Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्हाधिकाऱ्यांनी खोदला शौचखड्डा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावच्या निराधार महिला मंदाबाई जाधव यांच्या घरी शौचालय बांधण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांनी श्रमदान केले. ग्रामस्थांमध्ये यामुळे उत्साह निर्माण झाला असून, येत्या महिन्याभरात गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प नागरिकांनी केला.

जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रमदान केले. पालघर आणि नाशिकच्या सीमेवरील आदिवासी गाव तोरंगणात एकूण ३०७ कुटुंबांपैकी १०० कुटुंबांनी शौचालय बांधले आहे. मजुरांची उपलब्धता नसल्याने आणि साधनसामुग्री तालुका स्तरावरून आणावी लागत असल्याने शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर श्रमदानाद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळी गावात आले. शौचालयासाठी आवश्यक चार फूट खोलीचे दोन खड्डे खोदण्याचे काम दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. त्यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, तहसीलदार महेंद्र पवार, एम. बी. मुरकुटे, कल्पना जाधव यांनी श्रमदानात सहभाग घेतला. शंभरकर आणि श्रीमती संगमनेरे हे शौचालय बांधण्यासाठी खर्च करणार असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून मंदाबाईंना आर्थिक मदत होणार आहे.

उद्द‌िष्टपूर्ती केव्हाच
राज्यात पुण्याखालोखाल नाशिक जिल्ह्याने शौचालय बांधण्यात चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी जिल्ह्याला ७५ हजार शौचालय उभारण्याचे उद्द‌िष्ट असताना ९५ हजार ८९३ शौचालय उभारण्यात आली आहेत. ४०० गावांचे उद्दीष्ट असताना ४५१ गाव हागणदारीमुक्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात नववर्षानिमित्त मोटारसायकल रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

हिंदू-नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष स्वागतासाठी स्वागत यात्रा समिती गठीत करण्यात आली. या समितीकडून मोटारसायकल रॅलीसह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि. २८) सकाळी नऊ वाजता शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रॅलीत सामील झालेल्या प्रत्येक मोटार सायकलवर भगव्या रंगाचे झेंडे लावण्यात येणार असून, या रॅलीत युवक-युवतींसह महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर असणार आहे.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेत राम दरबार भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळ तसेच सजीव देखावे असणार आहेत. त्यात शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राम, सीता, लक्ष्मण यांचा सजीव देखावे सादर करण्यात येणार आहेत. शोभायात्रेत स्वरमुद्रा ढोलताशांचे पथक संचलन हे विशेष आकर्षक असणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा निघून जुना आग्रारोडवरील राममंदिराजवळ या शोभायात्रेचा समारोप होईल. तरी सर्व धुळेकरांनी या शोभायात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष जितेंद्र शहा, योगीराज मराठे, महिला संयोजिका ज्योत्स्ना मुंदडा, संध्या कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी सक्षमतेला प्राधान्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आदिवासी विकास विभागासमोर अनेक आव्हाने आहेत. ती स्वीकारून आदिवासींना विकासाकडे नेण्यासाठी सेवाभावी लोकांचे आणि संस्थांचे सहकार्य मिळत आहे. त्यांच्या सूचनांनुसार आदिवासी विकास काम करीत राहणार आहे. आदिवासी सक्षम होण्यासाठी त्यांच्यासाठी असलेल्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राधान्याने करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले. आदिवासी विकास विभागातर्फे २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांच्या आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या समारंभास ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रंजना भानसी, आमदार निर्मला गावित, जे. पी. गावित, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव, सचिव मनीषा वर्मा, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, किसन तडवी आदी उपस्थित होते. मंत्री सावरा म्हणाले, की आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना असल्या, तरी त्यांचा विकास झालेला नाही. यंदापासून २५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचा आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. वसतिगृहात प्रवेश मिळत नसलेले आदिवासी विद्यार्थी स्वतंत्र खोली घेऊन राहत असतील, तर त्यांना राहण्याचा खर्च शासनातर्फे देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘विकासाआड लांडगे’

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपल्या छोट्याशा भाषणात मंत्रालयातील आदिवासी विभागात कार्यरत बाबूशाहीवर तीव्र टीका केली. राज्य सरकार आदिवासींच्या विकासासाठी भरपूर योजना तयार करते. हे पुरणपोळीचे ताट आदिवासी मंत्रालयात तयार होते. परंतु, प्रत्यक्षात आदिवासींपर्यंत पोहोचत नाही. काही लांडगे मध्येच ते पुरणपोळीचे ताट गिळंकृत करतात, असा टोला मारत त्यांनी मंत्रालयातील लालफितीचा कारभार व भ्रष्ट कारभारावर तीव्र टीका केली. आदिवासींच्या विकासासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.


कविता ‍राऊतला देणार संधी

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात सेवेची संधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली. आदिवासी विकासमंत्री सावरा यांनी त्यांच्या भाषणात कविताला कामाची संधी देण्यात येणार आहे. याविषयीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या संधीमुळे क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.


आदिवासी सेवक पुरस्कारार्थी

प्रमोद गायकवाड (नाशिक), रमेश रावले (कळवण, नाशिक), बापूराव साळवे (पिंपळगाव, अहमदनगर), डॉ. कांतिलाल टाटिया (शहादा, नंदुरबार), सरस्वती भोये (विक्रमगड, पालघर), लक्ष्मण डोके (जव्हार, पालघर), हरेश्वर वनगा (डहाणू, पालघर), मनोहर पादिर (कर्जत, रायगड), रामेश्वर नरे (महाड, रायगड), भगवान देशमुख (नांदेड), पूर्णिमा उपाध्ये (गारखेडा, अमरावती), सुनील देशपांडे (लवादा, अमरावती), सदाशिव घोटेकर (सरपधरी, यवतमाळ), सुखदेव नवले (कारकीन, औरंगाबाद), प्रमोद पिंपरे (गडचिरोली) या आदिवासी सेवकांना २५ हजार रुपये, सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.


पुरस्कारार्थी आदिवासी सेवा संस्था

शाश्वत संस्था, मंचर, जि. पुणे, विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित राष्ट्र सेवा समिती, ग्रामविकास केंद्र, वसई, जि. पालघर, डॉ. हेगडेवार सेवा समिती, नंदुरबार, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा, जि. गडचिरोली, वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रदेश, सुयश चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबिवली, ता. मुळाशी, जि. पुणे या संस्थांना ५० हजार रुपये, सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

आयुक्तच आदिवासी सेवक

आदिवासी विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी आयुक्तपद बाजूला ठेवून आदिवासी सेवकाची भूमिका निभावली. विभागातील इतर अधिकारी ऐटीत बसले असताना जाधव यांनी मात्र प्रोटोकॉल बाजूला ठेवून पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन केले. पुरस्कारार्थींना स्टेजवर कसे आणायचे इथपासून तर पुरस्कारार्थींना दिले जाणारे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह स्वतः हातात घेऊन ते नेत्यांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले. पुरस्कारार्थींना व्यासपीठावरून खाली उतरण्याचाही मार्गदर्शनाचे कामही त्यांनीच केले. त्यांनी थेट कार्यकर्त्याचीच भूमिका निभावल्याने जाधवच आदिवासी सेवक झाल्याची चर्चा रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासासाठी फॉरेन्सिक अधिकारी दाखल

$
0
0

धुळे : शहरातील पाचकंदिल भागात रविवारी (दि. २६) घराला लागलेल्या आगीत शर्मा कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. यात ही घटना अपघात की, घात अशी शंका आल्याने पोलिसांनी सोमवारी (दि. २७) नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. या पथकाने घरातील काही नमूने घेतले आहेत. पथकाने गॅस सिलिंडरची तपासणी केली असता सिलिंडरचे रेग्यूलेटर सुरू असल्याने आग घरात पसरली, अशी माहिती पथकाने यावेळी दिली. सिलिंडर ठेवले होते त्याठिकाण्‍ााचे नमूने घेण्यात आले असून, लवकरच आग कशामुळे लागली हे निष्पन्न होईल, असे पथकाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनातून उलगडला शिक्षणाचा प्रवास

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी इंटरनॅशनल शाळेतील आयबीपीवायपी शिक्षणप्रणाली अंतर्गत असलेल्या प्रायमरी इयर प्रोग्राम (पीवायपी)चे विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे सादरीकरण केले. पीवायपीचे पाचवीचे शेवटचे वर्ष असते. या अनुषंगाने पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांनी शिकलेल्या पीवायपी शिक्षणाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच या अनुषंगाने प्रदर्शनही भरविण्यात आले होते. युरो किड्स प्ले स्कूलच्या संचालिका सुचित्रा माने यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना स्वत:च्या संकल्पना, ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन यांचे संकलन व्हिज्युअल, विडंबनात्मक लेख आणि आयसीटी सादरीकरणाद्वारे प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. या वर्षी विविध सामाजिक समस्यांवर आधारीत ‘हाऊ वुई ऑर्गनाइज अवरसेल्व्हज’ ही संकल्पना विद्यार्थ्यांनी घेतली होती. यात विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, वाहतूक, विपनण प्रणाली, चलन बंदी, आपत्ती व्यवस्थापन असे विषय निवडले होते. ते होण्याची कारणे आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम तसेच ते आटोक्यात आणण्यासाठीचे उपाय याचे विश्लेषण विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर सादर केले.

तसेच इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतील कविता, नाट्यछटा, एकांकिका आणि भाषणही सादर केले. यावेळी आयसीटीची आधुनिक तंत्रज्ञान कौशल्याच्या आधाराने गो अनिमेट, मुव्ही मेकर, प्रेझी, एडिटिंग म्युझिक व व्हिडिओ, कॉमिक मेकर टूल आदी वेब २.० व ३.० टूल्सचा वापर करुन मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे पालकांसाठी प्रश्नमंजूषा तयार करण्यात आली. तसेच त्यांची स्पर्धाही घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीगावात ५१ फुटांची गुढी

$
0
0

नाशिकरोड ः शिवसेनेच्या शिवकल्याणी महिला मंडळातर्फे देवळाली गावात आज सकाळी नऊ वाजता गुढी सन्मानाची उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी दिली. नदी, नीर, नारी यांच्या सन्मानार्थ ही ५१ फुटांची गुढी असेल. देवळाली गावातील ११ मंदिरांवर गुढी उभारली जाईल. यावेळी प्रभाग २२ मधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही होईल.

पंचवटीत स्वागत यात्रा

पंचवटी ः नववर्षाची स्वागत यात्रा पंचवटीतील आयुर्वेद महाविद्यालयातपासून सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी काढण्यात येणार आहे. त्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदिदी, महंत रामसनेहीदास महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज, योगगुरु अरुण एकबोटे, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आरोग्याबरोबर पर्यावरणही राखणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी , नाशिक

विज्ञानाची विशुद्ध निष्ठा, संशोधन ही ज्ञानप्रतिष्ठा! या विद्यापीठ गीतातील ब्रीदानुसार महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यंदाच्या पावणेचारशे कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात विद्यापीठाने संशोधनात्मक बाबींसाठी भरीव तरतूद करण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचाही मंत्र जपला आहे. विद्यापीठ परिसरातच सांडपाण्याच्या पुर्नवापरासह सौरदिव्यांच्या प्रकल्पांसाठी या अर्थ संकल्पात एकूण तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात विद्यापीठाने विविध मुद्द्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतानाच पर्यावरणासाठी यंदा उचलेल्या ठोस पावलांच्या भूमिकेचे स्वागत पर्यावरणप्रेमी वर्तुळातून होत आहे. विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी वाया जाते. हे पाणी प्रक्रिया करून विद्यापीठ परिसरातील उद्यानांसह विविध कामांसाठी पुन्हा वापरात आणता येणे शक्य असल्याचा अहवाल विद्यापीठाच्या पाहणीत आला.

या सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रकल्प उभारणीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. तर विद्यापीठाचा स्वतःचा सौरऊर्जा प्रकल्प करण्याचाही प्रस्ताव विद्यापीठासमोर होता. या प्रकल्पातून निर्मित ऊर्जेवरच विद्यापीठ चालण्यासाठी भरीव निधीची तरतूद अपेक्षित होती. यानुसार या प्रकल्पासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.



वित्तीय तूट दीड कोटींची

विद्यापीठाच्या सन २०१७-२०१८ चा अर्थसंकल्प प्रामुख्याने परीक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभाजित आहे. या अर्थसंकल्पात विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न ३७५.९७ कोटी रुपये अपेक्षित होते. उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च ३७७.३७ कोटी इतका अपेक्षित असल्याने वित्तीय तूट रुपये १ कोटी ४० लाख रुपयांची अपेक्षित आहे. वैद्यकीय शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव व नैराश्य वाढत असल्याचेही काही पाहणी निष्कर्ष आहेत. यामुळे या नोंदींची दखल घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी तब्बल २५ लाख रूपयांची तरतूद केली आहे. याशिवाय

डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संबंध चांगले असावेत यासाठीच्या संवाद कौशल्यांच्या प्रशिक्षणासाठीही २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना वाढत्या व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करणे विद्यापीठास भाग पडले आहे. भावी डॉक्टरांचा समाजातील सहभाग वाढावा यासाठी १० लाख रुपयांची तरतूद विद्यापीठाने केली आहे.



स्वतंत्र परीक्षा भवन

विद्यापीठाची प्रशासकीय इमारत कामकाजाच्या दृष्टिकोनातून अपूर्ण पडते आहे. यामुळे विद्यापीठ आवारातच स्वतंत्र परीक्षा भवनाचे बांधकाम प्रस्तावित आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून विद्यापीठाच्या गंगाजळीतून बांधकामासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-रिपाइं गटनोंदणी फेटाळली

$
0
0

स्थायी समितीचे गणित बदलले; शिवसेना जाणार हायकोर्टात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेतील स्थायी समितीची राजकीय गणिते बदलवणाऱ्या शिवसेना आणि आरपीआयची गट पुनर्नोंदणी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी फेटाळून लावली आहे. मुंबई प्रांतिक अधिनियम, १९४९ च्या कलम ३१ (अ) नुसार मह‌िनाभरात गट पुनर्नोंदणी करण्याची तरतूद असतानाही ती फेटाळण्यात आल्याने शिवसेना आता बुधवारी हायकोर्टात धाव घेणार आहे.
प्रशासनावर दबाव आणून भाजपने ही गट पुनर्नोंदणी फेटाळल्याचा आरोप शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे यांनी केला आहे. या निर्णयामुळे स्थायी समितीवर भाजपचे बहुमत होणार आहे. त्यामुळेच राजकीय जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे स्थायी समितीचा त‌िढा पुन्हा हायकोर्टात अडकण्याची शक्यता आहे.
महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, अपक्ष आणि आरपीआय सदस्यांच्या खेळीने स्थायी समितीतील भाजपचे गणित बिघडले आहे. तीन अपक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसोबत घरोबा करत गटनोंदणी केल्याने स्थायीमध्ये त‌िघांचे प्रत्येकी एक सदस्य जाणार आहे. संख्याबळानुसार सुरुवातीला भाजपचे नऊ तर शिवसेनेचे चार सदस्य जाणार होते. परंतु, आरपीआयच्या सदस्या दीक्षा लोंढे यांनी शिवसेनेसोबत गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातील अर्ज शिवसेनेच्या वतीने डवले यांच्याकडे पुनर्नोंदणीसाठी करण्यात आला होता.

शिवसेनेचा गाफिलपणा नडला

शिवसेनेने निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने घाईगडबडीत आपल्या ३५ सदस्यांची गटनोंदणी करून घेतली. सुरुवातीला भाजपचे ९ तर शिवसेनेचे ५ सदस्य स्थायीत जाणार होते. मनसेचे ५ सदस्य असल्याने त्यांचा सदस्य जाणार नव्हता. परंतु, त्यानंतर मनसेने अपक्ष सदस्याला सोबत घेऊन स्थायीत एण्ट्री केली. त्यामुळे शिवसेनेचे गणित बिघडले. स्थायी समितीतल्या गणिताचा अभ्यास न करताच गटनोंदणी केली. शिवसेनेचे नेते गाफिल राहिल्यानेच भाजप व मनसेने डाव साधल्याचे बोलले जात आहे.

भाजपने प्रशासनावर दबाव टाकला असून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. घटनेने अधिकार दिला असतानाही, त्याची पायमल्ली केली जात असून, याविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत.
-अजय बोरस्ते,
महानगरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाद उद्योजकांचा; वैताग अधिकाऱ्यांना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

दोन उद्योजकांमधील वादाने सातपूरमधील एमआयडीसी कार्यालयातील कर्मचारी ‘कामाला’ लागले आहेत. दोघा अधिकाऱ्यांकडून निव्वळ आपला स्वार्थ साधण्यासाठी माहिती अधिकाराचे अस्त्र वापरले जात आहे. त्यांना माहिती पुरवितांना अधिकाऱ्यांची मात्र धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) भूखंड मिळविण्यासाठी दोन उद्योजकांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र, त्याचा त्रास उद्योग भवनातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातील काही अधिकारी व कर्मचारी बदलीसाठी प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. स्थानिक लोकप्रतिनीधींनी यात लक्ष घालून चुकीचे काम करणाऱ्यांना रोखावे अशी अपेक्षा प्रामाणिक उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

‘एमआयडीसी’कडून भूखंड मिळविण्यासाठी उद्योजकांमध्ये चढाओढ लागली आहे. यातून अनेकदा उद्योजकांमध्ये वादही होतात. परंतु, त्यांच्यातील वादाचा परिणाम एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना होऊ लागला आहे. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर होत असल्याचे म्हणणे काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.
अनेकदा माहिती देण्यास उशीर झाल्यावर अपिलमध्येही जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उद्योगांच्या समस्या सोडविण्याऐवजी माहितीच्या अधिकाराचे काम करण्यात अधिक वेळ द्यावा जात असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील अमृतवृक्षांना संजीवनीची प्रतीक्षा...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अमृतवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडुनिंबाच्या झाडांनाच सध्या संजीवनीची गरज भासत असल्याची स्थिती शहरात दिसून येत आहे. हल्ली गुढीपाडव्यालाच आठवण येणाऱ्या कडुनिंबाच्या झाडांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. नाशिक-पुणे महामार्गासह सर्वच महामार्गांवरील कडुनिंबाच्या झाडांची सर्रास कत्तल झाली आहे.

नाशिकरोडला द्वारका ते सिन्नर दरम्यान कडुनिंबाची असंख्य झाडे होती. रस्ता रुंदीकरणात ती तोडण्यात आली. तशीच परिस्थिती शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा आणि नाशिक-औरंगाबाद मार्गावरील कडुनिंबाच्या झाडांची झाली आहे. ही झाडे तोडण्यात आल्यानंतर पुन्हा त्या जागी विदेशी झाडे लावण्यात आली आहेत. तीदेखील पुरेशी वाढलेली नाहीत.

चुकीचा वापर

बाजार समित्यांमध्ये अनेक शेतकरी क्रेटमध्ये टोमॅटो, वांगी व अन्य फळभाज्या वाहनांमधून घेऊन येतात. या भाज्या टिकाव्यात, त्यांना ऊन लागू नये म्हणून कडुनिंबाचा पाला मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात लोकाश्रय लाभलेल्या कडुनिंबाला आता शहराप्रमाणे खेड्यातही जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. फळबाजारांमध्येही असेच चित्र आहे.

औषधी गुणधर्म

कडुनिंबांचे अनेक गुणकारी उपयोग आहेत. त्यामुळे त्याला अमृतवृक्ष म्हटले जाते. कडुनिंबाची पाने गुढीला बांधतात. सायंकाळी गुढी उतरवल्यावर गुळासोबत कडुनिंबाचे एक पान तरी खातात. त्यामुळे रोगराई दूर होते, अशी धारणा आहे. ग्रामीण भागात मरीआईच्या यात्रेत कडुनिंबाचे डहाळे घेऊन देवीची मिरवणूक काढली जाते.

नाशिकरोडला काही समाज ही प्रथा पाळतात. कडुनिंबाच्या धुराने डास पळविले जातात. निंबोळ्यांचा साबणामध्ये उपयोग केला जातो. दातांच्या आरोग्यासाठीही कडुनिंबाचा उपयोग टूथपेस्टमध्ये अनेक कंपन्या करतात. ग्रामीण भागातही शेतीकामात कडुनिंबाचा वापर केला जातो.

नाशिकरोडला मोजकीच झाडे

द्वारकापासून उपनगरपर्यंत मोजकीच कडुनिंबाची झाडे राहिली आहेत. फेम सिनेमागृहासमोर (विजय-ममता) पाच-सहा झाडे तेवढी शिल्लक आहेत. पुढे उपनगरच्या सिग्नलजवळ तीन झाडे आहेत. त्यानंतर बिटको चौक येईपर्यंत कडुनिंबाचे झाडच नाही. दत्त मंदिर चौकातील वाहतूक बेटावर निंबाचे एक झाड तग धरून आहे. लष्करी हद्दीत आणि नाशिकरोड प्रेस व गांधीनगर प्रेसच्या आवारात कडुनिंबाची काही झाडे आहेत. सिन्नर फाटा ते संगमनेरदरम्यान कडुनिंबाची भरपूर झाडे होती. आता रस्ता रुंदीकरण सुरू झाल्याने ती सगळी तोडण्यात आली आहेत. नावालाही कडुनिंबाचे झाड पुण्यापर्यंत पाहायला मिळत नाही, याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरही हीच परिस्थिती आहे. नाशिकच्या गावठाण भागात चाळी व जुनी घरे पाडून इमारती बांधल्या जात आहेत. त्यावेळीही पहिला घाव कडुनिंबावरच पडत आहे.


कडुनिंबाची पाने, साल, निंबोळ्या या सर्वांत औषधी गुणधर्म आहेत. कडुनिंबाच्या पानांचा रस पोटातील कृमींचा नाश करणारा, कफनाशक, रक्तशुद्धी करणार आहे. पिंपल्सपासून सोरायसीपर्यंतच्या आजारावर तो उपयोगी आहे. अंगात उष्णता जास्त असेल किंवा खाज सुटली असेल, तर कडुनिंबाच्या रसाने आराम पडतो.

- वैद्य राहुल सावंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज नववर्षारंभ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चैत्राची सुरुवात ज्या दिवसाने होते तो गुढीपाडवा. या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडव्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. पाडव्यानिमित्त होणाऱ्या उलाढालीसाठी विक्रेत्यांनी तयारी केली आहे.
गुढीपाडव्याला आनंदाचे प्रतीक म्हणून घरादाराला आंब्याची तोरणे बांधतात, फुलांच्या माळांनी घर सजवतात. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे.
कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.

अशी करा पूजा

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढी उभी करावी. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे. तिच्यावर कोरे कापड (खण)चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडुनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. गुढीला ब्रह्मध्वजही मानतात. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटकोंडी अखेर फुटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून शासनदरबारी पडून असलेला कपाटांचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तांत्रिक अडचणीत अडकलेल्या कपाटांचा प्रश्‍न नव्याने मंजूर झालेल्या अतिरिक्त एफएसआय व साडेसात मीटर रस्त्यांची रुंदी वाढविण्याच्या पर्यायातून सुटू शकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १५ टक्क्यांपर्यंत एफएसआयचा वापर करून आणि हार्डशिप प्रीमियमच्या मदतीने कपाटकोंडी फोडण्याचा क्रेडाईचा प्रस्ताव महापालिका प्रशासन सरकारकडे सादर करणार आहे. सरकारने नियमावलीत दुरुस्ती केल्यानंतर शहरातील जवळपास ७० टक्के कपाटांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, संरक्षक भिंतीमुळे टीडीआर शिल्लक असलेल्या टीडीआरधारकांना दिलासा देण्याचा आणि २४ मीटरपर्यंतच्या बांधकामाची अग्निशमनच्या परवानगीपासून सुटका करण्याचा निर्णय झाला आहे.

शहराच्या नव्या विकास नियंत्रण नियमावलीतील जाचक तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी आयुक्तांमार्फत शासनाला प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. क्रेडाई आणि महापालिका प्रशासनात झालेल्या समझोत्यानुसार सोमवारी क्रेडाई आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये दुसरी बैठक झाली. आयुक्त अभिषेक कृष्णा, नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे, सहाय्यक संचालक नगररचना आकाश बागुल, कार्यकारी अभियंता संजय घुगे, मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी प्रशासनाच्या वतीने, तर क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, आर्किटेक्‍ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप काळे, विजय सानप, चारुदत्त नेरकर, रवी महाजन, विवेक जायखेडकर, योगेश महाजन, ऋषीकेश पवार, हेमंत दुग्गड, कृणाल पाटील आदींनी भूमिका मांडल्या. नव्या डीसीपीआरमध्ये सर्वच रस्त्यांवर दहा टक्के वाढीव एफएसआय व पाच टक्के अतिरिक्त बाल्कनी क्षेत्र मंजूर केले आहे. या १५ टक्के अतिरिक्त एफएसआयच्या आधारे मंजूर कपाटांशिवाय बांधलेल्या अतिरिक्त क्षेत्रावर तोडगा काढण्याचा प्रस्ताव क्रेडाईने दिला, तसेच हार्डशीप प्रीमियमचा आधार घेऊन व प्रीमियम दंडाची रक्कम लावून ते नियमित करण्याचा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आहे. त्यामुळे बहुतांश कपाटांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता.

नवीन नियमानुसार टीडीआरची प्रकरणे मार्गी लावताना करारातील अटी-शर्तींप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे संरक्षक भिंत उभारल्यास उर्वरित टीडीआर प्राप्त करून घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, डीपीरोड म्हणून समाविष्ट झालेल्या रस्त्यांना टीडीआरचा लाभ मिळणार नाही. सहा व साडेसात मीटर रस्त्यावर टीडीआर प्रस्तावित नसल्याने अनेक रस्त्यांवर इमारत बांधकाम करताना अडचण येणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठराविक अंतर सोडण्यास अनुकूलता दर्शविण्यात आली. पुणे शहराप्रमाणेच नाशिकमध्येही पार्किंग, बाल्कनी, सामासिक अंतरांबाबत नियम अंतर्भूत करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.


२४ मीटरपर्यंत नो परवाना

महाराष्ट्र फायर अॅक्ट, नॅशनल बिल्डिंग कोड, जुनी व नवीन विकास नियमावली या सर्वांचा आधार घेत विविध अंगांनी चर्चा झाली. त्यावर आयुक्तांनी चोवीस मीटर उंचीपर्यंत संपूर्ण रहिवासी असलेल्या इमारतीला अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचा प्रचंड वेळ व पैसा वाचणार आहे. पंधरा मीटर ते चोवीस मीटरपर्यंतच्या इमारतींना अग्निशमन उपकरणे लावणे बंधनकारक राहणार आहे. चोवीस मीटर उंचीवरील इमारती व नियमावलीतील विशेष इमारतीच्या व्याख्येत येणाऱ्या इमारतींना मात्र अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे. पण, हॉस्पिटल, शैक्षणिक या विशेष इमारतींना फायर ब्रिगेडची परवानगी आवश्यक असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. वीस हजार चौरस मीटरवरील इमारतींना सांडपाणी व्यवस्था करणे बंधनकारक राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलची प्रतिमा बदलून देणार नवा चेहरा

$
0
0

नाशिकरोड येथील सेंट्रल जेल अनेक कारणांनी प्रकाशझोतात असते. एकाच महिन्यात चाळीस मोबाइल सापडणे किंवा कर्मचारी-अधिकाऱ्यांवर हल्ले या कारणांनी जेल जसे चर्चेत असते, तसेच राज्यातील सर्वांत जास्त महसूल मिळविणारे, योग प्रशिक्षक कैद्यांची देशातील पहिली बॅच घडविणारे कारागृह अशा विधायक उपक्रमांनीही हे जेल चर्चेत असते. राजकुमार साळी या खान्देशच्या सुपुत्राकडे सध्या या जेलची सूत्रे आली आहेत. विविध उपाययोजना करून या जेलची प्रतिमा बदलून नवा चेहरा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.

जेलमध्ये मोबाइल, गांजा नियमितपणे सापडतात. शिस्त लावण्यासाठी काय करणार?

पहिल्या दिवशी मी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वेळेवर कामावर येण्याच्या सूचना दिल्या. रात्र पहारेकरी (निळी टोपी) आणि सिद्धदोष अन्वेषक (वॉर्डर) यांना शासकीय पगार मिळतो. त्यांनाही अॅलर्ट राहण्याचे आदेश दिले. आक्षेपार्ह घटना घडल्यास रात्री-अपरात्री कधीही माझ्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. मी स्वतः ६३ एकर जेलचा प्रत्येक कोपरा नजरेखालून घालत आहे. जेलचा कारभार पारदर्शी होईल, असा माझा प्रयत्न आहे.

जेल आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काेणत्या उपाययोजना करणार?

कैद्यांकडून हल्ले व मानसिक ताणामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे. मी मासिक बैठक घेऊन त्यांना नवा आत्मविश्वास दिला आहे. ड्युटीवर असताना कैद्याकडे मोबाइल सापडल्यास आपण निलंबित होऊ, ही भीती कर्मचाऱ्यांच्या मनात असते. त्याचा गैरफायदा कैदी घेतात. कर्मचाऱ्यांच्या मनातील ही भीती मी काढली आहे. जेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून ड्युटी करण्याच्या कडक सूचना केल्या आहेत.

नाशिकरोड जेलमध्ये नवीन फाशी यार्ड कधी होणार?

फाशी यार्ड सुरू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. शासन स्तरावर लवकरच कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

नाशिकरोडला ११३ एकरमधील खुले कारागृह कधी साकारणार?

सध्या पैठणला खुले कारागृह आहे. त्यासाठी वेगळे बांधकाम केलेले आहे. नाशिकला तसे नाही. नाशिकरोडला खुले कारागृह सध्या सुरू आहेच. परंतु, त्याचे आकारामान छोटे आहे. त्यासाठी वेगळे बांधकाम झालेले नाही.

जेलचा महसूल वाढविण्यासाठी काय उपायोजना करणार?

महसूल उत्पादनात नाशिकरोड जेल राज्यात आघाडीवर आहे. महसूलवाढीसाठी कर्मचाऱ्यांना मार्केटिंगचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच, नवीन उपाययोजना करण्याचाही विचार आहे.

कैद्यांच्या आरोग्याचे काय?

कैद्यांसाठी सध्या दोन डॉक्टर जेलमध्ये आहेत. महिला कैद्यांसाठी महिला डॉक्टर नाही. त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. आणखी वैद्यकीय स्टाफ उपलब्ध व्हावा आणि दवाखाना अद्ययावत व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहेत. कैद्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी गळाभेट, नातेवाइकांना थेट फोन या सुविधा सुरूच आहेत.

कैद्यांच्या आहाराच्या दर्जाबाबत तक्रारी आहेत...

आहार चांगला असेल, तर आचार आणि विचार चांगले राहण्यास मदत मिळते. जेलमधील कैद्यांच्या जेवणाचा दर्जा वाढविण्यात येईल. पोषक आहार मिळेल, याकडे लक्ष दिले जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने किचन सुधारणार आहे.

व्हीसी सुविधा व जॅमर सुरू आहेत का?

कैद्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी व्हीसी सुविधा सुरू आहे. मोबाइलला अटकाव करणारे जॅमर बसविलेले असले, तरी त्यांची रेंज कमी आहे. त्यामुळे अधिक क्षमतेचे जॅमर बसविणार आहे.

कैद्यांना पॅरोल, रजा मिळत नाही, अशी तक्रार आहे...

पॅरोलचे व रजेचे अर्ज पेंडिंग आहेत. विभागीय आयुक्तांना भेटून प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कैद्यांचा असंतोष कमी होईल. न्यायालयात व दवाखान्यात कैदी नेण्यासाठी पुरेसे पथक उपलब्ध करावे, यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

जेलच्या निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा केव्हा घेणार?

याबाबतची कारवाई शासनाने केली आहे. शासनच याबाबत निर्णय घेईल.

जेल कर्मचारी निवासस्थाने मोडकळीस आली आहेत...

याबाबत शासनाला मी विनंती करणार आहे. पालकमंत्र्यांची भेट घेऊन कर्मचारी निवासस्थांसाठी ग्रँट देण्याची विनंती करणार आहे. जेलभोवती नवीन तट बांधणार आहे.

(शब्दांकन ः डॉ. बाळकृष्ण शेलार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बंदोबस्तात ‌जमिनींची मोजणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नागपूर-मुंबई या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोध असूनही शासन व प्रशासनाने पोल‌िस बंदोबस्तात या महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम सुरू केले. सोमवारी घोटी परिसरातील औचितवाडी-कांचनगाव शिवारात महामार्गाच्या जमिनीसाठी मोजणी सुरू असताना महामार्गविरोधी कृती समितीच्या पदाध‌िकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी मोजणीस घटनास्थळी हरकत घेतली. मात्र प्रांताधिकारी व पोल‌िस यंत्रणेने या शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

काही स्थानिक शेतकऱ्यांना पोलिसांनी प्रत‌िबंधाकात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतले. प्रांताधिकारी व तहसीलदार मोजणीस्थळी तळ ठोकून आहेत.गेल्या दोन दिवसांपासून नागपूर-मुंबई या प्रस्तावित महामार्गाच्या भूसंपादनासाठी इगतपुरी तालुका हद्दीत जमीन मोजणीचे काम सुरू झाले आहे. धामणगाव, कवडदरा या परिसरात मोजणी करून मोजणीचे पथक सोमवारी औचीतवाडी, कांचनगाव या परिसरात दाखल झाले. प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली घोटीचे पोल‌िस निरीक्षक प्रभाकर पाटील, इगतपुरी पोल‌िस निरीक्षक संजय शुक्ला यांच्यासह दोन महिला पोल‌िस अधिकारी व राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या असा जवळपास ७० ते ८० पोल‌िस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या मोजणीसाठी घटनास्थळी तैनात होता.

शेतकऱ्यांना घेतले ताब्यात

दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मोजणी होणार, नाही अशी ग्वाही देवूनही प्रशासनाने चौवीस तासात मोजणी सुरू केली. त्यामुळे महामार्ग विरोधी कृती समितीचे लक्ष्मण तात्या गव्हाणे, भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, दौलतराव दुभाषे आदींसह कांचनगाव–औचितवाडी या शिवारातील शेतकऱ्यांनी या मोजणीस हरकत घेवून शेतकऱ्यांना न्याय दया, असे आवाहन करून मोजणी बंद करण्याची विनंती केली. यावेळी प्रारंभी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी या शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. या पदाधिकाऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांनी मोजणीस्थळी येवून पोलिसांना विनंती केली. पोल‌िस अधिकारी घोगरे यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढत तुम्ही शासन प्रतिनिधी व लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून दाद मागण्याचे नमूद केले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी कृती समितीचे भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, दौलतराव दुभाषे, रामदास गव्हाणे, बंटी गव्हाणे, गोरख दुभाषे आदींना बसवून ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी अटकेत

$
0
0

धुळ्यातील घटना; दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिक्षण संस्थामध्ये नियुक्या करताना नियमांचा भंग केल्याप्रकरणी तक्रारदाराला गुन्ह्यात आरोपी करू नये, यासाठी धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांनी साडेतीन लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी तक्रारदाराकडून दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांना मंगळवारी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक, मान्यता व संबंधितांच्या आस्थापनांचे काम गेल्या तीन वर्षांपासून संबंधित तक्रारदाराकडे आहे. सन २००७ ते २०११ या कालावधीत शैक्षणिक संस्थांमध्ये कायम आरक्षित, खुल्या व इतर पदांवर नियुक्त्या करताना, संबंधित तक्रारदाराने नियमांचा भंग केला होता. याप्रकरणी चौकशी करून उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी २४ फेब्रुवारीला तक्रारदाराविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराचे आरोपी म्हणून नाव न टाकण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती दोन लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना नंदुरबार जिल्हा लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा काढता पाय

शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यानंतर काही वेळाने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिक्षकांनी गर्दी केली होती. अजून काही लाच घेणारे कर्मचारी व अधिकारी या कार्यालयात आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी चर्चा दबक्या आवाजात शिक्षकांमध्ये सुरू होती.

चांगला अधिकारी हवा

धुळ्यात आतापर्यंत कारवाई झालेले प्रवीण पाटील हे सातवे माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत. यापूर्वी जे. के. ठाकूर, जी. के. पाडवी, भगवान सूर्यवंशी, जी. एन. पाटील, डी. एल. साळुंखे आणि परचुरे अशा सहा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर कोणत्या ना कोणत्या कारणाने निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे आता तरी शिक्षण विभागात प्रामाणिक अधिकारी येणे गरजेचे आहे, अशी मागणी शिक्षकांनी ‘मटा’शी बोलताना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदारांचे निलंबन मागे घ्या

$
0
0

धुळे : शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी आवाज उठवल्यामुळे भाजप सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले. यात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या आमदार कुणाल पाटील यांना निलंबित केल्याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. २३) धुळे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन करण्यात आले. यावेळी आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, याविषयी त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. याप्रसंगी शहराध्यक्ष युवराज करणकाळ, साबीरशेठ, मुजफ्फर हुसेन, इस्माईल पठाण, अफसर पठाण, वेणूबाई शिरसाठ, भिवसन अहिरे, सदाशिव पाटील, संजय बैसाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे बार असोसिएशनच्या वकिलांकडून निषेध

$
0
0

धुळे : गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील फाशीपूल चौकाजवळ गटारीचे काम रखडलेले आहे. या कामाची स्थिती कधी सुरू तर कधी बंद अशी आहे. यामुळे सहा महिन्यांपासून वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांना मोठा संघर्ष वाहन चालवितांना करावा लागत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी धुळे बार असोसिएशनच्या वकिलांनी बुधवारी फाशी पूल चौकात गटारीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन केले. मनपा विभागाकडे नागरिकांनी मनपाकडे तक्रार करूनही गटारीचे काम पूर्ण करण्यात येत नाही, अशी तक्रारही यावेळी करण्यात आली. यावेळी अॅड. शामकांत पाटील, अॅड. समीर सोनवणे, अॅड. मधुकर भिसे, अॅड. अमित दुसाणे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट मुंबईला

$
0
0

धुळ्यातील आरोपीच्या गळफासप्रकरणी सीआयडी तपासाला गती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील शासकीय हिरे महाविद्यालयातील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली होती. यातील संशयित आरोपी प्रदीप वेताळ याने पोलिस ठाण्यातच आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सीआयडीने पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि मृत प्रदीपचे डीएनए रिपोर्ट तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहेत. तर इतर संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

डॉक्टर मारहाणीच्या चौकशीत सीआयडी विभागाने शहर पोलिस ठाण्यातील चार गार्ड कर्मचारी, दोन ऑफिस पहारा कर्मचारी, एक सीसीटीएनएस कर्मचारी, मृताचे दोन नातेवाईक, तपासी अंमलदार राजेंद्र माळी यांची चौकशी केली आहे. तसेच मृताच्या शरीरातील काही अंश धुळ्यातील पॅथोलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे. यापुढे १२ जणांचे जवाब घेण्याचे बाकी असून, ते घेतल्यानंतर व सर्व तपासणीचे अहवाल आणि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाला चालना मिळणार असल्याची माहिती धुळे सीआयडी विभागाने दिली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय अधिकारी गणेश चौधरी, कर्मचारी नरेंद्र कुलकर्णी, मनोहर जाधव, उमेश येवलेकर, शरद काटके, सुरेश भालेराव हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर्स सेवेत

$
0
0

‘आयएमए’च्या संपाचे धुळ्यातही संमिश्र पडसाद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

येथील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. दोन दिवसानंतर नाशिक व ठाण्यातील रुग्णालयातही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडल्या. यामुळे आता ‘आयएमए’सह निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र, धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सर्व डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील सर्व डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, डॉक्टरांच्या मारहाणीच्या घटनेला धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरुवात झाली. त्याठिकाणी मात्र सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी कामावर आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सर्व डॉक्टर्स हे काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. तसेच शहरातील सुमारे तीनशेहून अधिक खासगी रुग्णालयांनी बुधवारी (दि. २२) बंद ठेवून राज्यातील काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांनी माघारी परतावे लागले.

दुसरीकडे राज्यातील निवासी डॉक्टरांवर सरकारने चालविलेली निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ आयएमए संघटनेने खासगी रुग्णसेवा बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत हा संप सुरूच होता. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा असल्याची माहिती धुळ्याच्या आयएमए अध्यक्षा विजया माळी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्‍ाुळ्यात आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या पाच कंदील परिसरातील घराला अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कापड बाजाराच्या बाजूला राम शर्मा यांच्या घराला रविवारी (दि. २६) पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास आग लागली. यात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेबद्दल पोलिसांनी घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला आहे. घटनास्थळी तत्काळ अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळीसह अधिकारी दाखल झाले होते.

शहरातील शिवाजी मार्केट व अकबर चौकात यामधील धनादाळ बोळीत राम शर्मा हे पत्नी, आई व दोन मुलांसोबत दुमजली घरात होते. या घरात ये-जा करण्यासाठी एकच दरवाजा होता. इतर तिन्ही बाजूनी भिंती असल्याने घरातील एकाही व्यक्तीला घराबाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत राम शर्मा (वय ४५), शोभाबाई छबूलाल शर्मा (वय ६२), जयश्री शर्मा (वय ३५), साई राम शर्मा (वय १२) आणि राधे राम शर्मा (वय १०) यांचा मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र पोलिसांनी काही घातपात आहे का? या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचा बंब उशिरा आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. घटना घडल्यानंतर बऱ्याचवेळा अग्निशमन विभागाला फोन केल्यावरही बंब दाखल झाला नाही. वेळेवर बंब आला असता तर कोणाचा तरी जीव वाचवता आला असता, अशी माहिती स्थानिकांनी दिली.


अग्निशमन विभाग सुस्त

शहरात गेल्या वर्ष दोन वर्षांच्या कालावधीत आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला नागरिकांनी फोन केला त्यावेळी ते कधीच वेळेवर पोहोचलेले नाहीत. रविवारीही, आगीच्या घटनेत अग्निशमन बंब वेळेवर पोहाचले नाही. त्यामुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. सुस्त अग्निशमन विभागाला शहरातील सर्व परिसरांची अर्धवट माहिती असून, चालक व कर्मचारी यांचा कोणताही परिपूर्ण अभ्यास नाही. सेफ्टी म्हणून गणवेश, शूज, टोपीही नाही. मनपाने अग्निशमन विभागात तात्पुरते कंत्राटी तत्त्वावर अप्रशिक्षित तरुणांना कामावर नियुक्त केले आहे. त्यामुळे आता प्रशिक्षित अनुभवी व रस्त्यांची माहिती असणारे कामगार नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

मुस्लिम बांधवांच्या प्रयत्नांना अपयश

राम शर्मा हे राहत असलेल्या ठिकाणी अकबर चौक आहे. त्याठिकाणी मुस्लिम बांधव रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलेले असतात. रात्री दीड ते दोनच्या सुमारास शर्मा यांच्या घरातून ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज येत असल्याचे काहींच्या लक्षात आले आणि त्यांनी शर्माच्या घरांकडे धाव घेतली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी तत्काळ मनपा अग्निशमन विभागाला फोन करून बंबाची मागणी केली. तर काहींनी वीज वितरण कंपनीला घटनेची माहिती देऊन वीजप्रवाह खंडित करण्यात आला. हे सर्व मदत कार्य सुरू होते. मात्र आगीने उग्ररूप धारण केल्याने घरात प्रवेश करणे शक्य नसल्याने बंबाची वाट पाहावी लागली. अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर तब्बल अर्धा तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत शर्मा यांच्या कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images