सूर्याच्या अस्तित्त्वापासून व पृथ्वीच्या निर्मितीपासून आदिवासींची जीवनप्रणाली अविरत सुरू आहे. बहुजन समाजाकडून आदिवासींचे नेहमीच शोषण होत आले आहे. व्यवस्थेतील हा भेदाभेद ज्यादिवशी मिटेल तो सोनियाचा दिनु असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वाहरू दादा सोनवणे यांनी व्यक्त केले.
लोकलढा सांस्कृतिक चळवळ, आदिवासी भटके, ओबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक आयोजित पहिले दलित साहित्य संमेलन पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात रविवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाहरू सोनवणे बोलत होते. साहित्य संमेलनात अनेक नामवंत साहित्यिकांनी विचार मांडताना आदिवासी भटके दलित आणि ओबीसी सर्वांनी आपापल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासठी संघटीत होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. सोनवणे यांनी आदिवासींची आधीची जीवन प्रणाली, संपत्ती, बहुजन समाजाकडून होणारे शोषण, शासन व्यवस्था,
श्रमाची निर्मिती, कुटुंबव्यवस्था, श्रीयांची आभूषणे, पुरुषप्रधान संस्कृती, आदिवासी यांच्यातील संघर्ष, व्यवस्थेतील भेदाभेद याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात अनुभवी आणि नवोदित कवींचे कवी संमेलन झाले. या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी लोकांनी जलसा आणि आदिवासी समूहनृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पहिल्या सत्रात मुंबई मंत्रालयातील अप्पर सचिव अंबादास चंदनशिवे, विक्रीकर विभागाचे सहआयुक्त कैलास चतुर, नगरसेवक दामोदर मानकर यांनी विचार मांडले.
दुसऱ्या सत्रात 'आजचा सांस्कृतिक दहशतवाद आणि दलित, आदिवासी भटके, ओबीसी कष्टकऱ्यांच्या एकजूटी समोरील आव्हाने' या विषयावर जेष्ठ विचारवंत कुमार शिरवळकर, प्रा.राजेश ढवळे (नांदेड), प्रा.सचिन गरुड (इस्लामपुरा), प्रा.डी.ए.दळवी (मुंबई) यांनी आपले विचार मांडले. यावेळी कवी विजयकुमार मीठे, कवी तुकाराम धांडे, प्रा.गंगाधर अहिरे यांच्यासह रवींद्र मालुंजकर, मनीषा पिंगळे, रमेश भोये, सोमनाथ भावे, सचिन गांगुर्डे, राजेश जाधव, देवदत्त चौधरी, प्रमोद अहिरे, हेमंत भोये, प्रमोद देशमुख, प्रशांत केंदळे यांनी विविध कविता सादर केल्या. पुंडलिक भोये, विठ्ठल शिंगरे आदिंनी जलसा सादर केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट