जात असून, त्यात काही जणांना अपात्र ठरविले जाण्याची शक्यता आहे. या अपात्र लोकांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुन्हा संधी दिली जाणार आहे.

पहिल्या घटकात झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण झाले आहे. शहरात जवळपास १४३ झोपडपट्ट्या असून, त्यात ३३ हजार ४७९ झोपड्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये ४४ हजार ८८४ कुटंबे राहतात. या सर्वांना घरकुल द्यावे लागणार असून, त्यात प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने या अर्जांची छाननी केली जात आहे. यात पात्र ठरलेल्या लाभार्थींची यादी जुलैअखेरपर्यंत तयार केली जाणार असून, त्याचा सविस्तर डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा डीपीआर ‘म्हाडा’ला सादर केला जाणार असून, ‘म्हाडा’वर ही घरकुले देण्याची जबाबादारी सोपविली जाणार आहे. घरकुले फुकट मिळतील, असा सर्वांचा समज आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

--

अशी आहे विभागनिहाय स्थिती

--

विभाग झोपटपट्ट्या झोपड्या कुटुंबे

नाशिकरोड ३३ १०,३८९ १२,२५३

पूर्व विभाग २० ४,६६९ ५,४०५

पंचवटी ३५ ८,४९९ १०,७४८

सिडको १६ २,२९२ २,५८५

सातपूर १९ ६,६७४ ८,२४३

पश्चिम २० ३,५६६ ५,३३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images