म. टा. प्रतिनिधी, नाशिक
यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे चौदा हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. याचा परिणाम आता कांदा दरवाढीवर झाला आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा कमाल चार हजार रुपये क्विंटलने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये दराने ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे. यंदा नवीन लागवडही खोळंबल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
सध्या बाजारपेठेत मार्च-एप्रिलमध्ये साठलेला कांदा बाजारात येत आहे. व्यापारी व काही मोठ्या शेतकऱ्यांकडेच फक्त कांदा उपलब्ध असल्याने बाजारभाव वाढले आहेत. गेल्या आठवड्यापासून कांद्याने चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी लासलगाव व पिंपळगाव बसवंत या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याला कमाल चार हजार रुपये भाव मिळाला. आवक घटल्याने तसेच मागणी वाढल्याने कांदा दरात वाढ झाली आहे. सध्या कर्नाटकातूनही कांदा आवक होत नसल्याने त्याचाही परिणाम भाववाढीवर झाला आहे.
कांद्यावरील निर्यातमूल्य वाढवूनही दर आवाक्यात आणणे कठीण झाले आहे. बुधवारी लासलगावमध्ये कांद्याला किमान २१००, कमाल ३९०० तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. पिंपळगाव बसवंतमध्ये किमान २२००, कमाल ४०१६ तर सरासरी ३६५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सटाणा, येवला, मनमाड, कळवण आदी बाजारपेठांमध्ये कांद्याला सरासरी ३५०० रुपये भाव मिळत आहे.
नाफेडचा कांदा रवाना
नाफेडने मार्च-एप्रिलमध्ये पिंपळगाव व लासलगावमध्ये कांदा खरेदी करून वेअर हाऊसमध्ये साठवला आहे. राजधानी दिल्लीसह व इतर मोठ्या बारा शहरांमध्ये नाफेडतर्फे कांदा पाठविला जाणार आहे. दिल्लीसाठी कांद्याचे ट्रक रवाना झाले असून, इतर शहरातही लवकरच कांदा पाठविला जाणार आहे.
भाववाढीचे गमक
किरकोळ बाजारात नाशिक बाहेर सद्यस्थितीत कांदा पन्नास रुपये किलोने विकला जात आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमाल चार हजार रुपये भाव मिळत असला तरी फक्त चार ते पाच ट्रॅक्टरांना हा दर मिळत आहे. किमान भाव हा दोन हजाराच्या आतबाहेरच आहे. यामुळे चार ते पाच ट्रॅक्टरांना मिळालेल्या दरानुसारच किरकोळ बाजारात कांदा विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. मात्र, याचा फटका शेतकरी व ग्राहकांना बसत आहे. हमीभाव नसल्याने ही झळ सोसावी लागत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट