मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात अवघे २२ टक्के सर्वेक्षण झाले आहे. नाशिक जिल्हा राज्यात सर्वात पिछाडीवर आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे सर्वेक्षणात अडथळे येत असल्याच्या निष्कर्षापर्यंत जिल्हा प्रशासन आले असून यापुढे पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, राहुल पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक गिरे आणि दत्तात्रय घोगरे आदी उपस्थित होते. समृध्दी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी गावागावातून सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. परंतु, या सर्वेक्षणाला ठिकठिकाणी विरोध होत असून जमीन मोजणीच्य कामात व्यत्यय येऊ लागला आहे. हे अडथळे दूर व्हावेत आणि प्रशासनाला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करता यावे यासाठी ग्रामीण पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यापुढे महसूल आणि पोलिस विभागाच्या समन्वयातून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. समृध्दी महामार्गासाठी भूमी अभिलेख विभागाद्वारे जागेची मोजणी करण्यात येत आहे. परंतु, या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने मोजणी करण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थ पिटाळून लावत आहेत. सर्वेक्षणाचे काम रखडल्याने प्रकल्प मुदतीत कसा पूर्ण होणार असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला. मराठवाडा, कोकण, विदर्भात सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. सरकारकडून प्रशासनावर दबाव वाढत आहे. या प्रकल्पाला आणि सर्वेक्षणाला होणारा शमविण्यासाठी सर्वेक्षणवेळी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या समन्वयातून ग्रामस्थांशी चर्चा करूनच कार्यवाही करा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न
मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून जातो. २४ जिल्ह्यांमध्ये या महामार्गासाठी सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. नाशिक आणि औरंगाबाद वगळता अन्य जिल्ह्यांनी गती घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात अवघे २२ टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यात या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने पोलिसांची मदत घेऊन सर्वेक्षण लवकर आटोपण्याचा निर्णय घेतला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट