म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
ज्ञानावर आजवर धर्मसत्तेचे नियंत्रण राहिल्याने मानवी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ईश्वर ही मानवी कल्पना असल्याचे नास्तिकांचे ठाम मत असले, तरी नास्तिकांची लढाई धर्माविरुद्ध नसून धर्माच्या नियंत्रणाविरुद्ध, त्यातील कट्टरतेविरुद्ध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत इरफान इंजिनीअर यांनी केले.
विवेकधारा संघटनेच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित तिसऱ्या नास्तिक मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. नास्तिकांच्या ‘ब्राइट’ संघटनेचे संस्थापक कुमार नागे, निखिल जोशी, चैताली शिंदे, प्रमोद सहस्रबुद्धे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे, दीप्ती राऊत, उद्योजक संदीप भावसार आणि विवेकधाराचे प्रवर्तक अमित जोजारे विचारमंचावर उपस्थित होते.
यावेळी इंजिनीअर यांनी जगातील तत्त्वज्ञानाचे प्रवाह, धर्मसत्ता, नास्तिक विचारधारा याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले. ते म्हणाले, की जगात आदर्शवादी (आयडियालिस्ट) व भौतिकतावादी (मटेरियालिस्ट) असे तत्त्वज्ञानाचे दोन प्रवाह कार्यरत असून, त्यापैकी आदर्शवादी तत्त्वज्ञानाची विचारधारा ‘ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या’ अशी आहे, तर भौतिकतावादी विचारधारा अनुभवावर आधारित आहे. आदिम काळापासूनच आदर्शवादी विचारधारा उदयास आली. धान्य, पाणी, हवा देणारा निसर्ग हा अतिवृष्टी, दुष्काळासारखी संकटेही आणतो, ही गोष्ट तेव्हाच्या लोकांच्या आकलनापलीकडची होती. त्यामुळे निसर्ग प्रसन्न होतो तेव्हा तो सुख देतो आणि कोपतो तेव्हा संकटे आणतो, अशी समजूत रुढ झाली. मग निसर्गाची कृपा पदरात पाडून घेण्यासाठी कर्मकांडे होऊ लागली.
समाजातील एका विशिष्ट वर्गाने याला बळकटी दिली. प्रारंभी ३३ कोटी देव असल्याचे मानले जाऊ लागले, पुढे ही संख्या तीनवर व नंतर एकेश्वरवादावर येऊन ठेपली. ईश्वर ही संकल्पना दिवसेंदिवस बदलत गेली, हा ईश्वर ही मानवी कल्पना असल्याचा पुरावाच मानायला हवा.
पुरातन काळापासून ज्ञानावर धर्मसत्तेचे नियंत्रण राहिल्याने मानवी समाजाचे मोठे नुकसान झाले; अन्यथा सद्यस्थितीपेक्षा मानवाने अधिक प्रगती केली असती. मात्र, धर्मसत्तेविरुद्ध बोलणाऱ्यांना राक्षस वा कनिष्ठ जातीचे म्हणून हिणवले गेले. चार्वाक, बुद्ध, जैन या विचारधारेने हा समज खोडून काढत समाजाला तर्काच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. धर्माचे केंद्र ईश्वर नव्हे, तर नैतिकताच असायला हवे. सध्याच्या काळात लोक असुरक्षित झाले असून, तर्कसंगत समाजनिर्मितीसाठी शोषितांचे जीवन सुसह्य करणे ही गरजेची बाब झाली आहे, असेही इंजिनिअर म्हणाले.
दरम्यान, अमित जोजारे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. श्यामला चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रसाद भट्टड यांनी जाहीरनाम्याचे वाचन केले. प्रियदर्शन भारतीय यांनी सूत्रसंचालन केले. भाविन पाटील यांनी आभार मानले.
धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्त्य संकल्पना असल्याची टीका संघ व हिंदुत्ववादी नेहमी करीतात. मात्र, धर्मनिरपेक्षता व त्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये बौद्ध तत्त्वज्ञान व भारतीय श्रम परंपरेतून घेतल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही विदेशी नव्हे, तर संपूर्णत: भारतीय संकल्पना असल्याचे इंजिनिअर यांनी यावेळी स्पष्ट केले.
नास्तिकता जीवनशैली!
मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात निखिल जोशी व चैताली शिंदे यांच्या मुलाखतीतून नास्तिक जीवनशैलीचा प्रवास उलगडला. दीप्ती राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. नास्तिक व्यक्तींना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली मात यावर या मुलाखतीतून प्रकाश टाकण्यात आला. याच सत्रात कुटुंबातील नास्तिकता, भारतीय कायद्यात नास्तिकांना अपेक्षित बदल, बुद्धिप्रामाण्याचा प्रचार-प्रसार, नास्तिकतेशी सुसंगत जीवनपद्धती, संयुक्तिक काय? अज्ञेयवाद की नास्तिकता? या विषयांवर गटचर्चा झाली. चैताली शिंदे, निखिल जोशी, प्रमोद सहस्त्रबुद्धे, संदीप भावसार, लोकेश शेवडे यांनी चर्चेची सूत्रे सांभाळली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट